'समता' हे तत्व स्वीकारल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं आहे. आज मोठ्या प्रमाणावर दिसून येणारी असहिष्णुता हा त्याचाच परिणाम आहे. कारण त्यामुळे चांगलं- वाईट, योग्य- अयोग्य, चूक- बरोबर यांचं विश्लेषण थांबलं, त्यामुळे काय स्वीकारायचं अन काय नाकारायचं याचा विवेक आपण गमवायला लागलो. परखड, स्पष्ट, तर्कपुर्ण विश्लेषण करणे; आणि ते समजून घेणे ही प्रक्रियाच बंद पडली. तशी तर रोजच नवीन उदाहरणे देता येतील अशी स्थिती आहे. ताजे उदाहरण म्हणजे- दिल्लीतील औरंगझेब रस्त्याला डॉ. कलाम यांचे नाव देण्याच्या निर्णयावरून होणारी चर्चा. सगळ्यांनाच समानता बहाल केल्याने राजे, धर्म, व्यवस्था, तत्वज्ञान, कल्पना, वैविध्य या सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे सुरु झाले. गुजराथेत नुकतेच झालेले आरक्षण आंदोलन हाही या समतेच्या बेगडीपणाचा परिणाम. यामुळे मागासलेले असो की पुढारलेले, शिक्षित असो की अशिक्षित, लहान असो की मोठे, अनुभवी असो की अननुभवी, श्रीमंत असो की गरीब, सगळ्यांना एकच फुटपट्टी लावणे, सगळ्यांकडून सारखीच अपेक्षा बाळगणे असे प्रकार होतात. नुसते घोषणा देणे, प्रवाह चुकीचा आहे की बरोबर हे न तपासून पाहता मोठ्या आवाजात आपलाही आवाज मिसळणे; या गोष्टींवर मुळातून विचार व्हायला हवा. समतेच्या तत्वालाही ही बाब लागू होते.
- श्रीपाद कोठे
१ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा