पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण या वेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन यात आधीचे जसेच्या तसे राखणे हे येते. पुनर्निर्माण यात जुन्याचा संबंध न सोडता नवीन निर्माण हे येते. जसे एखाद्या घराचे पुनरुज्जीवन म्हणजे अगदी ditto आधीसारखे. अन् पुनर्निर्माण म्हणजे परिस्थितीशी सुसंगत उभारणी. जुनं काही सामान वगैरे वापरता येऊ शकतं किंवा आठवण म्हणून काही जतन करता येऊ शकतं पण उभं होणारं नवीन घर जुन्या सारखं नसतं. पण जुन्याचा संबंधही तुटलेला नसतो.
घराप्रमाणेच राष्ट्राचेही असते. ती पुनर्निर्माण प्रक्रिया असते. जुनं हट्टाने धरून ठेवणे त्यात नसते. घराला जसे दारे खिडक्या नवीन पद्धतीच्या, वेगळ्या ठिकाणी वगैरे करतात; तसेच नवीन प्रथा, परंपरा तयार होतात. जुन्या धरून ठेवण्याचा अट्टाहास नसतो. नसावा. कारण पुनरुज्जीवन ही मृत साचलेली गोष्ट असते तर पुनर्निर्माण हा जिवंत प्रवाह असतो.
हे विवरण करण्याचं कारण म्हणजे येती दिवाळी. फटाके फोडण्याची परंपरा हट्टाने धरून ठेवणे किंवा फटाके न फोडणे म्हणजे अस्तित्वावर घाला वगैरे समजण्याचं कारण असू नये. प्रदूषण, पर्यावरण हे महत्त्वाचे विषय आहेतच. त्यात फटाक्यांचा वाटा असतो हेही खरे आहे. मग ती प्रथा सोडून देण्यात गैर काय? आक्षेपार्ह काय? त्यासाठी आक्रोश वा आक्रस्ताळेपणा का? अनेक गोष्टींना हे लागू होईल. सध्याचा विषय फटाके असल्याने त्याचा उल्लेख केला एवढंच.
- श्रीपाद कोठे
१७ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा