शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

आंधळेपणा

स्पीड लिमिट आणि चलन अशी एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे. (त्यामुळे ती अनेकांनी वाचली असेल.) त्यावर माझी प्रतिक्रिया -

हे ठीक आहे पण मुळात समस्या याहून खोल आहे अन् ती आकलन होणंही कठीण. सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीतील सगळी तांत्रिक व व्यवस्थात्मक माहिती अद्ययावत ठेवायला हवी; ही अपेक्षाच किती अवास्तव आणि चुकीची आहे. अन् दुसरे म्हणजे प्रगतीच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा अतिरेक. यंत्राला सगळं समजू शकतं हा भ्रम आहे. एखादी व्यक्ती एखाद्या इमर्जन्सीसाठी अधिक वेगाने जात असू शकते. ते कारण समर्थनीयही असू शकते. एवढंच नाही तर रस्त्यावरील वाहतूक त्याला जास्त वेगाने जाऊ देणारी असेल तरच त्याचा वेग वाढू शकतो. म्हणजे इमार्जन्सी आहे आणि जास्त वेगाने जाणे शक्य आहे त्यामुळे वेग अधिक राहू शकतो. पण यंत्राला हे कसे कळणार?

वास्तविक सामान्य माणूस आज विज्ञान, तंत्रज्ञान, प्रगती, पैसा, यंत्र या गोष्टींनी आंधळा झालेला आहे. अज्ञात सुखाच्या मागे धावत राहणे हेच जीवन असा समज करून घेऊन तो पळतो आहे. थांबून या साऱ्याचा फेरविचार करण्याची त्याची तयारी नाही आणि केलाच फेरविचार तर अनावश्यक गोष्टी नाकारण्याची आणि योग्य रस्ता धरण्याची तयारी नाही. पट्यांवर पट्या बांधणे सुरू आहे.

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर २०२२

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

आठवण

लेखिका मृणालिनी जोशी यांनी आज जगाचा निरोप घेतला. फार काहीच आठवत नाही पण एकदा त्यांना पाहिल्याचं स्मरणात आहे. गोळवलकर गुरुजी यांच्यावरील राष्ट्राय स्वाहा ही कादंबरी लिहीत असताना त्या नागपूरला आल्या होत्या. अन् संबंधितांना, संबंधित स्थानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्याच निमित्ताने वडिलांना भेटायला त्या घरी आल्या होत्या. जवळपास दोन तास वडील आणि त्यांच्यात गुरुजींविषयी बोलणं झालं होतं. गुरुजींच्या आठवणी, स्वभाव, वेगवेगळे पैलू असं ते बोलणं होतं. राष्ट्राय स्वाहा या कादंबरीच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात वडिलांचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. त्यावेळी मी अगदीच लहान शाळकरी मुलगा होतो. त्यामुळे बाकी काही स्मरणात नाही. मृणालिनी जोशी यांना अभिवादन. ॐ शांति: 🙏

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२२

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

व्यक्ती व देश

खूप दिवसांनी republic पाहिलं. National conclave. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा होते. फार छान चर्चा झाली. अर्णव अगदीच गरजेचं बोलताना दिसला याचा सुखद धक्का बसला. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकाही स्पष्ट आणि ठाम होत्या. फक्त एक मुद्दा मात्र नाही पटला. ते म्हणाले, you can criticise the individual but not the country. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं नावही घेतलं. त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले. मात्र एक मुद्दा ते स्पष्ट करू शकले नाहीत की, how to differentiate an individual and his decisions. One can criticise the individual. Ok. Nice. But if a decision of an individual is questioned, can it be a criticism of the country. Are decisions sans individual life can be blindly considered as or equated to country and interest of the country as a whole?

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०२२

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

Approach

काल फटाक्यांबद्दल एक पोस्ट केली त्यावर एका मित्राने प्रतिक्रिया दिली होती. नंतर उत्तर देऊ असं म्हटलं पण आज मित्राची प्रतिक्रिया दिसतच नाही आहे. फेसबुकने काढली की त्याने स्वतः की काही तांत्रिक प्रकार ठाऊक नाही. त्यामुळे ही पोस्ट.

प्रदूषण पसरविण्यात फटाक्यांची भूमिका असते त्यामुळे फटाक्यांची प्रथा बंद करायला हरकत नाही, या माझ्या मतावर मित्राने विचारले होते की : मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यावर चंदनाच्या लाकडावर अग्निसंस्कार करतात. त्याचे काय? कोणत्याही लाकडांच्या ज्वलनाने होणाऱ्या प्रदूषणापेक्षा चंदनाच्या लाकडाचे प्रदूषण अधिक असते का मला माहिती नाही. परंतु एक सिद्धांत म्हणून माझे मत आहे की, ज्या ज्या गोष्टी अहितकर असतात त्या कमी करत गेले पाहिजे. मात्र पर्यावरण, प्रदूषण इत्यादींचा विचार एकांगी पद्धतीने करू नये. विवेकाने करावा. तसेच त्यात तुमचे आमचे, वादविवाद टाळावे. विचारधारा वगैरे असू नये. जगताना पूर्णता असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा पूर्णतेचीच असावी लागते. जगताना आदर्श स्थिती असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा आदर्शाचीच असावी लागते. प्रगती आणि सुव्यवस्था या गोष्टी त्यानेच साध्य होतात. अन्यथा सावळागोंधळ माजतो. बजबजपुरी निर्माण होते. तेच प्रदूषण आदी बाबतीत. काय काय करता येऊ शकते. काय सहज करता येऊ शकते. काय हळूहळू करता येऊ शकते. काय अशक्य असेल. जगण्याचा प्रवाह थांबणार नाही याची काळजी घेत काय करावे लागेल. कोणते उपाय व्यवहाराशी संबंधित आहेत. कोणते उपाय मानसिकतेची संबंधित आहेत. असा सगळा साधकबाधक विचार करत पुढे जावे लागते. केवळ प्रश्न, प्रतिप्रश्न यांनी साध्य काही होत नाही. तसे तर माणसाचे मरणे हेच प्रदूषण आहे. पण मरण थांबवता येईल का? त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावावीच लागेल. त्यात बदल, सुधार ही एक अखंड प्रक्रिया आहे. जे जे लक्षात येईल ते सांगत, समजावत बदल होत राहतील. पण फटाके एकदम बंद करता येऊ शकतात. त्याने जगण्यात अडथळा नाही येत. स्वयंचलित वाहने प्रदूषण करतात. पण ती एकदम टाकून देता येणार नाहीत. मात्र मोटारी, खाजगी वाहने यांची होणारी वाढ थांबवण्यात काही हानी नाही. खाजगी वाहने कमी करत न्यायला हवी. एकूणच एकांगी approach न ठेवता, विवेकी approach हवा.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०२२

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण

पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण या वेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन यात आधीचे जसेच्या तसे राखणे हे येते. पुनर्निर्माण यात जुन्याचा संबंध न सोडता नवीन निर्माण हे येते. जसे एखाद्या घराचे पुनरुज्जीवन म्हणजे अगदी ditto आधीसारखे. अन् पुनर्निर्माण म्हणजे परिस्थितीशी सुसंगत उभारणी. जुनं काही सामान वगैरे वापरता येऊ शकतं किंवा आठवण म्हणून काही जतन करता येऊ शकतं पण उभं होणारं नवीन घर जुन्या सारखं नसतं. पण जुन्याचा संबंधही तुटलेला नसतो.

घराप्रमाणेच राष्ट्राचेही असते. ती पुनर्निर्माण प्रक्रिया असते. जुनं हट्टाने धरून ठेवणे त्यात नसते. घराला जसे दारे खिडक्या नवीन पद्धतीच्या, वेगळ्या ठिकाणी वगैरे करतात; तसेच नवीन प्रथा, परंपरा तयार होतात. जुन्या धरून ठेवण्याचा अट्टाहास नसतो. नसावा. कारण पुनरुज्जीवन ही मृत साचलेली गोष्ट असते तर पुनर्निर्माण हा जिवंत प्रवाह असतो.

हे विवरण करण्याचं कारण म्हणजे येती दिवाळी. फटाके फोडण्याची परंपरा हट्टाने धरून ठेवणे किंवा फटाके न फोडणे म्हणजे अस्तित्वावर घाला वगैरे समजण्याचं कारण असू नये. प्रदूषण, पर्यावरण हे महत्त्वाचे विषय आहेतच. त्यात फटाक्यांचा वाटा असतो हेही खरे आहे. मग ती प्रथा सोडून देण्यात गैर काय? आक्षेपार्ह काय? त्यासाठी आक्रोश वा आक्रस्ताळेपणा का? अनेक गोष्टींना हे लागू होईल. सध्याचा विषय फटाके असल्याने त्याचा उल्लेख केला एवढंच.

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०२२

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

जागतिक अन्न दिवस

आज जागतिक अन्न दिवस आहे.

हजारो वर्षांपूर्वी भारताने 'अन्नं ब्रम्हेति' म्हणून अन्नाचा गौरव तर केलाच पण त्याचे मूलभूत महत्त्वही अधोरेखित केले. उपयुक्तता विचारातून एखाद्या गोष्टीचे महत्त्व असतेच. त्या गोष्टीबद्दल जबाबदारीची भावना आणि कर्तव्य भावनाही त्यातून काही प्रमाणात निर्माण होतेच. परंतु उपयुक्ततेसोबत त्याबद्दल पावित्र्याची भावना असेल तर त्या गोष्टींबाबत कृतज्ञता आणि सन्मान भावना देखील फार वरच्या दर्जाची उत्पन्न होते. अन्न दिनाच्या उपयुक्ततेला भारताने अन्नाला दिलेल्या पावित्र्याची जोड देऊन ती जगभरात रुजवू या.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२२

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

दुर्लक्ष करावे

हरी नरके यांनी डॉ. कलाम यांच्याबद्दल आज काही विधान केले. त्यावर नाराज झालेल्या अनेकांनी नरके यांच्यावर विचित्र टीका केली आहे. एक विचारावं वाटतं की, अशा प्रतिक्रिया डॉ. कलाम यांना आवडल्या असत्या का? डॉ. कलाम यांनी ज्या माणसाची, ज्या भारतीयाची अपेक्षा केली होती त्याला धरून ही टीकाटिप्पणी आहे का? संयम सोडणे, आक्रस्ताळेपणा, कर्कशपणा, काही म्हटलेलं अजिबात सहन न होणे; हे कशासाठी? डॉ. कलाम वा तत्सम अन्य कोणी आणि त्यांनी मांडलेले विचार, केलेल्या अपेक्षा यांचे आम्ही फक्त प्रचारक आहोत की अनुयायी? दुर्लक्ष करण्याची आणि विरोध सुद्धा सौम्य परंतु ठाम करण्याची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक वेळी अवास्तव आक्रमकता योग्य नसते. हातावर बसलेली माशी उडवायला तलवार काढणे हास्यास्पद असते.

- श्रीपाद कोठे

१५ ऑक्टोबर २०२२

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

प्रसार माध्यमांचा वकूब

सरसंघचालकांच्या विदर्भ संशोधन मंडळातल्या भाषणावरून घमासान चर्चा सुरू आहे. ते भाषण आत्ता ऐकलं. त्यावरच्या कमेंट्स आणि चर्चा यावर काही बोलणार नाही. तसंच त्यावर काही लिहावं की नाही यावरही अजून विचार केलेला नाही. पण एक मात्र नक्की नमूद करावं वाटतं की, ते भाषण समजण्याची कुवत आणि क्षमताही फार थोड्या लोकांची असेल. कार्यक्रम कव्हर करायला जाणारे जे बातमीदार असतात त्यांची तर ती क्षमता अजिबातच नसते. वाईट वाटेल पण अगदी थोडे सन्माननीय अपवाद वगळता संपादक मंडळीही त्यासाठी तोकडीच पडतील. पत्रकारितेच्या क्षेत्रात आज असलेली बहुतांश मंडळी अशा विषयांच्या अन् भाषणांच्या दृष्टीने अतिशय सुमार आहेत एवढे नक्की. बाकी एका वृत्तपत्राने त्यात केलेले खोडसाळ राजकारण खरे असले तरीही, पत्रकारांचा बौद्धिक वकूब चिंता करण्यासारखा आहे एवढं खरं. समाजाने प्रसार माध्यमांवरील आपले बौद्धिक अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०२२