रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

अखंड भारत : काही मुद्दे

समाज माध्यमांवर अखंड भारताच्या संदर्भात अनेक पोस्ट आज पाहायला मिळाल्या. माझ्याही तीन पोस्ट आहेत. (तिन्ही वेगवेगळ्या आहेत.) त्यातल्या काही पोस्ट, काही प्रतिक्रिया वाचल्या. काही चाळल्या, काही भाषणेही पाहिली/ ऐकली. काही गोष्टी जाणवल्या.

- एक म्हणजे, अखंड भारत म्हणून भारताच्या विभाजनाची चर्चाच केली जाते. अखंड भारत आणि भारताचे विभाजन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे.

- दुसरी लक्षात घेण्याची बाब म्हणजे, अखंड भारत म्हणजे फक्त दोन राज्यांचे एकीकरण नाही. ते मनांचे, भावनांचे अखंड होणे आहे. दोन राज्यांचे एकीकरण हा अखंड भारताचा परिणाम असेल.

- तिसरी बाब म्हणजे, अखंड भारत साकारला नाही तर, भारत अखंड राहणार नाही. त्यामुळे अखंड भारत ही optional गोष्ट नाही.

- वैश्विक मानवी सहअस्तित्वाची ती सुरुवात असेल. अखंड भारताएवढं सार्थ उदाहरण त्यासाठी कोणतंही नसेल. अखंड भारत नाकारणं हे वैश्विक सहअस्तित्व नाकारणं असेल. 

- अखंड भारत साकार होईल का? कसा होईल?टिकेल का? पेलवेल का? या प्रश्नांची उत्तरे आहेतच. ती परिपूर्ण असतीलच असेही नाही. परंतु कोणत्याही समस्येचे असेच असते. त्यावर एकच उत्तर असू शकते - we will cross the bridge when we reach it. त्यामुळेच का? कसे? या प्रश्नांपेक्षाही महत्वाची बाब आहे ती म्हणजे, अखंड भारत ही आवश्यक गोष्ट आहे. अन महत्वाचा प्रश्न आहे त्यामागील हेतू काय? स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू असेल, अन त्याची आवश्यकता ठसली असेल तर अखंड भारत साकार होण्यात अडचण असणारच नाही.

- अखंड भारताचा एक भाग असणारे पाकिस्तान पेलवेल का, हा प्रश्न ३७० रद्द केल्यानंतर पडायलाच नको. अखंड भारत झाल्याबरोबर इकडचे तिकडे अन तिकडचे इकडे येतील जातील असे नाही. सगळे काही सर्वसामान्य होईपर्यंत काही बंधने घालता येतातच. काश्मीर हे ताजे उदाहरण आहे. शिवाय दहशतवाद हा युद्धाचा प्रश्न न उरता, नक्षलवादासारखा एक प्रश्न राहील.

बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातल्या काही विचारार्थ.

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा