रविवार, ७ एप्रिल, २०२४

अभ्यास म्हणजे काय?

पत्रकारितेत एक संकेत असतो की, संवेदनशील घटना असेल तर, गरजेपेक्षा अधिक तपशील (उदा. जात, पंथ इत्यादी) द्यायचा नाही. हे आठवण्याचं कारण म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातून गोडसेच्या संबंधात 'पुण्याचा ब्राम्हण' हा उल्लेख वगळण्यावरून सुरू झालेला वाद. यासंबंधात दोन प्रश्न निर्माण होतात - १) तसा उल्लेख असण्याचे प्रयोजन काय होते? २) तसा उल्लेख नसेल तर काय बिघडणार आहे? उत्तरे देण्याची गरज नाही. सामान्य माणसाला सुद्धा हे समजते. एक तर्क दिला जाऊ शकतो की, या विषयाकडे अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे. अन् हा तर्क पुढे आला की एक प्रकारची स्मशानशांतता पसरते किंवा चर्चा भटकवली जाते. वास्तविक या तर्काची छाननी करण्याची गरज आहे. अभ्यास म्हणजे काय? बुद्धीचा न संपणारा चौकसपणा म्हणजे अभ्यास का? गुण, दोष, बुद्धी, कर्तृत्व, कौशल्य, सद्भाव, दुर्भाव, क्षमता इत्यादी गोष्टी कोणत्याही प्रकारच्या समूहाचे लक्षण असतात का? भाषा, प्रांत, जात, धर्म, देश, लिंग अशी गुणदोषांची वर्गवारी करता येते का? अशी वर्गवारी करता येत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असूनही अशी वर्गवारी का केली जाते? कारण अशी वर्गवारी केल्याने संघर्ष करता येतात. भांडणे करता येतात. संघर्ष का करायचा असतो? कारण आम्ही योग्य आणि आम्ही ज्यांना आपले मानत नाही ते अयोग्य अशी धारणा असते. ही धारणा ख्रिश्चन मतातील ईश्वर आणि सैतान या कल्पनातून निघाली आहे. याच कल्पनेचा पगडा मार्क्स, हेगेल, डार्विन यांच्यावर असल्याने त्यात संघर्ष अपरिहार्य आणि आवश्यक मानला गेला. एवढेच नाही तर लोकशाही म्हणून जो काही विशिष्ट व्यवस्थेचा विकास झाला त्यातही संघर्ष मूलभूत मानला आहे. अन् संघर्ष करायचा असेल तर दुसरी बाजू हवी. हा सगळाच मूलभूत झुंडशाहीचा विचार आहे. सगळे विषय आणि अध्ययनपद्धती यात ही मूलभूत त्रुटी आहे. भारताचा विचार हा संघर्षाऐवजी समन्वयाचा आहे. त्याचे कारण आहे भारताचा worldview. हे संपूर्ण विश्व एकाच मूळ शक्तीचा (त्याला चैतन्य शक्ती म्हणा की जड शक्ती म्हणा. ती आहे एकच.) विकास आणि विलास आहे. हा आहे भारताचा worldview. त्यामुळे प्रत्येक कणाची धडपड ही दुसऱ्याशी संघर्ष करून स्वतःला सिद्ध करण्याची नसून, प्रत्येक गोष्ट सामावून घेत पूर्णत्व पावण्याची आहे. या worldview चा विकास आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रात कसा असेल (किंवा भारतीय भूतकाळाच्या संदर्भात कसा होता) याची मांडणी केल्याशिवाय वर्तमान वाद आणि समस्या यातून मार्ग निघणार नाही. हिंदू वा भारतीय विचारप्रवाहापुढील हे आव्हान आहे. हे आव्हान पेलल्याशिवाय तू तू मी मी मधून सुटका नाही. प्रचंड fundamental काम हवं आहे.

(भगवद्गीतेत सुद्धा दैवी आणि आसुरी संपद सांगितले आहे हे पामराला ठाऊक आहे. तरीही ईश्वर आणि सैतान हे योग्य नाही असेच माझे मत आहे. दैवी, आसुरी हा स्वतंत्र विषय आहे. तूर्त एवढेच.)

- श्रीपाद कोठे

शनिवार, ८ एप्रिल २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा