शनिवार, २३ जुलै, २०२२

गुरू

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाज माध्यमांवर अनेक पोस्ट पाहण्यात आल्या. त्यात थोड्याशा पोस्ट निराळ्याही होत्या. जे. कृष्णमूर्ती, गाडगेबाबा यांना उद्धृत करून गुरू वगैरे नकोत/ नसावेत असं सांगत विरोधी सूर लावणाऱ्या. त्याला काहीच हरकत नाही. सगळ्यांनी गुरू ही गोष्ट मानलीच पाहिजे असं नाही. पण सहज मनात आलं - आपलं मत मांडताना कृष्णमूर्ती किंवा गाडगेबाबा किंवा आणखीन कोणाचे दाखले देणं हे एका अर्थी गुरूतत्त्वाला, गुरूभावाला मान्यताच देणं नाही का? आधुनिक विचारपद्धतीमुळे माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीच बिघडवल्या आहेत. त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल. कारण कळत वा नकळत 'गुरू' आयुष्यात असतातच आणि त्यांच्याबद्दल स्वाभाविक आदर आणि कृतज्ञता ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. १+१= २ इथपासून तर समग्र अस्तित्वाच्या कोड्यापर्यंत आपल्या असंख्य जीवनजाणिवा विकसित करतात ते गुरू. हे गुरू कोण टाळू शकणार? कोण नाकारू शकणार? बाकी फसवणूक, बुवाबाजी वगैरे वेगळे विषय. ते सगळीकडेच असतात अन ते चूकच आहे. पण त्यासाठी गुरू या विषयाबद्दल नकारात्मकता बरोबर वाटत नाही. अर्थात प्रत्येकाचा आपापला विचार.

आध्यात्मिक विकासाच्या (जाणीव विकासाच्या) एका टप्प्यावरही भक्त, भक्ती, भगवान; ध्येय, ध्याता, ध्यान हे सगळं एकच होतं. तिथे गुरू शिष्य वेगळे कुठे राहणार? व्यावहारिक शास्त्रातही विकासाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यावर मागचे गुरू सुटत जातातच. प्रसंगी irrelevant सुद्धा होतात. पण कच्चा माल अन finished product हा फरकही समजून घ्यायला हवाच नं. कच्च्या माणसाचा पिकलेला माणूस तयार होण्यातली गुरुची भूमिका डोळ्याआड करून कसे चालेल?

- श्रीपाद कोठे

२४ जुलै २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा