आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का? काल महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात जी दुर्दैवी घटना घडली ती दुर्दैवी आणि वाईटच आहे. तुम्ही आध्यात्म मानता की मानत नाही हा भागच वेगळा. अगदी मृत्यूची अपरिहार्यता आणि त्याचा अभावितपणा शंभर टक्के मान्य करूनही, मानवी मर्यादेत त्याचे वाईट वाटणे आणि त्यावर गंभीर मंथन करणे हेच सयुक्तिक ठरते. त्यामुळे कार्यक्रम कसे आयोजित करावेत, कार्यक्रमांना वेळ - आकार - यासह कोणकोणत्या मर्यादा असाव्या, इत्यादी बाबींची गंभीर चर्चा होऊन यानंतर काळजी घेणे कर्तव्य ठरते. ते करायलाच हवे.
मात्र, त्याच वेळी मृत्यूसारख्या संवेदनशील मुद्याचा उपयोग आपल्या मनातील राग, द्वेष बाहेर काढण्यासाठी करणे तेवढेच निंदनीय म्हटले पाहिजे. आपल्याला सारे समजते आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे वागल्यास, विचार केल्यास जगाचे नंदनवन होईल; हा मानवी बुद्धीचा प्रचंड दर्पयुक्त दांभिकपणा; कशा ना कशावर दोषारोपण करण्यासाठी वळवळत असतो. मग कोणत्याही थराला जाऊन विश्लेषण आणि टीकाटिप्पणी होते. टवाळकी सुरू होते. बुद्धीच्या दांभिकतेची ही वळवळ सुद्धा आटोक्यात ठेवली पाहिजे. संवेदनशीलता म्हणजे कावकाव नाही. स्पष्ट भूमिका म्हणजे मूर्खपणा, असंबद्ध वटवट किंवा वाचाळपणा नाही ही जाण म्हणजेच सुजाणपणा म्हणजेच परिपक्वता म्हणजेच जीवनाचं गांभीर्य.
आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का?
- श्रीपाद कोठे
१७ एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा