शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

योग

तोंडावर (खाणे आणि बोलणे दोन्हीसाठी) नियंत्रण हे योगाचं केवळ लक्षण नाही तर तो योगाचा आधार आहे आणि सर्वस्व देखील. याचा विसर पडू नये. योग्यांना आणि योग मानणाऱ्या व्यक्तींना, समूहांना, समाजाला. भारतीय अथवा हिंदू विचार योगभ्रष्ट कल्पना अधिकृतपणे मान्य करते. धैर्य, कणखरपणा यासाठी भारतीय किंवा हिंदू विचारांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. हा लौकिक टिकून राहायला हवा. टिकवायला हवा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०२२

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

आंबेडकर म्हणतात -

मनाचे स्थैर्य आणि नीरक्षीरविवेक म्हणजे काय याचा उत्तम नमूना-

`मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

या छोट्याशा वेच्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. ते पुन्हा केव्हा तरी.

#श्रीपादचीलेखणी

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

स्थिरता

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

शिकार?

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर बरीच चर्चा सुरू आहे. त्यात एक प्रतिक्रिया आहे की, शिकार करण्यासाठी कधीकधी दोन पावलं मागे जावं लागतं. काय होतो या प्रतिक्रियेचा अर्थ? कृषी कायदे हा राजकीय धोबीपछाड देण्याचा विषय होता वा आहे का? कोणाची शिकार करायची आहे? शेतकऱ्यांची शिकार करायची आहे असा युक्तिवाद तर कोणीच करणार नाही. (कोणाच्या मनात असेल तरीही.) मग एकच पर्याय उरतो, तो म्हणजे विरोधकांची. कृषी कायद्यांचा हाच आशय असेल तर त्याची सगळी बैठकच मोडीत निघते. भाजपला सगळ्यात अडचणीचे ठरते आहे ते त्याचे प्रचार तंत्र. भाजपचा, त्याच्या नेत्यांचा, त्याच्या धोरणांचा, त्याच्या निर्णयांचा; जो अनावश्यक, आक्रस्ताळा, अप्रमाण, कधीकधी उन्मादी प्रचार असतो; तो अतिशय घातक आहे. हे लक्षात का येत नसावे हा प्रश्नच आहे. या प्रचारतंत्रात योजना किती आणि उत्स्फूर्तता किती यावर वाद घालत येईल. पण तो मर्यादेत, शालीन आणि आवश्यक तेवढाच असायला हवा हे मात्र निश्चित. पानटपरीवरच्या किंवा कॉलेज कट्ट्यावरच्या भांडणांसारखे वाद करून राजकारणही करता येत नाही आणि समाजही चालू शकत नाही; हे उमगेल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०२१

काय चुकलं?

चिडलेल्या, त्रासलेल्या, वैतागलेल्या, उबलेल्या माणसाला सबुरीच्या अन समजावणीच्या गोष्टी सांगू नयेत. ते क्रौर्य आणि अपरिपक्वता असते. बहुतेक माणसे तेच करतात अन मग विचारतात - 'मी काय चूक केली?' कारण संवादाचं एकच माध्यम आहे असा अजूनही बहुसंख्य माणसांचा समज आहे. बोलणे, सांगणे, विचारणे यापेक्षा वेगळ्या पध्दतीचे communication असू शकते याचा गंधच नसतो. अन असा वेगळा काही मार्ग असतो हे ऐकून/ वाचून माहिती असले तरीही, तो अवगत नसतो. खरं तर communication त्याच्या तंत्रात नाहीच, संवादाची मुळं, संवादाची सुरुवात मनात होत असते. स्वतःच्या आणि ज्याच्याशी संवाद करतो आहे त्याच्या, अशा दोन्ही मनांच्या मुळाशी पोहोचू शकणाराच प्रभावी आणि परिणामकारक संवाद करू शकतो. नुसतं मनानी चांगलं असणं, कळकळ बिळकळ असणं पुरेसं नसतं. या अंगाने पुष्कळदा जाणवतं की माणूस psycho- socio- cultural evolution च्या संदर्भात अजूनही पुष्कळ प्राथमिक स्तरावरच आहे.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०१७

पुरुष दिन

आज पुरुष दिवस असल्याची एक पोस्ट दिसली. थोडं आश्चर्यच वाटलं. कारण आजकाल कोणताही दिवस असला तर सकाळी हाती पडणाऱ्या वृत्तपत्रापासून त्याची माहिती मिळायला सुरुवात होते आणि मग फेसबुक, whats app, अन गेला बाजार वृत्तवाहिन्या त्याच्या कौतुकात बुडून गेलेले दिसतात. कविता, कथा, तक्रारी, कौतुके, प्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर - खरी किंवा खोटी- गाऱ्हाणी; असं एरव्ही दिसणारं चित्र काही दिसलं नाही. लिहिताना सगळेच `डेज' डोळ्यापुढे आहेत. खरं तर इच्छाही नाही, पण महिला हा विषय नाईलाजाने लिहावा लागेल. कारण पुरुष दिवस आहे. तर महिला दिनाला शुभेच्छा आदी; त्याही फुगे- फुले- इत्यादी इत्यादीची फोडणी देऊन; न चुकता देणारे पुरुष संख्येने महिलांपेक्षा अधिकच दिसतात. ते ओळखीची महिला, अनोळखी महिला असाही भेद फारसा करीत नाहीत. पण आजच्या पुरुष दिनाला शुभेच्छा आदी- कोरड्या का असेना- देणारा महिला वर्ग मात्र दिसला नाही. ओळखीच्यांनाच नाही तर अनोळखी पुरुषांचे काय घेऊन बसलात? अन कोरड्या शुभेच्छा नाहीत, तिथे कौतुक, कथा, कविता, गाऱ्हाणी, तक्रारी वगैरे वगैरेचे काय?? नाही म्हणायला अलिबागच्या जगप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर आणि नागपूरच्या फुटाळा चौपाटीवर कोण्या संस्थेने सर्व्हे केला म्हणे- आजचा पुरुष दिवस कोणाकोणाला माहीत आहे याचा. सर्व्हे करणाऱ्या लोकांची संख्या माहिती असणाऱ्या लोकांपेक्षा जास्तच होती म्हणतात. सर्व्हेची बातमी कानावर आलेली आहे. खातरजमा केलेली नाही. पण सूत्र विश्वसनीय आहेत. तर, या पुरुष दिनाच्या पाचा उत्तरी कहाणीतून काहीही सुचवायचे नाही. मात्र कोणी आपापले अर्थ काढले तर त्यालाही काहीच हरकत नाही. 🤣🤣

- श्रीपाद कोठे 

१९ नोव्हेंबर २०१७

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

कालच्या दुर्दैवी घटनेबद्दल...

- एखाद्या वाईट, हिणकस, बीभत्स गोष्टीचे किंवा घटनेचे साग्रसंगीत वर्णन चघळत बसू नये. त्याने झालं तर नुकसानच होतं.

- आजकाल तर अशा घटना लगेच व्हायरल होतात. त्यामुळे कालची घटना, चर्चित घटना, वादग्रस्त घटना - विधान; असे उल्लेख असावेत. ज्यांना कळणार नाही वा ठाऊक नसेल; त्या सगळ्यांना त्याबद्दल सांगण्याची गरज नसते. त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे. सगळ्या जगाला तपशीलवार सांगण्याची जबाबदारी स्वतःवर ओढून घेऊ नये.

- कालची घटना ऐहिकतेवर आधारित आत्यंतिक व्यक्तीवादाचा परिणाम आहे. ऐहिकता यात पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, राजकारण, आनंद पुरुषार्थ इत्यादी कल्पना, असंख्य मानसिक गोष्टी, बौद्धिक उन्मत्तता, चांगले आणि वाईट दोन्हींचा अहंकार; अशा सगळ्या गोष्टी येतात.

- गुण, अवगुण इत्यादींचे गटश: वर्गीकरण न करता; गुणपूजा, गुणग्राहकता यांची चर्चा समाजात सकारात्मक वातावरण तयार करते याचं भानही असायला हवं.

- कालची घटना विचारी माणसाला हतबुद्ध करणारी, दुःखद, संताप आणणारी, समाजाला लाजिरवाणी, त्रिवार निषेध करावा अशी आहे.

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२२

(प्रेयसीची हत्या)

श्रद्धा प्रकरणी खूप चर्चा सुरू आहे. लव्ह जिहादपासून; तर संस्कार, जीवनशैली, स्वातंत्र्य, जीवनमूल्ये, कायदे इत्यादी इत्यादी. मात्र हा सगळा विचार करताना आजची आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था आणि रचना यांच्या भूमिकांची चर्चा मात्र होत नाही. आजच्या व्यवस्थेत - विचारांचा अवकाश, संस्कार रुजण्यासाठीचा अवकाश, समज वाढेल असे वातावरण, गुन्हे आणि वाईट गोष्टी लक्षात येतील एवढा भौगोलिक आणि अन्य आवाका, ओळखी आणि ओळख होण्याच्या शक्यता, लपवाछपवीच्या किमान संधी; हे सगळं शक्य आहे का? अभिनिवेश, राग, दुःख, धुंदी बाजूला सारून यावर शांतपणे विचार करायला हवा. चांगल्या, सुरक्षित आणि संघर्षविहीन जगण्यासाठी विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनाच मुळातून बदलायला हवी आहे. त्याचा विचार कोण आणि केव्हा करणार?

- श्रीपाद कोठे

१७ नोव्हेंबर २०२२

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मंदिरांची संपत्ती

तिरुपती संस्थानने प्रथमच काल एक श्वेतपत्रिका जाहीर करून आपल्या संपत्तीची अधिकृत माहिती दिली. नेसले किंवा विप्रो सारख्या कंपन्यांपेक्षा तिरुपती संस्थानची संपत्ती अधिक आहे. आज ही बातमी वाचल्यानंतर फेसबुकवर एका मित्राने शेगाव संस्थानच्या व्यवस्थापनावर लिहिलेला लेख शेअर केलेला दिसला. या लेखात नवीन माहिती काही नाही. असंख्य लोकांना शेगाव संस्थानबद्दल माहिती आहेच. पण तो लेख पाहिल्यावर सहज मनात एक तुलना आली. संपत्तीबद्दलची दोन्ही संस्थानांची attitude किती वेगवेगळी आहे. आपल्याला येणारा राग थोडा बाजूला ठेवता आला तर असेही म्हणता येईल की, शेगाव संस्थानची attitude आध्यात्मिक आहे तर तिरुपती संस्थानची attitude भांडवलवादी आहे. दोन्ही हिंदू धार्मिक संस्थान आहेत. Attitude मात्र वेगवेगळी आहे.

मंदिरांच्या संपत्तीवर बोललं तर नाराज होणारे बरेच आहेत, पण मंदिरांनी शेगावसारखी आध्यात्मिक attitude का ठेवू नये? सामान्य हिंदू व्यक्तिपासून महाकाय हिंदू संस्थांपर्यंत सगळ्यांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा. मंदिरांनी संपत्तीच्या बाबतीत आध्यात्मिक attitude बाळगून काम केले तर हिंदू धर्म आणि समाज दोन्ही अधिक सशक्तच होतील. नुकसान काही होणार नाही. फक्त फायदाच फायदा होईल. हिंदूंच्या सध्याच्या जागृत अस्मितेने - आम्हाला का सांगता? आम्हाला का म्हणता? आमच्या संपत्तीवर का डोळा? बाकीच्यांना का सांगत नाही? बाकीच्यांना का म्हणत नाही? बाकीच्यांच्या संपत्तीवर लक्ष का नाही? हे जरा कमी करून आपल्याच हिंदू समाजाच्या हिताचा, सशक्तीकरणाचा विचार थोडा अधिक केला तर बरं होईल.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या उरलेल्या तहखान्यासह असलेल्या संपत्तीचाही विचार; कोणाला साप चावेल, कोणाचा निर्वंश होईल; वगैरे विचार न करता करावा. शाप वगैरे घ्यायचे असतील तर ते घ्यायला मी तयार आहे.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२२

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

भारत, अध्यात्म, संघ

आजची प्रबोधिनी एकादशी वाया जाऊ नये म्हणून... (तशी आपली रोजच प्रबोधिनी एकादशी असते. कधीतरी देवशयनी एकादशी व्हावी अशी अनेकांची इच्छा असली तरी ती काही येत नाही. 😃 तर असो...) विषयाकडे वळतो.

भारत म्हणजे काय? हा एक देश आहे. या देशात हजारो वर्षांपासून अनेक लोक राहत आले आहेत. त्यात ईश्वरवादी, निरिश्वरवादी, इहवादी, जडवादी सगळेच आहेत. सगळ्याच देशात असं असतं. अगदी मुस्लिम देशातही हे असंच असतं. या विविध लोकांनी मिळूनमिसळून राहणे, त्यासाठी एकमेकांचा आदर करणे, परस्परांना स्पेस देणे; देश म्हणून आवश्यक असते.

******************

उपासना म्हणजे ढोबळ मानाने ईश्वराशी संबंध जोडणे. सगळ्या लोकांना याची गरज असेल असे नसते. सगळ्यांनी ईश्वराशी संबंध जोडायला हवा हेही आवश्यक नाही. ईश्वराशी संबंध जोडण्याची गरज कोणाला वाटावी आणि कोणाला नाही याची प्रेरणा सुद्धा तो ईश्वरच देतो. कोणीही त्याबाबत दुराग्रह करण्यात अर्थ नसतो. ईश्वराशी संबंध कसा जोडायचा याचीही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझीच पद्धत योग्य आणि अंतिम असं म्हणणं किंवा विशिष्ट मार्गाने आपल्याला बरं वाटतं किंवा चांगले अनुभव आले वगैरे म्हणून, बाकीच्यांनी त्याच मार्गाने यायला हवे, हे तर्क आणि शहाणपण दोन्हीला धरून नाही.

भारतात तर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग, तंत्र इत्यादी प्रमुख मार्ग आणि त्यांचे उपमार्ग विकसित झाले आहेत. सगळ्यांची गृहितके, सगळ्यांचे सिद्धांत, सगळ्यांच्या पद्धती सारख्या नाहीत. त्यामुळे त्या त्या मार्गाने जाणारे साचेबद्ध नसतात. त्यांच्या विचार, व्यवहारात साम्य नसते. याचा secularism वगैरेही काही संबंध नाही. Secularism हा शब्दही जन्माला येण्याच्या आधीपासून भारताची ही प्रकृती आहे. यात ईश्वराला मानायलाच हवे याचीही गरज नसते.

******************

कुंकू प्रकरणी शास्त्र इत्यादी फार आग्रहीपणे सांगून जे त्याबाबत आग्रही नाहीत ते कसे चुकीचे आहेत हे सांगितले जात आहे. या एकांगीपणासाठी दोन मुद्दे - 

१) प्रत्येकाने आपला मेंदू आपण म्हणतो तसाच पोसावा, हा नक्कीच हटवाद आहे. २) असंख्य अगदी असंख्य लोक (धार्मिक, संत महंत, सामाजिक कार्यकर्ते, सुधारक, जीवनाच्या असंख्य क्षेत्रातले cream; तेही भारतासह जगभरात) कपाळी कुंकू लावत नाहीत. ते निरर्थक झाले का? विज्ञान, शास्त्र वगैरे करताना विचारांना तिलांजली देऊ नये एवढंच.

प्रस्तुत विषयात आज गोळवलकर गुरुजी यांचंही नाव चर्चेत आलं आहे. पाश्चात्य पोशाख घालून होणाऱ्या विवाहाला गुरुजी जात नसत. मग त्यांचे अनुयायी प्रतीकांना महत्त्व का देत नाहीत? असा एकूण विषय. त्याबद्दल -

१) गुरुजी माझ्यासाठी पूजनीय आहेत. उद्या मी समजा - मला संघाशी देणेघेणे नाही या अवस्थेला पोहोचलो तरीही गुरुजी मला पूजनीयच असतील. तरीही मी म्हणेन की, गुरुजी स्थलकालाच्या अतीत नाहीत. एक पुण्यपुरुष, महान आत्मा म्हणून ते कालातीत आहेत पण विचार, आचार, अभिव्यक्ती या संदर्भात स्थळकाळाने बद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी अमुक केले वा म्हटले वा सांगितले ते नेहमीसाठी, सगळ्यांसाठी अनुकरणीय असे नाही. दुसरे म्हणजे गुरुजी अतिशय संतुलित असल्याने कुठे आग्रह धरायचा, कशाचा आग्रह धरायचा याचा उत्तम विवेक त्यांच्याकडे होता. विवाहात पाश्चात्य पोशाख नसावा याचा आग्रह धरताना, स्वतः नियमितपणे करत असलेल्या संध्येचा आग्रह मात्र त्यांनी कोणालाही कधी केला नाही. एवढेच नाही तर अप्रबुद्धांनी ज्यावेळी त्यांना म्हटले की, संघाने स्वयंसेवकांना संध्या शिकवायला हवी तेव्हा त्यांनी ती सूचना अयोग्य असल्याचे त्यांना सांगितले.

२) गुरुजींनी काही गोष्टींचा आग्रह धरला असेल तरीही त्या गोष्टींचा आग्रह नेहमीच धरायला हवा असे नाही. चालायला शिकताना जी बाबागाडी वापरतो ती धावू लागल्यावर टाकूनच द्यावी लागते. ज्या काळी गुरुजींनी पारंपरिक पोशाखाचा आग्रह धरला त्यावेळी हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा विरुद्ध टोकाला गेलेला लंबक खेचून आणायचा होता. आज तो दुसऱ्या टोकाला जाऊ नये याची काळजी घेण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मांडणी बदलणे स्वाभाविक ठरते.

३) प्रतीके योग्य असली तरीही प्रतिकात अडकून संकुचित राहण्याचा दुराग्रह हास्यास्पद ठरतो. जीवनाचे प्रवाहीपण नाकारणे हा शहाणपणा नसतोच.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०२२