शुक्रवार, ८ जुलै, २०२२

वाहिन्यांच्या चर्चा

मी एकाला सहज विचारलं, वृत्तवाहिन्यांचे लोक रोज इतक्या चर्चा वगैरे करतात. हे कसं काय शक्य होत असेल? अभ्यास, वाचन आणि बोलणे याशिवाय दुसरं काहीच हे करत नाहीत का? कारण तेवढा वेळ तर द्यावाच लागेल ना. इतक्या कमी वयात इतके ज्ञान म्हणजे कौतुकच करायला पाहिजे.

माझ्या बोलण्यातील खोच त्याला कळली अन झोंबली पण. माझ्या बोलण्यावर तो म्हणाला- ज्ञानेश्वर तरी फक्त २१ वर्षांचेच होते ना? अन शंकराचार्य फक्त ३२, तर स्वामी विवेकानंद फक्त ३९ वर्षच ना?

त्याला वाईट वाटेल म्हणून मनातल्या मनात म्हणालो- ज्ञानेश्वर फक्त २१ वर्षांचे असू शकतात, पण २१ वर्षांचे ज्ञानेश्वर असतात असे नाही.

मी मौन आहे असे पाहून त्याला आणखीन स्फुरण चढले. म्हणाला- अन पुष्कळ जण असतात ना. सगळे मिळून विचार करतात, तयारी करतात.

मला जणू अंतर्मुख करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. मी पुन्हा मनातल्या मनात तुकोबांची आठवण केली अन गुणगुणलो, `सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता...'

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा