आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी बातमी वाचली. मनात एकच आलं - जगणं नको, पण कागद आवरा. हा कागद, तो कागद, हे कार्ड, ते कार्ड... इतकं सतत सुरू असतं की विचारू नका. विकास किंवा आधुनिकता किंवा सुव्यवस्थित समाज म्हणजे गुंतागुंत, किचकटपणा, कटकट; असाच अर्थ काढावा लागेल. फार नाही, अगदी पन्नासेक वर्षांपूर्वीचा विचार केला तरी; माणसाच्या आयुष्यात कागदपत्रे इतकी वाढली आहेत की विचारता सोय नाही. भूखंड, घर किंवा सदनिका यांचा विचार केला तरी पन्नास वर्षांपूर्वीचे कागदपत्रांचे जंजाळ आणि आताचे जंजाळ यात किती बदल झाला ते लक्षात येईल. आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबा यांची जन्म वा मृत्यू प्रमाणपत्रे सुद्धा नव्हती. त्यापैकी अनेकांना नंतरच्या काळात affidavit इत्यादी करून दाखले तयार करून घ्यावे लागले. हा विषय इतका मोठा आहे की, पंतप्रधान मोदी यांनी थोडासा दिलासा देण्यासाठी self attestation सुरू केले. नियम आणि कायदे कमी करण्याचीही घोषणा त्यांनी केली होती. परंतु हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येते. इतके करूनही सगळ्या व्यवहारातील अनाकलनीयता, फसवणूक, गोंधळ नुसता कायम नसून वाढतो आहे. असे का होते? आणि यावर उपाय काय? यांचा सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. दोन गोष्टी मुख्य आहेत. १) सगळ्या गोष्टी मुठीत घेण्याचा सरकार/ शासन/ प्रशासन/ व्यवस्था यांचा प्रयत्न. या प्रयत्नांच्या मागे लोकांच्या भल्याचा प्रामाणिक हेतूही असू शकतो. परंतु तो हेतू साध्य होणे दूर त्याने सगळ्यांचा त्रासच वाढतो हे समजून घेतले पाहिजे. २) दुसरे कारण म्हणजे - प्रामाणिकपणा, सचोटी, चांगुलपणा, परस्पर विश्वास इत्यादी मानवीय soft power बाजूला सारून समाज उभा करण्याचे, समाज घडवण्याचे प्रयत्न. शिक्षण, वातावरण, विमर्श, संस्कार, साहित्य, मूल्य या सगळ्यातून मानवी soft power ची हकालपट्टी करून त्याजागी; चतुराई, जुगाड, शक्ती, संबंध, diplomacy या गोष्टींची स्थापना करून; यश आणि achievement यांना देण्यात आलेले अवास्तव महत्त्व. काळाने कुस बदलल्याशिवाय यात काही बदल होईल असे वाटत नाही. अन् काळ जेव्हा कुस बदलेल तेव्हा अशी काही किंमत वसूल करेल की, दीर्घ काळ ते पोळत राहील. बाकी मानव शहाणा आहे वगैरे बकवास आहे.
- श्रीपाद कोठे
१५ फेब्रुवारी २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा