सोमवार, ३० मे, २०२२

Vivekananda's people

 https://en.m.wikipedia.org/wiki/Charlotte_Sevier


https://en.m.wikipedia.org/wiki/Advaita_Ashrama


https://www.thestatesman.com/opinion/british-couple-swamiji-1502744799.html


https://www.kalyan-gitapress.org/new_issues.html


https://auromere.wordpress.com/2011/09/30/emma-calves-interaction-with-swami-vivekananda/


http://www.vivekananda.net/PPlHeKnew/FriendsOfSV/EmmaCalve.html



https://en.m.wikipedia.org/wiki/Emma_Calv%C3%A9



https://muse.jhu.edu/article/171096/summary



https://indiaspiritual.wordpress.com/2019/08/07/sri-ma-sarada-devi-and-swami-vivekanandas-american-mother-sara-bull/


https://cambridgehistory.org/research/did-you-know/an-intrepid-lady-of-brattle-street-sara-chapman-bull/


https://www.vedanta.com/store/saint-sara-the-life-of-sara-chapman-bull-the-american-mother-of-sw-vivekananda_moreinfo.html


https://www.exoticindiaart.com/m/book/details/saint-sara-life-of-sara-chapman-bull-american-mother-of-swami-vivekananda-NAU858/


https://americanvedantist.org/2011/articles/glimpses-of-sara-bull/


https://en.m.wikipedia.org/wiki/Sara_Chapman_Bull



https://en.m.wikipedia.org/wiki/William_Hastie


https://en.m.wikipedia.org/wiki/Alasinga_Perumal


https://theseer.in/josephine-macleod-and-vivekanandas-mission-a-song-of-freedom/



https://www.ramakrishnavivekananda.info/reminiscences/228_jm.htm


https://en.m.wikipedia.org/wiki/Josephine_MacLeod

श्री रामकृष्ण परमहंस (१३)

तीर्थयात्रेहून परतल्यानंतर काही दिवसांनी श्री रामकृष्णांचा भाचा हृदयराम याची पत्नी मरण पावली. तेव्हा त्याच्या मनात विरक्ती येऊन तो अधिकाधिक साधना करू लागला. एके रात्री मामांना पंचवटीकडे जाताना बघून, त्यांना लागेल म्हणून तो त्यांच्यामागे गडवा व पंचा घेऊन जाऊ लागला. जाता जाता त्याला दिसले की, श्री रामकृष्ण हे रक्तमांसाचा जडदेह धारण करणारे मनुष्य नाहीतच. त्यांच्या देहातून निघालेल्या अपूर्व प्रभेने सगळी पंचवटी उजळून निघाली आहे. चालताना त्यांच्या चरणांचा भूमीला स्पर्श होत नसून ती अधांतरी पडत आहेत. हृदयने पुन्हा पुन्हा डोळे चोळले, आजूबाजूच्या वस्तू पाहिल्या; पण श्री रामकृष्ण मात्र तसेच ज्योतिर्मय दिसत होते. माझ्यात तर काही बदल झाला नाही ना म्हणून त्याने स्वतःकडे पाहिले तर त्याला, तोही त्यांच्या तेजातून निघालेला अंश आहे असे दिसले. हे अद्भुत दृश्य पाहून तो बेभान होऊन ओरडू लागला. त्याला ओरडताना पाहून श्री रामकृष्ण त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या छातीला स्पर्श करून त्यांनी त्याला शांत केले अन म्हणाले, 'आई याला जड करून दे.'

श्री रामकृष्णांच्या या कृतीनंतर हृदय लगेच सामान्य झाला. आपल्या मामांवर रागावून तो म्हणाला, 'का असे केले? अद्भुत दर्शनाचा आनंद मला पुन्हा कसा लाभणार?' त्यावर त्याच्या मामांनी उत्तर दिले, 'अरे एवढ्याशा दर्शनाने केवढा गोंधळ करत होता. मी तर चोवीस तास काय काय पाहत असतो. तुझी वेळ आली की तुलाही दर्शने वगैरे होतील. आता शांत हो.'

मामांच्या सांगण्याने हृदय वरून शांत झाला तरी आत अस्वस्थ होता. त्याला वाटले श्री रामकृष्ण पंचवटीत जिथे साधना करतात तिथे आपण साधना करावी. त्याप्रमाणे तो रात्री पंचवटीत गेला आणि श्री रामकृष्ण जिथे बसून साधना करीत तिथे बसून साधना करू लागला. अन थोड्याच वेळात किंचाळू लागला, 'जळालो, मेलो, वाचवा.' श्री रामकृष्णांनी जाऊन पाहिले अन विचारले तेव्हा तो म्हणाला, 'इथे ध्यान करायला बसताच कोणीतरी जणू घमेलंभर विस्तव माझ्यावर फेकला असं वाटलं आणि मी पोळू लागलो.' श्री रामकृष्ण त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाले, 'जा. तुझा दाह शांत होईल. पण तू असे का करतो. मी सांगितलं आहे नं की असं करत जाऊन नको.'

श्री रामकृष्णांचा पुतण्या अक्षय हादेखील दक्षिणेश्वर मंदिरात पूजक होता. आध्यात्मिक प्रकृतीच्या या पुतण्याचे १८६९ साली दक्षिणेश्वरचे व्यवस्थापक मथुरानाथ यांच्या दिवाणखान्यातच अल्पवयात निधन झाले. श्री रामकृष्णांना त्याच्या निधनाचे अपार दु:ख झाले. या घटनेनंतर ते मथुरानाथांच्या दिवाणखान्यात पुन्हा गेले नाहीत.

या घटनेनंतर काही दिवसांनी मथुरानाथ श्री रामकृष्णांना सोबत घेऊन आपल्या जमीनदारीच्या भागात आणि गुरुगृही घेऊन गेले होते. त्या भागात फिरताना एकदा कलाईघाट येथे गेले असताना खेडयातील बाया माणसांची दुर्दशा आणि दारिद्र्य पाहून श्री रामकृष्ण व्याकुळ झाले आणि त्यांनी मथुरानाथांकडून त्या सगळ्यांना पोटभर जेवण, एकेक वस्त्र आणि डोक्याला लावायला तेल देववीले होते.

इ. स. १८७० साली श्री रामकृष्णांना चैतन्य महाप्रभूंची लीलाभूमी नवद्विपाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली तेव्हा मथुरानाथ त्यांना तिथे घेऊन गेले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८७१ साली आषाढ महिन्यात मथुरानाथांनी या जगाचा निरोप घेतला. त्याआधीची एक घटना त्यांना श्री रामकृष्णांबद्दल किती भक्तिभाव होता ते दाखवणारी आहे. मथुरानाथांच्या कुठल्या तरी सांध्यावर एक फोड झाला होता. तो काही केल्या बरा होत नव्हता. रामकृष्णांनी आपल्याला भेटायला यावे असा लकडा त्यांनी लावला. रामकृष्ण टाळाटाळ करत होते. अखेरीस ते भेटायला गेले. तेव्हा मथुरानाथ त्यांना म्हणाले, 'बाबा तुमची पायधूळ द्या.' त्यावर रामकृष्णांनी विचारले, 'त्याने काय तुझा फोड बरा होईल?' त्यावर मथुरानाथांचे उत्तर विलक्षण होते. ते म्हणाले, 'मी फोड बरा करण्यासाठी पायधूळ मागत नाही. हा भवसागर पार करण्यासाठी मागतो आहे.' असे हे मथुरानाथ अंतिम घटका मोजत होते त्यावेळी रामकृष्ण दक्षिणेश्वरला आपल्या खोलीत प्रगाढ ध्यानात बुडून गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ध्यान संपवून ते भाचा हृदयराम याला म्हणाले, 'मथुर देवीलोकी गेले.' त्यानंतर काही तासांनी रात्री येऊन कालिवाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजता मथुरानाथांनी देह ठेवला. ज्या मथुरानाथांच्या प्रयत्नाने दक्षिणेश्वरचे काली मंदिर उभे राहिले आणि त्या मंदिराच्या आश्रयाने रामकृष्णांच्या साधना आणि लीला होऊन जगाला अध्यात्माचा प्रकाश लाभला; त्या मथुरानाथांशी असलेला रामकृष्णांचा मधुर मानवी संबंध त्यावेळी संपला.

वयाच्या १८ व्या वर्षी इ. स. १८७२ साली श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा माँ या दक्षिणेश्वरला आल्या. त्यांच्या गावी त्यांच्या कानावर रामकृष्णांबद्दल अनेक अफवा पडल्या होत्या. त्या अफवांमध्ये काही तथ्य नसून, आपले पती पूर्वीप्रमाणेच आहेत हे त्यांनी पाहिले आणि त्यांचे मन शांत झाले. रामकृष्णांच्या खोलीजवळील नौबतखान्यात शारदा माँ राहत असत. तिथेच स्वयंपाक वगैरेही करत. दक्षिणेश्वरला आल्यानंतर काहीच दिवसांनी त्या रामकृष्णांच्या खोलीतच झोपू लागल्या होत्या. एक दिवस पतीचे पाय चेपता चेपता त्यांनी पतीला विचारले - 'मी तुम्हाला कोण वाटते?' त्यावर रामकृष्णांनी उत्तर दिले - 'जी आई मंदिरात आहे (जगन्माता), तिनेच या शरीराला जन्म दिला आहे (जन्मदात्री) व ती सध्या नौबतखान्यात राहत आहे आणि तीच आता माझे पाय चेपीत आहे. प्रत्यक्ष आनंदमयीचे एक रूप अशाच तुम्ही मला सर्वदा खरोखरच दिसत असता.'

श्री रामकृष्ण व माँ शारदा यांच्या अलोकसामान्य संबंधांवर लिहिताना श्री रामकृष्ण लीलाप्रसंग या ग्रंथाचे लेखक स्वामी सारदानंद यांनी याच दिवसातला एक प्रसंग नोंदवला आहे. त्यांच्याच शब्दात तो प्रसंग असा - 'एके दिवशी श्री माताजींना स्वतःच्या बाजूला झोपलेल्या बघून ठाकूर आपल्या मनाला संबोधून पुढीलप्रमाणे विवेकविचारास प्रवृत्त झाले होते. ते म्हणाले - मना, याचेच नाव स्त्रीदेह. लोक याला पराकाष्ठेची आस्वाद्य अशी भोगवस्तू समजत असतात आणि त्याचा भोग घेण्यासाठी सदासर्वदा आतुर असतात. परंतु त्याचे ग्रहण केल्याने देहातच आबद्ध राहावे लागते. सच्चिदानंदघन ईश्वराचा लाभ करून घेता येत नाही. मना, स्वतःची इच्छा स्वतःपासून लपवू नकोस. पोटात एक आणि ओठात दुसरे ठेवू नकोस. खरं सांग तू हे ग्रहण करू इच्छितो की तुला ईश्वर हवा आहे? जर तुला हे हवे असेल तर ते तुझ्या समोरच आहे. त्याचे ग्रहण कर. असा विवेकविचार करून ठाकूर श्री माताजींच्या देहास स्पर्श करण्यास उद्यत होताक्षणीच त्यांचे मन कुंठित होऊन एकाएकी समाधीमार्गे असे विलीन होऊन गेले की, त्या रात्री मग ते परत साधारण बोधभूमीवर उतरले नाही. ईश्वराचे नाव ऐकवून दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रयासाने त्यांना भानावर आणावे लागले होते.'

श्री रामकृष्ण परमहंस (१२)

अद्वैत भावात दीर्घ काळ व्यतीत केल्यानंतर श्री रामकृष्णांच्या मनातील धर्माविषयीचा भाव अधिक घनीभूत आणि सर्वव्यापी झाला होता. एकांगीपणा तसाही नव्हताच, नंतर तर कोणाठायी एकांगीपणा दिसला तरीही त्यांना त्रास होत असे. अद्वैत साधना आणि नंतर त्याच भावात अवस्थित राहण्याच्या काळानंतर काहीच दिवसात एक सुफी फकीर दक्षिणेश्वरला आला. श्री रामकृष्ण त्या फकिराकडे आकृष्ट झाले. त्याच्याशी बोलताना त्यांना वाटले की, हाही तर ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे. कसा असेल हा मार्ग असे कुतूहल वाटून त्यांच्या मनाने घेतले की, आपण या मार्गानेही साधना करावी. मनात विचार येताच तो निश्चयात बदलला आणि त्यांनी आपले मन फकिराजवळ बोलून दाखवले. त्याच्याकडून दीक्षा घेतली आणि साधना सुरू केली.

नंतरच्या काळात याबाबत ते सांगत, 'त्यावेळी अल्ला मंत्राचा जप करीत असे. मुसलमानांप्रमाणे काचा न मारता धोतर नेसत असे. त्रिकाळ नमाज पढत असे. हिंदुभाव मनातून अजिबात लोपून गेल्याने हिंदू देवदेवींना प्रणाम करणे दूर, त्यांचे दर्शन घेण्याची देखील प्रवृत्ती होत नसे. असे तीन दिवस लोटल्यानंतर त्या मताच्या साधनेचे फळ हस्तगत झाले.' या साधनाकाळात त्यांना प्रथम लांब दाढी असलेल्या, गंभीर, ज्योतिर्मय पुरुषाचे दर्शन झाले. नंतर सगुण विराट ब्रम्हाची अनुभूती होऊन निर्गुण तुरीय अवस्थेत मन लीन होऊन गेले. या काळात त्यांना मुस्लिम लोकांप्रमाणेच आहार करण्याची इच्छा होत असे. इस्लाम साधनेच्या काळात ते कालीवाडीच्या आतही गेले नाहीत. व्यवस्थापक मथुरामोहन यांच्या बाहेर असलेल्या कोठीतच ते राहिले.

ज्यांच्याकडून श्री रामकृष्णांनी इस्लाम दीक्षा घेतली ते सय्यद वाजीद अली शाह हे सुफी फकीर होते. त्यांचे मूळ गाव डमडम. ते जन्माने हिंदू होते आणि त्यांचे नाव गोविंद होते. मात्र इस्लाम मताच्या आकर्षणाने त्यांनी त्या पंथाची दीक्षा घेऊन साधना केली होती. सुफी पंथाच्या नक्षबंदिया मुजद्दीदिया उपपंथाचे ते अनुयायी होते. अनेक वर्षे साधना करून ते त्या मार्गावरील गुरू म्हणून सर्वत्र परिचित होते. फारसी व अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वभावाने प्रेमळ असलेला हा फकीर सतत कुराणपठण करीत भावसाधनेत बुडलेला असे. ११ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्री रामकृष्णांच्या या इस्लाम साधनेबद्दल इस्लाम अनुयायांचे मत काय आहे असाही एक प्रश्न निर्माण होतो. Shri Ramakrishna's Sufi Sadhana या लेखात मौलाना मुबारक करीम जवाहर म्हणतात, 'इस्लाममध्ये अवतार मानत नाहीत. त्यामुळे इस्लाम मतानुयायी श्री रामकृष्णांना ईश्वरावतार मानू शकत नाहीत. मात्र श्री रामकृष्णांचे मार्गदर्शन आपल्याला अल्लाकडे घेऊन जाऊ शकते असे ते मानू शकतात. इस्लामचे अनुयायी श्री रामकृष्णांना अवतार न मानता मार्गदर्शक (मुरशीद) मानू शकतात.' मौलाना जवाहर यांचे हे मत प्रातिनिधिक म्हणता येत नसले तरीही महत्त्वाचे नक्कीच म्हणता येईल.

नंतरच्या काळात श्री रामकृष्ण म्हणत असत - 'हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जणू एक पर्वत अडथळ्यासारखा उभा आहे. इतके दिवस एकत्र राहूनही एकमेकांची विचारपद्धती, धार्मिक विश्वास अन धर्मकार्ये एकमेकांना पूर्णपणे दुर्बोधच राहिली आहेत. वेदांत विज्ञानावर विश्वास ठेवल्याने हा पर्वत एक दिवस अंतर्धान पावेल आणि दोघे प्रेमाने एकमेकांना आलिंगन देतील.'

अद्वैत साधनेनंतर श्री रामकृष्णांचे शरीर दुर्बल झाले होते. पावसाळा सुरू झाला की गंगेचे पाणी खारे होईल आणि पुन्हा कदाचित प्रकृतीचा त्रास होईल म्हणून त्यांनी काही काळ जन्मगावी कामारपुकुरला जावे असा सगळ्यांनी विचार केला. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी इ.स. १८६७ च्या ज्येष्ठ महिन्यात ते जन्मगावी कामारपुकुरला गेले. व्यवस्थापक मथुरामोहन यांची पत्नी आणि राणी रासमणीची मुलगी जगदंबा हिने तिथल्या मुक्कामात लागणारे सगळे सामान, धान्य आदी त्यांच्यासोबत दिले. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेतील गुरू भैरवी संन्यासिनी आणि त्यांचा भाचा हृदय हेही त्यांच्यासोबत कामारपुकुरला गेले. त्यांची म्हातारी आई मात्र कालीवाडीतच राहिली. उरलेले आयुष्य गंगातीरीच घालवण्याचा संकल्प त्यांनी मोडला नाही.

जवळपास आठ वर्षांनंतर श्री रामकृष्ण आपल्या जन्मगावी गेले होते. त्या काळात गावातील लोकांच्या कानावर त्यांच्याबद्दल खूप गोष्टी गेल्या होत्या. ते बाईचा वेष घालून हरी हरी करतात, कधी अल्ला अल्ला करीत असतात इत्यादी कथा गावकऱ्यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहण्याची सगळ्या गावालाच उत्सुकता लागली होती. पण श्री रामकृष्ण जसे पूर्वी होते तसेच आहेत हे पाहून गावकऱ्यांना संतोष वाटला. रोजच त्यांना पाहायला, भेटायला, बोलायला लोकांची गर्दी होत असे. त्यांच्या सहवासात एक अपूर्व शांतता गावकरी अनुभवत असत. सांसारिक चिंतांचा त्यांच्या सान्निध्यात विसर पडतो असाही अनुभव लोक घेत असत.

श्री रामकृष्ण गावी राहू लागल्यानंतर काही दिवसांनी घरचे लोक, त्यांच्या पत्नीला 'सारदा'ला तिच्या माहेरहून घेऊन आले. त्यावेळी सारदा देवींना पंधरावे वर्ष सुरू होते. सहा-सात महिने श्री रामकृष्ण कामारपुकुरला राहिले. बालपणीचे मित्र, जुने स्नेही, आप्त अशा सगळ्यांसोबत त्यांचा हा काळ आनंदात गेला. त्यांची प्रकृतीही सुधारली. याच काळात शेवटी शेवटी भैरवी संन्यासिनीचे क्षुल्लक कारणावरून हृदयशी भांडण झाले. त्यानंतर काहीच दिवसात उपरती होऊन, माफी मागून, किल्मिष दूर करून ती काशीला निघून गेली.

सुमारे सात महिने जन्मगावी राहून इ.स. १८६७ च्या अखेरीस श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्याच सुमारास काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांना सहकुटुंब तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. स्वाभाविकच त्यांनी श्री रामकृष्णांनाही आग्रह केला. या आग्रहामुळे श्री रामकृष्ण आपली वृद्ध आई आणि भाचा हृदयराम यांच्यासह मथुरांबरोबर तीर्थयात्रेला गेले. इ.स. १८६८ च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून अंदाजे सहा-सात महिने ही मंडळी तीर्थयात्रेला गेली होती.

या यात्रेसाठी सगळे मिळून शंभरेक महिला पुरुष होते. मथुरांनी यासाठी रेल्वेचा दुसऱ्या वर्गाचा एक व तिसऱ्या वर्गाचे तीन डबे आरक्षित केले होते. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार हे चार डबे वेगळे काढून मुक्काम करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. कोलकात्याहून निघाल्यावर देवघरला बैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी हे लोक थांबले होते. या ठिकाणी गरीब वस्तीतील लोकांना पाहून श्री रामकृष्णांचे मन करुणेने द्रवले होते आणि त्यांनी मथुरांना या लोकांना जेवण आणि वस्त्रे द्यायला सांगितले होते. इथून निघाल्यावर काशीला पोहोचण्याआधी एका ठिकाणी श्री रामकृष्ण व हृदय गाडीतून उतरले होते आणि पुन्हा गाडीत चढण्यापूर्वीच गाडी सुरू होऊन गेली. योगायोगाने रेल्वे कंपनीचे एक अधिकारी राजेंद्रलाल बंदोपाध्याय एका विशेष गाडीने तिथे पोहोचले आणि या दोघांना अडचणीत पाहून आपल्या गाडीने काशीला घेऊन गेले.

काशी मुक्कामी श्री रामकृष्ण केदारनाथ आणि अन्य देवतांच्या मंदिरात नित्य दर्शनासाठी जात असत. त्या ठिकाणीही त्यांना भावावेश होत असे. मणिकर्णीकेच्या घाटावरील श्रेष्ठ परमहंस त्रैलंग स्वामी यांनाही श्री रामकृष्ण भेटले होते. पाच सहा दिवस काशीला राहून ही सगळी मंडळी प्रयागला गेली. त्या ठिकाणी त्यांनी संगमात स्नान आणि त्रिरात्र वास केला होता. तिथून ते परत काशीला आले आणि पंधरा दिवस तिथे राहून वृन्दावनला गेले. काशी येथे भेटलेली तंत्रगुरू भैरवी ही देखील यांच्यासह वृन्दावनला गेली होती. तेथे सुमारे दोन आठवडे राहून मंडळी पुन्हा काशीला आली आणि काही महिने तिथेच राहिली. काशीहून गयेला जाण्याचा मथुरांचा विचार होता. परंतु गयेला गेल्यास आपण या धराधामी राहू शकणार नाही असे श्री रामकृष्णांनी निक्षून सांगितल्याने मथुरांनी तो विचार सोडून दिला. साधारण इ.स. १८६८ च्या मध्यावर ही मंडळी तीर्थयात्रा आटोपून दक्षिणेश्वरला परतली.

श्री रामकृष्ण परमहंस (११)

साधारण १८६४ साली केव्हातरी श्रीमत परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले. हे एक नागा संन्यासी होते. बराच काळ त्यांनी नर्मदा तटाकी साधना केली होती. भ्रमण करत करत ते राणी रासमणीच्या कालीवाडीत पोहोचले. एक दिवस नावेतून उतरून ते गंगा किनाऱ्यावरील देवस्थानाच्या ओवरीत येऊन बसले. इकडेतिकडे पाहताना त्यांना श्री रामकृष्ण दृष्टीस पडले. श्री रामकृष्ण अन्यमनस्कपणे, जणू या जगात नाहीतच असे त्याच ओवरीत बसले होते. तोतापुरींना त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटले. ही व्यक्ती अद्वैत वेदांताच्या साधनेला अत्युत्तम आहे असे त्यांच्या मनात आले. तोतापुरी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, 'तुम्ही अद्वैत साधना कराल का?' त्यावर श्री रामकृष्णांनी उत्तर दिले - 'मी काय करणार वा करणार नाही हे काही मला ठाऊक नाही. माझी आई म्हणेल तसे मी करीन.' त्यावर तोतापुरी त्यांना म्हणाले, 'मग जाऊन आईला विचारून या.' त्यावर श्री रामकृष्ण उठले आणि हळूहळू काली मंदिरात  गेले. तिथे जाताच त्यांना भगवतीचा आवाज आला, 'तू अद्वैताची साधना कर.' प्रणाम करून श्री रामकृष्ण माघारी वळले. तोतापुरी हे सगळे पाहत होते. त्यांना गंमत वाटली. हा माणूस या देवीमूर्तीला आई मानतो आणि तिलाच सल्ला विचारतो हे पाहून त्यांना थोडी मौजही वाटली. कारण ते स्वतः अद्वैत सिद्धांताचे मोठे अधिकारी पुरुष होते. अन या विश्वाची ती आदिशक्ती दोघांच्याही नकळत अलगदपणे आपले कार्य करत होती.

वेदांत साधना करण्यापूर्वी तुम्हाला जानवे आणि शेंडी यांचा त्याग करून संन्यास घ्यावा लागेल असे तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, गुप्तपणे संन्यास घेता येत असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्यासोबत राहणाऱ्या आणि मोठ्या मुलाच्या निधनाने पोळलेल्या शोकसंतप्त अशा माझ्या आईला माझ्या संन्यास घेण्याने त्रास होईल. तिला अधिक दु:ख होऊ नये म्हणून मी गुप्तपणे संन्यास घेईन. तोतापुरींनी त्याला संमती दिली. त्यानंतर एका शुभ दिवशी तोतापुरी यांनी त्यांच्याकडून प्रथम पितरांचे व नंतर स्वतःचे (श्री रामकृष्णांचे स्वतःचे) श्राद्धही करवून घेतले. कारण संन्यास घेण्यापूर्वी साधक तिन्ही लोकांचा निरोप घेत असतो. श्री रामकृष्णही तोतापुरी सांगतील ते ते अगदी तसेच व्यवस्थित करू लागले. श्राद्ध आदी आटोपल्यावर साधनेच्या सामानाची जुळवाजुळव पण त्यांनी करून ठेवली. नंतर एका ब्राम्ह मुहूर्तावर दोघेही दक्षिणेश्वरच्या पंचवटीतील कुटीरात उपस्थित झाले. पूर्वकर्म झाले. होम पेटवण्यात आला. पवित्र मंत्रांच्या गंभीर आवाजाने पंचवटी निनादली. श्री रामकृष्ण त्रिसुपर्ण मंत्रांच्या मंत्रोच्चारासह होमात आहुती देऊ लागले. त्यानंतर विरजा होम सुरू झाला. 'माझ्या ठायी असणारी पंचमहाभूते शुद्ध होवोत... मी रजोगुणाच्या मलिनतेपासून मुक्त होवो... माझ्या ठायी असणारे प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे सगळे वायू शुद्ध होवोत... माझे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे पंचकोष शुद्ध होवोत... माझ्या ठायी असलेले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे विषयसंस्कार शुद्ध होवोत... माझे मन, वाणी, काया, कर्म शुद्ध होवोत... माझ्या मार्गातील सगळे अडथळे दूर होवोत... माझी सगळी मलिनता दूर होऊन मी ज्योति:स्वरूप होवो...' अशी प्रार्थना करत अनेक आहुती दिल्या गेल्या. नंतर 'सर्व लोकांच्या प्राप्तीची आशा मी त्यागतो' आणि 'सर्व भूतांना अभय देतो' असे म्हणून होमाची समाप्ती झाली. शिखा आणि यज्ञोपवित यांचा त्याग झाला.

गुरूने दिलेली कौपीन, काषाय वस्त्रे परिधान केली. गुरूने दिलेले 'श्री रामकृष्ण' हे नाव ग्रहण केले. अन तोतापुरी यांच्याजवळ ते उपदेश श्रवण करण्यासाठी बसले. तोतापुरींनी वेदांताच्या अद्वैत सिद्धांताचा उपदेश देणे सुरू केले. नंतरच्या काळात याबद्दल सांगताना श्री रामकृष्ण सांगत असत - 'दीक्षा प्रदान करून तोतापुरी अनेक सिद्धांत वाक्यांचा उपदेश करू लागले. मन विकल्परहित करून आत्मध्यानात निमग्न होऊन जाण्यास त्यांनी सांगितले. मी मात्र मनाला विकल्परहित करून नामरूपाच्या अतित नेऊ शकलो नाही. इतर साऱ्या गोष्टीतून क्षणात मन बाहेर पडत असे. मात्र अखेरच्या क्षणी जगदंबेचे उज्वल रूप उदयास येई आणि मन तिथेच थांबे. वारंवार असे झाले तेव्हा डोळे उघडून त्यांना म्हणालो, नाही जमले.' त्यावर तोतापुरी क्षुब्ध झाले आणि निर्भत्सना करून म्हणाले, 'क्यो होगा नहीं?' इतके म्हणून त्यांनी इकडेतिकडे नजर फिरवली. कुटीत फुटक्या काचेचा एक तुकडा त्यांना दिसला. तो उचलून त्याचे तीक्ष्ण टोक माझ्या भुवयांमध्ये जोराने रोवून म्हणाले, 'या बिंदूवर मन केंद्रित करा.' तेव्हा दृढ संकल्प करून ध्यानास बसलो. फिरून अखेरच्या क्षणी जगदंबेची मूर्ती मनात उदय पावली तेव्हा ज्ञान ही तलवार आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीचे दोन तुकडे करून टाकले. मग विकल्प राहिला नाही आणि मन वेगाने नामरूपांचे राज्य ओलांडून समाधीत पोहोचले.'

अशा रीतीने श्री रामकृष्ण समाधीत स्थित झाल्यावर तोतापुरी कुटीच्या बाहेर आले आणि कोणी समाधीभंग करू नये म्हणून कुटीचे दार त्यांनी बाहेरून लावून घेतले. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस असे तीन दिवस सरले. कुटीचे दार उघडण्यासाठी आतून आवाज मात्र आला नाही. आश्चर्य वाटून तोतापुरी आत गेले आणि पाहतात तर काय? ज्या स्थितीत श्री रामकृष्ण बसले होते त्याच स्थितीत होते. शरीराची स्थिती किंचितही बदलली नव्हती. श्वासोच्छ्वास पूर्ण बंद होता. सगळे वायू निरुद्ध झालेले. जिवंतपणाचे काहीही लक्षण नाही. त्यांनी शिष्याच्या शरीराला पुन्हापुन्हा स्पर्श केला तरीही काहीच चेतना नाही, कसली हालचाल नाही, कसली प्रतिक्रिया नाही. निस्पंद... निष्कम्प... हे पाहून तोतापुरी आनंदाने व विस्मयाने ओरडले, 'यह क्या दैवी माया? समाधी... निर्विकल्प समाधी... एकही दिन मे !!'

सतत चाळीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर आपण प्राप्त केलेली अद्वैत अवस्था या अद्भुत शिष्याने एका दिवसात प्राप्त करून घेतली याचे सकौतुक आश्चर्य वाटलेल्या तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना साधारण भावभूमीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन दिवसांपेक्षा जास्त कुठेही न राहणारे तोतापुरी, त्यानंतर कुठल्याशा अगम्य ओढीने अकरा महिने दक्षिणेश्वरच्या पंचवटीत राहिले. या काळात त्या दोन गुरूशिष्यात अद्वैतानंदाची लयलूट होत होती. 

अकरा महिने पंचवटीत राहून तोतापुरी आपल्या मार्गाने निघून गेल्यावर आपण सतत याच अद्वैत बोधात राहावे अशी इच्छा श्री रामकृष्णांच्या मनात निर्माण झाली. अन तब्बल सहा महिने श्री रामकृष्ण या समाधी अवस्थेत होते. ज्या अवस्थेत राहिल्यावर साधारण जीव परत फिरू शकत नाही आणि एकवीस दिवसात शरीर सुकलेल्या पानासारखे गळून पडते, त्या अवस्थेत ते सहा महिने होते. त्याविषयी ते सांगत असत - 'दिवस कधी उगवत असे, रात्र कधी येत असे जात असे, हेही कळत नव्हते. मेलेल्या माणसाच्या नाकातोंडात माशा शिरतात तशा शिरत असत. मात्र त्याचे भान नसे. केसात माती जमून जमून जटा झाल्या होत्या. शौचाला वगैरे होऊन जाई तरीही शुद्ध नसे. अशा स्थितीत शरीर काय टिकले असते? पण त्याच वेळी कुठून तरी एक साधू तिथे हजर झाला. त्याच्या हाती एक काठी होती. त्याने माझी अवस्था ओळखली. त्याला कळले की, माझे कार्य अजून व्हायचे आहे. म्हणून खाण्याच्या वेळी तो खायचे आणून मला मारून मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. थोडी शुद्ध येते आहे असे दिसले की जबरदस्तीने खाण्याचे कोंबून द्यायचा. कधीकधी पोटात एव्हढेतेवढे जाई, कधी तेही नाही. असे सहा महिने उलटले. त्यानंतर त्याच अवस्थेत आईची वाणी ऐकू आली - 'भावमुखी राहा. लोकोपदेशासाठी भावमुखी राहा.' त्यानंतर आजारी पडलो. सहा महिने पोटाच्या दुखण्याने बेजार होतो. मग हळूहळू सामान्य अवस्था आली.'

श्री रामकृष्ण परमहंस (१०)

इ. स. १८६१ ते १८६४ या काळात तंत्रशास्त्रातील अनेक तांत्रिक साधना पूर्ण करून श्री रामकृष्ण वैष्णव मार्गाच्या वात्सल्य, मधुर आदी साधनांकडे वळले. त्यांचा जन्मच मुळी वैष्णव कुटुंबात झाला होता. श्रीराम हे त्यांचे कुलदैवत होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना वैष्णव पंथाची ओढ होतीच. १८६४ मध्ये केव्हातरी दक्षिणेश्वरच्या कालीवाडीत एक रामपंथी साधू आला. त्या जटाधारी बाबांजवळ एक रामलालाची छोटी मूर्ती होती. अतिशय भावभक्तीने तो त्या रामलालाची पूजाअर्चा इत्यादी करीत असे. त्या साधुसाठी ती रामलालाची मूर्ती नव्हती तर साक्षात बालक श्रीराम होते. त्याच भावनेने तो त्यांना खाउपिऊ घालत असे, झोपवत असे, रागे भरत असे. तो आल्यापासूनच श्री रामकृष्णांना त्याची आणि त्याच्यासोबत असलेल्या रामलालाची ओढ वाटू लागली. ते तासंतास त्यांच्याजवळ बसून राहू लागले. हळूहळू रामलालाला देखील श्री रामकृष्णांचा लळा लागला. नंतरच्या काळात आपल्या शिष्यांना ते सांगत असत की, 'प्रत्यक्ष रामलाला दिसत असे, खेळत असे, हट्ट करत असे, लाड करवून घेत असे, रुसत असे. अगदी जीवंत. जसे तुम्हा लोकांना पाहतो, तुमच्याशी बोलतो तसे.' रामलालाच्या अनेक लीलांचे वर्णनही ते सांगत असत. एकदा त्याने गंगेत स्नान करण्याचा हट्ट केला तेव्हा, आई जशी हट्टी मुलाची खोड मोडण्यासाठी करते तसे, त्यांनी त्याला प्रवाहात दाबून धरले. त्यामुळे रामलाला कासावीस झाला आणि त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला जवळ घेऊन त्याची समजूत काढली. असे अनेक प्रसंग ते सांगत असत. काही काळाने त्या जटाधारी बाबांना चिरवांच्छित अद्भुत दर्शन लाभले. त्यावेळी श्री रामकृष्णांकडे येऊन ते म्हणाले की, 'आता माझी सगळी तळमळ शांत झाली आहे. या रामलालालाही तुमची ओढ आणि लळा लागला आहे. तेव्हा त्याला इथेच राहू द्या आणि मला जाण्याची परवानगी द्या.' याप्रमाणे ते बाबाजी निघून गेले आणि रामलाला श्री रामकृष्णांजवळ राहिले. अन्यही अनेक रामायत साधू बैरागी कालीवाडीत त्या सुमारास आले होते. त्यांच्याकडून अनेक भजने श्री रामकृष्णांनी शिकून घेतली होती. कालीवाडीत येणाऱ्या विविध पंथ संप्रदायांच्या अनेक साधू बैराग्यांना काय हवे नको ते पाहून त्यांना ते ते देण्याची व्यवस्थाही श्री रामकृष्ण करून देत असत.

यानंतर श्री रामकृष्णांनी मधुर भावाची साधना केली. अन्य साधनांप्रमाणेच याही वेळी ते त्या भावात पूर्ण बुडून गेले होते. इतके की आपण पुरुष आहोत हेही ते जणू विसरून गेले होते. ईश्वर हाच आपला प्रेमास्पद हा भाव त्यांच्यात पूर्ण भिनला होता. त्यांची वेशभूषाही त्या काळात स्त्रियांचीच राहत असे. स्त्रियांसारखेच चालणे, बोलणे, हावभाव इत्यादी पाहायला मिळत. स्त्रियांमध्ये मिसळल्यास ते श्री रामकृष्ण आहेत हे देखील ओळखू येत नसे. काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरबाबू यांच्या घरीही अगदी अंत:पुरापर्यंत त्यांचा वावर होत असे. त्या महिलांनाही त्यांच्याबद्दल संकोच वाटत नसे. कधी कधी सखी भावाने ते त्यांची वेणीफणीही करून देत. त्यांच्या अगदी जवळच्या, रोजच्या लोकांनाही त्या अवतारात ते ओळखू येत नसत. त्या काळात नित्य त्यांच्यासोबत राहणारा, त्यांची सगळी काळजी घेणारा त्यांचा भाचा हृदयराम यालाही त्यांना ओळखता येत नसे. अनेकदा लोकांची फसगत होऊन हास्यविनोदही होई.

सहा महिने श्री रामकृष्ण या भावात निमग्न होते. या काळातील त्यांचे मनोभाव पूर्ण करण्यासाठी मथुरानाथांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांचा एक संच आणि एक कृत्रिम कुरळा केशकलापही तयार करून दिला होता. या मधुर भावाच्या साधनेकडे वळण्याआधी हा भाव किंवा या भावाची गाणी, भजने आपल्याला आवडत नाहीत असे ते अनेकवार सांगत. पण साधना सुरू केल्यावर ते त्या गोपी भावातच बुडून गेले. रात्रंदिवस राधाकृष्णाचाच त्यांना ध्यास लागला. हा ध्यास इतका पराकोटीचा होता की, भक्तीशास्त्रात सांगितलेली महाभावाची सगळी लक्षणे त्यांच्यात दिसू लागली. नंतरच्या काळात ते सांगत; अष्टपाश तोडल्याशिवाय, तसेच लज्जा, भय, संकोच, घृणा आदींचा पूर्ण त्याग केल्याशिवाय ईश्वराचा लाभ होत नाही. नंतर तर श्री राधेशिवाय श्रीकृष्णाची प्राप्ती शक्य नाही या भावनेतून ते स्वतःला राधाराणीच समजू लागले होते. भगवंताच्या सखीभावाचा त्यांचा मनोवेग अकल्पनिय होता. असे म्हणतात की त्या काळात त्यांच्या ओटीपोटाच्या भागातून रजस्वला स्त्रीप्रमाणे महिन्यातील तीन दिवस रक्तबिंदू निघत असत. माणसाच्या शरीराची घडण त्याच्या मनानुसारच होत असते या शास्त्रमताचा जणू प्रत्ययच येत होता. श्री रामकृष्णांच्या या अनुभूती पाहून त्यावेळच्या काही शास्त्री पंडितांचे तर म्हणणे होते की, त्यांच्या अनुभूती वेदपुराणांनाही ओलांडून खूप पुढे गेल्या आहेत. जणू शरीरविज्ञानशास्त्राचीही सीमा त्यांनी ओलांडली होती. परमशक्तीच्या या विश्वात सगळ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत वा सगळ्याच गोष्टींची उकल झालेली आहे असे तरी कसे म्हणायचे?

याच प्रबळ भावाच्या परिणामी अखेर त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि अन्य वेळेप्रमाणेच दर्शन झालेल्या ईश्वरी रूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि ते रूप त्यांच्यात मिसळून गेले. नंतर काही दिवसांनी त्यांच्या या श्रीकृष्ण भावाचा उपशम झाला. याच काळात एकदा विष्णू मंदिरात श्रीमद भागवताचा पाठ ऐकत बसले असताना, त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले. अन त्या मूर्तीच्या पायांपासून लांब दोरीसारखी एक ज्योत निघाली, त्या ज्योतीने भागवताच्या पोथीला स्पर्श केला आणि नंतर श्री रामकृष्णांच्या देहाला स्पर्श केला. काही काळ त्या ज्योतीने श्रीकृष्ण, भागवत आणि श्री रामकृष्ण यांना जोडून ठेवले. या दर्शनाबद्दल सांगून नंतरच्या काळात ते सांगत असत, 'भागवत, भक्त आणि भगवान हे तिन्ही वेगळे दिसत असले तरीही एकाच सदवस्तूचे तीन आविष्कार आहेत. तीही एक, एकी तीन.' या मधुर भावाच्या साधनेनंतर साधारण तीनेक महिन्यांनी परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले आणि त्यांनी श्री रामकृष्णांना अद्वैत साधनेसाठी प्रवृत्त केले. श्री रामकृष्णांची ती अद्वैत साधना आध्यात्मिक इतिहासातील एक अद्भुत अध्याय आहे.

याच काळात श्री रामकृष्णांची म्हातारी आई त्यांच्याजवळ येऊन दक्षिणेश्वरी राहत होती. मंदिराचे विश्वस्त मथुरामोहन यांचीही तार त्यांच्याशी जुळली होती. श्री रामकृष्ण तर आपल्याकडून काहीच घेत नाहीत, आधी एकदा त्यांच्या नावाने जमीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर ते मारायलाच धावले होते; हे सगळे मथुरानाथांच्या मनात होते. त्यामुळे श्री रामकृष्णांना नाही तर त्यांच्या आईला काही द्यावे अशी त्यांना इच्छा झाली. तेव्हा एक दिवस बोलता बोलता ते आईला म्हणाले, 'आजी तुम्हाला काय हवे? तुम्हाला जे काही लागत असेल ते सांगा. मी तुम्हाला देतो.' त्यावर म्हाताऱ्या आईने, 'काही नको. कपडेलत्ते आहेतच. जेवणाखाण्याची सोय आहे. कशाची कमी नाही. त्यामुळे काही नको,' असे त्यांना सांगितले. पण मथुरानाथांनी खूपच आग्रह केला तेव्हा त्या म्हणाल्या, 'दात घासण्यासाठी एक आण्याची तंबाखू आणून दे.' मथुरानाथ हे ऐकून भावविव्हळ झाले. ते उद्गारले, 'अशा आईच्या पोटी बाबा (श्री रामकृष्ण) जन्माला यावे यात आश्चर्य ते काय ' श्री रामकृष्णांची आई साधारण बारा वर्षे त्यांच्यासोबतच दक्षिणेश्वरी राहत होती. तिथेच त्यांनी देह ठेवला. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेचा काही काळ आणि त्यांच्या अद्वैत साधनेच्या काळात त्यांची आई त्यांच्यासोबतच राहत होती.

श्री रामकृष्ण परमहंस (९)

जन्मगाव कामारपुकुर येथून १९६१ च्या सुरुवातीला श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे १९ फेब्रुवारी १८६१ रोजी दक्षिणेश्वरच्या काली मंदिराच्या मालकीण राणी रासमणी यांनी इहलोकीचा निरोप घेतला. राणीचे जावई मथुरानाथ विश्वास हेच त्यानंतर काली मंदिराचा सगळा कारभार पाहू लागले. त्यांच्या मनात श्री रामकृष्णांबद्दल अतिशय प्रेम, आस्था, विश्वास आणि श्रद्धा होती. त्यामुळे ते श्री रामकृष्णांची सगळी काळजी घेऊ लागले. त्यांना हवं नको ते पाहू लागले. राणीच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांच्या जीवनातील एक महत्त्वाचे आणि अनोखे पर्व सुरू झाले.

दक्षिणेश्वर येथील गंगेच्या किनाऱ्यावरील बकुळीच्या घाटावर एक दिवस सकाळी; चाळीशीच्या वयाची, भगवी वस्त्रे परिधान केलेली एक संन्यासी महिला नावेतून उतरली. बगिच्यात फुले तोडत असलेल्या श्री रामकृष्णांनी ते पाहिले आणि आपल्या खोलीत येऊन आपला भाचा हृदय याला त्या महिलेला बोलावून आणण्यास सांगितले. अनोळखी महिलेला मामा का बोलावीत आहेत आणि आपण तरी तिला कसे बोलवावे अशा घोटाळ्यात हृदय पडला. परंतु मामाच्या आग्रहाने त्याने तिच्याकडे जाऊन मामाने बोलावल्याचे सांगितले. तीही काही न बोलता त्याच्या मागोमाग श्री रामकृष्णांच्या खोलीत दाखल झाली. खोलीत आल्यावर श्री रामकृष्णांकडे पाहताच ती त्यांना म्हणाली, 'बाबा तू इथं आहेस? तू गंगेच्या काठी आहे हे मला कळले होते. अन मी तुला शोधत फिरत होते.' आपल्याबद्दल कसं कळलं या त्यांच्या प्रश्नावर ती म्हणाली, 'तुम्हा तिघांना भेटावे लागेल हे जगदंबा कृपेने मला कळले होते. दोघांची भेट पूर्व बंगालमध्ये झाली आणि आज तू भेटला.'

यानंतर त्या दोघांनी अगदी जवळचे आप्त असावेत अशा गोष्टी केल्या. श्री रामकृष्णांनी आपली अलौकिक दर्शने, बाह्य संज्ञा लोप पावणे, गात्रदाह, निद्रानाश, शारीरिक बदल असे सगळे तिला सांगितले. अन ते विचारू लागले, 'मी काय खरंच वेडा झालो आहे का?' त्यावर त्यांची समजूत घालत ती संन्यासिनी म्हणाली, 'हे वेडेपण नाही. तुला महाभाव प्राप्त झाला आहे. राधा, चैतन्य महाप्रभू यांची अशी अवस्था झाली होती.' असे सगळे बोलणे झाल्यानंतर श्री रामकृष्णांनी तिला प्रसादाची फळे वगैरे अल्पोपहारासाठी दिली. अल्पोपहार झाल्यावर ती संन्यासिनी स्नान, पूजा, स्वयंपाक इत्यादी कामात गढून गेली

स्वयंपाक आटोपल्यावर आपल्या नित्य पूजेतील रघुवीरासमोर नैवेद्य दाखवून ती ध्यानात बुडून गेली. काही वेळातच अर्धबाह्य अवस्थेत श्री रामकृष्ण तिथे आले आणि तो नैवेद्य खाऊ लागले. काही वेळाने संन्यासिनी भानावर आली तेव्हा तिने पाहिले की, श्री रामकृष्ण भावविष्ट होऊन नैवेद्य खात आहेत. ते पाहून तिला खूप संतोष वाटला. नंतर भानावर आलेल्या श्री रामकृष्णांना ती म्हणाली, 'जे झालं ते योग्यच झालं. तुझ्या आत जो आहे त्यानेच हे केलं. आता मला बाह्य पूजेची गरज उरली नाही.' असे बोलतच, श्री रामकृष्णांच्या ठायी आपल्या देवतेचे दर्शन लाभलेल्या त्या संन्यासिनीने, आपल्या नित्य पूजेची रघुवीरशिला गंगेत विसर्जित करून टाकली.

यानंतर रोजच त्या दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा होऊ लागली. श्री रामकृष्ण आपल्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल सांगून तिला शंका आणि संदेह विचारू लागले. अन संन्यासिनी तंत्रशास्त्र, भक्तीशास्त्र आणि या शास्त्रांचे ग्रंथ यांच्या आधारे त्यांचे संदेह दूर करू लागली. साधारण आठवडाभर तिथे राहून ती जवळच असलेल्या दक्षिणेश्वर खेड्यातील देवमंडलांच्या घाटावर राहायला गेली. तिथून रोज कालीवाडीत येऊन ती श्री रामकृष्णांना भेटत असे आणि शास्त्रचर्चा व अध्यात्मचर्चा करत असे. कधीकधी वात्सल्य भावाने पुत्र समजून त्यांना खाउपिऊ घालीत असे. जसजसे दिवस जाऊ लागले तसे श्री रामकृष्ण केवळ आध्यात्मिक साधकच नव्हेत तर अवतार आहेत अशी तिची खात्री होऊ लागली. तसे ती बोलूनही दाखवीत असे. तिच्या या मताने कालीवाडीत मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. एक दिवस श्री रामकृष्ण आणि व्यवस्थापक मथुरबाबू बोलत बसले असताना श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंना तिचे मत सांगितले. त्यावर मथुरबाबूंनी उत्तर दिले की, 'अवतार तर फक्त दहा आहेत.' तेवढ्यात संन्यासिनी त्यांच्याकडे आली. तेव्हा श्री रामकृष्णांनी तिला मथुरबाबूंचे म्हणणे सांगितले. त्यावर तिने मथुरबाबूंनाही आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. आपण याबाबत कोणाशीही शास्त्रचर्चा करायला तयार असल्याचेही ती म्हणाली. नंतर काही दिवस श्री रामकृष्णांनीही मथुरबाबूंकडे आग्रह धरला की या विषयावर चर्चा व्हावी.

संन्यासिनीचे आव्हान आणि स्वतः श्री रामकृष्णांचा आग्रह यामुळे मथुरानाथ विचारात पडले. परंतु शास्त्रार्थ होऊन श्री रामकृष्णांना काही रोग झाल्याचा निष्कर्ष निघाला की, त्यांचे वेड दूर करणे सोपे होईल. त्यासाठी त्यांचेही सहकार्य मिळू शकेल, असा विचार करून मथुरानाथांनी पंडितांना बोलावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यावेळचे त्या भागातील वैष्णवचरण आणि गौरी पंडित या दोघांना कालीवाडीत बोलावण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीनही काही विद्वान होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत असा निष्कर्ष निघाला की, ज्या १९ प्रकारचे भाव वा अवस्था एकेठायी अनुभवाला येतात आणि ज्याला शास्त्रात 'महाभाव' म्हणतात, तो महाभाव श्री रामकृष्णांच्या ठायी आढळून येतो. ती सर्व लक्षणे त्यांच्या ठिकाणी दिसतात. हे ऐकून मथुरानाथ आणि अन्य लोक स्तंभित झाले. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, 'काहीही असो. रोग नाही हे ऐकून बरे वाटले.'

यानंतर संन्यासिनीने श्री रामकृष्णांकडून समस्त तंत्रसाधना करवून घेण्याचे ठरवले. तोपर्यंत कोणतीही शास्त्रविहित साधना न करता प्रबळ अनुरागाच्या साहाय्याने ईश्वरलाभ करून घेणाऱ्या श्री रामकृष्णांच्या मनातील सारे संदेह फिटावेत आणि त्यानंतरही त्यांना येऊ शकणाऱ्या अनुभवांसाठी त्यांची तयारी व्हावी हाच तिचा उद्देश होता. श्री रामकृष्णही त्यांच्या स्वभावानुसार जगदंबेला याविषयी सांगून आणि तिचा कौल घेऊन तांत्रिक साधनेला तयार झाले. त्यानंतर साधारण तीन चार वर्षे ते तांत्रिक साधना करीत होते. संन्यासिनीने त्यांच्याकडून शास्त्रात सांगितलेल्या सगळ्या ६४ तांत्रिक साधना करवून घेतल्या. त्यासाठीची सामुग्री इत्यादी तीच गोळा करीत असे. अन रात्रीच्या वेळी कालीवाडी परिसरातील पंचवटीत त्यांची साधना चालत असे. कोणतीही किळस आदी न बाळगता, तसेच पाच 'म'कारांचे ग्रहण न करताही, अग्राह्य आणि अशिष्ट समजल्या जाणाऱ्या या सगळ्या साधना त्यांनी केल्या. अन या सगळ्या मार्गांनी तोच एक अद्वय आनंद प्राप्त करून घेतला.

श्री रामकृष्णांची तांत्रिक साधना ही फार महत्त्वाची बाब होती. 'एकं सत, विप्रा: बहुधा वदंती' (सत्य एकच आहे. विद्वान लोक त्याचे वेगवेगळ्या रीतीने वर्णन करतात) असा भारतीय अध्यात्माचा सिद्धांत आहे. 'आकाशात पतितं तोयं' यासारख्या सुभाषितातून किंवा 'त्रयी सांख्यम योग:' यासारख्या शिव स्तोत्रातील श्लोकातून तोच भाव वाहतो. श्री रामकृष्णांच्या द्वारे तोच भाव सगळ्या जगाला देण्याची नियतीची योजना होती. त्यासाठी सगळ्या प्रकारच्या साधना करून ते सत्य सिद्ध करणे आवश्यक होते. शास्त्राचा सिद्धांत हा केवळ शब्द नाहीत. ते जिवंत अनुभूत सत्य आहे हे स्थापित होणे आवश्यक होते. म्हणूनच शिव स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे जगदंबेने सगळ्या सरळ व वक्र मार्गांनी श्री रामकृष्णांकडून साधना करून घेतल्या. त्या त्या मार्गाची साधना आटोपल्यावर पुन्हा कधीही श्री रामकृष्ण त्या मार्गाने गेले नाहीत. तंत्रसाधनेच्या बाबतही असेच घडले.

या तांत्रिक साधनेच्या काळात त्यांना अनेक प्रकारची अद्भुत दर्शने आदी झालीत. एवढेच नाही तर त्यांना अष्टसिद्धीही प्राप्त झाल्या. या सिद्धींचा उपयोग करणे योग्य की अयोग्य याविषयी जगदंबेचे म्हणणे जाणून घेतल्यावर त्यांनी निष्कर्ष काढला की, सिद्धी या तुच्छ आणि त्याज्य आहेत. त्यांचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही. नंतरच्या काळात एकदा स्वामी विवेकानंद यांना आपली सगळी शक्ती प्रदान करताना त्यांनी स्वामीजींना म्हटले होते, 'तुला धर्माचा प्रचार वगैरे बरीच कामे करायची आहेत. तेव्हा या सगळ्या सिद्धी तू स्वीकार.' त्यावर स्वामीजींनी विचारले, 'ईश्वरप्राप्तीसाठी मला यांचा उपयोग होईल का?' त्यावर श्री रामकृष्णांचे उत्तर नकारार्थी होते. तेव्हा स्वामीजींनी त्या सिद्धी स्वीकारण्यास नकार दिला होता.

या सिद्धींशिवाय एक महत्त्वाची बाब या तांत्रिक साधनेने त्यांना प्राप्त झाली होती. ती म्हणजे समत्व बोध. नंतरच्या काळात ते सांगत, 'तुळशीची पाने आणि शेवग्याची पाने सारखीच पवित्र वाटत.' यच्चयावत सगळ्या वस्तू, व्यक्ती इत्यादी आता त्यांना सारखीच प्रतीत होऊ लागली होती. या साधनेमुळे त्यांची अंगकांतीही विलक्षण तेजस्वी झाली होती. ती कांती लोकांच्या आकर्षणाचा विषय झाली होती. तेव्हा ते जगदंबेची काकुळतीने प्रार्थना करत - 'आई हे बाहेरचे रूप मला नको. ते परत घे आणि आतले आध्यात्मिक रूप दे.' त्यांची ही प्रार्थना कालांतराने पूर्ण झाली. यानंतर विविध पद्धतींनी आध्यात्मिक साधना करण्याचा जगाच्या आध्यात्मिक इतिहासातील एक अनोखा प्रवाह श्री रामकृष्णांच्या जीवनात वाहू लागला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (८)

श्री रामकृष्णांनी कालीमातेच्या पूजकाचे काम सोडून दिले असून त्यांना वायूरोगाने पछाडले आहे अशी चर्चा त्यांच्या जन्मगावी कामारपुकूरला पोहोचली. त्यामुळे त्यांची आई आणि भाऊ चिंतेत पडले. अन त्यांनी श्री रामकृष्णांना इ.स. १८५८ मध्ये कामारपुकूरला परत आणले. तिथे त्यांच्या स्वास्थ्यलाभासाठी औषधपाणी वगैरेसोबत घरच्यांनी धार्मिक आणि तांत्रिक अनुष्ठान आदीही सुरू केले. श्री रामकृष्ण कधी अगदी सामान्य माणसासारखे व्यवहार करीत तर कधी भावावेशात बाह्यसंज्ञारहित होऊन जात. तर कधी मनाच्या व्याकुळतेने 'आई आई' करत. सांसारिक बाबतीत तर नेहमीच उदासीन असत. या सगळ्यामुळे त्यांना भूताने पछाडले असावे अशीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे मांत्रिक बोलावून भूत पळवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण कशाने काही फरक पडला नाही.

कामारपुकूरच्या पश्चिम आणि ईशान्य सीमेवर दोन स्मशाने होती. श्री रामकृष्ण या दोन्ही ठिकाणी जाऊन बसत. तर कधी वाडग्यांमध्ये काही नैवेद्य वगैरे घेऊन जात आणि तिथल्या देवता उपदेवतांना तो अर्पण करत. तो नैवेद्य खायला कोल्हेही येत असत. एके रात्री खूप उशीर झाला म्हणून त्यांचे भाऊ रामेश्वर त्यांना शोधत स्मशानात गेले आणि भावाच्या नावाने आवाज देत शोधू लागले. त्यावेळी श्री रामकृष्ण त्यांना मोठ्याने आवाज देऊन सावध करत म्हणाले, 'आलो रे दादा. पण तू इकडे येऊ नको. हे तुला त्रास देतील.' स्मशानातील पिंपळाच्या झाडाखाली बसून ते खूप वेळ जप ध्यान करीत असत. महिन्यांमागून महिने जाऊ लागले आणि जगदंबेचे वारंवार दर्शन लाभून त्यांची अस्वस्थता कमी होऊ लागली.

याच काळात घरच्यांनी त्यांच्या नकळत त्यांच्या विवाहाचा विचार सुरू केला होता. ही कुजबुज त्यांच्या कानी गेली तेव्हा त्यांनी या प्रयत्नांना काहीही हरकत घेतली नाही. उलट त्यांना आनंद झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये माणसे पाठवून वधूचा शोध सुरू झाला. काही वधू लक्षातही आल्या पण त्यांच्या आईवडिलांनी हुंडा खूप मागितल्याने विवाह काही जमू शकला नाही. असेच दिवस जात असताना एक दिवस स्वतः श्री रामकृष्ण भावावस्थेत घरच्यांना म्हणाले, 'इकडेतिकडे शोध करणे व्यर्थ आहे. जयरामवाटी खेड्यातील रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी लग्नाची वधू आहे. तीच माझी नियोजित वधू आहे.' त्यांच्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही तरीही शोध घ्यावा असा विचार करून माणूस पाठवण्यात आला. तो माणूस माहिती काढून आला की, बाकी काही हरकत नसली तरी वधूचे वय फारच कमी आहे. अवघे पाच वर्षे. पण दुसरी वधू सापडत नसल्याने त्यांच्या आईने या मुलीला होकार दिला आणि इ.स. १८५९ च्या मे महिन्यात वयाच्या २४ व्या वर्षी श्री रामकृष्णांचा विवाह झाला. लग्नात वधू पक्षाला तीनशे रुपये हुंडा देण्यात आला.

व्याह्यांचे मन राखण्यासाठी आणि इभ्रत राहावी म्हणून, वधूच्या अंगावर चंद्रादेवीने काही दागिने घातले होते. हे दागिने कुटुंबाचे स्नेही गावचे जमीनदार लाहाबाबू यांच्याकडून आणले होते. याच दागिन्यांनी वधूला विवाहात सजवले होते. काही दिवसांनी दागिने परत करण्याची वेळ आली. त्यावेळी चंद्रादेवी 'आता कसे करावे?' या विचारात पडली. मात्र श्री रामकृष्णांनी आईला शांत केले आणि नववधू झोपली असताना हळूच ते दागिने काढून घेतले. जागी झाल्यावर मात्र तिने आपल्या सासूला विचारले, 'माझ्या अंगावरचे दागिने कुठे गेले?' त्यावर चंद्रादेवीने तिला मांडीवर घेऊन ओल्या डोळ्यांनी समजावले, 'माझा मुलगा तुला यापेक्षा चांगले दागिने देईल.' प्रकरण इथे संपले मात्र नाही. मुलीचे काका त्याच दिवशी तिला भेटायला आले तेव्हा त्यांना हा प्रकार कळला. अन असंतुष्ट होऊन ते मुलीला माहेरी घेऊन गेले. श्री रामकृष्णांनी दु:खी आईची समजूत घातली. विवाहानंतर एक वर्ष सात महिन्यांचा काळ श्री रामकृष्णांनी कामारपुकूरला घालवला. इ.स. १८६० च्या अखेरीस मुलीला सातवे वर्ष लागल्यावर कुळाच्या प्रथेप्रमाणे काही दिवस सासरी जाऊन ते आपल्या पत्नीला घेऊन कामारपुकूरला परत आले. नंतर त्यांनी कोलकात्याला परतण्याचा निर्णय घेतला आणि कालीवाडीत परतून त्यांनी जगदंबेच्या सेवेचे काम स्वतःकडे घेतले.

दक्षिणेश्वरला कालीवाडीत परतल्यानंतर ते जणू कामारपुकूर, तेथील वास्तव्य, तिथलं जगणं सगळं विसरून गेले. पुन्हा एकदा दिव्योन्माद सुरू झाला. मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांनी पुन्हा वैद्यांचे उपचार सुरू केले. एकदा वैद्याकडे गेले असतानाच तिथे असलेल्या दुसऱ्या एका वैद्याने त्याचे मत नोंदवले की, श्री रामकृष्णांना कोणताही रोग झालेला नसून हा योगजन्य दिव्योन्माद आहे. तिकडे जन्मगावीही ही वार्ता कळली. तेव्हा त्यांची आई चंद्रादेवी यांनी शिवमंदिरात प्रायोपवेशन केले. दोन तीन दिवसातच त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, 'भीतीचे कारण नाही. तुझा मुलगा वेडा झाला नसून ईश्वरी आवेशाने त्याची अशी अवस्था झाली आहे.'

त्या काळातील अवस्थेसंबंधी ते सांगत असत - 'मला झालेल्या ईश्वरी भावाच्या एक चतुर्थांश जरी सामान्य माणसाला झाला तरी त्याचा देहपात होईल. दिवसरात्र आईचे दर्शन होत असे. सहा वर्षे तिळमात्र झोप नव्हती. पापण्यांची उघडझाप बंद झाली होती. प्रयत्न करूनही पापण्या मिटत नसत. शरीराकडे पाहून भीती वाटत असे. वाटत असे वेडा होतो की काय? आरशासमोर उभा राहून डोळ्यात बोट घालत असे. तरीही पापणी लवत नसे. भीतीने रडू लागून आईला म्हणत असे - तुला आळवण्याचं, तुझ्यावर विश्वास टाकण्याचं हेच फळ? शरीरात भयंकर रोग दिलास? पण दुसऱ्याच क्षणी म्हणत असे - ठीक आहे. जे व्हायचं ते होऊ दे. शरीर जायचं असेल तर जावो. पण तू मात्र मला सोडू नकोस. मला दर्शन दे. कृपा कर. तुझ्याशिवाय मला गती नाही. अशा रीतीने रडतारडता अपूर्व उत्साह दाटून येई.'

याच काळात एक दिवस श्री रामकृष्ण एक दिवस पडवीत फिरत असताना व्यवस्थापक मथुरबाबूंना एक विलक्षण दर्शन झाले होते. श्री रामकृष्ण एकीकडे जात असताना त्यांना शिव चालत आहेत असे दिसे, तर वळून परत जाताना दुर्गा चालते आहे असे दिसे. या अद्भुत प्रकारानी मथुरबाबूंना चक्रावून तर टाकलेच होते पण त्यांची श्री रामकृष्णांवरील श्रद्धाही अधिक दृढ झाली.