काल फटाक्यांबद्दल एक पोस्ट केली त्यावर एका मित्राने प्रतिक्रिया दिली होती. नंतर उत्तर देऊ असं म्हटलं पण आज मित्राची प्रतिक्रिया दिसतच नाही आहे. फेसबुकने काढली की त्याने स्वतः की काही तांत्रिक प्रकार ठाऊक नाही. त्यामुळे ही पोस्ट.
प्रदूषण पसरविण्यात फटाक्यांची भूमिका असते त्यामुळे फटाक्यांची प्रथा बंद करायला हरकत नाही, या माझ्या मतावर मित्राने विचारले होते की : मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यावर चंदनाच्या लाकडावर अग्निसंस्कार करतात. त्याचे काय? कोणत्याही लाकडांच्या ज्वलनाने होणाऱ्या प्रदूषणापेक्षा चंदनाच्या लाकडाचे प्रदूषण अधिक असते का मला माहिती नाही. परंतु एक सिद्धांत म्हणून माझे मत आहे की, ज्या ज्या गोष्टी अहितकर असतात त्या कमी करत गेले पाहिजे. मात्र पर्यावरण, प्रदूषण इत्यादींचा विचार एकांगी पद्धतीने करू नये. विवेकाने करावा. तसेच त्यात तुमचे आमचे, वादविवाद टाळावे. विचारधारा वगैरे असू नये. जगताना पूर्णता असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा पूर्णतेचीच असावी लागते. जगताना आदर्श स्थिती असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा आदर्शाचीच असावी लागते. प्रगती आणि सुव्यवस्था या गोष्टी त्यानेच साध्य होतात. अन्यथा सावळागोंधळ माजतो. बजबजपुरी निर्माण होते. तेच प्रदूषण आदी बाबतीत. काय काय करता येऊ शकते. काय सहज करता येऊ शकते. काय हळूहळू करता येऊ शकते. काय अशक्य असेल. जगण्याचा प्रवाह थांबणार नाही याची काळजी घेत काय करावे लागेल. कोणते उपाय व्यवहाराशी संबंधित आहेत. कोणते उपाय मानसिकतेची संबंधित आहेत. असा सगळा साधकबाधक विचार करत पुढे जावे लागते. केवळ प्रश्न, प्रतिप्रश्न यांनी साध्य काही होत नाही. तसे तर माणसाचे मरणे हेच प्रदूषण आहे. पण मरण थांबवता येईल का? त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावावीच लागेल. त्यात बदल, सुधार ही एक अखंड प्रक्रिया आहे. जे जे लक्षात येईल ते सांगत, समजावत बदल होत राहतील. पण फटाके एकदम बंद करता येऊ शकतात. त्याने जगण्यात अडथळा नाही येत. स्वयंचलित वाहने प्रदूषण करतात. पण ती एकदम टाकून देता येणार नाहीत. मात्र मोटारी, खाजगी वाहने यांची होणारी वाढ थांबवण्यात काही हानी नाही. खाजगी वाहने कमी करत न्यायला हवी. एकूणच एकांगी approach न ठेवता, विवेकी approach हवा.
- श्रीपाद कोठे
१८ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा