मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

आप्तांशी लढाई

एका पोस्ट वरील प्रतिक्रिया -

जीवनाचं ध्येयच पैसा, अधिक पैसा, अधिक अधिक पैसा... हे झालेलं आहे. कोणताही व्यवसाय, कोणताही उद्योग, कोणतीही सेवा, कोणतीही व्यक्ती... अशा स्थितीत काय करणार कोणी? जीवनाचं ध्येय, जीवनाचा आशय बदलायला हवा आहे. त्यासाठी सशक्त आवाहन हवं आहे. त्या आवाहनाचा परिणाम होण्यासाठी किंमत चुकवणाऱ्या आयुष्यांचे तारण हवे आहे. कुठे आहे हे सगळे? आप्तांशी लढाई ही फक्त कुरुक्षेत्रावर नसते. अनेक ठिकाणी असते. ती करणारे अर्जुन आणि त्यासाठी उद्युक्त करणारे कृष्ण कुठे आहेत?

संघभाव

रामभाऊ बोंडाळे काल गेले. अकोल्याचे श्रीकांत कोंडोलीकर यांनी त्यांच्यावर लिहिलेला लेख आज वाचण्यात आला. त्यांनी रामभाऊंच्या मितव्ययतेचे फार भावपूर्ण वर्णन केले आहे. सहज काही गोष्टी आठवल्या आणि जाणवले की, रामभाऊ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या श्रद्धांजली संदेशात पण ही बाब अधोरेखित केली आहेच. ही मितव्ययता फक्त लहान क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाच गुण होता असेही नाही. श्री. यादवराव जोशी हे संघाचे एक फार मोठे अधिकारी. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत काम केलेले. दक्षिण भारतात संघ रोवणारे. प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सहसरकार्यवाह अशा मोठाल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवले.

१९५० च्या दशकात संघातील आर्थिक ओढगस्त फार मोठी होती. शाखा रोडावल्या होत्या. गुरुदक्षिणा कमी झाली होती. गैरसमज आणि अपप्रचार यामुळे समाजात मान्यता आणि स्थान कमी झाले होते. अशाही परिस्थितीत संघाचे काम मात्र करायचे या निश्चयाने कार्यकर्ते काम करीत असत. आर्थिक तंगी त्यात बाधा ठरत नसे. उलट या आर्थिक ओढगस्तीवर स्वतःच विनोद करून वातावरण प्रफुल्लित ठेवणे ही कलासुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी आत्मसात केली होती. श्री यादवराव जोशी हे अशा कार्यकर्त्यांपैकी एक होते. विनोदाने ते अनेकदा म्हणत असत की, 'आपल्या कार्यालयाबाहेर एक फलक लावा की; येथे विवाह, मौंजीबंधन, जन्मदिवस, श्राद्ध इत्यादींसाठी अतिथी म्हणून ब्राह्मण मिळतील.' अन् स्वतःच त्यावर हसून वातावरण निर्मळ करीत असत. एका शिबिरातील एक घटनाही त्यावेळच्या परिस्थितीवर पुरेसा प्रकाश टाकते. एका शिबिरामध्ये जेवण सुरू असताना श्री. गुरुजी ताटातील ताक पाहून म्हणाले, 'एखाद्या विहिरीत एक थेंब ताक टाकले तरीही त्याला ताकाची विहीर म्हटले जाईल.' जवळच बसलेले यादवराव त्यावर मोठ्या आवाजात म्हणाले, 'तरीही ते ताक तेवढेच रुचकर आणि पाणीदार राहील.' अशाच शिबिरात वाढल्या गेलेली शेवयाची खीर हाही एक विनोदाचा भाग झाला होता. आपल्या शेजारी बसलेले डॉक्टर आबाजी थत्ते यांना गुरुजी म्हणाले होते, 'हे पहा, हे पहा. या खिरीत शेवयांचा एक तुकडा दिसतो आहे. त्यावरून सिद्ध होते की ही खीर शेवयाचीच आहे.' यात कुठेही कटुता नव्हती. यात कुठेही त्रागा नव्हता, टीकाटिप्पणी आणि दोषदर्शन नव्हते; तर असलेल्या परिस्थितीत हसतखेळत सगळ्यांनी मिळून पुढे जाणे हाच भाव राहत असे.

बरं, यादवराव तर ठरले उमरेडच्या एका दरिद्री भिक्षुकाचे चिरंजीव. त्यांना हे जन्मजात सवयीचे. पण, १९४० च्या दशकात, घरी राहत असूनही शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये देणाऱ्या वडिलांचे चिरंजीव असलेले चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह देखील त्याच वळणाचे. ते सरकार्यवाह, सहसरकार्यवाह असताना सुद्धा आपला रोजचा खर्च, हिशेब लिहून ठेवत असत.

चार दोन कार्यकर्त्यांची, माहिती असलेली अशी चारदोन उदाहरणे. पण हे कार्यकर्ते पाच पाच, सहा सहा, सात सात दशके काम करत होते. त्यांच्या आयुष्यात असे किती प्रसंग असतील. अन् असेही हजारो हजार कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या जीवनात असे किती क्षण असतील?

याची आणखीन एक बाजूही आहे. कोंडोलीकर यांनी त्यांच्या लेखात श्री. मधुकर कुलकर्णी यांचाही उल्लेख केलेला आहे. ती बाजूही महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. एकीकडे सगळं विसरून, आपल्याला एक भव्य दिव्य कार्य करायचे आहे या धुंदीत काम करणारे लहानथोर कार्यकर्ते होते; तर दुसरीकडे एका भव्य दिव्य कार्यासाठी स्वत:च्या जीवनावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य करीत आहेत याची समंजस जाणीव असणारेही अनेक होते. सीमेवर जाणाऱ्या एखाद्या सैनिकाबद्दल जी भावना असते तशीच भावना अनेकांची या प्रचारकांबद्दल होती. संघ यात आहे आणि यातून आहे. संघाचा पिळ आणि पिंड यातून घडले आहे. बाकीच्यांचे असो अनेकदा स्वयंसेवकांना देखील हे आकलन होत नाही. आजची हिंदुत्वाची सुनामी या साधनेचा परिणाम आहे. केवळ घोषणा, वाद, चर्चा, जाहिराती यांचा नाही.

याचा अर्थ तीच परिस्थिती आज राहावी किंवा तशाच प्रकारे जगावे असा होत नाही. बदल होणारच. पण मर्यादांची जाणीव महत्त्वाची. अभावांच्या मर्यादांची जाणीव ठेवून निराश होण्याचे जसे नाकारले, तसेच संपन्नतेच्या मर्यादांची जाणीव ठेवून 'जितं मया' होण्याचे नाकारले की झाले. मर्यादांची ही जाणीव असेल तोवर संघ असेल. जाणीव नसेल तर संघ नसेल. बाहेरचे कोणी काही करू शकत नाहीत. ना भले ना बुरे. हितचिंतकांना, विरोधकांना, टीकाकारांना याबद्दल चिंता वगैरे वाटू शकते पण त्याची सवंग चर्चा करण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे का?

- श्रीपाद कोठे

सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

आरक्षण, मोदी, नेहरू

मोदी समर्थकांपैकी खूप जण आरक्षण विरोधी आणि सोबतच नेहरू विरोधी आहेत. काल मोदींनी स्वतः सांगितले की, नेहरू आरक्षण विरोधी होते. आता हे आरक्षण विरोधी मोदी समर्थक नेहरूंचे समर्थक होतील का? किंवा मोदी विरोधक होतील का?

(थोडी चंमत ग हवी ना !!) 😀😀

- श्रीपाद कोठे

८ फेब्रुवारी २०२४

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

हिंदुत्व आणि समजूतदारपणा

समजूतदारपणा म्हटलं की आजकाल अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेक हिंदुत्ववाद्यांच्या. जणू काही समजूतदारपणा हे पाप आहे असं त्यांचं ठाम मत असतं. अशांना एक विचारावं वाटतं की, लोक कुलुपे लावत नसत किंवा भारतात कुठेही भिकारी नव्हते; हे हिंदू समाजाचं character कसं निर्माण झालं आणि टिकलं? भारतात तर काही क्रांती वगैरे झाल्याचा इतिहास नाही. किंवा इथला माणूस सुद्धा जगातल्या इतर माणसांसारखाच आहे. मात्र इतरांपेक्षा त्याचं वेगळं character कसं निर्माण झालं? ज्याचा सगळ्यांना गौरव आणि हेवा वाटावा असं हे character समजूतदारपणा यापेक्षा अन्य कोणत्या गोष्टीने निर्माण होऊ शकलं असेल? अगदी वर्तमान उदाहरण घ्यायचं तर; ईशान्य भारतात हिंदुत्वाने जे ठामपणे पाय रोवले ते कसे? समजूतदारपणाला तीलांजली देऊन की, समजूतदारपणाच्या भरवशावर? क्रांती आणि क्रांतिकारक पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कधीही यशस्वी झालेले नाहीत. क्रांती आणि मांजर आपलीच पिले खाऊन टाकतात. आजचे हिंदुत्वाचे उत्थान देखील हिंदुत्वाच्या समजूतदार प्रवाहाचा परिणाम आणि यश आहे. And to be blunt ... हिंदुत्वाचे क्रांतिवादी प्रवाह काहीही करू शकलेले नाहीत.

#श्रीपाद कोठे

६ फेब्रुवारी २०२४

- ललित कला प्रकरणावर तू काही प्रतिक्रिया नाही दिली?

- हं. नाही दिली.

- तरी...

- हे प्रकरण पुढे आलं तेव्हापासून दोन गोष्टी आठवत आहेत. १) पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य : गणपतीला बुशकोट घालणे म्हणजे आधुनिकता नाही, आचरटपणा. २) संघाच्या एका गीताची एक ओळ : दानवता का तीमिर हटाने, तीलतील कर हम जलना सीखे...

@@@@@

दानवताका तिमिर हटाने तिल तिल जलतांना

यात कधी कधी ताडन कर हम जीना सिखे... असे होऊ शकते. गरज तिमिराचा पडदा हटवणे ही आहे.

(किशोर पौनिकर)

तीमिराचा पडदा कोणत्याही शक्तीने हटवल्याचं मी तरी कधी कुठे ऐकलं, पाहिलं नाही. तिमिर हटवण्याचा मला माहिती असलेला एकमेव मार्ग म्हणजे दिवा उजळणे. पेटत्या दिव्यांची संख्या वाढवणे. अन्य मार्ग असेल तरी मला ठाऊक नाही.

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

कलशारोहण

सगळ्यांनी, म्हणजे इकडच्यांनी आणि तिकडच्यांनी पण ऐकावा असा व्हिडिओ. दोन्ही पक्षांना भांडायला बळ देईल असा. 😄 असो. मला मात्र हा व्हिडिओ ऐकताना एक जुनी आठवण जागी झाली. शंकराचार्य (हे चार पिठातील नाहीत. मग शंकराचार्य कसे? वगैरे शंकांना माझ्याकडे उत्तरे नाहीत. ती मला मिळवायची पण नाहीत.) मंदिराच्या कळसाबद्दल बोलले त्यामुळे.

२००७ असेल. एका लग्नाला गेलो होतो. गप्पा मारत उभा होतो तेवढ्यात एक मित्र एक दोन जणांना घेऊन आला आणि आमची ओळख करून दिली. त्या एक दोघांना माझ्याकडे काम होतं. म्हटलं बोला. अन् त्यांनी काम सांगताच मी उडालोच. नागपूरला हिंगणा मार्गावर एक गजानन महाराज मंदिर आहे. त्या मंदिराचे ते कार्यकर्ते होते. दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम होता. मी ते कलशारोहण करावे अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांची समजूत काढली की, मी तसाही कोणीच नाही. अन् एवढं मोठं काम करण्यासाठी तर अगदीच पात्र नाही. मग त्यांनी त्यांची अडचण सांगितली. कलशारोहण एखाद्या संन्यासी व्यक्तीच्या हस्ते करायचे असते. पण कामाच्या गडबडीत त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली नव्हती. ती एक दिवस आधी सांगितली. एक दोन ठिकाणी विचारपूस केली पण संन्यासी कोणी मिळाले नाहीत. आणखी प्रयत्न केले तर कोणी मिळतील देखील पण वेळ कमी होता. नव्हताच म्हटलं तरी चालेल. तेव्हा त्यांना कोणीतरी अधिकारी व्यक्तीने धर्मशास्त्रात असलेला एक तोडगा सांगितला की, एखाद्या ब्रम्हचारी व्यक्तीच्या हस्ते कलशारोहण करता येईल. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मला त्यातले काहीही त्यावेळीही कळत नव्हते अन् आताही कळत नाही. पण कोणाची अडचण आहे अन् आपण ती दूर करू शकतो. शिवाय गजानन महाराजांच्या मंदिराचे काम असल्याने फारसा विचार करण्याची गरज नव्हती. मी हो म्हटले. कलशारोहण झाले. माझे काय पाप पुण्य असेल ते गजानन दरबारी ठेवले.

आज हा व्हिडिओ ऐकताना त्याचे शास्त्र ऐकायला मिळाले की, कलशारोहण करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश होतो अशी समजूत आहे. असे असताना कोण गृहस्थ कशाला त्या भानगडीत पडेल? अन् ब्रम्हचारी असेल तरी तो का म्हणून ही रिस्क घेईल? त्यामुळे संन्यासी हवा. मला त्या लोकांनी का बोलावले त्याचा शास्त्रीय उलगडा आज झाला. अन् प्रभूची योजनाही लक्षात आली. गृहस्थ नव्हतो आणि निर्वंश वगैरेची काही भानगड नव्हती. कलशारोहणाने तशी भानगड उत्पन्न होण्याची शक्यताही प्रभूने संपवून टाकली. वंश नाही म्हणजे पुढे नाव नाही. म्हणजेच हा जन्म म्हणजे पूर्णविराम. शेवटला जन्म. पुन्हा येणेजाणे नाही. अशाच एका अवलियाने एकदा बोलता बोलता म्हटलं होतं - 'तुमचा शेवटला जन्म आहे.' तेही आठवलं. त्यामुळे छान वाटलं. सारीपाटावरील शेवटलं दान पडलेलं आहे. कलशारोहण करून सगळ्या पापपुण्याचा हिशेब होऊन गेला आहे. आनंदी आनंद.

- श्रीपाद कोठे

२४ जानेवारी २०२३

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

राम का गुणगान करीये

मकर संक्रांतीपासून २१ जानेवारीपर्यंत रोज 'राम का गुणगान करीये' लिहावं असं मनात आलं होतं. परंतु अन्य लिखाण, कामं, व्यस्तता, प्रकृती; अशा सगळ्या कारणांनी ते शक्य नाही हेही लक्षात आलं आणि तो विचार सोडून दिला. मात्र दोन तीन दिवस झाले आतून कोणीतरी खूप जबरदस्ती करत आहे असं वाटतंय. कदाचित हनुमानजी गदा घेऊन उभे आहेत की - 'मी तुला हे लिही म्हणतो आहे नं.' त्यामुळे हे लिहितो आहे. अर्थात फक्त एकच दिवस हे त्या आतल्यांना सांगितलं आहे. असो.

श्रीरामाच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. रावणाशी युद्ध सुरू होतं आणि रामाच्या सगळ्या कौशल्याचाही काहीच उपयोग होत नाही. आणीबाणीची परिस्थिती उद्भवते तेव्हा जांबुवंत त्यांना शक्तीची उपासना करायला सांगतात. त्यासाठी १०८ नीलकमले आणली जातात. श्रीराम अनुष्ठानाला बसतात. नीलकमलांनी मातेची आराधना सुरू होते. अन् १०७ कमले वाहिल्यावर ताटातील कमले संपून जातात. ही मां दुर्गेची चलाखी असते. एक कमळ गायब झालेले असते. आता काय करायचे? सगळं मुसळ केरात. तेव्हाच श्रीरामांना आठवतं, आपली आई आपल्या डोळ्यांना नीलकमलाची उपमा देत असे. ते तात्काळ निर्णय घेतात. कमी पडणाऱ्या नीलकमलाच्या जागी आपलं नेत्रकमल मातेला अर्पण करायचं. त्यासाठी ते आपला नेत्र काढणार तोच दुर्गा प्रकट होते आणि त्यांना इच्छित वरदान देते. श्रीरामांच्या लोकविलक्षण धैर्यशीलतेचा हा प्रसंग आहे.

धैर्य हा रामाच्या चारित्र्याचा फार महत्त्वाचा गुण आहे. बालपणी ऋषिमुनींच्या यज्ञयागाचे रक्षण करण्यासाठी जाणे असो, पित्याने वनवासात जाण्याची आज्ञा करणे असो, रावणाने सीतेचे अपहरण करणे असो, सीतेचा शोध घेणे असो, वालीशी युद्ध असो, रावणाशी युद्ध असो, भरताला समजावणे असो, सीतेचा त्याग असो, लक्ष्मणाला शरयू जवळ करायला सांगणे असो... अनेक प्रसंग कसोटीचे पण त्यांचे धैर्य खचत नाही, मोडत नाही. रावणाला परास्त करण्याचे कर्तव्य पार पाडल्यावर ते उन्मादी होऊन त्याच्या छातीवर नाचत नाहीत. सीतेचा त्याग करताना, राजकर्तव्याचा अभिनिवेश बाळगत नाहीत. चुकीचे परंतु आवश्यक असे ते कर्तव्य करताना त्याचे कोणतेही समर्थन न करता ते प्रिय सीतेला टाळून वेळ मारून नेतात. प्रत्यक्ष भरत आपल्या आईला बरेवाईट बोलला तरी राम तिला काहीही म्हणत नाहीत. श्रीराम धैर्य कधीच सोडत नाहीत. म्हणूनच ते पराक्रमी ठरतात. शौर्याला धैर्याचा आधार असतो तेव्हा तो पराक्रम होतो. शौर्याला धैर्याचा आधार नसेल तर तो राक्षसीपणा ठरतो. रावणाच्या शौर्याला धैर्याचा आधार नव्हता म्हणून तो राक्षस होता. श्रीरामाच्या शौर्याला धैर्याचा आधार होता म्हणून ते प्रभू राम आहेत.

श्रीरामाचे नाव घेताना, त्याची भक्ती करताना, त्याच्या नावाचा प्रचारप्रसार करताना; त्याचा हा गुण अंगी बाणवायला हवा. आज अनेकदा तसे होताना दिसत नाही. हे वेदनादायी आहे. का म्हणून आपण धैर्य सोडून देतो? कशासाठी आक्रस्ताळेपणा? कशासाठी उतावळेपणा? कशासाठी उथळपणा? कशासाठी मर्यादेचे उल्लंघन? आपल्याला काहीच का सहन होत नाही? योग्य अयोग्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय याचे मोजमाप आपणच आपले करतो आणि स्वतःला प्रभू राम समजून अयोग्य, अन्याय्य, अधर्म यांच्यावर तुटून पडतो, तेही रामाच्या नावाला साजेसे ठरणार नाही अशा रीतीने. का आणि कशासाठी? न्याय, धर्म इत्यादीचा निकष आपल्याला वाटणे हा नसतो. तसा तो समजला जातो तेव्हा रावण जन्माला येतात. अन् कालातीत कसोट्यांवर न्यायाचा आणि धर्माचा निर्णय करणारा श्रीराम होतो. श्रीरामाचे नाव घेऊन आपण रावणाची कृती करतो आहोत का? हा प्रश्न विचारलेला आज फारसा कोणाला आवडणार नाही. परंतु श्रीरामासाठी तेवढा वाईटपणा घ्यावाच लागेल. काहीही कारण नसताना, विचार चिंतन समज बाजूला सारून; वागणे, बोलणे, प्रतिक्रिया देणे, सगळ्यांशी शत्रुवत व्यवहार; हे शोभणारे नाही. आपल्या टीचभर आयुष्यात समस्त अस्तित्व आपल्या मुठीत आलं आहे असं समजून, सारं जग टाचेखाली घेण्याचा आविर्भाव; बाकी काहीही असू शकेल पण रामनामाला साजेसा नक्कीच नाही. कुठे काही वेगळा स्वर ऐकू आला, कुठे काही वेगळे मत कानी आले, कुठे काही वेगळा व्यवहार पाहायला मिळाला की; जणू आता जगबुडी होणार अशा थाटाने वागण्या बोलण्याचे कारण नाही. हजारो वर्षे झाली; मानवी संस्कृती या पृथ्वीवर नांदते आहे. तुमच्या माझ्या हातात नसलेली ती शक्ती व्यवस्थित ते चालवते आहे. आपल्यासारखे अब्जावधी आले गेले, ती शक्ती तिचं काम चोख करते. आपल्या टीचभर आयुष्यात आपण हे जग चालवतो हा भ्रम टाकून देऊन रामगुण घेता आले तर घ्यावे. जगाचं आणि आपलंही भलं वगैरे झालं तर त्यानेच होईल. किमान रामाच्या नावाला कलंक लावण्याचं पातक तरी आपल्या हातून होऊ नये.

- श्रीपाद कोठे

रविवार, १४ जानेवारी २०२४

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

श्रीराम परततात तेव्हा...

१४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले. भरताला त्यांच्या आगमनाची वर्दी मिळताच तो आनंदाने कामाला लागला. त्याने स्वागताची तयारी सुरू केली. काय करायचे त्याचे आदेश आणि सूचना सुरू केल्या. अन् स्वागतासाठी सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी दूतांना, सेवकांना पिटाळले. हे करताना कोणाकोणाला बोलवायचे तेही अंतर्बाह्य साधू असलेले भरत महाराज सांगत होते. त्यावेळी त्यांनी गणिकांनाही बोलवा असे मुद्दाम उल्लेख करून सांगितले. (इति श्रीमद् वाल्मिकी रामायण)

(पोस्टचा उद्देश काहीच नाही. पण २२ तारखेपर्यंत राम राम चालणारच आहे. तर आपण का मागे राहा? खरं तर राम राम अखंडच चालायला हवे. अगदी शिव्या द्यायच्या असतील त्यासुद्धा त्यालाच द्याव्या. रावणाला नाही का मुक्ती मिळाली. विनासायास. तेव्हा... 😀)

- श्रीपाद कोठे 

१० जानेवारी २०२४

- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्यांनाच समजत नाही.

- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्याला तरी कुठे समजतं?