स्पीड लिमिट आणि चलन अशी एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे. (त्यामुळे ती अनेकांनी वाचली असेल.) त्यावर माझी प्रतिक्रिया -
हे ठीक आहे पण मुळात समस्या याहून खोल आहे अन् ती आकलन होणंही कठीण. सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीतील सगळी तांत्रिक व व्यवस्थात्मक माहिती अद्ययावत ठेवायला हवी; ही अपेक्षाच किती अवास्तव आणि चुकीची आहे. अन् दुसरे म्हणजे प्रगतीच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा अतिरेक. यंत्राला सगळं समजू शकतं हा भ्रम आहे. एखादी व्यक्ती एखाद्या इमर्जन्सीसाठी अधिक वेगाने जात असू शकते. ते कारण समर्थनीयही असू शकते. एवढंच नाही तर रस्त्यावरील वाहतूक त्याला जास्त वेगाने जाऊ देणारी असेल तरच त्याचा वेग वाढू शकतो. म्हणजे इमार्जन्सी आहे आणि जास्त वेगाने जाणे शक्य आहे त्यामुळे वेग अधिक राहू शकतो. पण यंत्राला हे कसे कळणार?
वास्तविक सामान्य माणूस आज विज्ञान, तंत्रज्ञान, प्रगती, पैसा, यंत्र या गोष्टींनी आंधळा झालेला आहे. अज्ञात सुखाच्या मागे धावत राहणे हेच जीवन असा समज करून घेऊन तो पळतो आहे. थांबून या साऱ्याचा फेरविचार करण्याची त्याची तयारी नाही आणि केलाच फेरविचार तर अनावश्यक गोष्टी नाकारण्याची आणि योग्य रस्ता धरण्याची तयारी नाही. पट्यांवर पट्या बांधणे सुरू आहे.
- श्रीपाद कोठे
२९ ऑक्टोबर २०२२