'लोकमत'च्या कार्यक्रमात काल रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण झाले. काळ कसा बदलतो हे पाहून मौज वाटली. साधारण ४० वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कॉलनीत संघाचे वातावरण होते, पण आजूबाजूला सगळीकडे संघद्वेषच. आमच्या वस्तीत दुकाने नव्हती. थोडे बाजूला झोपडपट्टी सारख्या वस्तीत एक बऱ्यापैकी किराणा दुकान होते. 'झोपडीचे दुकान', 'मामाजीचे दुकान', 'वाघमारेचे दुकान' म्हणून त्याला ओळखत. महिन्याचा किराणा महाल वा बर्डी वरून येत असला तरी, एखाद्या वेळी या दुकानातही लोक जात असत. आमची वस्ती साधारण 'तरुण भारत'वाली, तर या दुकानात लोकमत येत असे. दुकानात गेलं की समोर ठेवलेला लोकमत सहज चाळला जाई. एकदा असाच या दुकानात गेलो होतो. दसऱ्याच्या दोन तीन दिवस आधीचा दिवस असेल. समोरचा लोकमत चाळला अन उडालोच. पहिल्याच पानावर लीड स्टोरी होती - 'संघ मुख्यालयात सरसंघचालक पदासाठी हाणामारी'. त्यात बाळासाहेब देवरस, आबाजी थत्ते, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, यादवराव जोशी, भाऊराव देवरस; अशी त्या काळातील संघातील दिग्गज नावे होती. या सगळ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची कशी हाणामारी झाली याचं रसभरीत वर्णनही बातमीत होतं. मला प्रश्न पडला होता, कालच मी माझ्या गणातील स्वयंसेवकांचे गणवेशाचे सामान आणायला कार्यालयात गेलो होतो. तिथे काहीच गडबड, गोंधळ नव्हता. बातमीत नाव असलेले अनेक जण नागपुरात सुद्धा नव्हते. भांडार वेळेवर उघडले होते. भांडार प्रमुख रंगनाथजी व्यवस्थित सामान देत होते, हिशेब ठिशेब करत होते. पुष्कळ जण येत जात होते. गप्पागोष्टी होत होत्या. अन आता ही बातमी? असो. काळ बदलत असतो. हो काळ।बदलत असतो. काल होता तो आज नाही. अन आजचा उद्या नसेल.
- श्रीपाद कोठे
७ फेब्रुवारी २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा