सोमवार, ३० मे, २०२२

श्री रामकृष्ण परमहंस (७)

इ. स. १८५५ ते १८६७ असा बारा वर्षांचा काळ हा श्री रामकृष्णांच्या दक्षिणेश्वर येथील साधनेचा काळ आहे. त्यातील फक्त पहिली चार वर्षेच त्यांनी कालीमातेचे पुजारी म्हणून काम केले. या बारा वर्षांचे तीन सारखे भाग करता येतात. त्यातील प्रत्येक चार वर्षांचा काळ हा एकूण साधनेचाच एक भाग असला तरीही, त्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. पहिल्या चार वर्षांच्या काळात त्यांनी केलेली साधना ही मनाच्या अभूतपूर्व तीव्र तळमळीने स्वतः केलेली साधना आहे. त्यात कोणीही मार्गदर्शक वा गुरू नव्हते. या पहिल्या चार वर्षांच्या साधनेत शास्त्र वगैरेचा संबंध नव्हता. जी काही होती ती तीव्र तळमळ आणि त्यांचा जगन्मातेशी असलेला सरळ निर्व्याज आंतरिक सशक्त संवाद. केवळ या संवादाच्या भरवशावर त्यांनी ईश्वरलाभ करून घेतला होता.

याच प्रारंभीच्या काळात जगदंबेच्या दर्शनानंतर त्यांना त्यांची कुलदेवता असलेल्या रघुवीराच्या दर्शनाची तळमळ उत्पन्न झाली. हनुमंतासारख्या अनन्य भक्तीने आपल्याला श्री रामचंद्राचे दर्शन होईल असे त्यांना वाटू लागले आणि आपण हनुमंत असल्याचा भाव त्यांनी स्वतःवर आरोपित करून साधना सुरू केली. त्या भावात ते इतके तन्मय झाले की, त्यांचे सगळे वागणे हनुमंतासारखेच होऊ लागले. धोतर शेपटासारखे कंबरेला गुंडाळून घेत. उड्या मारतच चालत. फळांशिवाय दुसरं काहीही खात नसत. फळेही सालीसह खात. दिवसाचा खूप वेळ झाडावरच बसून राहत. अन तोंडाने सतत रघुवीर रघुवीर असा एकसारखा जप करत. त्या काळात त्यांच्या पाठीच्या कण्याचे खालचे टोक जवळजवळ इंचभर वाढले होते. या भावाचा उपशम झाल्यावर कणा पुन्हा सामान्य झाला होता. या साधनेने त्यांना रघुवीराचे दर्शन झाले वा नाही याचा नेमका उल्लेख नाही, पण या साधनाकाळात सीतामाईचे दर्शन झाल्याचे मात्र त्यांनी स्वतःच नंतर सांगितले होते.

सीतामाईच्या दर्शनाची कहाणी श्री रामकृष्णांच्याच शब्दात अशी - 'त्या काळात एक दिवस पंचवटीत बसलो होतो. ध्यानचिंतन काही करीत नव्हतो. नुसताच बसलो होतो. इतक्यात एक अनुपम ज्योतिर्मय स्त्री जवळच आविर्भूत झाली आणि तिने ते स्थळ उजळून टाकले. मला त्यावेळी ती आकृतीच दिसत होती असे नाही. तर पंचवटीतील झाडेझुडपे, गंगा वगैरे सगळे काही दिसत होते. ती मानव स्त्रीच होती पण प्रेम, दु:ख, करुणा, सहिष्णुता यांचा त्या मुखावरच्यासारखा अपूर्व ओजस्वी गंभीर भाव देवीच्या मुखावरदेखील साधारणपणे आढळून येत नसतो. प्रसन्न मुद्रेने ती देवमानव स्त्री माझ्या रोखाने पुढेपुढे येऊ लागली. स्तंभित होऊन 'ही कोण' असा विचार करीतच होतो एवढ्यात एका वानराने हुप्प आवाज करत तिच्या पायाशी लोळण घेतली. अन माझे अंतर्मन उद्गारले 'ही सीता ! उभा जन्म दु:खच दु:ख भोगलेली सीता ! राजा जनकाच्या आनंदाचं निधान असलेली सीता ! जिचं सारं जीवन रामाने भरून टाकलं होतं ती सीता!' अन आई आई म्हणत तिच्या पायांवर पडणार त्या क्षणार्धात ती माझ्या शरीरात प्रविष्ट झाली. आनंदाने, विस्मयाने भारावून जाऊन बाहेरचे भान हरवून पडून गेलो. ध्यानचिंतन वगैरे न करता अशा रीतीने कोणतेही दर्शन यापूर्वी आणखी कधी मला झाले नव्हते.'

दक्षिणेश्वरला कालीवाडी तयार झाल्यानंतर, गंगासागर आणि जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू तिथे मुक्कामाला येऊ लागले. त्यांच्यात पुष्कळ साधक आणि सिद्ध लोक सुद्धा असत. त्यांच्याच कडून प्राणायाम आदी क्रिया शिकून घेऊन श्री रामकृष्ण या प्रारंभीच्या काळात हठयोग साधना करू लागले होते. या हठयोगाच्या साधना काळातच एक दिवस रात्री आठ नऊच्या सुमारास त्यांना टाळूच्या भागात खूप गुदगुल्या होऊ लागल्या आणि त्यांच्या तोंडावाटे रक्त पडू लागले. श्री रामकृष्ण याविषयी सांगत की, 'पडणाऱ्या रक्ताचा रंग घेवड्याच्या पानाच्या रसासारखा काळाशार होता. अन ते खूप घट्ट होते. त्यामुळे थोडे बाहेर पडले अन काही दातांना चिकटून पारंब्यासारखे लोंबु लागले. तोंडात बोळा कोंबून दाबून धरले तरी रक्त थांबत नव्हते.' या घटनेने कालीवाडीत सगळ्यांची धावपळ सुरू झाली. गडबड पाहून देवस्थानात उतरलेला एक साधू तिथे आला. तो प्रकार पाहून त्याने सांगितले, 'घाबरण्याचे कारण नाही. रक्त पडले हे चांगलेच झाले. हठयोगाच्या सर्वोच्च अवस्थेत जडसमाधी लागत असते. तुम्हालाही लागत होती. सुषुम्नाद्वार उघडून रक्त डोक्यात चढत होते. ते डोक्यात न चढता तोंडातून बाहेर निघाले हे चांगले झाले. कारण जडसमाधी लागली असती तर ती कशानेही भंगली नसती. तुमच्या शरीराद्वारे काहीतरी विशेष कार्य व्हावयाचे आहे. त्यासाठीच जगदंबेने तुमचे या प्रकारे रक्षण केले.' त्या साधूच्या या स्पष्टीकरणाने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नंतरच्या काळात त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना, साधकांना, मुमुक्षूंना मात्र श्री रामकृष्ण हठयोग साधना न करण्याचाच उपदेश करत असत. वर्तमान युग, मानवाची आयुर्मयादा, योग्य गुरुची उपलब्धता अशा पुष्कळ कारणांसाठी हठयोग न करता भक्तीचाच उपदेश ते करत. भक्तीमार्गानेही त्याच ठिकाणी पोहोचता येते जिथे हठयोग घेऊन जातो, असा त्यांचा उपदेश राहत असे.

साधनाकाळाच्या प्रारंभीच्या चार वर्षांच्या काळात श्री रामकृष्णांना एका तरुण संन्याशाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असे. हा तरुण संन्यासी कधीही त्यांच्याच शरीरातून बाहेर येई आणि त्यांना नाना सूचना आणि आदेश देत असे. या काळात त्यांची अवस्था विवेक चुडामणीत केलेल्या सिद्ध पुरुषाच्या वर्णनाप्रमाणे झाली होती. कधी बालकासारखे, कधी उन्मत्त व्यक्तीसारखे, तर कधी पिशाच्चवत. त्यामुळे ते वेडे झाले आहेत की काय असा अनेकांचा समज होत असे. पुष्कळ जण तशा चर्चाही करत असत. परंतु श्री रामकृष्णांचा सर्वसाधारण व्यवहार पाहून मात्र कोणालाही मत बनवता येत नव्हते. कोणी सांगितलेले औषध आदी उपाय नीट करणे, कुठे भजन वगैरे असेल तिथे सगळ्यांसारखा सहभाग; इत्यादींमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होई. त्यांना भेटणारे सिद्धसाधक मात्र त्यांच्या आध्यात्मिक अवस्थेची खात्री देत. बाकीच्यांना मात्र काही उमज पडत नसे. एवढेच काय दक्षिणेश्वर मंदिराची मालकीण राणी रासमणी आणि मंदिराचे व्यवस्थापक आणि राणीचे जावई मथुरानाथ यांनाही श्री रामकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. अखंड ब्रम्हचर्य पालनामुळे त्यांच्या डोक्यात विकृती निर्माण झाल्याचा कयास करून या दोघांनी, प्रथम दक्षिणेश्वरी आणि नंतर मेछुयाबाजार भागात त्यांच्याकडे वेश्या पाठवल्या होत्या. मात्र त्या वेश्यांना पाहताच 'आई आई' म्हणत त्यांना जो ईश्वरानुराग होत असे तो पाहून त्या वेश्याच खजील झाल्या होत्या. अन त्याच श्री रामकृष्णांना प्रणाम करून निघून गेल्या होत्या.

श्री रामकृष्ण परमहंस (६)

चिन्मयी जगदंबेच्या पहिल्या दर्शनानंतर श्री रामकृष्णांना रोजची पूजा इत्यादी करणे कठीण होऊ लागले. त्यांचा भाचा हृदयराम कसेतरी ते सारे उरकून घेऊ लागला. अन मामांना काहीतरी रोग झाला असावा असा विचार करून त्याने त्यांच्यावर वैद्याचे औषधोपचार सुरू केले. ज्या दिवशी बेचैनी थोडी कमी असे त्या दिवशी ते पूजेसाठी पुढे होत. त्यावेळी मंदिरात ध्यानासाठी बसले की, पायापासून वरपर्यंत आतून कोणीतरी सगळे सांधे बंद करीत असल्याचा अनुभव त्यांना येत असे. सांधे बंद केल्याचा कट कट असा आवाजही येत असे. त्यानंतर मात्र पुन्हा ते बंद सांधे कोणीतरी आतून उघडून देईपर्यंत ते अगदी निस्पंद होऊन जात असत. या काळात काजव्यांसारखे प्रकाशकणांचे पुंजके, प्रकाशकणांनी व्यापून गेलेल्या चारही दिशा, चांदीसारख्या प्रकाशाने वेढलेल्या सगळ्या वस्तू; असेही दिसत असे. हे सगळे डोळे मिटलेल्या आणि डोळे उघडलेल्या दोन्ही अवस्थात दिसत असे. अशावेळी ते भवतारीणीला काकुळतीने विनवीत की, 'आई, मला काय होते आहे ते काहीच मला समजत नाही. तूच मला काय ते नीट शिकव. तुझ्याशिवाय मला काहीच गती नाही.'

यानंतर त्यांना हळूहळू देवीच्या एकेका अवयवाचे साक्षात दर्शन होऊ लागले. अन त्याहीपुढे हळूहळू जगदंबेची पूर्ण ज्योतिर्मय आकृती दिसू लागली. ती आकृती त्यांच्याशी बोलत असे, हसत असे, हे कर किंवा हे करू नको असे सांगत असे. पूर्वी नैवेद्य दाखवल्यावर देवीमूर्तीच्या डोळ्यातून तेजाचे किरण येऊन अन्नाला स्पर्श करून जात. नंतर मात्र नैवेद्य दाखवताच प्रत्यक्ष देवी नैवेद्य ग्रहण करीत असल्याचे दिसू लागले. पूर्वी पाषाणाच्या मूर्तीत जिवंतपणा दिसत असे. नंतर मात्र पाषाणमूर्ती दिसतच नसे. दिसत असे फक्त चिन्मयी. नाकपुड्यांजवळ हात नेताच चिन्मयी श्वासोच्छ्वास करीत असल्याचे त्यांना जाणवले, तर दिव्यांच्या प्रकाशात कधीही देवीची सावली पडत नसल्याचाही त्यांना अनुभव येत असे. परत कधी पायात चाळ घालून लहान मुलीसारखी ती वर चढून जात असल्याचे दिसे तर कधी गच्चीवर उभी राहून गंगा आणि कोलकाता यांच्याकडे पाहताना दिसत असे.

या सगळ्या प्रकारामुळे भाचा हृदयराम सतत त्यांच्या सोबत सोबत राहत असे. त्याच्या मनात एक अव्यक्त भीतीही त्यावेळी भरून राहिली होती. कारण दिवसेंदिवस श्री रामकृष्णांच्या पूजेचा ताल वेगळाच होत होता. वैधी भक्ती पूर्णपणे मागे पडून रागाभक्ती किंवा प्रेमभक्तीत ते बुडून गेलेले असत. त्यामुळे देवीला वाहावयाची बेलफुले कधी स्वतःलाच वाहून घेत. कधी मूर्तीशी थट्टाविनोद करीत. कधी ताटातील भाजीभात देवीला भरवीत तर कधी स्वतःच खात. कधी तिच्याजवळ झोपत. सगळाच एक निर्भय उन्मनी भाव. रोजच असे प्रकार होऊ लागल्याने लोकांच्या ते नजरेत आले. काही लोकांनी त्याची व्यवस्थापक मंडळींकडे तक्रार केली. त्यावरून देवस्थानाचे अधिकारी मंदिरात पाहणी करायला आले. त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला पण ते बोलू मात्र काहीही शकले नाहीत. मात्र भट्टाचार्य पुजारी वेडे झाले आहेत किंवा त्यांना भूताने झपाटले आहे यावर मात्र त्यांचे एकमत झाले. सगळ्यांनी मिळून मंदिराचे मालक मथुर बाबू यांना या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा एक दिवस येऊन मथुर बाबूंनी सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आता भट्टाचार्य महाराजांची सुट्टी होणार ही लोकांची खात्री मात्र पूर्ण झाली नाही. घडले भलतेच. अगम्य अशा दैवी लीलेनेच, हा सगळा प्रकार म्हणजे भक्तीची परमावधी असून खऱ्या अर्थाने इथे जगदंबेचा आविर्भाव झाला आहे हे त्यांना मनोमन जाणवले. अन त्यांनी आदेश दिला की, 'भट्टाचार्य महाराज कोणत्याही तऱ्हेने पूजा करोत. त्यांना अडथळा करू नये.'

भक्तीच्या या अफाट आवेगामुळे श्री रामकृष्णांच्या शरीराचा खूप दाह होत असे. साधनाकाळात एकूण तीनदा त्यांना शरीरदाहाचा हा त्रास झाला. पहिल्यांदा त्यांना हा त्रास झाला त्याबद्दल ते सांगत असत, 'संध्या, पूजा करताना ज्यावेळी आतला पापपुरुष दग्ध होऊन गेला असे चिंतन करीत असे त्यावेळी कोणाला माहीत होते की शरीरात खरोखरच पापपुरुष असतो अन त्याला दग्ध व नष्ट करता येते? साधनेच्या सुरुवातीपासून अंगाची आग होणे सुरू झाले. काही तरी रोग झाला असावा असे वाटू लागले. पुष्कळ आयुर्वेदिक तेले चोळली पण काहीच फायदा झाला नाही. एक दिवस पंचवटीत बसलो असताना पाहिले की, एक काळाकभिन्न लाल डोळ्यांचा भेसूर पुरुष अंगातून बाहेर पडून फिरतो आहे. अन त्यापाठोपाठ भगव्या कपड्यातील एक सौम्य पुरुष हाती त्रिशूळ घेऊन बाहेर पडला आहे. त्या त्रिशूळधारी पुरुषाने त्या भेसूर पुरुषावर जबरदस्त हल्ला करून त्याला मारून टाकले. अन सहा महिने सुरू असलेला शरीरदाह त्यानंतर कमी होत थांबला.'

नंतर एकदा वैधी भक्तीची सीमा ओलांडून रागात्मिका भक्तीच्या अवस्थेत असताना त्यांना पुन्हा अंगाची आग आग होण्याचा त्रास झाला होता. त्यावेळी डोक्यावर ओला पंचा ठेवून तीन तीन चार चार तास ते गंगेच्या पाण्यात उभे राहत असत. तरीही फारसा फरक पडत नसे. नंतर त्यांच्या जीवनात आलेल्या आणि त्यांच्याकडून तांत्रिक साधना करवून घेणाऱ्या भैरवी नावाच्या साधिकेने काही उपाय करून त्यांचा हा दाह दूर केला होता.

तिसऱ्यांदा त्यांना मधुरभावाची साधना करतानाही असा शरीरदाह झाला होता. छातीच्या आत वाडगाभर विस्तव ठेवल्यासारखी आग त्यावेळी होत असे. काही वर्षांनी रामकानाई घोषाल या शक्तीसाधकाने त्यांना इष्टदेवतेचा ताईत घालण्यास सांगितले. त्यानंतर इष्टकवच बांधल्यानंतर असा त्रास त्यांना झाला नाही.

श्री रामकृष्णांच्या या असल्या अवस्थेबद्दल मंदिराचे व्यवस्थापक असलेल्या मथुरबाबूंनी आपली सासू आणि मालकीण राणी रासमणी हिला सांगितले. राणीला याचा राग येण्याऐवजी संतोषच वाटला. एक दिवस राणी मंदिरात दर्शनाला आली.  अन देवीसमोर बसली असताना तिच्या मनात कुठल्या तरी खटल्याचाच विचार सुरू होता. श्री रामकृष्णांना तिच्या मनातील ही गोष्ट कळली आणि त्यांनी तिला एक थापड मारली अन तिला म्हणाले, 'इथेही तेच विचार?' याही गोष्टीचा राग न येता उलट तिच्या मनात विशुद्ध भक्तीचा भाव जागा होऊन तिच्या मनातील आदर वाढला.

परंतु हळूहळू श्री रामकृष्णांची भावावस्था अशी होऊ लागली की त्यांच्याने पूजाअर्चा नीट होणे कठीण झाले. नेमक्या त्याचवेळी त्यांचे चुलत भाऊ रामतारक चट्टोपाध्याय कामाच्या शोधात संस्थानात आले. तेही साधक होते. व्यवस्थापक मथुरबाबूंनी त्यांना जगदंबेच्या पूजेसाठी नियुक्त केले. अशा रीतीने साधारण तीन ते चार वर्षे कालीमातेच्या पूजकाचे काम केल्यानंतर श्री रामकृष्ण त्या कामातून मोकळे झाले. मथुरबाबूंनी पूजकाचे काम काढून घेतले तरीही त्यांना सोडले मात्र नाही. उलट त्यांना देवस्थानातच ठेवून घेतले. त्यांच्या लहानमोठ्या गरजांची काळजी घेत राहिले आणि त्यांना कोणाचा त्रास होऊ नये याचीही काळजी घेऊ लागले. श्री रामकृष्णांच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची यानंतर सुरुवात होणार होती.

श्री रामकृष्ण परमहंस (५)

श्री रामकृष्णांना वडिलांचा सहवास फार लाभला नव्हता. त्यांच्या बालवयातच वडील हे जग सोडून गेले होते. ३१ वर्षांनी मोठे असलेले मोठे भाऊ रामकुमार हेच त्यांना वडिलांच्या जागी होते. त्यामुळे रामकुमार यांनी जगाचा निरोप घेतल्यावर श्री रामकृष्ण आणखीनच अंतर्मुख आणि उदास झाले. जगदंबेकडील त्यांचा ओढा वाढला. पूजा आटोपल्यावर सुद्धा ते मंदिरातच बसून राहत. तिथे भजने आदी गात वेळ घालवत. अन रात्री मंदिराची दारे बंद झाल्यावर लोकांना टाळून, परिसरातील पंचवटीच्या झाडीत जाऊन ध्यान करीत बसत. पक्का व्यवहारी असलेल्या, त्यांच्या सोबत राहणाऱ्या हृदयरामला मात्र त्यांचे असे वागणे आवडत नसे. परंतु तो काही करू शकत नव्हता. काही दिवसांनी मात्र यावर काहीतरी उपाय करायचा असे त्याने ठरवले. त्याप्रमाणे एक दिवस रात्री तो कळू न देता त्यांच्या मागे मागे गेला. रोजच्याप्रमाणे श्री रामकृष्ण पंचवटीच्या झाडीत शिरले आणि खोलगट भागात असलेल्या आवळीच्या झाडाखाली जाऊन ध्यानाला बसले. हृदयरामने त्यांना काही म्हटले नाही. मात्र त्यांना भीती दाखवण्यासाठी तो झाडीत दगडगोटे, मातीची ढेकळे फेकू लागला. परंतु त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही असे पाहून तो आपल्या खोलीत परतला. दुसऱ्या दिवशी मात्र त्याने जोर करून त्यांना विचारलेच, 'झाडीत जाऊन रात्री काय करता?' त्यावर श्री रामकृष्णांनीही आढेवेढे न घेता सरळपणे सांगितले, 'त्या ठिकाणी आवळीचे झाड आहे त्याखाली बसून ध्यान करतो. आवळीच्या झाडाखाली ध्यान केल्याने कामना पूर्ण होते असे शास्त्रात सांगितले आहे.'

यानंतर काही दिवस श्री रामकृष्ण ध्यानाला बसले की आजूबाजूला दगडगोटे येऊ लागले. हे हृदयचेच काम आहे हे माहीत असूनही त्यांनी त्याला काही म्हटले मात्र नाही. अखेर एक दिवस मनाचा हिय्या करून हृदय त्यांच्या मागोमाग पंचवटीच्या झाडीत शिरला. अन पाहतो तर काय? धोतर, जानवे सगळं काढून टाकून श्री रामकृष्ण ध्यानात बुडून गेले आहेत. हे पाहून त्याला वाटले मामा वेडे झाले आहेत. तो त्यांच्याजवळ गेला अन आरडाओरडा करून विचारू लागला, 'हे काय आहे? ध्यान करायचे तर करा पण नागवे होऊन का बसता?' त्यावर ते म्हणाले, 'तुला माहिती नाही. पाशमुक्त होऊन ध्यान करायचे असते. जन्मापासून माणूस घृणा, लज्जा, कुल, शील, भय, मान, जाती आणि अभिमान या आठ पाशांनी बद्ध असतो. जानवंदेखील मी मोठा, मी ब्राम्हण या अभिमानाचं चिन्ह आणि पाश होय. जगदंबेला आळवण्यासाठी हे सगळे पाश फेकून देऊन एकाग्र मनाने आळवायचं असतं.' मामांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू या विचाराने गेलेला हृदय स्वतःच अचंभित होऊन परतला. ही त्यांच्या साधनेची सुरुवात होती.

श्री रामकृष्णांच्या जीवनात नंतरही अशा अनेक घटना पाहायला मिळतात. अष्टपाश तोडून मुक्त झाल्याशिवाय आपलं मन पूर्णपणे ईश्वराकडे लावता येत नाही. कुठल्या ना कुठल्या पाशात किंचित का असेना ते अडकलेलं राहतं. त्यामुळे मनाला कठोरपणे या पाशातून सोडवण्यासाठी प्रत्यक्ष शरीराला, इंद्रियांनाही तसे वळण लावावे लागते. नाही तर मन एकीकडे आणि इंद्रिये दुसरीकडे अशी साधकाची ओढाताण होते. आध्यात्मिक विकासाला ते बाधक ठरते. या धारणेतून त्यांनी आपल्या शरीरालाही वळवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. अभिमानाचा नाश करण्यासाठी अनेकदा ते लोकांनी विष्ठा केलेली जागा स्वतः स्वच्छ करीत असत. तर कधी, माती आणि सोने सारखेच हे बाणवण्यासाठी एका हाती माती आणि एका हाती रुपये घेऊन 'रुपया माती, माती रुपया' म्हणत म्हणत दोन्ही गंगेत फेकून देत असत. सगळ्यांविषयी शिवबोध पक्का करण्यासाठी, कालीवाडीत भिकाऱ्यांचे खाणे झाल्यावर त्यांचे उष्टे, देवतेचा प्रसाद म्हणून खात आणि मस्तकी लावीत. त्यांची उष्टी पाने डोक्यावरून नेऊन गंगेकाठी टाकत. नंतर फडा घेऊन ती जागा धुवून स्वच्छ करीत. मन, जाणीव, व्यवहार, शरीर, इंद्रिये यांच्यात पूर्ण ऐकतानता राहावी यासाठी कठोरपणे प्रयत्न करीत असत.

याचा परिणाम म्हणूनच साधना काळानंतरच्या आयुष्यातही अनेक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळतात. एका घटनेचा उल्लेख येथे करता येईल. स्वामी विवेकानंद दक्षिणेश्वरला येऊ जाऊ लागल्यानंतरची एक घटना. श्री रामकृष्णांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या अंथरुणाखाली काही रुपये लपवून ठेवले. श्री रामकृष्ण अंथरुणावर बसताच त्यांना जणू विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. सगळे अंग पोळले. स्वामीजींनी नंतर ते रुपये काढून घेतले आणि त्यांची क्षमा मागितली. श्री रामकृष्णांचा ईश्वराशी भावबंध इतका शुद्ध होता.

ब्राम्ह समाजाचे त्यावेळचे नेते शिवनाथ शास्त्री यांनी 'modern review' मध्ये १९१० सालच्या नोव्हेंम्बर महिन्यात लिहिलेल्या व्यक्तिगत आठवणींवर आधारित लेखात; श्री रामकृष्णांच्या या प्रयोगांवर थोडी टीकाही केली होती. श्री रामकृष्णांचे हे प्रयोग म्हणजे त्यांचा मन:कल्पित साधनामार्ग असून त्याची काहीही गरज नव्हती. असे उपाय न करताही मनावर, इंद्रियांवर ताबा मिळवता येतो, असे शिवनाथ शास्त्री यांचे प्रतिपादन होते. यासंबंधात दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे केवळ मनाने भोग्य वस्तूंचा त्याग करण्याने स्वतःशी प्रतारणा करण्याची ढोंगी वृत्ती वाढण्याची शक्यताच जास्त असते. अन दुसरे म्हणजे नवीन साधना पद्धतींना शास्त्रांनी आडकाठी केलेली नाही. नवीन साधना सिद्ध झाल्यास त्यातून नवीन शास्त्र निर्माण होईल एवढेच. श्री रामकृष्णांनी नकळत असेच नवीन शास्त्र सिद्ध केलेले आहे.

यानंतर हळूहळू त्यांचा पूजेचा कालावधी वाढत जाऊ लागला. पूजा करताना, कालीमूर्तीचा शृंगार करताना, नैवेद्य अर्पण करताना, भजने गाताना; त्यांना काहीही भान राहत नसे. एखादी गोष्ट करताना जगदंबेच्या चिंतनात इतके रमून जात की ती गोष्ट संपतच नसे. त्यांचा आहार आणि झोप कमी कमी होऊ लागले. व्याकुळता वाढू लागली. रडत रडत ते देवीला विचारीत, 'मी इतके आळवतो तरीही तू दर्शन का देत नाही?' नंतरच्या काळात ते सांगत असत की, कोरडा करण्यासाठी एखादा पंचा पिळावा तसं कोणीतरी हृदय पिळून काढत आहे असं वाटत असे. आई दर्शन देत नाही याचं असह्य दु:ख होत असे. असेच करुण रुदन करताना एक दिवस अभावितपणे मंदिरातल्या तलवारीवर त्यांची दृष्टी पडली. त्यांनी मनात विचार केला, आई दर्शन देत नाही तर या जगण्याला तरी काय अर्थ आहे? करावा या जीवनाचा अंत. अन झेप घालून तलवार उचलण्यासाठी ते पुढे झाले तोच काहीतरी अद्भुत असं दर्शन झालं आणि बाह्य संज्ञाशून्य होऊन ते पडून गेले. तो आणि त्यानंतरचा दिवस कसा उगवला, कसा मावळला हे काहीही त्यांना कळले नाही. या प्रसंगाचे वर्णन करताना नंतर ते सांगत असत, 'घरदार, मंदिर सगळं जणू कुठे लुप्त झालं. कुठेच काहीही नाही. केवळ एक असीम अनंत चेतन ज्योति:समुद्र. दृष्टीला त्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. चोहीकडून त्या समुद्राच्या लाटा महावेगाने माझ्याकडे झेपावत होत्या आणि त्यांनी मला अजिबात बुडवून टाकले. अन धापा टाकीत, गटांगळ्या खात, भान लोपून पडून गेलो.' याच प्रथम अनुभवात त्यांना जगदंबेचे समूर्त दर्शन झाले होते. त्यामुळेच त्यानंतर भानावर येताना त्यांच्या मुखातून 'आई आई' असे आर्त शब्द उमटले होते.

या दर्शनानंतर जगदंबेचे अखंड दर्शन लाभावे यासाठी वेळोवेळी त्यांची वृत्ती व्याकुळ होत असे. आजूबाजूला लोक आहेत, लोक काय म्हणतील असले काहीही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नसे. एकच धून सदा राहत असे 'आई आई आई.' अन व्याकुळता परमावधीची झाली की, जगदंबाही त्यांना दर्शन देऊन त्यांचे सांत्वन करीत असे. त्यांच्याशी बोलत असे, हसत असे.

श्री रामकृष्ण परमहंस (४)

आपले वडील भाऊ रामकुमार यांच्यासोबत श्री रामकृष्णही दक्षिणेश्वरच्या कालिवाडीत त्यांच्यासह राहू लागले. मंदिराचे व्यवस्थापक आणि राणी रासमणीचे जावई मथुरबाबू यांचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्यांना त्यांच्याबद्दल कसलेसे अनामिक आकर्षणही होते. श्री रामकृष्णांचा स्वभाव, धर्मनिष्ठा, भक्तिभाव यांचे त्यांना कौतुक आणि अप्रूप वाटे. त्यांनाही मंदिराच्या कामात नेमावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु भावाची कर्मनिष्ठा पाहून रामकुमार मात्र त्यासाठी तयार नव्हते. कधीही मथुरबाबूंनी तो विषय काढला तर रामकुमार त्यांचा उत्साह मोडून काढीत असत. कालीमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांचा आतेभाऊ हृदयराम पोटापाण्याच्या शोधात दक्षिणेश्वरला येऊन पोहोचला. श्री रामकृष्ण आणि हृदयराम साधारण समवयस्क होते. दोघांनाही त्यामुळे आनंद झाला आणि त्यांचे दिवस मजेत जाऊ लागले. एक दिवस श्री रामकृष्णांनी मातीची शिवप्रतिमा तयार करून त्या प्रतिमेची पूजाअर्चा केली. हृदयराम ती मूर्ती पाहून अचंबित झाला. त्याने ती मूर्ती मथुरबाबूंना दाखवली. त्यांनाही ती मूर्ती खूपच आवडली आणि ती मूर्ती श्री रामकृष्णांनी तयार केल्याचे ऐकून विस्मय वाटला. त्यांनी ती मूर्ती राणी रासमणीकडे पाठवून दिली. राणीलाही ती अद्भुत मूर्ती अतिशय आवडली आणि ती प्रसन्न झाली. यानंतर मथुरबाबूंच्या मनाने श्री रामकृष्णांना मंदिराच्या कामात नेमण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. एक दिवस मंदिराच्या आवारात श्री रामकृष्णांना पाहून मथुरबाबूंनी त्यांना बोलवायला माणूस पाठवला. श्री रामकृष्ण मात्र त्यांच्याकडे जायला का कू करू लागले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या हृदयरामने त्यांना कारण विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मला नोकरीत वगैरे बांधून घेण्याची अजिबात इच्छा नाही. शिवाय मूर्तीचे दागिने वगैरे सांभाळायचे म्हणजे जबाबदारीचेच काम. ते काही जमणार नाही. तू ही जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी काम स्वीकारीन.' हृदयराम त्यासाठी तयार झाले. नंतर श्री रामकृष्ण मथुरबाबूंना भेटले आणि त्यांनी आपला मनोदय त्यांना सांगितला. मथुरबाबू त्याला तयार झाले आणि त्यांनी दोघांनाही कामावर नेमले. त्याप्रमाणे रामकुमार मुख्य पूजकाचे काम करू लागले, श्री रामकृष्ण जगदंबेच्या शृंगाराचे काम करू लागले आणि हृदयराम त्यांना मदत करू लागले.

काली मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर  तीनेक महिन्यात या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतरच्या जन्माष्टमी उत्सवाच्या वेळी एक आगळी घटना घडली. दक्षिणेश्वरच्या याच परिसरात राधागोविंदाचेही एक मंदिर आहे. त्या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात पार पडला. रात्री गोविंदजींची मूर्ती शयनासाठी घेऊन जाताना पुजाऱ्याचा हातून पडली आणि मूर्तीचा एक पाय भंगला. स्वाभाविकच अनेक चर्चांना उत आला. काय करावे याची जिकडेतिकडे विचारणा होऊ लागली. शास्त्रार्थ सुरू झाले. श्री रामकृष्णांनाही याबाबत विचारले त्यावेळी अतिशय सहजपणे त्यांनी विचारले, 'राणीच्या जावयाचा पाय मोडला तर जावई टाकून द्याल का?' अन त्यांनी उपाय सांगितला - गोविंदजींचा पाय जोडून पुन्हा पूजा सुरू करावी. मथुरबाबू चकितच झाले आणि त्यांना हा सल्ला पटलाही. त्यानुसार श्री रामकृष्णांनीच मूर्तीचा पाय जोडून दिला. त्यानंतर राधागोविंदाच्या पुजाऱ्याची हलगर्जीपणासाठी सुट्टी झाली आणि श्री रामकृष्णांकडे राधागोविंदाच्या पूजेचे काम आले.

श्री रामकृष्णांचे पूजा करणे ही पाहण्यासारखी गोष्ट होती. जो त्यांना पूजा करताना पाही तो मुग्ध होऊन जात असे. पूजा करत असताना कोण आले, कोण गेले याकडे त्यांचे लक्ष नसे एवढेच नाही तर त्याचे त्यांना भानही नसे. पूर्ण एकाग्र चित्ताने त्यांची पूजा चाले. पूजेची विशिष्ट पद्धत असते. त्यात अंगन्यास, करन्यास अशा काही क्रिया असतात. श्री रामकृष्ण नंतरच्या काळात सांगत असत की; हे अंगन्यास, करन्यास करताना आपल्या शरीरात त्या त्या ठिकाणी लखलखीत मंत्राक्षरे जडवलेली त्यांना दिसत असत. तसेच सर्पाकार कुंडलिनीशक्ती सुषुम्ना मार्गाने खरोखर सहस्रार चक्रापर्यंत चढत जाताना दिसे. अन एक एक चक्र पार करताना तो तो भाग बंद करून टाकत त्यांना निस्पंद समाधीत घेऊन जात असे. किंवा पूजेपुर्वी आपल्या चहूभोवताल पाणी फिरवून, आपले पूजास्थान अग्नीच्या परकोटाने वेढून सुरक्षित झालेले आहे अशी कल्पना करताना; प्रत्यक्ष अग्नीने आपले पूजास्थान वेढून टाकलेले त्यांना दिसत असे. पूजा करताना श्री रामकृष्ण सतत अशा प्रकारे दिव्य भावात असत. पूजा, प्रतिमेचा शृंगार इत्यादी करताना ते भक्तीविषयक गाणीही म्हणत असत. गाणी म्हणतानाही त्या गाण्याच्या भावात बुडून जाऊन, त्या भावाशी एकरूप होऊन ते गाणी म्हणत. त्यांचा आवाजही कमालीचा गोड होता. ऐकणाऱ्याला बांधून टाकण्याची शक्ती आणि गोडवा त्यांच्या गाण्यात होते. देवस्थानाची मालकीण असलेली राणी रासमणी जेव्हा मंदिरात येई तेव्हा तेव्हा त्यांना बोलावून त्यांचे गाणे ऐकत असे.

लहान भाऊ गदाधर अशा रीतीने कामकाजाला लागल्याने वडील भाऊ रामकुमार देखील निश्चिन्त झाले. गदाधराला निरनिराळ्या पूजा, पूजाविधी ते शिकवू लागले. काहीच महिन्यात त्यांनी मथुरबाबूंशी बोलून, कालीमूर्तीच्या पूजेचे महत्त्वाचे व मोठे काम गदाधराला सोपवले आणि स्वतः राधागोविंदजींच्या पूजेचे काम करू लागले. शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतल्याशिवाय जगदंबेच्या पूजेचे काम करणे योग्य नाही असा विचार करून श्री रामकृष्णांनी कोलकात्याच्या बैठकखाना भागात राहणारे शक्तीसाधक केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतली. दीक्षा घेताच त्यांना भावावेश प्राप्त होऊन समाधी लागली. स्वतः केनाराम भट्टाचार्य सुद्धा यामुळे अचंबित झाले होते.

सगळे काही सुरळीत सुरू झालेले पाहून रामकुमार काही दिवस कामारपुकुरला घरी जाण्याचा विचार करू लागले. गावी जाण्यासाठी जुळवाजुळव करत असतानाच काही कामासाठी ते श्यामनगर भागात काही दिवस राहिले. तिथेच ते एकाएकी मरण पावले. दक्षिणेश्वर येथे काली मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधारण वर्षभरातच रामकुमारांनी या जगाचा निरोप घेतला. जणू काही पुढील लीलेसाठी गदाधराला जगन्मातेच्या हाती सोपवणे हेच त्यांचे जीवितकार्य होते आणि ते पार पाडून ते पुढील प्रवासाला निघून गेले.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (३)

श्री रामकृष्णांचे वडील बंधू रामकुमार यांनी १८५० साली कोलकात्याला पाठशाळा उघडली होती. त्यानंतर १८५२-१८५३ मध्ये त्यांनी लहान भाऊ गदाधर याला कोलकाता नगरीत आणले होते. याच सुमारास अचिंत्य शक्ती भविष्यातील आपल्या खेळाची मांडामांड करीत होती. कोलकात्याच्या जानबाजार भागात कोळी जातीची राणी रासमणी राहत होती. वयाच्या ४४ व्या वर्षी पती राजचंद्र दास यांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्या गडगंज संपत्तीची आणि दौलतीची देखभाल करण्याचे काम ओघानेच राणीकडे आले होते. तेजस्वी आणि ईश्वरपरायण राणी यशस्वीपणे हे काम करीत असे. दानधर्म, देणग्या, अन्नदान यासाठी राणीने कधी हात आखडता घेतला नव्हता. काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घेण्याची तिची इच्छा मात्र पतीनिधनामुळे बाजूला सारावी लागली होती. कारभार थोडा स्थिरस्थावर झाल्यावर आणि लहान जावई समर्थपणे कामात साथ देऊ लागल्यावर १८४९ साली पुन्हा राणीने काशीयात्रेची तयारी सुरू केली. मात्र जगन्मातेला तर काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळे यात्रेला निघण्याच्या आदल्या रात्री रासमणीला देवीने दर्शन दिले आणि आदेश दिला की, 'काशीला जाण्याची गरज नाही. येथेच भागीरथी किनाऱ्यावर माझे मंदिर उभारून, माझी मूर्तीस्थापना कर. माझ्या नैवेद्याची व्यवस्था कर. त्या ठिकाणी प्रत्यक्ष आविर्भूत होऊन मी तुझी पूजा स्वीकारीन.' राणीने हा आदेश शिरसावंद्य मानून, यात्रेसाठी काढून ठेवलेले सगळे धन भगवतीच्या मंदिर उभारण्यासाठी लावले.

राणी रासमणीने कोलकात्याला भागीरथीच्या पूर्व तीरावर उभारलेले हे मंदिरच आज दक्षिणेश्वरचे कालीमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या आवारात, भवतारीणी कालीमातेच्या सहवासात आणि आशीर्वादाने श्री रामकृष्णांची साधना आणि जीवनलीला पार पडली. याच मंदिराच्या आवारात नरेंद्रनाथ दत्त यांचे विवेकानंद रुपात परिवर्तन झाले. याच मंदिराच्या आवारात कालीमातेच्या आशीर्वादाने नवीन काळाला साजेशा आध्यात्मिक भावधारेचे सृजन झाले. आयुष्याची साधारण तीन दशके श्री रामकृष्ण याच मंदिराच्या आधारे राहिले.

१८४९ साली सुरू झालेली नऊ कळसांच्या या कालीमंदिराची उभारणी १८५५ सालीही पूर्ण झाली नव्हती. राणीला एक चिंता सतावू लागली की, जीवनाचा काही भरवसा नाही. मंदिर बांधकाम पूर्ण व्हायचे आहे अन आपल्याला देवाघरचे बोलावणे आले तर जगदंबेची स्थापना करण्याचा संकल्प राहून जायचा. त्यामुळे राणीने जगदंबेची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळच्या सामाजिक रुढींमुळे दोन समस्या तिच्यापुढे उभ्या राहिल्या. एक म्हणजे जगदंबेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्याची. ब्राम्हण व्यक्तिशिवाय अन्नाचा नैवेद्य कसा दाखवणार? अन दाखवला तरी नंतर तो ग्रहण कोण करणार? त्यामुळे राणीने यावर तोडगा काय अशी विचारणा अनेक शास्त्री, पंडितांकडे केली. झामापूकुर येथे पाठशाळा चालवणारे श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्याकडेही ही विचारणा झाली. त्यांनी तोडगा सांगितला की, प्रतिष्ठापना करण्यापूर्वी हे मंदिर कुणा ब्राम्हणाला दान केले तर तो अन्न नैवेद्याची व्यवस्था करू शकेल आणि तो नैवेद्य ग्रहण करण्यातही कोणाला अडचण होणार नाही. कोलकात्यातील काही मंडळींनी हे सामाजिक रूढीला धरून नाही अशी कुरकुर केली पण राणीला मात्र आनंद झाला. आपल्या गुरूंच्या कुळातील कोणाच्या तरी नावे मंदिर दान करून प्रतिष्ठापना करण्याचे तिने निश्चित केले. याप्रमाणे एक समस्या सुटली पण या मंदिरात पुजारी म्हणून कोण काम करेल ही दुसरी समस्या मात्र सुटायची होती. गुरुकुलातील लोक शास्त्रादीच्या बाबतीत यथातथा वाटत असल्याने त्यांना पुजारी म्हणून नेमण्याची राणीची इच्छा नव्हती. म्हणून तिने योग्य अधिकारी पुजाऱ्याचा शोध सुरू केला. राणीचा हा शोध पुन्हा श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्यापाशी येऊन थांबला. रामकुमार या कामासाठी तयार नव्हते पण अन्य कोणी चांगला पुजारी मिळेपर्यंत अडचण दूर करावी या राणीच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी प्रतिष्ठापना करण्याचे आणि पूजकाचे काम स्वीकारले. त्यानंतर मंदिराचे काम सुरू असतानाच ३१ मे १८५५ रोजी राणी रासमणीने जगदंबेची प्रतिष्ठापना उरकून घेतली. जगदंबेची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उभारणे यानिमित्ताने राणीने नऊ लाख रुपये खर्च केले होते. शिवाय सव्वादोन लाख रुपयात एक परगणा विकत घेऊन तो या मंदिराच्या व्यवस्थेसाठी दान केला होता.

दक्षिणेश्वर मंदिरातील जगदंबेच्या प्रतिष्ठापनेच्या सोहोळ्यात श्री रामकृष्ण सहभागी झाले होते. दिवसभर ते तिथे होते. त्यावेळच्या रीतीप्रमाणे आणि नैष्ठीक ब्राम्हणाला शोभेशा पद्धतीनेच त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद मात्र ग्रहण केला नव्हता. संध्याकाळी बाजारातून एक पैशाचे मुरमुरे आणि साळीच्या लाह्या घेऊन त्यांनी भूक भागवली होती. रात्री ते झामापूकुरच्या निवासी परत आले होते. मोठे भाऊ रामकुमार मात्र दक्षिणेश्वरीच राहिले होते. दुसऱ्या दिवशी श्री रामकृष्ण पुन्हा दक्षिणेश्वरी आपल्या भावाला भेटायला आले. अन संध्याकाळी परतले. त्यानंतर आठवडाभर ते मंदिराकडे फिरकले नाहीत. अन फिरून भावाची खबरबात घ्यायला कालीमंदिरी दाखल झाले. तोवर पूजकाचे पद कायमस्वरूपी स्वीकारण्याचा रामकुमारांचा निर्णय झाला होता. श्री रामकृष्णांना मात्र तो निर्णय पटला नव्हता. त्यामुळे रामकुमारांनी चिठ्ठ्या टाकून ईश्वराचा कौल घेण्याचे ठरवले. तेव्हा - रामकुमारांनी काहीही चुकीचा निर्णय घेतला नसून, त्यांच्या निर्णयाने सगळ्यांचे मंगलच होईल, असा कौल मिळाला. हा कौल मिळाल्याने श्री रामकृष्ण निश्चिन्त झाले तरी त्यांच्यासमोर दुसरी समस्या उभी राहिली की, आता आपण करायचे काय? पाठशाळा बंद होणार. आपल्याला काम काय? या काळजीतच त्या दिवशी ते तिथेच थांबले. मोठे भाऊ रामकुमार यांनी वारंवार म्हणून आणि समजावून देखील, शास्त्रार्थ सांगून देखील; प्रसाद ग्रहण करण्यास मात्र ते तयार झाले नाहीत. अखेर रामकुमारांनी त्यांच्या मनातील गंगाभक्तीला हात घातला. ते त्यांना म्हणाले, 'गंगेच्या काठच्या सगळ्या गोष्टी पवित्र असतात हे तर तू मानतो नं? मग शिधा घेऊन तू गंगेच्या काठी स्वयंपाक कर आणि जेव.' श्री रामकृष्णांनी ते मान्य केले आणि तट दिवशी स्वहस्ते स्वयंपाक करून ते जेवले. त्यानंतर ते तेथेच राहू लागले आणि स्वहस्ते स्वयंपाक करून उदरभरण करू लागले.

मात्र त्यांचे असे वागणे ही अनुदारता किंवा संकुचितता होती असे म्हणता येत नाही. कारण कामारपुकुर येथेच आपल्या मौंजीच्या वेळी त्यांनी लोहार जातीच्या स्त्रीकडून पहिली भिक्षा स्वीकारली होती. शिवाय काली प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकून ते त्यापासून दूर राहिले होते असेही नाही. त्यामुळे मंदिरातील अन्नप्रसाद ग्रहण न करता स्वहस्ते स्वयंपाक करणे ही त्यांची अनुदारता किंवा संकुचितता ठरत नाही, तर नैष्ठिक व्रतस्थता आणि तत्कालीन सामाजिक रीतिरिवाज एवढेच त्याविषयी म्हणता येते. शिवाय साधकाच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया या अंगानेही ते समजून घ्यावे लागते. पुढील काळात आध्यात्मिक भावाचा जो महान प्रवाह निर्माण होणार होता त्याची अगम्य जडणघडण हाही त्याचा एक पक्ष आहेच. स्वतः श्री रामकृष्णांनी आणि त्यांच्या चरित्रकारांनीही या गोष्टीची मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली आजची मते हाच सार्वकालिक मापदंड मानून सगळ्या गोष्टींकडे पाहता येत नाही. ते चुकीचे ठरते.

ते काहीही असले तरीही ईश्वरी शक्ती या पृथ्वीवरील आपल्या नव्या खेळाची हळूहळू व्यवस्थित मांडामांड करीत होती.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (२)

वडील क्षुदिराम चटोपाध्याय यांनी जगाचा निरोप घेतल्याला दोन वर्षे उलटून गेली. तेव्हा परंपरेप्रमाणे ज्येष्ठ बंधू रामकुमार यांनी गदाधराच्या उपनयनाची (मौंजीबंधनाची) तयारी सुरू केली. त्यावेळी गदाधराला नववे वर्ष सुरू होते. मौंजेचा दिवस जवळ आला तेव्हा बालक गदाधराने आपला मनोदय वडील भावाला सांगितला. धनी नावाच्या लोहार जातीच्या एका स्त्रीकडून आपण मौंजविधीतील पहिली भिक्षा घेणार असल्याचे त्याने सांगितले. या धनीनेच गदाधराच्या जन्माच्या वेळी दाई म्हणून चंद्रादेवीची मदत केली होती. तिचा या कुटुंबाशी स्नेहाचा संबंधही होता. एकदा केव्हा तरी तिने गदाधराजवळ आपली ही इच्छा व्यक्त केली होती आणि बालकानेही तिला होकार दिला होता. आता त्याने ते वचन पूर्ण करण्याचा आग्रह धरला. वडील भावासमोर मात्र पेच निर्माण झाला. बालकाच्या या हट्टामुळे कार्यात विघ्न येते की काय अशी स्थिती तयार झाली. गावचे जमीनदार आणि क्षुदिराम चटोपाध्याय यांचे स्नेही धर्मदास लाहा यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली. त्यावेळी रामकुमार यांची समजूत घालत ते म्हणाले, 'तुमच्या कुटुंबात अशी गोष्ट कधी घडली नसेल. पण इतरत्र अनेक ब्राह्मणांच्या घरी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणी बोल लावणार नाही.' अखेर रामकुमार यांची समजूत पटली आणि गदाधराने धनी लोहारणीकडून मौंजेत पहिली भिक्षा घेतली. वचन न पाळल्यास खोटे बोलण्याचे पातक लागते आणि अशा व्यक्तीला ब्राम्हण म्हणवण्याचा आणि यज्ञोपवित (जानवे) धारण करण्याचा अधिकार नाही हा बालकाचा युक्तिवाद जिंकला. या प्रसंगातील तीन बाबी लक्षणीय म्हणता येतील. एक तर बालक गदाधराची दृष्टी आणि विचार, दुसरे म्हणजे जमीनदारांची समन्वय करण्याची भूमिका, तिसरे म्हणजे ब्राम्हण व अन्य जातीतील सलोख्याचे वातावरण. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात कामारपुकुरसारख्या छोट्याशा गावात समाजाची ही स्थिती होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

उपनयन संस्कार झाल्यानंतर गदाधराला कुलदेवता रघुवीर, तसेच शीतलामाता, शिव आदी देवादिकांची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. वडील नसल्याने तसेच मोठे भाऊ रामकुमार प्रापंचिक कामात आणि जीविकोपार्जन करण्यात व्यस्त राहत असल्याने घरच्या देवांच्या पूजेचे काम बालकाकडे आले. धार्मिक वृत्तीचा गदाधर सगळ्या चित्तवृत्ती एकाग्र करून देवपूजा करू लागला. त्याची ही धर्मवृत्ती आणि त्या वृत्तीची एकाग्र तीव्रता एवढी असे की, त्याला अधूनमधून भावसमाधी लागत असे. एका महाशिवरात्रीला तर रात्रीच्या वेळी शिवाचे नाटक करणारा नट न आल्याने गदाधरालाच शिवाचे रूप सजवून उभे करण्यात आले अन बालकाला केवळ तेवढ्यानेच भावसमाधी प्राप्त झाली. समाधी काही केल्या उतरेना त्यामुळे नाटक बंद करावे लागले. तेव्हापासून गावातही बालकाच्या अशा समाधीची चर्चा होऊ लागली.

याच काळात वयाच्या ११ व्या, १२ व्या वर्षीच गदाधराच्या मनात वैराग्याचा उदय होऊ लागला. वैराग्य, ईश्वरभक्ती, सत्यनिष्ठा, सदाचरण, धर्मपरायणता यांच्याऐवजी; पंडित आणि भट्टाचार्य लोकांमध्ये भोगसुखाची आणि धनाची लालसाच असते हे पाहून; त्याच्या मनात शास्त्र इत्यादींच्या विद्येविषयी उदासीनता निर्माण होऊ लागली.

अर्थात त्याचे शाळेत जाणे सुरूच होते. मातृभाषेतील पुस्तके वाचणे, मातृभाषेत लिहिणे बालकाला येऊ लागले होते. गावातील लोकांना गदाधर रामायण, महाभारत वाचून दाखवीत असे. लोकही त्याला कथा, पुराणे वाचण्यासाठी बोलावीत असत. श्री रामकृष्णांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली रामकृष्णायन पोथी, योगाद्येचे गाणे, सुबाहुचे गीत इत्यादी, त्यांचे चरित्रकार स्वामी सारदानंद यांना कामारपुकुरच्या घरी सापडले होते.

गणिताची नावड असूनही पाढे, जुजबी बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार गदाधर करू शकत असे. परंतु याच सुमारास त्यांना अधूनमधून होणारी भावसमाधी पाहून त्यांना वायूरोग झाला असावा या भीतीने शाळेत जाणे, अभ्यास करणे यासाठी कोणीही त्यांना आग्रह करीत नसे. अशीच दोन तीन वर्षे निघून गेली. कुटुंबाचा डोलारा सांभाळणारे मोठे भाऊ रामकुमार यांची कमाई हळूहळू कमी होऊ लागली. त्यांची पत्नीही मुलाला जन्म देऊन देवाघरी निघून गेली. कर्जही होऊ लागले. त्यावेळी, कोलकात्याला जाऊन काही खटपट करावी असा विचार करून रामकुमार कोलकाता नगरीत दाखल झाले. तिथे झामापूकुर भागात एक संस्कृत पाठशाळा उघडून ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले.

गदाधर मात्र गावातच राहून आधीसारखेच जीवन जगत होता. घरची पूजा इत्यादी कामे करणे. आईला कामात मदत करणे. साधूसंतांना भेटणे, त्यांची कामे करणे, त्यांच्याकडून धार्मिक कथा, शास्त्रे यांचं श्रवण करणे, स्वतः कथा सांगणे, धार्मिक नाटके करणे, चित्र व मूर्ती बनवणे; हे सगळे सुरूच होते. गावातील सगळ्या जातीजमातीच्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यात गदाधर अतिशय प्रिय होता. त्याची सरलता, सात्विकता, धार्मिकता, ऋजुता, स्नेह, निष्कपटता यामुळे सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता. गदाधर नाटक वा उत्सव प्रसंगी कोणाकोणाच्या आग्रहाने स्त्री वेष सुद्धा करीत असे. अन हे इतके बेमालूमपणे करीत असे की रोजच्या लोकांनाही तो ओळखू येत नसे. अशी फजिती झाल्याचे किस्सेही घडले होते. अगदी स्त्रियासुद्धा स्त्री वेशातील गदाधराला ओळखू शकत नसत.

मोठे भाऊ रामकुमार यांना मात्र गदाधराच्या सांसारिक उदासीनतेमुळे चिंता वाटू लागली होती. त्यांच्या कोलकात्यातील संस्कृत पाठशाळेचा व्यापही वाढत होता. त्यामुळे त्यांना सोबतीची गरजही वाटत होती. गदाधराबद्दलची काळजी आणि सोबतीची गरज या दोन्ही गोष्टी आई व मधला भाऊ रामेश्वर यांच्याशी बोलून रामकुमारांनी गदाधराला आपल्यासोबत कोलकात्याला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने गदाधर नकळतपणे आपल्या कर्मक्षेत्री दाखल झाला. त्यावेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते.

गदाधराच्या अंगच्या अद्भुत स्मरणशक्ती, विवेचक बुद्धी, दृढनिश्चय, साहस, थट्टाविनोद, प्रेम आणि करुणा; यांचा परिचय त्यांच्या कामारपुकुर येथील बालजीवनात सगळ्यांना झाला. विश्वास, पवित्रता, स्वार्थरहितता, निष्कपटता हे तर त्यांचे स्वभावविशेष होते. कोलकात्याला आल्यावरही त्यात काही बदल झाला नाही. संस्कृत पाठशाळेसोबतच रामकुमार पुष्कळ सधन लोकांच्या घरी देवपूजेचे कामही करीत असत. गदाधर कोलकात्यात आल्यावर त्यांना हाताशी एक जण मिळाला आणि घरोघरीच्या देवपूजेचे काम त्यांनी आपल्या लहान भावावर सोपवले. मुळातच आवडीचे असलेले देवपूजेचे काम गदाधर मनापासून करू लागला. उरलेल्या वेळात त्याने शास्त्रांचा अभ्यासही करावा अशी रामकुमार यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्याबाबतीत मात्र गदाधर उदासीन असे. भावाच्या भावी जीवनाच्या चिंतेपोटी एक दिवस रामकुमारांनी त्यांची याबाबत कानउघाडणी केली. मात्र त्या कानउघाडणीने विचलित न होता गदाधराने मोठ्या भावाला स्पष्ट उत्तर दिले - 'मला केळ्या तांदळाची गाठोडी बांधणारी विद्या शिकायची नाही. मला अशी विद्या शिकायची आहे ज्याने ज्ञानाचा उदय होऊन माणूस कृतार्थ होतो.' आपल्याला सांसारिक विद्या शिकून संसारात पडायचे नाही तर जीवनाचा अर्थ समजून घेऊन कृतार्थ व्हायचे आहे, हे गदाधराने पहिल्यांदा एवढ्या स्पष्टपणे सांगितले. आपल्या जीवनाची ही जाणीव त्यांना त्यावेळी होत होती आणि सर्वप्रथम त्यांनी ती आपल्या वडील भावाजवळ व्यक्त केली. जीवनाची ही कृतार्थता कशी प्राप्त होणार, त्यानंतर आपण काय करणार याबद्दल काहीही संकेत त्यांनी दिले नाहीत पण आपले जीवन सर्वसामान्य लोकांसारखे नसेल एवढे सूतोवाच मात्र त्यांनी त्यावेळी केले.

श्री रामकृष्ण परमहंस (१)

अध्यात्म हा भारताचा प्राण आहे. अध्यात्म वजा केल्यास भारताची शक्ती आणि श्रेष्ठत्व लयाला जाईल. पण तसे होणे कदापि शक्य नाही. कारण भारताची ही अध्यात्म आधारित शक्ती आणि श्रेष्ठत्व हाच जगाचा आधार आहे. कालप्रवाहात ही शक्ती आणि श्रेष्ठत्व कमी अधिक होत असतात. मात्र भारताची विशेषता ही की, वारंवार असंख्य श्रेष्ठ आध्यात्मिक विभूती जन्म घेतात आणि ही शक्ती आणि श्रेष्ठत्व पुन्हा स्थापित करतात. या विभूती आध्यात्मिकतेचा एक सशक्त प्रवाह प्रवाहित करतात आणि या विश्वाला नवसंजीवन प्रदान करतात. १९ व्या शतकात बंगालमध्ये जन्मलेले श्री रामकृष्ण परमहंस हे अशीच एक श्रेष्ठ विभूती होते.

बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरापासून अंदाजे १०० किमी अंतरावर असलेल्या हुगळी जिल्ह्यातील कामारपुकुर या गावी फाल्गुन शुद्ध द्वितीया या तिथीला, १७ फेब्रुवारी १८३६ रोजी ब्राम्ह मुहूर्ती (पहाटेस) रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गदाधर होते. त्यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चटोपाध्याय आणि आईचे नाव चंद्रादेवी होते. क्षुदिराम चटोपाध्याय गया क्षेत्री तीर्थयात्रेला गेले असताना त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले आणि 'मी तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्या घरी येईन' असे त्यांना सांगितले. १८३५ सालच्या या घटनेनंतर १८३६ साली गदाधराचा जन्म झाला. त्यावेळी क्षुदिराम ६१ वर्षांचे आणि चंद्रादेवी ४५ वर्षांच्या होत्या. गदाधराला रामकुमार आणि रामेश्वर असे दोन भाऊ, आणि कात्यायनी व सर्वमंगला अशा दोन बहिणी होत्या.

कामारपुकुरपासून जवळच असलेल्या देरे गावी क्षुदिराम राहत असत. तेथे त्यांची सुमारे ४३ एकर जमीन होती. त्या गावच्या जमीनदाराने एकदा त्यांना आपल्या बाजूने कोर्टात खोटी साक्ष देण्याची गळ घातली. परंतु धर्मनिष्ठ, देवभक्त, सात्विक वृत्तीच्या क्षुदिरामांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. त्याचा सूड म्हणून जमीनदाराने त्यांच्याच विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आणि त्यांचा सगळा जमीनजुमला गिळंकृत केला. अकिंचन आणि अनिकेत झालेले क्षुदिराम पत्नी व दोन मुलांना घेऊन कामारपुकुरला आले होते. कामारपुकुर हे त्यावेळी बऱ्यापैकी सधन आणि उद्योगी गाव होते तरीही रामकृष्णांचा परिवार मात्र ओढगस्तीतच एका सहृदय माणसाने दिलेल्या झोपडीतच राहात होता. क्षुदिराम यांची ईश्वरपरायणता, सात्विकता आणि विरागी वृत्ती मात्र अभंग होती.

लहानपणापासूनच गदाधराची स्मरणशक्ती अद्भुत होती. वडिलांच्या तोंडून ऐकलेली स्तोत्रे, गोष्टी, पूर्वजांची माहिती असे सगळे त्याला एकदा ऐकले की कायम लक्षात राहत असे. कामारपुकुरचे जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावच्या मुलांसाठी स्वखर्चाने सुरू केलेल्या शाळेत वयाच्या पाचव्या वर्षी गदाधराला दाखल करण्यात आले. सकाळी दोन तीन तास शाळेत, मग घरी जाऊन आंघोळ जेवण उरकायचे आणि दुपारी तीन वाजता शाळेत येऊन सूर्यास्तापर्यंत शाळा, असे शाळेचे स्वरूप होते.

ही शाळा एकशिक्षकी होती. सगळ्या मुलांना एकच शिक्षक शिकवीत. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेत, त्यांना मदत करत. लहान मुलांना खेळण्यालाही भरपूर वेळ दिला जाई. सुरुवातीला यदुनाथ सरकार आणि नंतर राजेंद्रनाथ सरकार हे गदाधराचे शिक्षक होते. लहानपणी गदाधर अवखळ होता. म्हणजे शाळेत न जाता सवंगड्यांबरोबर खेळत राहणे, कुठेतरी गावठी नाटक पाहायला जाणे; असेही तो करीत असे. एक मात्र होते की, जे काही असेल ते तो प्रामाणिकपणे सांगत असे. लपवाछपवी अजिबात नव्हती. त्याच्या स्वभावाचा आणखीन एक पैलू म्हणजे, त्याच्या मनाला पटेल अशा रीतीने त्याला एखादी गोष्ट समजावून दिली नाही तर ती गोष्ट तो कधीच ऐकत नसे. प्रत्येक वेळी बालकाची जिज्ञासा पूर्ण करणेही मोठ्यांना कठीण होत असे. काहीच दिवसात गदाधर जुजबी लिहायला वाचायला शिकला. अंकगणित मात्र त्याला अजिबात आवडत नसे. शाळेबाहेरही बालक अनेक गोष्टी शिकू लागला. कुंभाराकडे जाऊन देवादिकांच्या मूर्ती तयार करणे, चित्रं काढणे, नाटक करणे, कथा सांगणे; अशा अनेक गोष्टी गदाधर आत्मसात करू लागला. त्याची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती विलक्षण होती. नकला करणे, थट्टाविनोद करणे, बायांचे पुरुषांचे आवाज हुबेहूब काढणे यात गदाधर तरबेज होता. त्याच्या ठायी देवभक्तीही विशेष रूपाने होती. आपले वागणे, बोलणे, गाणे म्हणणे याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करीत असे.

वयाच्या सातव्या वर्षीच गदाधराला पहिल्यांदा भावावेश झाला होता. एकदा भातशेतांमध्ये भटकता भटकता काळ्या मेघांसमोरून उडत जाणारे शुभ्र बगळे पाहून तो इतका तन्मय झाला की त्याचे बाह्य भान लोपून तो वाटेतच पडून गेला. त्याला उचलून घरी नेण्यात आले. थोड्या वेळाने तो आपोआप पूर्वीसारखा सामान्य होऊन गेला. त्याला कसलाही त्रास झाला नाही. आईवडिलांना मात्र चिंता वाटली आणि ते औषधोपचार आदींचा विचार करू लागले.

याच दरम्यान इ.स. १८४३ च्या शारदीय दुर्गापूजेसाठी क्षुदीरामांना त्यांचा भाचा रामचंद्र बंदोपाध्याय याने आमंत्रित केले. त्यानुसार ते भाच्याच्या गावी गेले. तेथेच विजयादशमीला दुर्गा विसर्जन आटोपल्यावर काही वेळाने क्षुदिराम यांनी देह ठेवला. तेथेच त्यांच्यावर अंत्यक्रिया झाली. गदाधर वडिलांच्या अंत्यसमयी त्यांच्याबरोबर नव्हता. कामारपुकुरला दुसऱ्या दिवशी ही वार्ता कळली. वडिलांच्या वियोगाचा विषाद गदाधराच्या मनाला विचारशील आणि एकांतप्रिय करू लागला. गावातील आमराई, स्मशान अशा निर्जन जागी तो वेळ घालवू लागला. आईजवळ पूर्वीसारखा हट्ट करणे त्याने थांबवले.

जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावात एक धर्मशाळा बांधली होती. कामारपुकुरच्या रस्त्याने जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू, साधूबैरागी या धर्मशाळेत मुक्काम करत असत. गदाधर या धर्मशाळेत जाई. तिथल्या साधूबैराग्यांना लाकडे आणणे, पाणी आणणे अशा कामात मदत करत असे. काम नसले की त्यांचे वागणे, बोलणे, चर्चा, ध्यानधारणा, उपासना पाहत बसे, ऐकत बसे. सकाळ संध्याकाळचे धुनी पेटवणे, जी काही मामुली भिक्षा मिळाली असेल तीच रांधून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि तो प्रसाद ग्रहण करणे, काही शारीरिक कष्ट वा रोग असल्यास ईश्वरावर भार टाकून हसत हसत दु:ख सहन करणे, आपली गरज भागवण्यासाठीही कोणाला त्रास न देणे; असा त्यांचा व्यवहार तो निरखीत असे. त्याच वेळी साधूचा वेष करून लोक स्वार्थ आणि सुखासाठी कसे ढोंगीपणा करतात हेही त्याला पाहायला मिळे. धर्माची, शास्त्रांची, पुराणांची, ईश्वराची, अध्यात्माची, जगाच्या व्यवहाराची, जगाच्या नश्वरतेची माहिती, ज्ञान, तोंडओळख बालकाला या धर्मशाळेत होऊ लागली.

एकदा असाच साधूंचा एक गट धर्मशाळेत मुक्कामाला आला. चालण्याचे श्रम झाले असल्याने त्यांनी पुष्कळ दिवस तिथे मुक्काम केला. गदाधराची त्यांच्याशी छान ओळख झाली. एक दिवस त्यांनी त्याला अंगाला राख फासून, टिळे लावून सजवून घरी पाठवले. बालकाच्या आईला त्यामुळे चिंता वाटली. हे साधू लोक आपल्या मुलाला पळवून घेऊन गेले तर कसे या चिंतेने तिने गदाधराला धर्मशाळेत जायला मना केले. हे सांगायला बालक दुसऱ्या दिवशी तिथे गेला तेव्हा त्याचे ऐकून घेतल्यावर ते साधू त्याच्याबरोबर त्याच्या घरी आले. आपण बालकाला पळवणार नाही, साधूंच्या दृष्टीने तसे करणे पाप आणि भयंकर गुन्हा आहे; असे सांगून त्यांनी चंद्रादेवीची समजूत घातली.