शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

जीवन प्रवाह

सध्या आर्थिक विषयांची चर्चा खूप सुरू आहे. सहज मनात विचार आला की, या सगळ्या अर्थकारणाचं वय किती आहे? रिझर्व्ह बँकेला अजून ९० वर्षेसुद्धा झालेली नाहीत. रिझर्व्ह बँक ही अर्थकारण नियंत्रित करणारी व्यवस्था आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापूर्वी देश, समाज, माणसे, लोक, त्यांचे व्यवहार, उद्योग, व्यापार, उत्पादन, सेवा, कृषी, शिक्षण, आरोग्य... इत्यादी इत्यादी इत्यादी अस्तित्वातच नव्हतं का? तर सगळंच होतं. समाज, माणसे आणि त्यांचे व्यवहार हे सगळंच होतं. उदाहरण म्हणून काही नावेच घ्यायची तर - काँग्रेसची स्थापना; संघाची स्थापना; टिळक, विवेकानंद आदींचे अवतारकार्य; वंगभंग; वृत्तपत्रे; अशा अनेक गोष्टी त्यापूर्वीच्या आहेत. मुद्दा एवढाच की, व्यवस्था येत जात राहतात. उभ्या राहतात वा मोडून पडतात. त्यांचे महत्त्व आणि परिणाम तात्पुरते असतात. समाज जीवनाचा प्रवाह वाहतच राहतो. दुसरा मुद्दा हा की, संघटित सूत्रबद्ध आर्थिक रचना नसतानाही समाज व्यवस्थित राहू शकतो. गुण दोष, फायदे तोटे प्रत्येकच अवस्थेत असतात. त्याने आनंदून वा गडबडून जाण्यात अर्थ नसतो. माणूस, जीवन, जीवनप्रवास आणि जीवनप्रवाह; याकडे लक्ष देत राहिलं की बास.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा