मंगळवार, १२ जुलै, २०२२

पावनखिंड

१३ जुलै १६६०, तिथीनुसार आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा), रोजी पावनखिंडीची अद्भुत आणि अद्वितीय लढाई झाली. शौर्य, त्याग, स्वामिनिष्ठा, शब्द देणे म्हणजे काय याचं मूर्तिमंत चित्र जगाला पाहायला मिळालं. अन याच त्याग आणि बलिदानाने घोडखिंडीची पावनखिंड झाली. पन्हाळ्याला गेलो तेव्हा साहजिकच घोडखिंडीला पावनखिंड करणाऱ्या बाजीप्रभूंना अभिवादन केले. माझ्यासोबत कोल्हापूरला अभियांत्रिकीला शिकणारा माझा भाचा होता. मी वर चढून बाजीप्रभूंना नमस्कार केला तेव्हा त्याला थोडी गंमत वाटली. बदललेल्या वातावरणाचा त्यालाही स्पर्श झालेलाच ना. अन तसेही पन्हाळा काय किंवा सिंहगड काय किंवा अन्यत्र काय इतिहास, धर्म, संस्कृती, भाव, विचार, भावना वगैरेपेक्षा `टुरीस्ट'च जास्त. प्रणाम करून खाली उतरलो. आजूबाजूचे लोकही पाहत होतेच. सहज बोलत भाच्याच्या खांद्यावर हात टाकला अन थोडे मोठ्याने, सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो, `अरे, त्यांच्याच बलिदानामुळे आम्ही आज ताठ आहोत.' या एकाच वाक्याचा परिणाम पुढच्या १५ मिनिटातच पाहायला मिळाला. पन्हाळा उतरताना पायथ्याच्या गावाला जंगलात `शिवा न्हाव्याचे' स्मारकही आहे. या शिवानेच शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन शत्रूला हूल दिली होती. खाली उतरताना या स्मारकावरही गेलो. तेव्हा मी काही म्हणण्याच्या आधीच आमचा मावळा (भाचा) शिवाच्या समाधीजवळ गेला. त्याने ती साफ, स्वच्छ केली. शेजारी फुलांची खूप झाडे. त्याची फुले तोडली. समाधीवर वाहिली आणि नमस्कार केला. आणखी काय हवे?

- श्रीपाद कोठे

१३ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा