सोमवार, ३० मे, २०२२

Vivekananda's people

 https://en.m.wikipedia.org/wiki/Charlotte_Sevier


https://en.m.wikipedia.org/wiki/Advaita_Ashrama


https://www.thestatesman.com/opinion/british-couple-swamiji-1502744799.html


https://www.kalyan-gitapress.org/new_issues.html


https://auromere.wordpress.com/2011/09/30/emma-calves-interaction-with-swami-vivekananda/


http://www.vivekananda.net/PPlHeKnew/FriendsOfSV/EmmaCalve.html



https://en.m.wikipedia.org/wiki/Emma_Calv%C3%A9



https://muse.jhu.edu/article/171096/summary



https://indiaspiritual.wordpress.com/2019/08/07/sri-ma-sarada-devi-and-swami-vivekanandas-american-mother-sara-bull/


https://cambridgehistory.org/research/did-you-know/an-intrepid-lady-of-brattle-street-sara-chapman-bull/


https://www.vedanta.com/store/saint-sara-the-life-of-sara-chapman-bull-the-american-mother-of-sw-vivekananda_moreinfo.html


https://www.exoticindiaart.com/m/book/details/saint-sara-life-of-sara-chapman-bull-american-mother-of-swami-vivekananda-NAU858/


https://americanvedantist.org/2011/articles/glimpses-of-sara-bull/


https://en.m.wikipedia.org/wiki/Sara_Chapman_Bull



https://en.m.wikipedia.org/wiki/William_Hastie


https://en.m.wikipedia.org/wiki/Alasinga_Perumal


https://theseer.in/josephine-macleod-and-vivekanandas-mission-a-song-of-freedom/



https://www.ramakrishnavivekananda.info/reminiscences/228_jm.htm


https://en.m.wikipedia.org/wiki/Josephine_MacLeod

श्री रामकृष्ण परमहंस (१३)

तीर्थयात्रेहून परतल्यानंतर काही दिवसांनी श्री रामकृष्णांचा भाचा हृदयराम याची पत्नी मरण पावली. तेव्हा त्याच्या मनात विरक्ती येऊन तो अधिकाधिक साधना करू लागला. एके रात्री मामांना पंचवटीकडे जाताना बघून, त्यांना लागेल म्हणून तो त्यांच्यामागे गडवा व पंचा घेऊन जाऊ लागला. जाता जाता त्याला दिसले की, श्री रामकृष्ण हे रक्तमांसाचा जडदेह धारण करणारे मनुष्य नाहीतच. त्यांच्या देहातून निघालेल्या अपूर्व प्रभेने सगळी पंचवटी उजळून निघाली आहे. चालताना त्यांच्या चरणांचा भूमीला स्पर्श होत नसून ती अधांतरी पडत आहेत. हृदयने पुन्हा पुन्हा डोळे चोळले, आजूबाजूच्या वस्तू पाहिल्या; पण श्री रामकृष्ण मात्र तसेच ज्योतिर्मय दिसत होते. माझ्यात तर काही बदल झाला नाही ना म्हणून त्याने स्वतःकडे पाहिले तर त्याला, तोही त्यांच्या तेजातून निघालेला अंश आहे असे दिसले. हे अद्भुत दृश्य पाहून तो बेभान होऊन ओरडू लागला. त्याला ओरडताना पाहून श्री रामकृष्ण त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या छातीला स्पर्श करून त्यांनी त्याला शांत केले अन म्हणाले, 'आई याला जड करून दे.'

श्री रामकृष्णांच्या या कृतीनंतर हृदय लगेच सामान्य झाला. आपल्या मामांवर रागावून तो म्हणाला, 'का असे केले? अद्भुत दर्शनाचा आनंद मला पुन्हा कसा लाभणार?' त्यावर त्याच्या मामांनी उत्तर दिले, 'अरे एवढ्याशा दर्शनाने केवढा गोंधळ करत होता. मी तर चोवीस तास काय काय पाहत असतो. तुझी वेळ आली की तुलाही दर्शने वगैरे होतील. आता शांत हो.'

मामांच्या सांगण्याने हृदय वरून शांत झाला तरी आत अस्वस्थ होता. त्याला वाटले श्री रामकृष्ण पंचवटीत जिथे साधना करतात तिथे आपण साधना करावी. त्याप्रमाणे तो रात्री पंचवटीत गेला आणि श्री रामकृष्ण जिथे बसून साधना करीत तिथे बसून साधना करू लागला. अन थोड्याच वेळात किंचाळू लागला, 'जळालो, मेलो, वाचवा.' श्री रामकृष्णांनी जाऊन पाहिले अन विचारले तेव्हा तो म्हणाला, 'इथे ध्यान करायला बसताच कोणीतरी जणू घमेलंभर विस्तव माझ्यावर फेकला असं वाटलं आणि मी पोळू लागलो.' श्री रामकृष्ण त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाले, 'जा. तुझा दाह शांत होईल. पण तू असे का करतो. मी सांगितलं आहे नं की असं करत जाऊन नको.'

श्री रामकृष्णांचा पुतण्या अक्षय हादेखील दक्षिणेश्वर मंदिरात पूजक होता. आध्यात्मिक प्रकृतीच्या या पुतण्याचे १८६९ साली दक्षिणेश्वरचे व्यवस्थापक मथुरानाथ यांच्या दिवाणखान्यातच अल्पवयात निधन झाले. श्री रामकृष्णांना त्याच्या निधनाचे अपार दु:ख झाले. या घटनेनंतर ते मथुरानाथांच्या दिवाणखान्यात पुन्हा गेले नाहीत.

या घटनेनंतर काही दिवसांनी मथुरानाथ श्री रामकृष्णांना सोबत घेऊन आपल्या जमीनदारीच्या भागात आणि गुरुगृही घेऊन गेले होते. त्या भागात फिरताना एकदा कलाईघाट येथे गेले असताना खेडयातील बाया माणसांची दुर्दशा आणि दारिद्र्य पाहून श्री रामकृष्ण व्याकुळ झाले आणि त्यांनी मथुरानाथांकडून त्या सगळ्यांना पोटभर जेवण, एकेक वस्त्र आणि डोक्याला लावायला तेल देववीले होते.

इ. स. १८७० साली श्री रामकृष्णांना चैतन्य महाप्रभूंची लीलाभूमी नवद्विपाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली तेव्हा मथुरानाथ त्यांना तिथे घेऊन गेले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८७१ साली आषाढ महिन्यात मथुरानाथांनी या जगाचा निरोप घेतला. त्याआधीची एक घटना त्यांना श्री रामकृष्णांबद्दल किती भक्तिभाव होता ते दाखवणारी आहे. मथुरानाथांच्या कुठल्या तरी सांध्यावर एक फोड झाला होता. तो काही केल्या बरा होत नव्हता. रामकृष्णांनी आपल्याला भेटायला यावे असा लकडा त्यांनी लावला. रामकृष्ण टाळाटाळ करत होते. अखेरीस ते भेटायला गेले. तेव्हा मथुरानाथ त्यांना म्हणाले, 'बाबा तुमची पायधूळ द्या.' त्यावर रामकृष्णांनी विचारले, 'त्याने काय तुझा फोड बरा होईल?' त्यावर मथुरानाथांचे उत्तर विलक्षण होते. ते म्हणाले, 'मी फोड बरा करण्यासाठी पायधूळ मागत नाही. हा भवसागर पार करण्यासाठी मागतो आहे.' असे हे मथुरानाथ अंतिम घटका मोजत होते त्यावेळी रामकृष्ण दक्षिणेश्वरला आपल्या खोलीत प्रगाढ ध्यानात बुडून गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ध्यान संपवून ते भाचा हृदयराम याला म्हणाले, 'मथुर देवीलोकी गेले.' त्यानंतर काही तासांनी रात्री येऊन कालिवाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजता मथुरानाथांनी देह ठेवला. ज्या मथुरानाथांच्या प्रयत्नाने दक्षिणेश्वरचे काली मंदिर उभे राहिले आणि त्या मंदिराच्या आश्रयाने रामकृष्णांच्या साधना आणि लीला होऊन जगाला अध्यात्माचा प्रकाश लाभला; त्या मथुरानाथांशी असलेला रामकृष्णांचा मधुर मानवी संबंध त्यावेळी संपला.

वयाच्या १८ व्या वर्षी इ. स. १८७२ साली श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा माँ या दक्षिणेश्वरला आल्या. त्यांच्या गावी त्यांच्या कानावर रामकृष्णांबद्दल अनेक अफवा पडल्या होत्या. त्या अफवांमध्ये काही तथ्य नसून, आपले पती पूर्वीप्रमाणेच आहेत हे त्यांनी पाहिले आणि त्यांचे मन शांत झाले. रामकृष्णांच्या खोलीजवळील नौबतखान्यात शारदा माँ राहत असत. तिथेच स्वयंपाक वगैरेही करत. दक्षिणेश्वरला आल्यानंतर काहीच दिवसांनी त्या रामकृष्णांच्या खोलीतच झोपू लागल्या होत्या. एक दिवस पतीचे पाय चेपता चेपता त्यांनी पतीला विचारले - 'मी तुम्हाला कोण वाटते?' त्यावर रामकृष्णांनी उत्तर दिले - 'जी आई मंदिरात आहे (जगन्माता), तिनेच या शरीराला जन्म दिला आहे (जन्मदात्री) व ती सध्या नौबतखान्यात राहत आहे आणि तीच आता माझे पाय चेपीत आहे. प्रत्यक्ष आनंदमयीचे एक रूप अशाच तुम्ही मला सर्वदा खरोखरच दिसत असता.'

श्री रामकृष्ण व माँ शारदा यांच्या अलोकसामान्य संबंधांवर लिहिताना श्री रामकृष्ण लीलाप्रसंग या ग्रंथाचे लेखक स्वामी सारदानंद यांनी याच दिवसातला एक प्रसंग नोंदवला आहे. त्यांच्याच शब्दात तो प्रसंग असा - 'एके दिवशी श्री माताजींना स्वतःच्या बाजूला झोपलेल्या बघून ठाकूर आपल्या मनाला संबोधून पुढीलप्रमाणे विवेकविचारास प्रवृत्त झाले होते. ते म्हणाले - मना, याचेच नाव स्त्रीदेह. लोक याला पराकाष्ठेची आस्वाद्य अशी भोगवस्तू समजत असतात आणि त्याचा भोग घेण्यासाठी सदासर्वदा आतुर असतात. परंतु त्याचे ग्रहण केल्याने देहातच आबद्ध राहावे लागते. सच्चिदानंदघन ईश्वराचा लाभ करून घेता येत नाही. मना, स्वतःची इच्छा स्वतःपासून लपवू नकोस. पोटात एक आणि ओठात दुसरे ठेवू नकोस. खरं सांग तू हे ग्रहण करू इच्छितो की तुला ईश्वर हवा आहे? जर तुला हे हवे असेल तर ते तुझ्या समोरच आहे. त्याचे ग्रहण कर. असा विवेकविचार करून ठाकूर श्री माताजींच्या देहास स्पर्श करण्यास उद्यत होताक्षणीच त्यांचे मन कुंठित होऊन एकाएकी समाधीमार्गे असे विलीन होऊन गेले की, त्या रात्री मग ते परत साधारण बोधभूमीवर उतरले नाही. ईश्वराचे नाव ऐकवून दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रयासाने त्यांना भानावर आणावे लागले होते.'

श्री रामकृष्ण परमहंस (१२)

अद्वैत भावात दीर्घ काळ व्यतीत केल्यानंतर श्री रामकृष्णांच्या मनातील धर्माविषयीचा भाव अधिक घनीभूत आणि सर्वव्यापी झाला होता. एकांगीपणा तसाही नव्हताच, नंतर तर कोणाठायी एकांगीपणा दिसला तरीही त्यांना त्रास होत असे. अद्वैत साधना आणि नंतर त्याच भावात अवस्थित राहण्याच्या काळानंतर काहीच दिवसात एक सुफी फकीर दक्षिणेश्वरला आला. श्री रामकृष्ण त्या फकिराकडे आकृष्ट झाले. त्याच्याशी बोलताना त्यांना वाटले की, हाही तर ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे. कसा असेल हा मार्ग असे कुतूहल वाटून त्यांच्या मनाने घेतले की, आपण या मार्गानेही साधना करावी. मनात विचार येताच तो निश्चयात बदलला आणि त्यांनी आपले मन फकिराजवळ बोलून दाखवले. त्याच्याकडून दीक्षा घेतली आणि साधना सुरू केली.

नंतरच्या काळात याबाबत ते सांगत, 'त्यावेळी अल्ला मंत्राचा जप करीत असे. मुसलमानांप्रमाणे काचा न मारता धोतर नेसत असे. त्रिकाळ नमाज पढत असे. हिंदुभाव मनातून अजिबात लोपून गेल्याने हिंदू देवदेवींना प्रणाम करणे दूर, त्यांचे दर्शन घेण्याची देखील प्रवृत्ती होत नसे. असे तीन दिवस लोटल्यानंतर त्या मताच्या साधनेचे फळ हस्तगत झाले.' या साधनाकाळात त्यांना प्रथम लांब दाढी असलेल्या, गंभीर, ज्योतिर्मय पुरुषाचे दर्शन झाले. नंतर सगुण विराट ब्रम्हाची अनुभूती होऊन निर्गुण तुरीय अवस्थेत मन लीन होऊन गेले. या काळात त्यांना मुस्लिम लोकांप्रमाणेच आहार करण्याची इच्छा होत असे. इस्लाम साधनेच्या काळात ते कालीवाडीच्या आतही गेले नाहीत. व्यवस्थापक मथुरामोहन यांच्या बाहेर असलेल्या कोठीतच ते राहिले.

ज्यांच्याकडून श्री रामकृष्णांनी इस्लाम दीक्षा घेतली ते सय्यद वाजीद अली शाह हे सुफी फकीर होते. त्यांचे मूळ गाव डमडम. ते जन्माने हिंदू होते आणि त्यांचे नाव गोविंद होते. मात्र इस्लाम मताच्या आकर्षणाने त्यांनी त्या पंथाची दीक्षा घेऊन साधना केली होती. सुफी पंथाच्या नक्षबंदिया मुजद्दीदिया उपपंथाचे ते अनुयायी होते. अनेक वर्षे साधना करून ते त्या मार्गावरील गुरू म्हणून सर्वत्र परिचित होते. फारसी व अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वभावाने प्रेमळ असलेला हा फकीर सतत कुराणपठण करीत भावसाधनेत बुडलेला असे. ११ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्री रामकृष्णांच्या या इस्लाम साधनेबद्दल इस्लाम अनुयायांचे मत काय आहे असाही एक प्रश्न निर्माण होतो. Shri Ramakrishna's Sufi Sadhana या लेखात मौलाना मुबारक करीम जवाहर म्हणतात, 'इस्लाममध्ये अवतार मानत नाहीत. त्यामुळे इस्लाम मतानुयायी श्री रामकृष्णांना ईश्वरावतार मानू शकत नाहीत. मात्र श्री रामकृष्णांचे मार्गदर्शन आपल्याला अल्लाकडे घेऊन जाऊ शकते असे ते मानू शकतात. इस्लामचे अनुयायी श्री रामकृष्णांना अवतार न मानता मार्गदर्शक (मुरशीद) मानू शकतात.' मौलाना जवाहर यांचे हे मत प्रातिनिधिक म्हणता येत नसले तरीही महत्त्वाचे नक्कीच म्हणता येईल.

नंतरच्या काळात श्री रामकृष्ण म्हणत असत - 'हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये जणू एक पर्वत अडथळ्यासारखा उभा आहे. इतके दिवस एकत्र राहूनही एकमेकांची विचारपद्धती, धार्मिक विश्वास अन धर्मकार्ये एकमेकांना पूर्णपणे दुर्बोधच राहिली आहेत. वेदांत विज्ञानावर विश्वास ठेवल्याने हा पर्वत एक दिवस अंतर्धान पावेल आणि दोघे प्रेमाने एकमेकांना आलिंगन देतील.'

अद्वैत साधनेनंतर श्री रामकृष्णांचे शरीर दुर्बल झाले होते. पावसाळा सुरू झाला की गंगेचे पाणी खारे होईल आणि पुन्हा कदाचित प्रकृतीचा त्रास होईल म्हणून त्यांनी काही काळ जन्मगावी कामारपुकुरला जावे असा सगळ्यांनी विचार केला. त्यानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी इ.स. १८६७ च्या ज्येष्ठ महिन्यात ते जन्मगावी कामारपुकुरला गेले. व्यवस्थापक मथुरामोहन यांची पत्नी आणि राणी रासमणीची मुलगी जगदंबा हिने तिथल्या मुक्कामात लागणारे सगळे सामान, धान्य आदी त्यांच्यासोबत दिले. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेतील गुरू भैरवी संन्यासिनी आणि त्यांचा भाचा हृदय हेही त्यांच्यासोबत कामारपुकुरला गेले. त्यांची म्हातारी आई मात्र कालीवाडीतच राहिली. उरलेले आयुष्य गंगातीरीच घालवण्याचा संकल्प त्यांनी मोडला नाही.

जवळपास आठ वर्षांनंतर श्री रामकृष्ण आपल्या जन्मगावी गेले होते. त्या काळात गावातील लोकांच्या कानावर त्यांच्याबद्दल खूप गोष्टी गेल्या होत्या. ते बाईचा वेष घालून हरी हरी करतात, कधी अल्ला अल्ला करीत असतात इत्यादी कथा गावकऱ्यांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहण्याची सगळ्या गावालाच उत्सुकता लागली होती. पण श्री रामकृष्ण जसे पूर्वी होते तसेच आहेत हे पाहून गावकऱ्यांना संतोष वाटला. रोजच त्यांना पाहायला, भेटायला, बोलायला लोकांची गर्दी होत असे. त्यांच्या सहवासात एक अपूर्व शांतता गावकरी अनुभवत असत. सांसारिक चिंतांचा त्यांच्या सान्निध्यात विसर पडतो असाही अनुभव लोक घेत असत.

श्री रामकृष्ण गावी राहू लागल्यानंतर काही दिवसांनी घरचे लोक, त्यांच्या पत्नीला 'सारदा'ला तिच्या माहेरहून घेऊन आले. त्यावेळी सारदा देवींना पंधरावे वर्ष सुरू होते. सहा-सात महिने श्री रामकृष्ण कामारपुकुरला राहिले. बालपणीचे मित्र, जुने स्नेही, आप्त अशा सगळ्यांसोबत त्यांचा हा काळ आनंदात गेला. त्यांची प्रकृतीही सुधारली. याच काळात शेवटी शेवटी भैरवी संन्यासिनीचे क्षुल्लक कारणावरून हृदयशी भांडण झाले. त्यानंतर काहीच दिवसात उपरती होऊन, माफी मागून, किल्मिष दूर करून ती काशीला निघून गेली.

सुमारे सात महिने जन्मगावी राहून इ.स. १८६७ च्या अखेरीस श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्याच सुमारास काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांना सहकुटुंब तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. स्वाभाविकच त्यांनी श्री रामकृष्णांनाही आग्रह केला. या आग्रहामुळे श्री रामकृष्ण आपली वृद्ध आई आणि भाचा हृदयराम यांच्यासह मथुरांबरोबर तीर्थयात्रेला गेले. इ.स. १८६८ च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून अंदाजे सहा-सात महिने ही मंडळी तीर्थयात्रेला गेली होती.

या यात्रेसाठी सगळे मिळून शंभरेक महिला पुरुष होते. मथुरांनी यासाठी रेल्वेचा दुसऱ्या वर्गाचा एक व तिसऱ्या वर्गाचे तीन डबे आरक्षित केले होते. आपल्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार हे चार डबे वेगळे काढून मुक्काम करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. कोलकात्याहून निघाल्यावर देवघरला बैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी हे लोक थांबले होते. या ठिकाणी गरीब वस्तीतील लोकांना पाहून श्री रामकृष्णांचे मन करुणेने द्रवले होते आणि त्यांनी मथुरांना या लोकांना जेवण आणि वस्त्रे द्यायला सांगितले होते. इथून निघाल्यावर काशीला पोहोचण्याआधी एका ठिकाणी श्री रामकृष्ण व हृदय गाडीतून उतरले होते आणि पुन्हा गाडीत चढण्यापूर्वीच गाडी सुरू होऊन गेली. योगायोगाने रेल्वे कंपनीचे एक अधिकारी राजेंद्रलाल बंदोपाध्याय एका विशेष गाडीने तिथे पोहोचले आणि या दोघांना अडचणीत पाहून आपल्या गाडीने काशीला घेऊन गेले.

काशी मुक्कामी श्री रामकृष्ण केदारनाथ आणि अन्य देवतांच्या मंदिरात नित्य दर्शनासाठी जात असत. त्या ठिकाणीही त्यांना भावावेश होत असे. मणिकर्णीकेच्या घाटावरील श्रेष्ठ परमहंस त्रैलंग स्वामी यांनाही श्री रामकृष्ण भेटले होते. पाच सहा दिवस काशीला राहून ही सगळी मंडळी प्रयागला गेली. त्या ठिकाणी त्यांनी संगमात स्नान आणि त्रिरात्र वास केला होता. तिथून ते परत काशीला आले आणि पंधरा दिवस तिथे राहून वृन्दावनला गेले. काशी येथे भेटलेली तंत्रगुरू भैरवी ही देखील यांच्यासह वृन्दावनला गेली होती. तेथे सुमारे दोन आठवडे राहून मंडळी पुन्हा काशीला आली आणि काही महिने तिथेच राहिली. काशीहून गयेला जाण्याचा मथुरांचा विचार होता. परंतु गयेला गेल्यास आपण या धराधामी राहू शकणार नाही असे श्री रामकृष्णांनी निक्षून सांगितल्याने मथुरांनी तो विचार सोडून दिला. साधारण इ.स. १८६८ च्या मध्यावर ही मंडळी तीर्थयात्रा आटोपून दक्षिणेश्वरला परतली.

श्री रामकृष्ण परमहंस (११)

साधारण १८६४ साली केव्हातरी श्रीमत परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले. हे एक नागा संन्यासी होते. बराच काळ त्यांनी नर्मदा तटाकी साधना केली होती. भ्रमण करत करत ते राणी रासमणीच्या कालीवाडीत पोहोचले. एक दिवस नावेतून उतरून ते गंगा किनाऱ्यावरील देवस्थानाच्या ओवरीत येऊन बसले. इकडेतिकडे पाहताना त्यांना श्री रामकृष्ण दृष्टीस पडले. श्री रामकृष्ण अन्यमनस्कपणे, जणू या जगात नाहीतच असे त्याच ओवरीत बसले होते. तोतापुरींना त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटले. ही व्यक्ती अद्वैत वेदांताच्या साधनेला अत्युत्तम आहे असे त्यांच्या मनात आले. तोतापुरी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, 'तुम्ही अद्वैत साधना कराल का?' त्यावर श्री रामकृष्णांनी उत्तर दिले - 'मी काय करणार वा करणार नाही हे काही मला ठाऊक नाही. माझी आई म्हणेल तसे मी करीन.' त्यावर तोतापुरी त्यांना म्हणाले, 'मग जाऊन आईला विचारून या.' त्यावर श्री रामकृष्ण उठले आणि हळूहळू काली मंदिरात  गेले. तिथे जाताच त्यांना भगवतीचा आवाज आला, 'तू अद्वैताची साधना कर.' प्रणाम करून श्री रामकृष्ण माघारी वळले. तोतापुरी हे सगळे पाहत होते. त्यांना गंमत वाटली. हा माणूस या देवीमूर्तीला आई मानतो आणि तिलाच सल्ला विचारतो हे पाहून त्यांना थोडी मौजही वाटली. कारण ते स्वतः अद्वैत सिद्धांताचे मोठे अधिकारी पुरुष होते. अन या विश्वाची ती आदिशक्ती दोघांच्याही नकळत अलगदपणे आपले कार्य करत होती.

वेदांत साधना करण्यापूर्वी तुम्हाला जानवे आणि शेंडी यांचा त्याग करून संन्यास घ्यावा लागेल असे तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, गुप्तपणे संन्यास घेता येत असेल तर माझी हरकत नाही. कारण माझ्यासोबत राहणाऱ्या आणि मोठ्या मुलाच्या निधनाने पोळलेल्या शोकसंतप्त अशा माझ्या आईला माझ्या संन्यास घेण्याने त्रास होईल. तिला अधिक दु:ख होऊ नये म्हणून मी गुप्तपणे संन्यास घेईन. तोतापुरींनी त्याला संमती दिली. त्यानंतर एका शुभ दिवशी तोतापुरी यांनी त्यांच्याकडून प्रथम पितरांचे व नंतर स्वतःचे (श्री रामकृष्णांचे स्वतःचे) श्राद्धही करवून घेतले. कारण संन्यास घेण्यापूर्वी साधक तिन्ही लोकांचा निरोप घेत असतो. श्री रामकृष्णही तोतापुरी सांगतील ते ते अगदी तसेच व्यवस्थित करू लागले. श्राद्ध आदी आटोपल्यावर साधनेच्या सामानाची जुळवाजुळव पण त्यांनी करून ठेवली. नंतर एका ब्राम्ह मुहूर्तावर दोघेही दक्षिणेश्वरच्या पंचवटीतील कुटीरात उपस्थित झाले. पूर्वकर्म झाले. होम पेटवण्यात आला. पवित्र मंत्रांच्या गंभीर आवाजाने पंचवटी निनादली. श्री रामकृष्ण त्रिसुपर्ण मंत्रांच्या मंत्रोच्चारासह होमात आहुती देऊ लागले. त्यानंतर विरजा होम सुरू झाला. 'माझ्या ठायी असणारी पंचमहाभूते शुद्ध होवोत... मी रजोगुणाच्या मलिनतेपासून मुक्त होवो... माझ्या ठायी असणारे प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे सगळे वायू शुद्ध होवोत... माझे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे पंचकोष शुद्ध होवोत... माझ्या ठायी असलेले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे विषयसंस्कार शुद्ध होवोत... माझे मन, वाणी, काया, कर्म शुद्ध होवोत... माझ्या मार्गातील सगळे अडथळे दूर होवोत... माझी सगळी मलिनता दूर होऊन मी ज्योति:स्वरूप होवो...' अशी प्रार्थना करत अनेक आहुती दिल्या गेल्या. नंतर 'सर्व लोकांच्या प्राप्तीची आशा मी त्यागतो' आणि 'सर्व भूतांना अभय देतो' असे म्हणून होमाची समाप्ती झाली. शिखा आणि यज्ञोपवित यांचा त्याग झाला.

गुरूने दिलेली कौपीन, काषाय वस्त्रे परिधान केली. गुरूने दिलेले 'श्री रामकृष्ण' हे नाव ग्रहण केले. अन तोतापुरी यांच्याजवळ ते उपदेश श्रवण करण्यासाठी बसले. तोतापुरींनी वेदांताच्या अद्वैत सिद्धांताचा उपदेश देणे सुरू केले. नंतरच्या काळात याबद्दल सांगताना श्री रामकृष्ण सांगत असत - 'दीक्षा प्रदान करून तोतापुरी अनेक सिद्धांत वाक्यांचा उपदेश करू लागले. मन विकल्परहित करून आत्मध्यानात निमग्न होऊन जाण्यास त्यांनी सांगितले. मी मात्र मनाला विकल्परहित करून नामरूपाच्या अतित नेऊ शकलो नाही. इतर साऱ्या गोष्टीतून क्षणात मन बाहेर पडत असे. मात्र अखेरच्या क्षणी जगदंबेचे उज्वल रूप उदयास येई आणि मन तिथेच थांबे. वारंवार असे झाले तेव्हा डोळे उघडून त्यांना म्हणालो, नाही जमले.' त्यावर तोतापुरी क्षुब्ध झाले आणि निर्भत्सना करून म्हणाले, 'क्यो होगा नहीं?' इतके म्हणून त्यांनी इकडेतिकडे नजर फिरवली. कुटीत फुटक्या काचेचा एक तुकडा त्यांना दिसला. तो उचलून त्याचे तीक्ष्ण टोक माझ्या भुवयांमध्ये जोराने रोवून म्हणाले, 'या बिंदूवर मन केंद्रित करा.' तेव्हा दृढ संकल्प करून ध्यानास बसलो. फिरून अखेरच्या क्षणी जगदंबेची मूर्ती मनात उदय पावली तेव्हा ज्ञान ही तलवार आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीचे दोन तुकडे करून टाकले. मग विकल्प राहिला नाही आणि मन वेगाने नामरूपांचे राज्य ओलांडून समाधीत पोहोचले.'

अशा रीतीने श्री रामकृष्ण समाधीत स्थित झाल्यावर तोतापुरी कुटीच्या बाहेर आले आणि कोणी समाधीभंग करू नये म्हणून कुटीचे दार त्यांनी बाहेरून लावून घेतले. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस असे तीन दिवस सरले. कुटीचे दार उघडण्यासाठी आतून आवाज मात्र आला नाही. आश्चर्य वाटून तोतापुरी आत गेले आणि पाहतात तर काय? ज्या स्थितीत श्री रामकृष्ण बसले होते त्याच स्थितीत होते. शरीराची स्थिती किंचितही बदलली नव्हती. श्वासोच्छ्वास पूर्ण बंद होता. सगळे वायू निरुद्ध झालेले. जिवंतपणाचे काहीही लक्षण नाही. त्यांनी शिष्याच्या शरीराला पुन्हापुन्हा स्पर्श केला तरीही काहीच चेतना नाही, कसली हालचाल नाही, कसली प्रतिक्रिया नाही. निस्पंद... निष्कम्प... हे पाहून तोतापुरी आनंदाने व विस्मयाने ओरडले, 'यह क्या दैवी माया? समाधी... निर्विकल्प समाधी... एकही दिन मे !!'

सतत चाळीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर आपण प्राप्त केलेली अद्वैत अवस्था या अद्भुत शिष्याने एका दिवसात प्राप्त करून घेतली याचे सकौतुक आश्चर्य वाटलेल्या तोतापुरी यांनी श्री रामकृष्णांना साधारण भावभूमीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन दिवसांपेक्षा जास्त कुठेही न राहणारे तोतापुरी, त्यानंतर कुठल्याशा अगम्य ओढीने अकरा महिने दक्षिणेश्वरच्या पंचवटीत राहिले. या काळात त्या दोन गुरूशिष्यात अद्वैतानंदाची लयलूट होत होती. 

अकरा महिने पंचवटीत राहून तोतापुरी आपल्या मार्गाने निघून गेल्यावर आपण सतत याच अद्वैत बोधात राहावे अशी इच्छा श्री रामकृष्णांच्या मनात निर्माण झाली. अन तब्बल सहा महिने श्री रामकृष्ण या समाधी अवस्थेत होते. ज्या अवस्थेत राहिल्यावर साधारण जीव परत फिरू शकत नाही आणि एकवीस दिवसात शरीर सुकलेल्या पानासारखे गळून पडते, त्या अवस्थेत ते सहा महिने होते. त्याविषयी ते सांगत असत - 'दिवस कधी उगवत असे, रात्र कधी येत असे जात असे, हेही कळत नव्हते. मेलेल्या माणसाच्या नाकातोंडात माशा शिरतात तशा शिरत असत. मात्र त्याचे भान नसे. केसात माती जमून जमून जटा झाल्या होत्या. शौचाला वगैरे होऊन जाई तरीही शुद्ध नसे. अशा स्थितीत शरीर काय टिकले असते? पण त्याच वेळी कुठून तरी एक साधू तिथे हजर झाला. त्याच्या हाती एक काठी होती. त्याने माझी अवस्था ओळखली. त्याला कळले की, माझे कार्य अजून व्हायचे आहे. म्हणून खाण्याच्या वेळी तो खायचे आणून मला मारून मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. थोडी शुद्ध येते आहे असे दिसले की जबरदस्तीने खाण्याचे कोंबून द्यायचा. कधीकधी पोटात एव्हढेतेवढे जाई, कधी तेही नाही. असे सहा महिने उलटले. त्यानंतर त्याच अवस्थेत आईची वाणी ऐकू आली - 'भावमुखी राहा. लोकोपदेशासाठी भावमुखी राहा.' त्यानंतर आजारी पडलो. सहा महिने पोटाच्या दुखण्याने बेजार होतो. मग हळूहळू सामान्य अवस्था आली.'

श्री रामकृष्ण परमहंस (१०)

इ. स. १८६१ ते १८६४ या काळात तंत्रशास्त्रातील अनेक तांत्रिक साधना पूर्ण करून श्री रामकृष्ण वैष्णव मार्गाच्या वात्सल्य, मधुर आदी साधनांकडे वळले. त्यांचा जन्मच मुळी वैष्णव कुटुंबात झाला होता. श्रीराम हे त्यांचे कुलदैवत होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना वैष्णव पंथाची ओढ होतीच. १८६४ मध्ये केव्हातरी दक्षिणेश्वरच्या कालीवाडीत एक रामपंथी साधू आला. त्या जटाधारी बाबांजवळ एक रामलालाची छोटी मूर्ती होती. अतिशय भावभक्तीने तो त्या रामलालाची पूजाअर्चा इत्यादी करीत असे. त्या साधुसाठी ती रामलालाची मूर्ती नव्हती तर साक्षात बालक श्रीराम होते. त्याच भावनेने तो त्यांना खाउपिऊ घालत असे, झोपवत असे, रागे भरत असे. तो आल्यापासूनच श्री रामकृष्णांना त्याची आणि त्याच्यासोबत असलेल्या रामलालाची ओढ वाटू लागली. ते तासंतास त्यांच्याजवळ बसून राहू लागले. हळूहळू रामलालाला देखील श्री रामकृष्णांचा लळा लागला. नंतरच्या काळात आपल्या शिष्यांना ते सांगत असत की, 'प्रत्यक्ष रामलाला दिसत असे, खेळत असे, हट्ट करत असे, लाड करवून घेत असे, रुसत असे. अगदी जीवंत. जसे तुम्हा लोकांना पाहतो, तुमच्याशी बोलतो तसे.' रामलालाच्या अनेक लीलांचे वर्णनही ते सांगत असत. एकदा त्याने गंगेत स्नान करण्याचा हट्ट केला तेव्हा, आई जशी हट्टी मुलाची खोड मोडण्यासाठी करते तसे, त्यांनी त्याला प्रवाहात दाबून धरले. त्यामुळे रामलाला कासावीस झाला आणि त्याची अवस्था पाहून त्यांनी त्याला जवळ घेऊन त्याची समजूत काढली. असे अनेक प्रसंग ते सांगत असत. काही काळाने त्या जटाधारी बाबांना चिरवांच्छित अद्भुत दर्शन लाभले. त्यावेळी श्री रामकृष्णांकडे येऊन ते म्हणाले की, 'आता माझी सगळी तळमळ शांत झाली आहे. या रामलालालाही तुमची ओढ आणि लळा लागला आहे. तेव्हा त्याला इथेच राहू द्या आणि मला जाण्याची परवानगी द्या.' याप्रमाणे ते बाबाजी निघून गेले आणि रामलाला श्री रामकृष्णांजवळ राहिले. अन्यही अनेक रामायत साधू बैरागी कालीवाडीत त्या सुमारास आले होते. त्यांच्याकडून अनेक भजने श्री रामकृष्णांनी शिकून घेतली होती. कालीवाडीत येणाऱ्या विविध पंथ संप्रदायांच्या अनेक साधू बैराग्यांना काय हवे नको ते पाहून त्यांना ते ते देण्याची व्यवस्थाही श्री रामकृष्ण करून देत असत.

यानंतर श्री रामकृष्णांनी मधुर भावाची साधना केली. अन्य साधनांप्रमाणेच याही वेळी ते त्या भावात पूर्ण बुडून गेले होते. इतके की आपण पुरुष आहोत हेही ते जणू विसरून गेले होते. ईश्वर हाच आपला प्रेमास्पद हा भाव त्यांच्यात पूर्ण भिनला होता. त्यांची वेशभूषाही त्या काळात स्त्रियांचीच राहत असे. स्त्रियांसारखेच चालणे, बोलणे, हावभाव इत्यादी पाहायला मिळत. स्त्रियांमध्ये मिसळल्यास ते श्री रामकृष्ण आहेत हे देखील ओळखू येत नसे. काली मंदिराचे व्यवस्थापक मथुरबाबू यांच्या घरीही अगदी अंत:पुरापर्यंत त्यांचा वावर होत असे. त्या महिलांनाही त्यांच्याबद्दल संकोच वाटत नसे. कधी कधी सखी भावाने ते त्यांची वेणीफणीही करून देत. त्यांच्या अगदी जवळच्या, रोजच्या लोकांनाही त्या अवतारात ते ओळखू येत नसत. त्या काळात नित्य त्यांच्यासोबत राहणारा, त्यांची सगळी काळजी घेणारा त्यांचा भाचा हृदयराम यालाही त्यांना ओळखता येत नसे. अनेकदा लोकांची फसगत होऊन हास्यविनोदही होई.

सहा महिने श्री रामकृष्ण या भावात निमग्न होते. या काळातील त्यांचे मनोभाव पूर्ण करण्यासाठी मथुरानाथांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांचा एक संच आणि एक कृत्रिम कुरळा केशकलापही तयार करून दिला होता. या मधुर भावाच्या साधनेकडे वळण्याआधी हा भाव किंवा या भावाची गाणी, भजने आपल्याला आवडत नाहीत असे ते अनेकवार सांगत. पण साधना सुरू केल्यावर ते त्या गोपी भावातच बुडून गेले. रात्रंदिवस राधाकृष्णाचाच त्यांना ध्यास लागला. हा ध्यास इतका पराकोटीचा होता की, भक्तीशास्त्रात सांगितलेली महाभावाची सगळी लक्षणे त्यांच्यात दिसू लागली. नंतरच्या काळात ते सांगत; अष्टपाश तोडल्याशिवाय, तसेच लज्जा, भय, संकोच, घृणा आदींचा पूर्ण त्याग केल्याशिवाय ईश्वराचा लाभ होत नाही. नंतर तर श्री राधेशिवाय श्रीकृष्णाची प्राप्ती शक्य नाही या भावनेतून ते स्वतःला राधाराणीच समजू लागले होते. भगवंताच्या सखीभावाचा त्यांचा मनोवेग अकल्पनिय होता. असे म्हणतात की त्या काळात त्यांच्या ओटीपोटाच्या भागातून रजस्वला स्त्रीप्रमाणे महिन्यातील तीन दिवस रक्तबिंदू निघत असत. माणसाच्या शरीराची घडण त्याच्या मनानुसारच होत असते या शास्त्रमताचा जणू प्रत्ययच येत होता. श्री रामकृष्णांच्या या अनुभूती पाहून त्यावेळच्या काही शास्त्री पंडितांचे तर म्हणणे होते की, त्यांच्या अनुभूती वेदपुराणांनाही ओलांडून खूप पुढे गेल्या आहेत. जणू शरीरविज्ञानशास्त्राचीही सीमा त्यांनी ओलांडली होती. परमशक्तीच्या या विश्वात सगळ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत वा सगळ्याच गोष्टींची उकल झालेली आहे असे तरी कसे म्हणायचे?

याच प्रबळ भावाच्या परिणामी अखेर त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि अन्य वेळेप्रमाणेच दर्शन झालेल्या ईश्वरी रूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि ते रूप त्यांच्यात मिसळून गेले. नंतर काही दिवसांनी त्यांच्या या श्रीकृष्ण भावाचा उपशम झाला. याच काळात एकदा विष्णू मंदिरात श्रीमद भागवताचा पाठ ऐकत बसले असताना, त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले. अन त्या मूर्तीच्या पायांपासून लांब दोरीसारखी एक ज्योत निघाली, त्या ज्योतीने भागवताच्या पोथीला स्पर्श केला आणि नंतर श्री रामकृष्णांच्या देहाला स्पर्श केला. काही काळ त्या ज्योतीने श्रीकृष्ण, भागवत आणि श्री रामकृष्ण यांना जोडून ठेवले. या दर्शनाबद्दल सांगून नंतरच्या काळात ते सांगत असत, 'भागवत, भक्त आणि भगवान हे तिन्ही वेगळे दिसत असले तरीही एकाच सदवस्तूचे तीन आविष्कार आहेत. तीही एक, एकी तीन.' या मधुर भावाच्या साधनेनंतर साधारण तीनेक महिन्यांनी परमहंस तोतापुरी यांचे दक्षिणेश्वरला आगमन झाले आणि त्यांनी श्री रामकृष्णांना अद्वैत साधनेसाठी प्रवृत्त केले. श्री रामकृष्णांची ती अद्वैत साधना आध्यात्मिक इतिहासातील एक अद्भुत अध्याय आहे.

याच काळात श्री रामकृष्णांची म्हातारी आई त्यांच्याजवळ येऊन दक्षिणेश्वरी राहत होती. मंदिराचे विश्वस्त मथुरामोहन यांचीही तार त्यांच्याशी जुळली होती. श्री रामकृष्ण तर आपल्याकडून काहीच घेत नाहीत, आधी एकदा त्यांच्या नावाने जमीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर ते मारायलाच धावले होते; हे सगळे मथुरानाथांच्या मनात होते. त्यामुळे श्री रामकृष्णांना नाही तर त्यांच्या आईला काही द्यावे अशी त्यांना इच्छा झाली. तेव्हा एक दिवस बोलता बोलता ते आईला म्हणाले, 'आजी तुम्हाला काय हवे? तुम्हाला जे काही लागत असेल ते सांगा. मी तुम्हाला देतो.' त्यावर म्हाताऱ्या आईने, 'काही नको. कपडेलत्ते आहेतच. जेवणाखाण्याची सोय आहे. कशाची कमी नाही. त्यामुळे काही नको,' असे त्यांना सांगितले. पण मथुरानाथांनी खूपच आग्रह केला तेव्हा त्या म्हणाल्या, 'दात घासण्यासाठी एक आण्याची तंबाखू आणून दे.' मथुरानाथ हे ऐकून भावविव्हळ झाले. ते उद्गारले, 'अशा आईच्या पोटी बाबा (श्री रामकृष्ण) जन्माला यावे यात आश्चर्य ते काय ' श्री रामकृष्णांची आई साधारण बारा वर्षे त्यांच्यासोबतच दक्षिणेश्वरी राहत होती. तिथेच त्यांनी देह ठेवला. श्री रामकृष्णांच्या तांत्रिक साधनेचा काही काळ आणि त्यांच्या अद्वैत साधनेच्या काळात त्यांची आई त्यांच्यासोबतच राहत होती.

श्री रामकृष्ण परमहंस (९)

जन्मगाव कामारपुकुर येथून १९६१ च्या सुरुवातीला श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला परतले. त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे १९ फेब्रुवारी १८६१ रोजी दक्षिणेश्वरच्या काली मंदिराच्या मालकीण राणी रासमणी यांनी इहलोकीचा निरोप घेतला. राणीचे जावई मथुरानाथ विश्वास हेच त्यानंतर काली मंदिराचा सगळा कारभार पाहू लागले. त्यांच्या मनात श्री रामकृष्णांबद्दल अतिशय प्रेम, आस्था, विश्वास आणि श्रद्धा होती. त्यामुळे ते श्री रामकृष्णांची सगळी काळजी घेऊ लागले. त्यांना हवं नको ते पाहू लागले. राणीच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांच्या जीवनातील एक महत्त्वाचे आणि अनोखे पर्व सुरू झाले.

दक्षिणेश्वर येथील गंगेच्या किनाऱ्यावरील बकुळीच्या घाटावर एक दिवस सकाळी; चाळीशीच्या वयाची, भगवी वस्त्रे परिधान केलेली एक संन्यासी महिला नावेतून उतरली. बगिच्यात फुले तोडत असलेल्या श्री रामकृष्णांनी ते पाहिले आणि आपल्या खोलीत येऊन आपला भाचा हृदय याला त्या महिलेला बोलावून आणण्यास सांगितले. अनोळखी महिलेला मामा का बोलावीत आहेत आणि आपण तरी तिला कसे बोलवावे अशा घोटाळ्यात हृदय पडला. परंतु मामाच्या आग्रहाने त्याने तिच्याकडे जाऊन मामाने बोलावल्याचे सांगितले. तीही काही न बोलता त्याच्या मागोमाग श्री रामकृष्णांच्या खोलीत दाखल झाली. खोलीत आल्यावर श्री रामकृष्णांकडे पाहताच ती त्यांना म्हणाली, 'बाबा तू इथं आहेस? तू गंगेच्या काठी आहे हे मला कळले होते. अन मी तुला शोधत फिरत होते.' आपल्याबद्दल कसं कळलं या त्यांच्या प्रश्नावर ती म्हणाली, 'तुम्हा तिघांना भेटावे लागेल हे जगदंबा कृपेने मला कळले होते. दोघांची भेट पूर्व बंगालमध्ये झाली आणि आज तू भेटला.'

यानंतर त्या दोघांनी अगदी जवळचे आप्त असावेत अशा गोष्टी केल्या. श्री रामकृष्णांनी आपली अलौकिक दर्शने, बाह्य संज्ञा लोप पावणे, गात्रदाह, निद्रानाश, शारीरिक बदल असे सगळे तिला सांगितले. अन ते विचारू लागले, 'मी काय खरंच वेडा झालो आहे का?' त्यावर त्यांची समजूत घालत ती संन्यासिनी म्हणाली, 'हे वेडेपण नाही. तुला महाभाव प्राप्त झाला आहे. राधा, चैतन्य महाप्रभू यांची अशी अवस्था झाली होती.' असे सगळे बोलणे झाल्यानंतर श्री रामकृष्णांनी तिला प्रसादाची फळे वगैरे अल्पोपहारासाठी दिली. अल्पोपहार झाल्यावर ती संन्यासिनी स्नान, पूजा, स्वयंपाक इत्यादी कामात गढून गेली

स्वयंपाक आटोपल्यावर आपल्या नित्य पूजेतील रघुवीरासमोर नैवेद्य दाखवून ती ध्यानात बुडून गेली. काही वेळातच अर्धबाह्य अवस्थेत श्री रामकृष्ण तिथे आले आणि तो नैवेद्य खाऊ लागले. काही वेळाने संन्यासिनी भानावर आली तेव्हा तिने पाहिले की, श्री रामकृष्ण भावविष्ट होऊन नैवेद्य खात आहेत. ते पाहून तिला खूप संतोष वाटला. नंतर भानावर आलेल्या श्री रामकृष्णांना ती म्हणाली, 'जे झालं ते योग्यच झालं. तुझ्या आत जो आहे त्यानेच हे केलं. आता मला बाह्य पूजेची गरज उरली नाही.' असे बोलतच, श्री रामकृष्णांच्या ठायी आपल्या देवतेचे दर्शन लाभलेल्या त्या संन्यासिनीने, आपल्या नित्य पूजेची रघुवीरशिला गंगेत विसर्जित करून टाकली.

यानंतर रोजच त्या दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा होऊ लागली. श्री रामकृष्ण आपल्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल सांगून तिला शंका आणि संदेह विचारू लागले. अन संन्यासिनी तंत्रशास्त्र, भक्तीशास्त्र आणि या शास्त्रांचे ग्रंथ यांच्या आधारे त्यांचे संदेह दूर करू लागली. साधारण आठवडाभर तिथे राहून ती जवळच असलेल्या दक्षिणेश्वर खेड्यातील देवमंडलांच्या घाटावर राहायला गेली. तिथून रोज कालीवाडीत येऊन ती श्री रामकृष्णांना भेटत असे आणि शास्त्रचर्चा व अध्यात्मचर्चा करत असे. कधीकधी वात्सल्य भावाने पुत्र समजून त्यांना खाउपिऊ घालीत असे. जसजसे दिवस जाऊ लागले तसे श्री रामकृष्ण केवळ आध्यात्मिक साधकच नव्हेत तर अवतार आहेत अशी तिची खात्री होऊ लागली. तसे ती बोलूनही दाखवीत असे. तिच्या या मताने कालीवाडीत मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. एक दिवस श्री रामकृष्ण आणि व्यवस्थापक मथुरबाबू बोलत बसले असताना श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंना तिचे मत सांगितले. त्यावर मथुरबाबूंनी उत्तर दिले की, 'अवतार तर फक्त दहा आहेत.' तेवढ्यात संन्यासिनी त्यांच्याकडे आली. तेव्हा श्री रामकृष्णांनी तिला मथुरबाबूंचे म्हणणे सांगितले. त्यावर तिने मथुरबाबूंनाही आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. आपण याबाबत कोणाशीही शास्त्रचर्चा करायला तयार असल्याचेही ती म्हणाली. नंतर काही दिवस श्री रामकृष्णांनीही मथुरबाबूंकडे आग्रह धरला की या विषयावर चर्चा व्हावी.

संन्यासिनीचे आव्हान आणि स्वतः श्री रामकृष्णांचा आग्रह यामुळे मथुरानाथ विचारात पडले. परंतु शास्त्रार्थ होऊन श्री रामकृष्णांना काही रोग झाल्याचा निष्कर्ष निघाला की, त्यांचे वेड दूर करणे सोपे होईल. त्यासाठी त्यांचेही सहकार्य मिळू शकेल, असा विचार करून मथुरानाथांनी पंडितांना बोलावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यावेळचे त्या भागातील वैष्णवचरण आणि गौरी पंडित या दोघांना कालीवाडीत बोलावण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीनही काही विद्वान होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत असा निष्कर्ष निघाला की, ज्या १९ प्रकारचे भाव वा अवस्था एकेठायी अनुभवाला येतात आणि ज्याला शास्त्रात 'महाभाव' म्हणतात, तो महाभाव श्री रामकृष्णांच्या ठायी आढळून येतो. ती सर्व लक्षणे त्यांच्या ठिकाणी दिसतात. हे ऐकून मथुरानाथ आणि अन्य लोक स्तंभित झाले. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, 'काहीही असो. रोग नाही हे ऐकून बरे वाटले.'

यानंतर संन्यासिनीने श्री रामकृष्णांकडून समस्त तंत्रसाधना करवून घेण्याचे ठरवले. तोपर्यंत कोणतीही शास्त्रविहित साधना न करता प्रबळ अनुरागाच्या साहाय्याने ईश्वरलाभ करून घेणाऱ्या श्री रामकृष्णांच्या मनातील सारे संदेह फिटावेत आणि त्यानंतरही त्यांना येऊ शकणाऱ्या अनुभवांसाठी त्यांची तयारी व्हावी हाच तिचा उद्देश होता. श्री रामकृष्णही त्यांच्या स्वभावानुसार जगदंबेला याविषयी सांगून आणि तिचा कौल घेऊन तांत्रिक साधनेला तयार झाले. त्यानंतर साधारण तीन चार वर्षे ते तांत्रिक साधना करीत होते. संन्यासिनीने त्यांच्याकडून शास्त्रात सांगितलेल्या सगळ्या ६४ तांत्रिक साधना करवून घेतल्या. त्यासाठीची सामुग्री इत्यादी तीच गोळा करीत असे. अन रात्रीच्या वेळी कालीवाडी परिसरातील पंचवटीत त्यांची साधना चालत असे. कोणतीही किळस आदी न बाळगता, तसेच पाच 'म'कारांचे ग्रहण न करताही, अग्राह्य आणि अशिष्ट समजल्या जाणाऱ्या या सगळ्या साधना त्यांनी केल्या. अन या सगळ्या मार्गांनी तोच एक अद्वय आनंद प्राप्त करून घेतला.

श्री रामकृष्णांची तांत्रिक साधना ही फार महत्त्वाची बाब होती. 'एकं सत, विप्रा: बहुधा वदंती' (सत्य एकच आहे. विद्वान लोक त्याचे वेगवेगळ्या रीतीने वर्णन करतात) असा भारतीय अध्यात्माचा सिद्धांत आहे. 'आकाशात पतितं तोयं' यासारख्या सुभाषितातून किंवा 'त्रयी सांख्यम योग:' यासारख्या शिव स्तोत्रातील श्लोकातून तोच भाव वाहतो. श्री रामकृष्णांच्या द्वारे तोच भाव सगळ्या जगाला देण्याची नियतीची योजना होती. त्यासाठी सगळ्या प्रकारच्या साधना करून ते सत्य सिद्ध करणे आवश्यक होते. शास्त्राचा सिद्धांत हा केवळ शब्द नाहीत. ते जिवंत अनुभूत सत्य आहे हे स्थापित होणे आवश्यक होते. म्हणूनच शिव स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे जगदंबेने सगळ्या सरळ व वक्र मार्गांनी श्री रामकृष्णांकडून साधना करून घेतल्या. त्या त्या मार्गाची साधना आटोपल्यावर पुन्हा कधीही श्री रामकृष्ण त्या मार्गाने गेले नाहीत. तंत्रसाधनेच्या बाबतही असेच घडले.

या तांत्रिक साधनेच्या काळात त्यांना अनेक प्रकारची अद्भुत दर्शने आदी झालीत. एवढेच नाही तर त्यांना अष्टसिद्धीही प्राप्त झाल्या. या सिद्धींचा उपयोग करणे योग्य की अयोग्य याविषयी जगदंबेचे म्हणणे जाणून घेतल्यावर त्यांनी निष्कर्ष काढला की, सिद्धी या तुच्छ आणि त्याज्य आहेत. त्यांचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही. नंतरच्या काळात एकदा स्वामी विवेकानंद यांना आपली सगळी शक्ती प्रदान करताना त्यांनी स्वामीजींना म्हटले होते, 'तुला धर्माचा प्रचार वगैरे बरीच कामे करायची आहेत. तेव्हा या सगळ्या सिद्धी तू स्वीकार.' त्यावर स्वामीजींनी विचारले, 'ईश्वरप्राप्तीसाठी मला यांचा उपयोग होईल का?' त्यावर श्री रामकृष्णांचे उत्तर नकारार्थी होते. तेव्हा स्वामीजींनी त्या सिद्धी स्वीकारण्यास नकार दिला होता.

या सिद्धींशिवाय एक महत्त्वाची बाब या तांत्रिक साधनेने त्यांना प्राप्त झाली होती. ती म्हणजे समत्व बोध. नंतरच्या काळात ते सांगत, 'तुळशीची पाने आणि शेवग्याची पाने सारखीच पवित्र वाटत.' यच्चयावत सगळ्या वस्तू, व्यक्ती इत्यादी आता त्यांना सारखीच प्रतीत होऊ लागली होती. या साधनेमुळे त्यांची अंगकांतीही विलक्षण तेजस्वी झाली होती. ती कांती लोकांच्या आकर्षणाचा विषय झाली होती. तेव्हा ते जगदंबेची काकुळतीने प्रार्थना करत - 'आई हे बाहेरचे रूप मला नको. ते परत घे आणि आतले आध्यात्मिक रूप दे.' त्यांची ही प्रार्थना कालांतराने पूर्ण झाली. यानंतर विविध पद्धतींनी आध्यात्मिक साधना करण्याचा जगाच्या आध्यात्मिक इतिहासातील एक अनोखा प्रवाह श्री रामकृष्णांच्या जीवनात वाहू लागला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (८)

श्री रामकृष्णांनी कालीमातेच्या पूजकाचे काम सोडून दिले असून त्यांना वायूरोगाने पछाडले आहे अशी चर्चा त्यांच्या जन्मगावी कामारपुकूरला पोहोचली. त्यामुळे त्यांची आई आणि भाऊ चिंतेत पडले. अन त्यांनी श्री रामकृष्णांना इ.स. १८५८ मध्ये कामारपुकूरला परत आणले. तिथे त्यांच्या स्वास्थ्यलाभासाठी औषधपाणी वगैरेसोबत घरच्यांनी धार्मिक आणि तांत्रिक अनुष्ठान आदीही सुरू केले. श्री रामकृष्ण कधी अगदी सामान्य माणसासारखे व्यवहार करीत तर कधी भावावेशात बाह्यसंज्ञारहित होऊन जात. तर कधी मनाच्या व्याकुळतेने 'आई आई' करत. सांसारिक बाबतीत तर नेहमीच उदासीन असत. या सगळ्यामुळे त्यांना भूताने पछाडले असावे अशीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे मांत्रिक बोलावून भूत पळवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण कशाने काही फरक पडला नाही.

कामारपुकूरच्या पश्चिम आणि ईशान्य सीमेवर दोन स्मशाने होती. श्री रामकृष्ण या दोन्ही ठिकाणी जाऊन बसत. तर कधी वाडग्यांमध्ये काही नैवेद्य वगैरे घेऊन जात आणि तिथल्या देवता उपदेवतांना तो अर्पण करत. तो नैवेद्य खायला कोल्हेही येत असत. एके रात्री खूप उशीर झाला म्हणून त्यांचे भाऊ रामेश्वर त्यांना शोधत स्मशानात गेले आणि भावाच्या नावाने आवाज देत शोधू लागले. त्यावेळी श्री रामकृष्ण त्यांना मोठ्याने आवाज देऊन सावध करत म्हणाले, 'आलो रे दादा. पण तू इकडे येऊ नको. हे तुला त्रास देतील.' स्मशानातील पिंपळाच्या झाडाखाली बसून ते खूप वेळ जप ध्यान करीत असत. महिन्यांमागून महिने जाऊ लागले आणि जगदंबेचे वारंवार दर्शन लाभून त्यांची अस्वस्थता कमी होऊ लागली.

याच काळात घरच्यांनी त्यांच्या नकळत त्यांच्या विवाहाचा विचार सुरू केला होता. ही कुजबुज त्यांच्या कानी गेली तेव्हा त्यांनी या प्रयत्नांना काहीही हरकत घेतली नाही. उलट त्यांना आनंद झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये माणसे पाठवून वधूचा शोध सुरू झाला. काही वधू लक्षातही आल्या पण त्यांच्या आईवडिलांनी हुंडा खूप मागितल्याने विवाह काही जमू शकला नाही. असेच दिवस जात असताना एक दिवस स्वतः श्री रामकृष्ण भावावस्थेत घरच्यांना म्हणाले, 'इकडेतिकडे शोध करणे व्यर्थ आहे. जयरामवाटी खेड्यातील रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी लग्नाची वधू आहे. तीच माझी नियोजित वधू आहे.' त्यांच्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही तरीही शोध घ्यावा असा विचार करून माणूस पाठवण्यात आला. तो माणूस माहिती काढून आला की, बाकी काही हरकत नसली तरी वधूचे वय फारच कमी आहे. अवघे पाच वर्षे. पण दुसरी वधू सापडत नसल्याने त्यांच्या आईने या मुलीला होकार दिला आणि इ.स. १८५९ च्या मे महिन्यात वयाच्या २४ व्या वर्षी श्री रामकृष्णांचा विवाह झाला. लग्नात वधू पक्षाला तीनशे रुपये हुंडा देण्यात आला.

व्याह्यांचे मन राखण्यासाठी आणि इभ्रत राहावी म्हणून, वधूच्या अंगावर चंद्रादेवीने काही दागिने घातले होते. हे दागिने कुटुंबाचे स्नेही गावचे जमीनदार लाहाबाबू यांच्याकडून आणले होते. याच दागिन्यांनी वधूला विवाहात सजवले होते. काही दिवसांनी दागिने परत करण्याची वेळ आली. त्यावेळी चंद्रादेवी 'आता कसे करावे?' या विचारात पडली. मात्र श्री रामकृष्णांनी आईला शांत केले आणि नववधू झोपली असताना हळूच ते दागिने काढून घेतले. जागी झाल्यावर मात्र तिने आपल्या सासूला विचारले, 'माझ्या अंगावरचे दागिने कुठे गेले?' त्यावर चंद्रादेवीने तिला मांडीवर घेऊन ओल्या डोळ्यांनी समजावले, 'माझा मुलगा तुला यापेक्षा चांगले दागिने देईल.' प्रकरण इथे संपले मात्र नाही. मुलीचे काका त्याच दिवशी तिला भेटायला आले तेव्हा त्यांना हा प्रकार कळला. अन असंतुष्ट होऊन ते मुलीला माहेरी घेऊन गेले. श्री रामकृष्णांनी दु:खी आईची समजूत घातली. विवाहानंतर एक वर्ष सात महिन्यांचा काळ श्री रामकृष्णांनी कामारपुकूरला घालवला. इ.स. १८६० च्या अखेरीस मुलीला सातवे वर्ष लागल्यावर कुळाच्या प्रथेप्रमाणे काही दिवस सासरी जाऊन ते आपल्या पत्नीला घेऊन कामारपुकूरला परत आले. नंतर त्यांनी कोलकात्याला परतण्याचा निर्णय घेतला आणि कालीवाडीत परतून त्यांनी जगदंबेच्या सेवेचे काम स्वतःकडे घेतले.

दक्षिणेश्वरला कालीवाडीत परतल्यानंतर ते जणू कामारपुकूर, तेथील वास्तव्य, तिथलं जगणं सगळं विसरून गेले. पुन्हा एकदा दिव्योन्माद सुरू झाला. मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाथ यांनी पुन्हा वैद्यांचे उपचार सुरू केले. एकदा वैद्याकडे गेले असतानाच तिथे असलेल्या दुसऱ्या एका वैद्याने त्याचे मत नोंदवले की, श्री रामकृष्णांना कोणताही रोग झालेला नसून हा योगजन्य दिव्योन्माद आहे. तिकडे जन्मगावीही ही वार्ता कळली. तेव्हा त्यांची आई चंद्रादेवी यांनी शिवमंदिरात प्रायोपवेशन केले. दोन तीन दिवसातच त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, 'भीतीचे कारण नाही. तुझा मुलगा वेडा झाला नसून ईश्वरी आवेशाने त्याची अशी अवस्था झाली आहे.'

त्या काळातील अवस्थेसंबंधी ते सांगत असत - 'मला झालेल्या ईश्वरी भावाच्या एक चतुर्थांश जरी सामान्य माणसाला झाला तरी त्याचा देहपात होईल. दिवसरात्र आईचे दर्शन होत असे. सहा वर्षे तिळमात्र झोप नव्हती. पापण्यांची उघडझाप बंद झाली होती. प्रयत्न करूनही पापण्या मिटत नसत. शरीराकडे पाहून भीती वाटत असे. वाटत असे वेडा होतो की काय? आरशासमोर उभा राहून डोळ्यात बोट घालत असे. तरीही पापणी लवत नसे. भीतीने रडू लागून आईला म्हणत असे - तुला आळवण्याचं, तुझ्यावर विश्वास टाकण्याचं हेच फळ? शरीरात भयंकर रोग दिलास? पण दुसऱ्याच क्षणी म्हणत असे - ठीक आहे. जे व्हायचं ते होऊ दे. शरीर जायचं असेल तर जावो. पण तू मात्र मला सोडू नकोस. मला दर्शन दे. कृपा कर. तुझ्याशिवाय मला गती नाही. अशा रीतीने रडतारडता अपूर्व उत्साह दाटून येई.'

याच काळात एक दिवस श्री रामकृष्ण एक दिवस पडवीत फिरत असताना व्यवस्थापक मथुरबाबूंना एक विलक्षण दर्शन झाले होते. श्री रामकृष्ण एकीकडे जात असताना त्यांना शिव चालत आहेत असे दिसे, तर वळून परत जाताना दुर्गा चालते आहे असे दिसे. या अद्भुत प्रकारानी मथुरबाबूंना चक्रावून तर टाकलेच होते पण त्यांची श्री रामकृष्णांवरील श्रद्धाही अधिक दृढ झाली.

श्री रामकृष्ण परमहंस (७)

इ. स. १८५५ ते १८६७ असा बारा वर्षांचा काळ हा श्री रामकृष्णांच्या दक्षिणेश्वर येथील साधनेचा काळ आहे. त्यातील फक्त पहिली चार वर्षेच त्यांनी कालीमातेचे पुजारी म्हणून काम केले. या बारा वर्षांचे तीन सारखे भाग करता येतात. त्यातील प्रत्येक चार वर्षांचा काळ हा एकूण साधनेचाच एक भाग असला तरीही, त्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. पहिल्या चार वर्षांच्या काळात त्यांनी केलेली साधना ही मनाच्या अभूतपूर्व तीव्र तळमळीने स्वतः केलेली साधना आहे. त्यात कोणीही मार्गदर्शक वा गुरू नव्हते. या पहिल्या चार वर्षांच्या साधनेत शास्त्र वगैरेचा संबंध नव्हता. जी काही होती ती तीव्र तळमळ आणि त्यांचा जगन्मातेशी असलेला सरळ निर्व्याज आंतरिक सशक्त संवाद. केवळ या संवादाच्या भरवशावर त्यांनी ईश्वरलाभ करून घेतला होता.

याच प्रारंभीच्या काळात जगदंबेच्या दर्शनानंतर त्यांना त्यांची कुलदेवता असलेल्या रघुवीराच्या दर्शनाची तळमळ उत्पन्न झाली. हनुमंतासारख्या अनन्य भक्तीने आपल्याला श्री रामचंद्राचे दर्शन होईल असे त्यांना वाटू लागले आणि आपण हनुमंत असल्याचा भाव त्यांनी स्वतःवर आरोपित करून साधना सुरू केली. त्या भावात ते इतके तन्मय झाले की, त्यांचे सगळे वागणे हनुमंतासारखेच होऊ लागले. धोतर शेपटासारखे कंबरेला गुंडाळून घेत. उड्या मारतच चालत. फळांशिवाय दुसरं काहीही खात नसत. फळेही सालीसह खात. दिवसाचा खूप वेळ झाडावरच बसून राहत. अन तोंडाने सतत रघुवीर रघुवीर असा एकसारखा जप करत. त्या काळात त्यांच्या पाठीच्या कण्याचे खालचे टोक जवळजवळ इंचभर वाढले होते. या भावाचा उपशम झाल्यावर कणा पुन्हा सामान्य झाला होता. या साधनेने त्यांना रघुवीराचे दर्शन झाले वा नाही याचा नेमका उल्लेख नाही, पण या साधनाकाळात सीतामाईचे दर्शन झाल्याचे मात्र त्यांनी स्वतःच नंतर सांगितले होते.

सीतामाईच्या दर्शनाची कहाणी श्री रामकृष्णांच्याच शब्दात अशी - 'त्या काळात एक दिवस पंचवटीत बसलो होतो. ध्यानचिंतन काही करीत नव्हतो. नुसताच बसलो होतो. इतक्यात एक अनुपम ज्योतिर्मय स्त्री जवळच आविर्भूत झाली आणि तिने ते स्थळ उजळून टाकले. मला त्यावेळी ती आकृतीच दिसत होती असे नाही. तर पंचवटीतील झाडेझुडपे, गंगा वगैरे सगळे काही दिसत होते. ती मानव स्त्रीच होती पण प्रेम, दु:ख, करुणा, सहिष्णुता यांचा त्या मुखावरच्यासारखा अपूर्व ओजस्वी गंभीर भाव देवीच्या मुखावरदेखील साधारणपणे आढळून येत नसतो. प्रसन्न मुद्रेने ती देवमानव स्त्री माझ्या रोखाने पुढेपुढे येऊ लागली. स्तंभित होऊन 'ही कोण' असा विचार करीतच होतो एवढ्यात एका वानराने हुप्प आवाज करत तिच्या पायाशी लोळण घेतली. अन माझे अंतर्मन उद्गारले 'ही सीता ! उभा जन्म दु:खच दु:ख भोगलेली सीता ! राजा जनकाच्या आनंदाचं निधान असलेली सीता ! जिचं सारं जीवन रामाने भरून टाकलं होतं ती सीता!' अन आई आई म्हणत तिच्या पायांवर पडणार त्या क्षणार्धात ती माझ्या शरीरात प्रविष्ट झाली. आनंदाने, विस्मयाने भारावून जाऊन बाहेरचे भान हरवून पडून गेलो. ध्यानचिंतन वगैरे न करता अशा रीतीने कोणतेही दर्शन यापूर्वी आणखी कधी मला झाले नव्हते.'

दक्षिणेश्वरला कालीवाडी तयार झाल्यानंतर, गंगासागर आणि जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू तिथे मुक्कामाला येऊ लागले. त्यांच्यात पुष्कळ साधक आणि सिद्ध लोक सुद्धा असत. त्यांच्याच कडून प्राणायाम आदी क्रिया शिकून घेऊन श्री रामकृष्ण या प्रारंभीच्या काळात हठयोग साधना करू लागले होते. या हठयोगाच्या साधना काळातच एक दिवस रात्री आठ नऊच्या सुमारास त्यांना टाळूच्या भागात खूप गुदगुल्या होऊ लागल्या आणि त्यांच्या तोंडावाटे रक्त पडू लागले. श्री रामकृष्ण याविषयी सांगत की, 'पडणाऱ्या रक्ताचा रंग घेवड्याच्या पानाच्या रसासारखा काळाशार होता. अन ते खूप घट्ट होते. त्यामुळे थोडे बाहेर पडले अन काही दातांना चिकटून पारंब्यासारखे लोंबु लागले. तोंडात बोळा कोंबून दाबून धरले तरी रक्त थांबत नव्हते.' या घटनेने कालीवाडीत सगळ्यांची धावपळ सुरू झाली. गडबड पाहून देवस्थानात उतरलेला एक साधू तिथे आला. तो प्रकार पाहून त्याने सांगितले, 'घाबरण्याचे कारण नाही. रक्त पडले हे चांगलेच झाले. हठयोगाच्या सर्वोच्च अवस्थेत जडसमाधी लागत असते. तुम्हालाही लागत होती. सुषुम्नाद्वार उघडून रक्त डोक्यात चढत होते. ते डोक्यात न चढता तोंडातून बाहेर निघाले हे चांगले झाले. कारण जडसमाधी लागली असती तर ती कशानेही भंगली नसती. तुमच्या शरीराद्वारे काहीतरी विशेष कार्य व्हावयाचे आहे. त्यासाठीच जगदंबेने तुमचे या प्रकारे रक्षण केले.' त्या साधूच्या या स्पष्टीकरणाने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नंतरच्या काळात त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना, साधकांना, मुमुक्षूंना मात्र श्री रामकृष्ण हठयोग साधना न करण्याचाच उपदेश करत असत. वर्तमान युग, मानवाची आयुर्मयादा, योग्य गुरुची उपलब्धता अशा पुष्कळ कारणांसाठी हठयोग न करता भक्तीचाच उपदेश ते करत. भक्तीमार्गानेही त्याच ठिकाणी पोहोचता येते जिथे हठयोग घेऊन जातो, असा त्यांचा उपदेश राहत असे.

साधनाकाळाच्या प्रारंभीच्या चार वर्षांच्या काळात श्री रामकृष्णांना एका तरुण संन्याशाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असे. हा तरुण संन्यासी कधीही त्यांच्याच शरीरातून बाहेर येई आणि त्यांना नाना सूचना आणि आदेश देत असे. या काळात त्यांची अवस्था विवेक चुडामणीत केलेल्या सिद्ध पुरुषाच्या वर्णनाप्रमाणे झाली होती. कधी बालकासारखे, कधी उन्मत्त व्यक्तीसारखे, तर कधी पिशाच्चवत. त्यामुळे ते वेडे झाले आहेत की काय असा अनेकांचा समज होत असे. पुष्कळ जण तशा चर्चाही करत असत. परंतु श्री रामकृष्णांचा सर्वसाधारण व्यवहार पाहून मात्र कोणालाही मत बनवता येत नव्हते. कोणी सांगितलेले औषध आदी उपाय नीट करणे, कुठे भजन वगैरे असेल तिथे सगळ्यांसारखा सहभाग; इत्यादींमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होई. त्यांना भेटणारे सिद्धसाधक मात्र त्यांच्या आध्यात्मिक अवस्थेची खात्री देत. बाकीच्यांना मात्र काही उमज पडत नसे. एवढेच काय दक्षिणेश्वर मंदिराची मालकीण राणी रासमणी आणि मंदिराचे व्यवस्थापक आणि राणीचे जावई मथुरानाथ यांनाही श्री रामकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. अखंड ब्रम्हचर्य पालनामुळे त्यांच्या डोक्यात विकृती निर्माण झाल्याचा कयास करून या दोघांनी, प्रथम दक्षिणेश्वरी आणि नंतर मेछुयाबाजार भागात त्यांच्याकडे वेश्या पाठवल्या होत्या. मात्र त्या वेश्यांना पाहताच 'आई आई' म्हणत त्यांना जो ईश्वरानुराग होत असे तो पाहून त्या वेश्याच खजील झाल्या होत्या. अन त्याच श्री रामकृष्णांना प्रणाम करून निघून गेल्या होत्या.

श्री रामकृष्ण परमहंस (६)

चिन्मयी जगदंबेच्या पहिल्या दर्शनानंतर श्री रामकृष्णांना रोजची पूजा इत्यादी करणे कठीण होऊ लागले. त्यांचा भाचा हृदयराम कसेतरी ते सारे उरकून घेऊ लागला. अन मामांना काहीतरी रोग झाला असावा असा विचार करून त्याने त्यांच्यावर वैद्याचे औषधोपचार सुरू केले. ज्या दिवशी बेचैनी थोडी कमी असे त्या दिवशी ते पूजेसाठी पुढे होत. त्यावेळी मंदिरात ध्यानासाठी बसले की, पायापासून वरपर्यंत आतून कोणीतरी सगळे सांधे बंद करीत असल्याचा अनुभव त्यांना येत असे. सांधे बंद केल्याचा कट कट असा आवाजही येत असे. त्यानंतर मात्र पुन्हा ते बंद सांधे कोणीतरी आतून उघडून देईपर्यंत ते अगदी निस्पंद होऊन जात असत. या काळात काजव्यांसारखे प्रकाशकणांचे पुंजके, प्रकाशकणांनी व्यापून गेलेल्या चारही दिशा, चांदीसारख्या प्रकाशाने वेढलेल्या सगळ्या वस्तू; असेही दिसत असे. हे सगळे डोळे मिटलेल्या आणि डोळे उघडलेल्या दोन्ही अवस्थात दिसत असे. अशावेळी ते भवतारीणीला काकुळतीने विनवीत की, 'आई, मला काय होते आहे ते काहीच मला समजत नाही. तूच मला काय ते नीट शिकव. तुझ्याशिवाय मला काहीच गती नाही.'

यानंतर त्यांना हळूहळू देवीच्या एकेका अवयवाचे साक्षात दर्शन होऊ लागले. अन त्याहीपुढे हळूहळू जगदंबेची पूर्ण ज्योतिर्मय आकृती दिसू लागली. ती आकृती त्यांच्याशी बोलत असे, हसत असे, हे कर किंवा हे करू नको असे सांगत असे. पूर्वी नैवेद्य दाखवल्यावर देवीमूर्तीच्या डोळ्यातून तेजाचे किरण येऊन अन्नाला स्पर्श करून जात. नंतर मात्र नैवेद्य दाखवताच प्रत्यक्ष देवी नैवेद्य ग्रहण करीत असल्याचे दिसू लागले. पूर्वी पाषाणाच्या मूर्तीत जिवंतपणा दिसत असे. नंतर मात्र पाषाणमूर्ती दिसतच नसे. दिसत असे फक्त चिन्मयी. नाकपुड्यांजवळ हात नेताच चिन्मयी श्वासोच्छ्वास करीत असल्याचे त्यांना जाणवले, तर दिव्यांच्या प्रकाशात कधीही देवीची सावली पडत नसल्याचाही त्यांना अनुभव येत असे. परत कधी पायात चाळ घालून लहान मुलीसारखी ती वर चढून जात असल्याचे दिसे तर कधी गच्चीवर उभी राहून गंगा आणि कोलकाता यांच्याकडे पाहताना दिसत असे.

या सगळ्या प्रकारामुळे भाचा हृदयराम सतत त्यांच्या सोबत सोबत राहत असे. त्याच्या मनात एक अव्यक्त भीतीही त्यावेळी भरून राहिली होती. कारण दिवसेंदिवस श्री रामकृष्णांच्या पूजेचा ताल वेगळाच होत होता. वैधी भक्ती पूर्णपणे मागे पडून रागाभक्ती किंवा प्रेमभक्तीत ते बुडून गेलेले असत. त्यामुळे देवीला वाहावयाची बेलफुले कधी स्वतःलाच वाहून घेत. कधी मूर्तीशी थट्टाविनोद करीत. कधी ताटातील भाजीभात देवीला भरवीत तर कधी स्वतःच खात. कधी तिच्याजवळ झोपत. सगळाच एक निर्भय उन्मनी भाव. रोजच असे प्रकार होऊ लागल्याने लोकांच्या ते नजरेत आले. काही लोकांनी त्याची व्यवस्थापक मंडळींकडे तक्रार केली. त्यावरून देवस्थानाचे अधिकारी मंदिरात पाहणी करायला आले. त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला पण ते बोलू मात्र काहीही शकले नाहीत. मात्र भट्टाचार्य पुजारी वेडे झाले आहेत किंवा त्यांना भूताने झपाटले आहे यावर मात्र त्यांचे एकमत झाले. सगळ्यांनी मिळून मंदिराचे मालक मथुर बाबू यांना या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा एक दिवस येऊन मथुर बाबूंनी सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आता भट्टाचार्य महाराजांची सुट्टी होणार ही लोकांची खात्री मात्र पूर्ण झाली नाही. घडले भलतेच. अगम्य अशा दैवी लीलेनेच, हा सगळा प्रकार म्हणजे भक्तीची परमावधी असून खऱ्या अर्थाने इथे जगदंबेचा आविर्भाव झाला आहे हे त्यांना मनोमन जाणवले. अन त्यांनी आदेश दिला की, 'भट्टाचार्य महाराज कोणत्याही तऱ्हेने पूजा करोत. त्यांना अडथळा करू नये.'

भक्तीच्या या अफाट आवेगामुळे श्री रामकृष्णांच्या शरीराचा खूप दाह होत असे. साधनाकाळात एकूण तीनदा त्यांना शरीरदाहाचा हा त्रास झाला. पहिल्यांदा त्यांना हा त्रास झाला त्याबद्दल ते सांगत असत, 'संध्या, पूजा करताना ज्यावेळी आतला पापपुरुष दग्ध होऊन गेला असे चिंतन करीत असे त्यावेळी कोणाला माहीत होते की शरीरात खरोखरच पापपुरुष असतो अन त्याला दग्ध व नष्ट करता येते? साधनेच्या सुरुवातीपासून अंगाची आग होणे सुरू झाले. काही तरी रोग झाला असावा असे वाटू लागले. पुष्कळ आयुर्वेदिक तेले चोळली पण काहीच फायदा झाला नाही. एक दिवस पंचवटीत बसलो असताना पाहिले की, एक काळाकभिन्न लाल डोळ्यांचा भेसूर पुरुष अंगातून बाहेर पडून फिरतो आहे. अन त्यापाठोपाठ भगव्या कपड्यातील एक सौम्य पुरुष हाती त्रिशूळ घेऊन बाहेर पडला आहे. त्या त्रिशूळधारी पुरुषाने त्या भेसूर पुरुषावर जबरदस्त हल्ला करून त्याला मारून टाकले. अन सहा महिने सुरू असलेला शरीरदाह त्यानंतर कमी होत थांबला.'

नंतर एकदा वैधी भक्तीची सीमा ओलांडून रागात्मिका भक्तीच्या अवस्थेत असताना त्यांना पुन्हा अंगाची आग आग होण्याचा त्रास झाला होता. त्यावेळी डोक्यावर ओला पंचा ठेवून तीन तीन चार चार तास ते गंगेच्या पाण्यात उभे राहत असत. तरीही फारसा फरक पडत नसे. नंतर त्यांच्या जीवनात आलेल्या आणि त्यांच्याकडून तांत्रिक साधना करवून घेणाऱ्या भैरवी नावाच्या साधिकेने काही उपाय करून त्यांचा हा दाह दूर केला होता.

तिसऱ्यांदा त्यांना मधुरभावाची साधना करतानाही असा शरीरदाह झाला होता. छातीच्या आत वाडगाभर विस्तव ठेवल्यासारखी आग त्यावेळी होत असे. काही वर्षांनी रामकानाई घोषाल या शक्तीसाधकाने त्यांना इष्टदेवतेचा ताईत घालण्यास सांगितले. त्यानंतर इष्टकवच बांधल्यानंतर असा त्रास त्यांना झाला नाही.

श्री रामकृष्णांच्या या असल्या अवस्थेबद्दल मंदिराचे व्यवस्थापक असलेल्या मथुरबाबूंनी आपली सासू आणि मालकीण राणी रासमणी हिला सांगितले. राणीला याचा राग येण्याऐवजी संतोषच वाटला. एक दिवस राणी मंदिरात दर्शनाला आली.  अन देवीसमोर बसली असताना तिच्या मनात कुठल्या तरी खटल्याचाच विचार सुरू होता. श्री रामकृष्णांना तिच्या मनातील ही गोष्ट कळली आणि त्यांनी तिला एक थापड मारली अन तिला म्हणाले, 'इथेही तेच विचार?' याही गोष्टीचा राग न येता उलट तिच्या मनात विशुद्ध भक्तीचा भाव जागा होऊन तिच्या मनातील आदर वाढला.

परंतु हळूहळू श्री रामकृष्णांची भावावस्था अशी होऊ लागली की त्यांच्याने पूजाअर्चा नीट होणे कठीण झाले. नेमक्या त्याचवेळी त्यांचे चुलत भाऊ रामतारक चट्टोपाध्याय कामाच्या शोधात संस्थानात आले. तेही साधक होते. व्यवस्थापक मथुरबाबूंनी त्यांना जगदंबेच्या पूजेसाठी नियुक्त केले. अशा रीतीने साधारण तीन ते चार वर्षे कालीमातेच्या पूजकाचे काम केल्यानंतर श्री रामकृष्ण त्या कामातून मोकळे झाले. मथुरबाबूंनी पूजकाचे काम काढून घेतले तरीही त्यांना सोडले मात्र नाही. उलट त्यांना देवस्थानातच ठेवून घेतले. त्यांच्या लहानमोठ्या गरजांची काळजी घेत राहिले आणि त्यांना कोणाचा त्रास होऊ नये याचीही काळजी घेऊ लागले. श्री रामकृष्णांच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची यानंतर सुरुवात होणार होती.

श्री रामकृष्ण परमहंस (५)

श्री रामकृष्णांना वडिलांचा सहवास फार लाभला नव्हता. त्यांच्या बालवयातच वडील हे जग सोडून गेले होते. ३१ वर्षांनी मोठे असलेले मोठे भाऊ रामकुमार हेच त्यांना वडिलांच्या जागी होते. त्यामुळे रामकुमार यांनी जगाचा निरोप घेतल्यावर श्री रामकृष्ण आणखीनच अंतर्मुख आणि उदास झाले. जगदंबेकडील त्यांचा ओढा वाढला. पूजा आटोपल्यावर सुद्धा ते मंदिरातच बसून राहत. तिथे भजने आदी गात वेळ घालवत. अन रात्री मंदिराची दारे बंद झाल्यावर लोकांना टाळून, परिसरातील पंचवटीच्या झाडीत जाऊन ध्यान करीत बसत. पक्का व्यवहारी असलेल्या, त्यांच्या सोबत राहणाऱ्या हृदयरामला मात्र त्यांचे असे वागणे आवडत नसे. परंतु तो काही करू शकत नव्हता. काही दिवसांनी मात्र यावर काहीतरी उपाय करायचा असे त्याने ठरवले. त्याप्रमाणे एक दिवस रात्री तो कळू न देता त्यांच्या मागे मागे गेला. रोजच्याप्रमाणे श्री रामकृष्ण पंचवटीच्या झाडीत शिरले आणि खोलगट भागात असलेल्या आवळीच्या झाडाखाली जाऊन ध्यानाला बसले. हृदयरामने त्यांना काही म्हटले नाही. मात्र त्यांना भीती दाखवण्यासाठी तो झाडीत दगडगोटे, मातीची ढेकळे फेकू लागला. परंतु त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही असे पाहून तो आपल्या खोलीत परतला. दुसऱ्या दिवशी मात्र त्याने जोर करून त्यांना विचारलेच, 'झाडीत जाऊन रात्री काय करता?' त्यावर श्री रामकृष्णांनीही आढेवेढे न घेता सरळपणे सांगितले, 'त्या ठिकाणी आवळीचे झाड आहे त्याखाली बसून ध्यान करतो. आवळीच्या झाडाखाली ध्यान केल्याने कामना पूर्ण होते असे शास्त्रात सांगितले आहे.'

यानंतर काही दिवस श्री रामकृष्ण ध्यानाला बसले की आजूबाजूला दगडगोटे येऊ लागले. हे हृदयचेच काम आहे हे माहीत असूनही त्यांनी त्याला काही म्हटले मात्र नाही. अखेर एक दिवस मनाचा हिय्या करून हृदय त्यांच्या मागोमाग पंचवटीच्या झाडीत शिरला. अन पाहतो तर काय? धोतर, जानवे सगळं काढून टाकून श्री रामकृष्ण ध्यानात बुडून गेले आहेत. हे पाहून त्याला वाटले मामा वेडे झाले आहेत. तो त्यांच्याजवळ गेला अन आरडाओरडा करून विचारू लागला, 'हे काय आहे? ध्यान करायचे तर करा पण नागवे होऊन का बसता?' त्यावर ते म्हणाले, 'तुला माहिती नाही. पाशमुक्त होऊन ध्यान करायचे असते. जन्मापासून माणूस घृणा, लज्जा, कुल, शील, भय, मान, जाती आणि अभिमान या आठ पाशांनी बद्ध असतो. जानवंदेखील मी मोठा, मी ब्राम्हण या अभिमानाचं चिन्ह आणि पाश होय. जगदंबेला आळवण्यासाठी हे सगळे पाश फेकून देऊन एकाग्र मनाने आळवायचं असतं.' मामांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू या विचाराने गेलेला हृदय स्वतःच अचंभित होऊन परतला. ही त्यांच्या साधनेची सुरुवात होती.

श्री रामकृष्णांच्या जीवनात नंतरही अशा अनेक घटना पाहायला मिळतात. अष्टपाश तोडून मुक्त झाल्याशिवाय आपलं मन पूर्णपणे ईश्वराकडे लावता येत नाही. कुठल्या ना कुठल्या पाशात किंचित का असेना ते अडकलेलं राहतं. त्यामुळे मनाला कठोरपणे या पाशातून सोडवण्यासाठी प्रत्यक्ष शरीराला, इंद्रियांनाही तसे वळण लावावे लागते. नाही तर मन एकीकडे आणि इंद्रिये दुसरीकडे अशी साधकाची ओढाताण होते. आध्यात्मिक विकासाला ते बाधक ठरते. या धारणेतून त्यांनी आपल्या शरीरालाही वळवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. अभिमानाचा नाश करण्यासाठी अनेकदा ते लोकांनी विष्ठा केलेली जागा स्वतः स्वच्छ करीत असत. तर कधी, माती आणि सोने सारखेच हे बाणवण्यासाठी एका हाती माती आणि एका हाती रुपये घेऊन 'रुपया माती, माती रुपया' म्हणत म्हणत दोन्ही गंगेत फेकून देत असत. सगळ्यांविषयी शिवबोध पक्का करण्यासाठी, कालीवाडीत भिकाऱ्यांचे खाणे झाल्यावर त्यांचे उष्टे, देवतेचा प्रसाद म्हणून खात आणि मस्तकी लावीत. त्यांची उष्टी पाने डोक्यावरून नेऊन गंगेकाठी टाकत. नंतर फडा घेऊन ती जागा धुवून स्वच्छ करीत. मन, जाणीव, व्यवहार, शरीर, इंद्रिये यांच्यात पूर्ण ऐकतानता राहावी यासाठी कठोरपणे प्रयत्न करीत असत.

याचा परिणाम म्हणूनच साधना काळानंतरच्या आयुष्यातही अनेक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळतात. एका घटनेचा उल्लेख येथे करता येईल. स्वामी विवेकानंद दक्षिणेश्वरला येऊ जाऊ लागल्यानंतरची एक घटना. श्री रामकृष्णांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या अंथरुणाखाली काही रुपये लपवून ठेवले. श्री रामकृष्ण अंथरुणावर बसताच त्यांना जणू विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. सगळे अंग पोळले. स्वामीजींनी नंतर ते रुपये काढून घेतले आणि त्यांची क्षमा मागितली. श्री रामकृष्णांचा ईश्वराशी भावबंध इतका शुद्ध होता.

ब्राम्ह समाजाचे त्यावेळचे नेते शिवनाथ शास्त्री यांनी 'modern review' मध्ये १९१० सालच्या नोव्हेंम्बर महिन्यात लिहिलेल्या व्यक्तिगत आठवणींवर आधारित लेखात; श्री रामकृष्णांच्या या प्रयोगांवर थोडी टीकाही केली होती. श्री रामकृष्णांचे हे प्रयोग म्हणजे त्यांचा मन:कल्पित साधनामार्ग असून त्याची काहीही गरज नव्हती. असे उपाय न करताही मनावर, इंद्रियांवर ताबा मिळवता येतो, असे शिवनाथ शास्त्री यांचे प्रतिपादन होते. यासंबंधात दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे केवळ मनाने भोग्य वस्तूंचा त्याग करण्याने स्वतःशी प्रतारणा करण्याची ढोंगी वृत्ती वाढण्याची शक्यताच जास्त असते. अन दुसरे म्हणजे नवीन साधना पद्धतींना शास्त्रांनी आडकाठी केलेली नाही. नवीन साधना सिद्ध झाल्यास त्यातून नवीन शास्त्र निर्माण होईल एवढेच. श्री रामकृष्णांनी नकळत असेच नवीन शास्त्र सिद्ध केलेले आहे.

यानंतर हळूहळू त्यांचा पूजेचा कालावधी वाढत जाऊ लागला. पूजा करताना, कालीमूर्तीचा शृंगार करताना, नैवेद्य अर्पण करताना, भजने गाताना; त्यांना काहीही भान राहत नसे. एखादी गोष्ट करताना जगदंबेच्या चिंतनात इतके रमून जात की ती गोष्ट संपतच नसे. त्यांचा आहार आणि झोप कमी कमी होऊ लागले. व्याकुळता वाढू लागली. रडत रडत ते देवीला विचारीत, 'मी इतके आळवतो तरीही तू दर्शन का देत नाही?' नंतरच्या काळात ते सांगत असत की, कोरडा करण्यासाठी एखादा पंचा पिळावा तसं कोणीतरी हृदय पिळून काढत आहे असं वाटत असे. आई दर्शन देत नाही याचं असह्य दु:ख होत असे. असेच करुण रुदन करताना एक दिवस अभावितपणे मंदिरातल्या तलवारीवर त्यांची दृष्टी पडली. त्यांनी मनात विचार केला, आई दर्शन देत नाही तर या जगण्याला तरी काय अर्थ आहे? करावा या जीवनाचा अंत. अन झेप घालून तलवार उचलण्यासाठी ते पुढे झाले तोच काहीतरी अद्भुत असं दर्शन झालं आणि बाह्य संज्ञाशून्य होऊन ते पडून गेले. तो आणि त्यानंतरचा दिवस कसा उगवला, कसा मावळला हे काहीही त्यांना कळले नाही. या प्रसंगाचे वर्णन करताना नंतर ते सांगत असत, 'घरदार, मंदिर सगळं जणू कुठे लुप्त झालं. कुठेच काहीही नाही. केवळ एक असीम अनंत चेतन ज्योति:समुद्र. दृष्टीला त्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. चोहीकडून त्या समुद्राच्या लाटा महावेगाने माझ्याकडे झेपावत होत्या आणि त्यांनी मला अजिबात बुडवून टाकले. अन धापा टाकीत, गटांगळ्या खात, भान लोपून पडून गेलो.' याच प्रथम अनुभवात त्यांना जगदंबेचे समूर्त दर्शन झाले होते. त्यामुळेच त्यानंतर भानावर येताना त्यांच्या मुखातून 'आई आई' असे आर्त शब्द उमटले होते.

या दर्शनानंतर जगदंबेचे अखंड दर्शन लाभावे यासाठी वेळोवेळी त्यांची वृत्ती व्याकुळ होत असे. आजूबाजूला लोक आहेत, लोक काय म्हणतील असले काहीही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नसे. एकच धून सदा राहत असे 'आई आई आई.' अन व्याकुळता परमावधीची झाली की, जगदंबाही त्यांना दर्शन देऊन त्यांचे सांत्वन करीत असे. त्यांच्याशी बोलत असे, हसत असे.

श्री रामकृष्ण परमहंस (४)

आपले वडील भाऊ रामकुमार यांच्यासोबत श्री रामकृष्णही दक्षिणेश्वरच्या कालिवाडीत त्यांच्यासह राहू लागले. मंदिराचे व्यवस्थापक आणि राणी रासमणीचे जावई मथुरबाबू यांचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्यांना त्यांच्याबद्दल कसलेसे अनामिक आकर्षणही होते. श्री रामकृष्णांचा स्वभाव, धर्मनिष्ठा, भक्तिभाव यांचे त्यांना कौतुक आणि अप्रूप वाटे. त्यांनाही मंदिराच्या कामात नेमावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु भावाची कर्मनिष्ठा पाहून रामकुमार मात्र त्यासाठी तयार नव्हते. कधीही मथुरबाबूंनी तो विषय काढला तर रामकुमार त्यांचा उत्साह मोडून काढीत असत. कालीमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर काहीच दिवसात श्री रामकृष्णांचा आतेभाऊ हृदयराम पोटापाण्याच्या शोधात दक्षिणेश्वरला येऊन पोहोचला. श्री रामकृष्ण आणि हृदयराम साधारण समवयस्क होते. दोघांनाही त्यामुळे आनंद झाला आणि त्यांचे दिवस मजेत जाऊ लागले. एक दिवस श्री रामकृष्णांनी मातीची शिवप्रतिमा तयार करून त्या प्रतिमेची पूजाअर्चा केली. हृदयराम ती मूर्ती पाहून अचंबित झाला. त्याने ती मूर्ती मथुरबाबूंना दाखवली. त्यांनाही ती मूर्ती खूपच आवडली आणि ती मूर्ती श्री रामकृष्णांनी तयार केल्याचे ऐकून विस्मय वाटला. त्यांनी ती मूर्ती राणी रासमणीकडे पाठवून दिली. राणीलाही ती अद्भुत मूर्ती अतिशय आवडली आणि ती प्रसन्न झाली. यानंतर मथुरबाबूंच्या मनाने श्री रामकृष्णांना मंदिराच्या कामात नेमण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. एक दिवस मंदिराच्या आवारात श्री रामकृष्णांना पाहून मथुरबाबूंनी त्यांना बोलवायला माणूस पाठवला. श्री रामकृष्ण मात्र त्यांच्याकडे जायला का कू करू लागले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या हृदयरामने त्यांना कारण विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मला नोकरीत वगैरे बांधून घेण्याची अजिबात इच्छा नाही. शिवाय मूर्तीचे दागिने वगैरे सांभाळायचे म्हणजे जबाबदारीचेच काम. ते काही जमणार नाही. तू ही जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी काम स्वीकारीन.' हृदयराम त्यासाठी तयार झाले. नंतर श्री रामकृष्ण मथुरबाबूंना भेटले आणि त्यांनी आपला मनोदय त्यांना सांगितला. मथुरबाबू त्याला तयार झाले आणि त्यांनी दोघांनाही कामावर नेमले. त्याप्रमाणे रामकुमार मुख्य पूजकाचे काम करू लागले, श्री रामकृष्ण जगदंबेच्या शृंगाराचे काम करू लागले आणि हृदयराम त्यांना मदत करू लागले.

काली मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर  तीनेक महिन्यात या सगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतरच्या जन्माष्टमी उत्सवाच्या वेळी एक आगळी घटना घडली. दक्षिणेश्वरच्या याच परिसरात राधागोविंदाचेही एक मंदिर आहे. त्या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात पार पडला. रात्री गोविंदजींची मूर्ती शयनासाठी घेऊन जाताना पुजाऱ्याचा हातून पडली आणि मूर्तीचा एक पाय भंगला. स्वाभाविकच अनेक चर्चांना उत आला. काय करावे याची जिकडेतिकडे विचारणा होऊ लागली. शास्त्रार्थ सुरू झाले. श्री रामकृष्णांनाही याबाबत विचारले त्यावेळी अतिशय सहजपणे त्यांनी विचारले, 'राणीच्या जावयाचा पाय मोडला तर जावई टाकून द्याल का?' अन त्यांनी उपाय सांगितला - गोविंदजींचा पाय जोडून पुन्हा पूजा सुरू करावी. मथुरबाबू चकितच झाले आणि त्यांना हा सल्ला पटलाही. त्यानुसार श्री रामकृष्णांनीच मूर्तीचा पाय जोडून दिला. त्यानंतर राधागोविंदाच्या पुजाऱ्याची हलगर्जीपणासाठी सुट्टी झाली आणि श्री रामकृष्णांकडे राधागोविंदाच्या पूजेचे काम आले.

श्री रामकृष्णांचे पूजा करणे ही पाहण्यासारखी गोष्ट होती. जो त्यांना पूजा करताना पाही तो मुग्ध होऊन जात असे. पूजा करत असताना कोण आले, कोण गेले याकडे त्यांचे लक्ष नसे एवढेच नाही तर त्याचे त्यांना भानही नसे. पूर्ण एकाग्र चित्ताने त्यांची पूजा चाले. पूजेची विशिष्ट पद्धत असते. त्यात अंगन्यास, करन्यास अशा काही क्रिया असतात. श्री रामकृष्ण नंतरच्या काळात सांगत असत की; हे अंगन्यास, करन्यास करताना आपल्या शरीरात त्या त्या ठिकाणी लखलखीत मंत्राक्षरे जडवलेली त्यांना दिसत असत. तसेच सर्पाकार कुंडलिनीशक्ती सुषुम्ना मार्गाने खरोखर सहस्रार चक्रापर्यंत चढत जाताना दिसे. अन एक एक चक्र पार करताना तो तो भाग बंद करून टाकत त्यांना निस्पंद समाधीत घेऊन जात असे. किंवा पूजेपुर्वी आपल्या चहूभोवताल पाणी फिरवून, आपले पूजास्थान अग्नीच्या परकोटाने वेढून सुरक्षित झालेले आहे अशी कल्पना करताना; प्रत्यक्ष अग्नीने आपले पूजास्थान वेढून टाकलेले त्यांना दिसत असे. पूजा करताना श्री रामकृष्ण सतत अशा प्रकारे दिव्य भावात असत. पूजा, प्रतिमेचा शृंगार इत्यादी करताना ते भक्तीविषयक गाणीही म्हणत असत. गाणी म्हणतानाही त्या गाण्याच्या भावात बुडून जाऊन, त्या भावाशी एकरूप होऊन ते गाणी म्हणत. त्यांचा आवाजही कमालीचा गोड होता. ऐकणाऱ्याला बांधून टाकण्याची शक्ती आणि गोडवा त्यांच्या गाण्यात होते. देवस्थानाची मालकीण असलेली राणी रासमणी जेव्हा मंदिरात येई तेव्हा तेव्हा त्यांना बोलावून त्यांचे गाणे ऐकत असे.

लहान भाऊ गदाधर अशा रीतीने कामकाजाला लागल्याने वडील भाऊ रामकुमार देखील निश्चिन्त झाले. गदाधराला निरनिराळ्या पूजा, पूजाविधी ते शिकवू लागले. काहीच महिन्यात त्यांनी मथुरबाबूंशी बोलून, कालीमूर्तीच्या पूजेचे महत्त्वाचे व मोठे काम गदाधराला सोपवले आणि स्वतः राधागोविंदजींच्या पूजेचे काम करू लागले. शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतल्याशिवाय जगदंबेच्या पूजेचे काम करणे योग्य नाही असा विचार करून श्री रामकृष्णांनी कोलकात्याच्या बैठकखाना भागात राहणारे शक्तीसाधक केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून शक्तीमंत्राची रीतसर दीक्षा घेतली. दीक्षा घेताच त्यांना भावावेश प्राप्त होऊन समाधी लागली. स्वतः केनाराम भट्टाचार्य सुद्धा यामुळे अचंबित झाले होते.

सगळे काही सुरळीत सुरू झालेले पाहून रामकुमार काही दिवस कामारपुकुरला घरी जाण्याचा विचार करू लागले. गावी जाण्यासाठी जुळवाजुळव करत असतानाच काही कामासाठी ते श्यामनगर भागात काही दिवस राहिले. तिथेच ते एकाएकी मरण पावले. दक्षिणेश्वर येथे काली मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधारण वर्षभरातच रामकुमारांनी या जगाचा निरोप घेतला. जणू काही पुढील लीलेसाठी गदाधराला जगन्मातेच्या हाती सोपवणे हेच त्यांचे जीवितकार्य होते आणि ते पार पाडून ते पुढील प्रवासाला निघून गेले.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (३)

श्री रामकृष्णांचे वडील बंधू रामकुमार यांनी १८५० साली कोलकात्याला पाठशाळा उघडली होती. त्यानंतर १८५२-१८५३ मध्ये त्यांनी लहान भाऊ गदाधर याला कोलकाता नगरीत आणले होते. याच सुमारास अचिंत्य शक्ती भविष्यातील आपल्या खेळाची मांडामांड करीत होती. कोलकात्याच्या जानबाजार भागात कोळी जातीची राणी रासमणी राहत होती. वयाच्या ४४ व्या वर्षी पती राजचंद्र दास यांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्या गडगंज संपत्तीची आणि दौलतीची देखभाल करण्याचे काम ओघानेच राणीकडे आले होते. तेजस्वी आणि ईश्वरपरायण राणी यशस्वीपणे हे काम करीत असे. दानधर्म, देणग्या, अन्नदान यासाठी राणीने कधी हात आखडता घेतला नव्हता. काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घेण्याची तिची इच्छा मात्र पतीनिधनामुळे बाजूला सारावी लागली होती. कारभार थोडा स्थिरस्थावर झाल्यावर आणि लहान जावई समर्थपणे कामात साथ देऊ लागल्यावर १८४९ साली पुन्हा राणीने काशीयात्रेची तयारी सुरू केली. मात्र जगन्मातेला तर काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळे यात्रेला निघण्याच्या आदल्या रात्री रासमणीला देवीने दर्शन दिले आणि आदेश दिला की, 'काशीला जाण्याची गरज नाही. येथेच भागीरथी किनाऱ्यावर माझे मंदिर उभारून, माझी मूर्तीस्थापना कर. माझ्या नैवेद्याची व्यवस्था कर. त्या ठिकाणी प्रत्यक्ष आविर्भूत होऊन मी तुझी पूजा स्वीकारीन.' राणीने हा आदेश शिरसावंद्य मानून, यात्रेसाठी काढून ठेवलेले सगळे धन भगवतीच्या मंदिर उभारण्यासाठी लावले.

राणी रासमणीने कोलकात्याला भागीरथीच्या पूर्व तीरावर उभारलेले हे मंदिरच आज दक्षिणेश्वरचे कालीमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या आवारात, भवतारीणी कालीमातेच्या सहवासात आणि आशीर्वादाने श्री रामकृष्णांची साधना आणि जीवनलीला पार पडली. याच मंदिराच्या आवारात नरेंद्रनाथ दत्त यांचे विवेकानंद रुपात परिवर्तन झाले. याच मंदिराच्या आवारात कालीमातेच्या आशीर्वादाने नवीन काळाला साजेशा आध्यात्मिक भावधारेचे सृजन झाले. आयुष्याची साधारण तीन दशके श्री रामकृष्ण याच मंदिराच्या आधारे राहिले.

१८४९ साली सुरू झालेली नऊ कळसांच्या या कालीमंदिराची उभारणी १८५५ सालीही पूर्ण झाली नव्हती. राणीला एक चिंता सतावू लागली की, जीवनाचा काही भरवसा नाही. मंदिर बांधकाम पूर्ण व्हायचे आहे अन आपल्याला देवाघरचे बोलावणे आले तर जगदंबेची स्थापना करण्याचा संकल्प राहून जायचा. त्यामुळे राणीने जगदंबेची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळच्या सामाजिक रुढींमुळे दोन समस्या तिच्यापुढे उभ्या राहिल्या. एक म्हणजे जगदंबेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्याची. ब्राम्हण व्यक्तिशिवाय अन्नाचा नैवेद्य कसा दाखवणार? अन दाखवला तरी नंतर तो ग्रहण कोण करणार? त्यामुळे राणीने यावर तोडगा काय अशी विचारणा अनेक शास्त्री, पंडितांकडे केली. झामापूकुर येथे पाठशाळा चालवणारे श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्याकडेही ही विचारणा झाली. त्यांनी तोडगा सांगितला की, प्रतिष्ठापना करण्यापूर्वी हे मंदिर कुणा ब्राम्हणाला दान केले तर तो अन्न नैवेद्याची व्यवस्था करू शकेल आणि तो नैवेद्य ग्रहण करण्यातही कोणाला अडचण होणार नाही. कोलकात्यातील काही मंडळींनी हे सामाजिक रूढीला धरून नाही अशी कुरकुर केली पण राणीला मात्र आनंद झाला. आपल्या गुरूंच्या कुळातील कोणाच्या तरी नावे मंदिर दान करून प्रतिष्ठापना करण्याचे तिने निश्चित केले. याप्रमाणे एक समस्या सुटली पण या मंदिरात पुजारी म्हणून कोण काम करेल ही दुसरी समस्या मात्र सुटायची होती. गुरुकुलातील लोक शास्त्रादीच्या बाबतीत यथातथा वाटत असल्याने त्यांना पुजारी म्हणून नेमण्याची राणीची इच्छा नव्हती. म्हणून तिने योग्य अधिकारी पुजाऱ्याचा शोध सुरू केला. राणीचा हा शोध पुन्हा श्री रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांच्यापाशी येऊन थांबला. रामकुमार या कामासाठी तयार नव्हते पण अन्य कोणी चांगला पुजारी मिळेपर्यंत अडचण दूर करावी या राणीच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी प्रतिष्ठापना करण्याचे आणि पूजकाचे काम स्वीकारले. त्यानंतर मंदिराचे काम सुरू असतानाच ३१ मे १८५५ रोजी राणी रासमणीने जगदंबेची प्रतिष्ठापना उरकून घेतली. जगदंबेची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उभारणे यानिमित्ताने राणीने नऊ लाख रुपये खर्च केले होते. शिवाय सव्वादोन लाख रुपयात एक परगणा विकत घेऊन तो या मंदिराच्या व्यवस्थेसाठी दान केला होता.

दक्षिणेश्वर मंदिरातील जगदंबेच्या प्रतिष्ठापनेच्या सोहोळ्यात श्री रामकृष्ण सहभागी झाले होते. दिवसभर ते तिथे होते. त्यावेळच्या रीतीप्रमाणे आणि नैष्ठीक ब्राम्हणाला शोभेशा पद्धतीनेच त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद मात्र ग्रहण केला नव्हता. संध्याकाळी बाजारातून एक पैशाचे मुरमुरे आणि साळीच्या लाह्या घेऊन त्यांनी भूक भागवली होती. रात्री ते झामापूकुरच्या निवासी परत आले होते. मोठे भाऊ रामकुमार मात्र दक्षिणेश्वरीच राहिले होते. दुसऱ्या दिवशी श्री रामकृष्ण पुन्हा दक्षिणेश्वरी आपल्या भावाला भेटायला आले. अन संध्याकाळी परतले. त्यानंतर आठवडाभर ते मंदिराकडे फिरकले नाहीत. अन फिरून भावाची खबरबात घ्यायला कालीमंदिरी दाखल झाले. तोवर पूजकाचे पद कायमस्वरूपी स्वीकारण्याचा रामकुमारांचा निर्णय झाला होता. श्री रामकृष्णांना मात्र तो निर्णय पटला नव्हता. त्यामुळे रामकुमारांनी चिठ्ठ्या टाकून ईश्वराचा कौल घेण्याचे ठरवले. तेव्हा - रामकुमारांनी काहीही चुकीचा निर्णय घेतला नसून, त्यांच्या निर्णयाने सगळ्यांचे मंगलच होईल, असा कौल मिळाला. हा कौल मिळाल्याने श्री रामकृष्ण निश्चिन्त झाले तरी त्यांच्यासमोर दुसरी समस्या उभी राहिली की, आता आपण करायचे काय? पाठशाळा बंद होणार. आपल्याला काम काय? या काळजीतच त्या दिवशी ते तिथेच थांबले. मोठे भाऊ रामकुमार यांनी वारंवार म्हणून आणि समजावून देखील, शास्त्रार्थ सांगून देखील; प्रसाद ग्रहण करण्यास मात्र ते तयार झाले नाहीत. अखेर रामकुमारांनी त्यांच्या मनातील गंगाभक्तीला हात घातला. ते त्यांना म्हणाले, 'गंगेच्या काठच्या सगळ्या गोष्टी पवित्र असतात हे तर तू मानतो नं? मग शिधा घेऊन तू गंगेच्या काठी स्वयंपाक कर आणि जेव.' श्री रामकृष्णांनी ते मान्य केले आणि तट दिवशी स्वहस्ते स्वयंपाक करून ते जेवले. त्यानंतर ते तेथेच राहू लागले आणि स्वहस्ते स्वयंपाक करून उदरभरण करू लागले.

मात्र त्यांचे असे वागणे ही अनुदारता किंवा संकुचितता होती असे म्हणता येत नाही. कारण कामारपुकुर येथेच आपल्या मौंजीच्या वेळी त्यांनी लोहार जातीच्या स्त्रीकडून पहिली भिक्षा स्वीकारली होती. शिवाय काली प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकून ते त्यापासून दूर राहिले होते असेही नाही. त्यामुळे मंदिरातील अन्नप्रसाद ग्रहण न करता स्वहस्ते स्वयंपाक करणे ही त्यांची अनुदारता किंवा संकुचितता ठरत नाही, तर नैष्ठिक व्रतस्थता आणि तत्कालीन सामाजिक रीतिरिवाज एवढेच त्याविषयी म्हणता येते. शिवाय साधकाच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया या अंगानेही ते समजून घ्यावे लागते. पुढील काळात आध्यात्मिक भावाचा जो महान प्रवाह निर्माण होणार होता त्याची अगम्य जडणघडण हाही त्याचा एक पक्ष आहेच. स्वतः श्री रामकृष्णांनी आणि त्यांच्या चरित्रकारांनीही या गोष्टीची मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली आजची मते हाच सार्वकालिक मापदंड मानून सगळ्या गोष्टींकडे पाहता येत नाही. ते चुकीचे ठरते.

ते काहीही असले तरीही ईश्वरी शक्ती या पृथ्वीवरील आपल्या नव्या खेळाची हळूहळू व्यवस्थित मांडामांड करीत होती.

- श्रीपाद कोठे

नागपूर

श्री रामकृष्ण परमहंस (२)

वडील क्षुदिराम चटोपाध्याय यांनी जगाचा निरोप घेतल्याला दोन वर्षे उलटून गेली. तेव्हा परंपरेप्रमाणे ज्येष्ठ बंधू रामकुमार यांनी गदाधराच्या उपनयनाची (मौंजीबंधनाची) तयारी सुरू केली. त्यावेळी गदाधराला नववे वर्ष सुरू होते. मौंजेचा दिवस जवळ आला तेव्हा बालक गदाधराने आपला मनोदय वडील भावाला सांगितला. धनी नावाच्या लोहार जातीच्या एका स्त्रीकडून आपण मौंजविधीतील पहिली भिक्षा घेणार असल्याचे त्याने सांगितले. या धनीनेच गदाधराच्या जन्माच्या वेळी दाई म्हणून चंद्रादेवीची मदत केली होती. तिचा या कुटुंबाशी स्नेहाचा संबंधही होता. एकदा केव्हा तरी तिने गदाधराजवळ आपली ही इच्छा व्यक्त केली होती आणि बालकानेही तिला होकार दिला होता. आता त्याने ते वचन पूर्ण करण्याचा आग्रह धरला. वडील भावासमोर मात्र पेच निर्माण झाला. बालकाच्या या हट्टामुळे कार्यात विघ्न येते की काय अशी स्थिती तयार झाली. गावचे जमीनदार आणि क्षुदिराम चटोपाध्याय यांचे स्नेही धर्मदास लाहा यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली. त्यावेळी रामकुमार यांची समजूत घालत ते म्हणाले, 'तुमच्या कुटुंबात अशी गोष्ट कधी घडली नसेल. पण इतरत्र अनेक ब्राह्मणांच्या घरी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणी बोल लावणार नाही.' अखेर रामकुमार यांची समजूत पटली आणि गदाधराने धनी लोहारणीकडून मौंजेत पहिली भिक्षा घेतली. वचन न पाळल्यास खोटे बोलण्याचे पातक लागते आणि अशा व्यक्तीला ब्राम्हण म्हणवण्याचा आणि यज्ञोपवित (जानवे) धारण करण्याचा अधिकार नाही हा बालकाचा युक्तिवाद जिंकला. या प्रसंगातील तीन बाबी लक्षणीय म्हणता येतील. एक तर बालक गदाधराची दृष्टी आणि विचार, दुसरे म्हणजे जमीनदारांची समन्वय करण्याची भूमिका, तिसरे म्हणजे ब्राम्हण व अन्य जातीतील सलोख्याचे वातावरण. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात कामारपुकुरसारख्या छोट्याशा गावात समाजाची ही स्थिती होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

उपनयन संस्कार झाल्यानंतर गदाधराला कुलदेवता रघुवीर, तसेच शीतलामाता, शिव आदी देवादिकांची पूजा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. वडील नसल्याने तसेच मोठे भाऊ रामकुमार प्रापंचिक कामात आणि जीविकोपार्जन करण्यात व्यस्त राहत असल्याने घरच्या देवांच्या पूजेचे काम बालकाकडे आले. धार्मिक वृत्तीचा गदाधर सगळ्या चित्तवृत्ती एकाग्र करून देवपूजा करू लागला. त्याची ही धर्मवृत्ती आणि त्या वृत्तीची एकाग्र तीव्रता एवढी असे की, त्याला अधूनमधून भावसमाधी लागत असे. एका महाशिवरात्रीला तर रात्रीच्या वेळी शिवाचे नाटक करणारा नट न आल्याने गदाधरालाच शिवाचे रूप सजवून उभे करण्यात आले अन बालकाला केवळ तेवढ्यानेच भावसमाधी प्राप्त झाली. समाधी काही केल्या उतरेना त्यामुळे नाटक बंद करावे लागले. तेव्हापासून गावातही बालकाच्या अशा समाधीची चर्चा होऊ लागली.

याच काळात वयाच्या ११ व्या, १२ व्या वर्षीच गदाधराच्या मनात वैराग्याचा उदय होऊ लागला. वैराग्य, ईश्वरभक्ती, सत्यनिष्ठा, सदाचरण, धर्मपरायणता यांच्याऐवजी; पंडित आणि भट्टाचार्य लोकांमध्ये भोगसुखाची आणि धनाची लालसाच असते हे पाहून; त्याच्या मनात शास्त्र इत्यादींच्या विद्येविषयी उदासीनता निर्माण होऊ लागली.

अर्थात त्याचे शाळेत जाणे सुरूच होते. मातृभाषेतील पुस्तके वाचणे, मातृभाषेत लिहिणे बालकाला येऊ लागले होते. गावातील लोकांना गदाधर रामायण, महाभारत वाचून दाखवीत असे. लोकही त्याला कथा, पुराणे वाचण्यासाठी बोलावीत असत. श्री रामकृष्णांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली रामकृष्णायन पोथी, योगाद्येचे गाणे, सुबाहुचे गीत इत्यादी, त्यांचे चरित्रकार स्वामी सारदानंद यांना कामारपुकुरच्या घरी सापडले होते.

गणिताची नावड असूनही पाढे, जुजबी बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार गदाधर करू शकत असे. परंतु याच सुमारास त्यांना अधूनमधून होणारी भावसमाधी पाहून त्यांना वायूरोग झाला असावा या भीतीने शाळेत जाणे, अभ्यास करणे यासाठी कोणीही त्यांना आग्रह करीत नसे. अशीच दोन तीन वर्षे निघून गेली. कुटुंबाचा डोलारा सांभाळणारे मोठे भाऊ रामकुमार यांची कमाई हळूहळू कमी होऊ लागली. त्यांची पत्नीही मुलाला जन्म देऊन देवाघरी निघून गेली. कर्जही होऊ लागले. त्यावेळी, कोलकात्याला जाऊन काही खटपट करावी असा विचार करून रामकुमार कोलकाता नगरीत दाखल झाले. तिथे झामापूकुर भागात एक संस्कृत पाठशाळा उघडून ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले.

गदाधर मात्र गावातच राहून आधीसारखेच जीवन जगत होता. घरची पूजा इत्यादी कामे करणे. आईला कामात मदत करणे. साधूसंतांना भेटणे, त्यांची कामे करणे, त्यांच्याकडून धार्मिक कथा, शास्त्रे यांचं श्रवण करणे, स्वतः कथा सांगणे, धार्मिक नाटके करणे, चित्र व मूर्ती बनवणे; हे सगळे सुरूच होते. गावातील सगळ्या जातीजमातीच्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यात गदाधर अतिशय प्रिय होता. त्याची सरलता, सात्विकता, धार्मिकता, ऋजुता, स्नेह, निष्कपटता यामुळे सगळ्यांचा त्याच्यावर जीव होता. गदाधर नाटक वा उत्सव प्रसंगी कोणाकोणाच्या आग्रहाने स्त्री वेष सुद्धा करीत असे. अन हे इतके बेमालूमपणे करीत असे की रोजच्या लोकांनाही तो ओळखू येत नसे. अशी फजिती झाल्याचे किस्सेही घडले होते. अगदी स्त्रियासुद्धा स्त्री वेशातील गदाधराला ओळखू शकत नसत.

मोठे भाऊ रामकुमार यांना मात्र गदाधराच्या सांसारिक उदासीनतेमुळे चिंता वाटू लागली होती. त्यांच्या कोलकात्यातील संस्कृत पाठशाळेचा व्यापही वाढत होता. त्यामुळे त्यांना सोबतीची गरजही वाटत होती. गदाधराबद्दलची काळजी आणि सोबतीची गरज या दोन्ही गोष्टी आई व मधला भाऊ रामेश्वर यांच्याशी बोलून रामकुमारांनी गदाधराला आपल्यासोबत कोलकात्याला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने गदाधर नकळतपणे आपल्या कर्मक्षेत्री दाखल झाला. त्यावेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते.

गदाधराच्या अंगच्या अद्भुत स्मरणशक्ती, विवेचक बुद्धी, दृढनिश्चय, साहस, थट्टाविनोद, प्रेम आणि करुणा; यांचा परिचय त्यांच्या कामारपुकुर येथील बालजीवनात सगळ्यांना झाला. विश्वास, पवित्रता, स्वार्थरहितता, निष्कपटता हे तर त्यांचे स्वभावविशेष होते. कोलकात्याला आल्यावरही त्यात काही बदल झाला नाही. संस्कृत पाठशाळेसोबतच रामकुमार पुष्कळ सधन लोकांच्या घरी देवपूजेचे कामही करीत असत. गदाधर कोलकात्यात आल्यावर त्यांना हाताशी एक जण मिळाला आणि घरोघरीच्या देवपूजेचे काम त्यांनी आपल्या लहान भावावर सोपवले. मुळातच आवडीचे असलेले देवपूजेचे काम गदाधर मनापासून करू लागला. उरलेल्या वेळात त्याने शास्त्रांचा अभ्यासही करावा अशी रामकुमार यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्याबाबतीत मात्र गदाधर उदासीन असे. भावाच्या भावी जीवनाच्या चिंतेपोटी एक दिवस रामकुमारांनी त्यांची याबाबत कानउघाडणी केली. मात्र त्या कानउघाडणीने विचलित न होता गदाधराने मोठ्या भावाला स्पष्ट उत्तर दिले - 'मला केळ्या तांदळाची गाठोडी बांधणारी विद्या शिकायची नाही. मला अशी विद्या शिकायची आहे ज्याने ज्ञानाचा उदय होऊन माणूस कृतार्थ होतो.' आपल्याला सांसारिक विद्या शिकून संसारात पडायचे नाही तर जीवनाचा अर्थ समजून घेऊन कृतार्थ व्हायचे आहे, हे गदाधराने पहिल्यांदा एवढ्या स्पष्टपणे सांगितले. आपल्या जीवनाची ही जाणीव त्यांना त्यावेळी होत होती आणि सर्वप्रथम त्यांनी ती आपल्या वडील भावाजवळ व्यक्त केली. जीवनाची ही कृतार्थता कशी प्राप्त होणार, त्यानंतर आपण काय करणार याबद्दल काहीही संकेत त्यांनी दिले नाहीत पण आपले जीवन सर्वसामान्य लोकांसारखे नसेल एवढे सूतोवाच मात्र त्यांनी त्यावेळी केले.

श्री रामकृष्ण परमहंस (१)

अध्यात्म हा भारताचा प्राण आहे. अध्यात्म वजा केल्यास भारताची शक्ती आणि श्रेष्ठत्व लयाला जाईल. पण तसे होणे कदापि शक्य नाही. कारण भारताची ही अध्यात्म आधारित शक्ती आणि श्रेष्ठत्व हाच जगाचा आधार आहे. कालप्रवाहात ही शक्ती आणि श्रेष्ठत्व कमी अधिक होत असतात. मात्र भारताची विशेषता ही की, वारंवार असंख्य श्रेष्ठ आध्यात्मिक विभूती जन्म घेतात आणि ही शक्ती आणि श्रेष्ठत्व पुन्हा स्थापित करतात. या विभूती आध्यात्मिकतेचा एक सशक्त प्रवाह प्रवाहित करतात आणि या विश्वाला नवसंजीवन प्रदान करतात. १९ व्या शतकात बंगालमध्ये जन्मलेले श्री रामकृष्ण परमहंस हे अशीच एक श्रेष्ठ विभूती होते.

बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरापासून अंदाजे १०० किमी अंतरावर असलेल्या हुगळी जिल्ह्यातील कामारपुकुर या गावी फाल्गुन शुद्ध द्वितीया या तिथीला, १७ फेब्रुवारी १८३६ रोजी ब्राम्ह मुहूर्ती (पहाटेस) रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गदाधर होते. त्यांच्या वडिलांचे नाव क्षुदिराम चटोपाध्याय आणि आईचे नाव चंद्रादेवी होते. क्षुदिराम चटोपाध्याय गया क्षेत्री तीर्थयात्रेला गेले असताना त्यांना एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले आणि 'मी तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्या घरी येईन' असे त्यांना सांगितले. १८३५ सालच्या या घटनेनंतर १८३६ साली गदाधराचा जन्म झाला. त्यावेळी क्षुदिराम ६१ वर्षांचे आणि चंद्रादेवी ४५ वर्षांच्या होत्या. गदाधराला रामकुमार आणि रामेश्वर असे दोन भाऊ, आणि कात्यायनी व सर्वमंगला अशा दोन बहिणी होत्या.

कामारपुकुरपासून जवळच असलेल्या देरे गावी क्षुदिराम राहत असत. तेथे त्यांची सुमारे ४३ एकर जमीन होती. त्या गावच्या जमीनदाराने एकदा त्यांना आपल्या बाजूने कोर्टात खोटी साक्ष देण्याची गळ घातली. परंतु धर्मनिष्ठ, देवभक्त, सात्विक वृत्तीच्या क्षुदिरामांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. त्याचा सूड म्हणून जमीनदाराने त्यांच्याच विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आणि त्यांचा सगळा जमीनजुमला गिळंकृत केला. अकिंचन आणि अनिकेत झालेले क्षुदिराम पत्नी व दोन मुलांना घेऊन कामारपुकुरला आले होते. कामारपुकुर हे त्यावेळी बऱ्यापैकी सधन आणि उद्योगी गाव होते तरीही रामकृष्णांचा परिवार मात्र ओढगस्तीतच एका सहृदय माणसाने दिलेल्या झोपडीतच राहात होता. क्षुदिराम यांची ईश्वरपरायणता, सात्विकता आणि विरागी वृत्ती मात्र अभंग होती.

लहानपणापासूनच गदाधराची स्मरणशक्ती अद्भुत होती. वडिलांच्या तोंडून ऐकलेली स्तोत्रे, गोष्टी, पूर्वजांची माहिती असे सगळे त्याला एकदा ऐकले की कायम लक्षात राहत असे. कामारपुकुरचे जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावच्या मुलांसाठी स्वखर्चाने सुरू केलेल्या शाळेत वयाच्या पाचव्या वर्षी गदाधराला दाखल करण्यात आले. सकाळी दोन तीन तास शाळेत, मग घरी जाऊन आंघोळ जेवण उरकायचे आणि दुपारी तीन वाजता शाळेत येऊन सूर्यास्तापर्यंत शाळा, असे शाळेचे स्वरूप होते.

ही शाळा एकशिक्षकी होती. सगळ्या मुलांना एकच शिक्षक शिकवीत. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेत, त्यांना मदत करत. लहान मुलांना खेळण्यालाही भरपूर वेळ दिला जाई. सुरुवातीला यदुनाथ सरकार आणि नंतर राजेंद्रनाथ सरकार हे गदाधराचे शिक्षक होते. लहानपणी गदाधर अवखळ होता. म्हणजे शाळेत न जाता सवंगड्यांबरोबर खेळत राहणे, कुठेतरी गावठी नाटक पाहायला जाणे; असेही तो करीत असे. एक मात्र होते की, जे काही असेल ते तो प्रामाणिकपणे सांगत असे. लपवाछपवी अजिबात नव्हती. त्याच्या स्वभावाचा आणखीन एक पैलू म्हणजे, त्याच्या मनाला पटेल अशा रीतीने त्याला एखादी गोष्ट समजावून दिली नाही तर ती गोष्ट तो कधीच ऐकत नसे. प्रत्येक वेळी बालकाची जिज्ञासा पूर्ण करणेही मोठ्यांना कठीण होत असे. काहीच दिवसात गदाधर जुजबी लिहायला वाचायला शिकला. अंकगणित मात्र त्याला अजिबात आवडत नसे. शाळेबाहेरही बालक अनेक गोष्टी शिकू लागला. कुंभाराकडे जाऊन देवादिकांच्या मूर्ती तयार करणे, चित्रं काढणे, नाटक करणे, कथा सांगणे; अशा अनेक गोष्टी गदाधर आत्मसात करू लागला. त्याची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती विलक्षण होती. नकला करणे, थट्टाविनोद करणे, बायांचे पुरुषांचे आवाज हुबेहूब काढणे यात गदाधर तरबेज होता. त्याच्या ठायी देवभक्तीही विशेष रूपाने होती. आपले वागणे, बोलणे, गाणे म्हणणे याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करीत असे.

वयाच्या सातव्या वर्षीच गदाधराला पहिल्यांदा भावावेश झाला होता. एकदा भातशेतांमध्ये भटकता भटकता काळ्या मेघांसमोरून उडत जाणारे शुभ्र बगळे पाहून तो इतका तन्मय झाला की त्याचे बाह्य भान लोपून तो वाटेतच पडून गेला. त्याला उचलून घरी नेण्यात आले. थोड्या वेळाने तो आपोआप पूर्वीसारखा सामान्य होऊन गेला. त्याला कसलाही त्रास झाला नाही. आईवडिलांना मात्र चिंता वाटली आणि ते औषधोपचार आदींचा विचार करू लागले.

याच दरम्यान इ.स. १८४३ च्या शारदीय दुर्गापूजेसाठी क्षुदीरामांना त्यांचा भाचा रामचंद्र बंदोपाध्याय याने आमंत्रित केले. त्यानुसार ते भाच्याच्या गावी गेले. तेथेच विजयादशमीला दुर्गा विसर्जन आटोपल्यावर काही वेळाने क्षुदिराम यांनी देह ठेवला. तेथेच त्यांच्यावर अंत्यक्रिया झाली. गदाधर वडिलांच्या अंत्यसमयी त्यांच्याबरोबर नव्हता. कामारपुकुरला दुसऱ्या दिवशी ही वार्ता कळली. वडिलांच्या वियोगाचा विषाद गदाधराच्या मनाला विचारशील आणि एकांतप्रिय करू लागला. गावातील आमराई, स्मशान अशा निर्जन जागी तो वेळ घालवू लागला. आईजवळ पूर्वीसारखा हट्ट करणे त्याने थांबवले.

जमीनदार धर्मदास लाहा यांनी गावात एक धर्मशाळा बांधली होती. कामारपुकुरच्या रस्त्याने जगन्नाथपुरीला जाणारे वाटसरू, साधूबैरागी या धर्मशाळेत मुक्काम करत असत. गदाधर या धर्मशाळेत जाई. तिथल्या साधूबैराग्यांना लाकडे आणणे, पाणी आणणे अशा कामात मदत करत असे. काम नसले की त्यांचे वागणे, बोलणे, चर्चा, ध्यानधारणा, उपासना पाहत बसे, ऐकत बसे. सकाळ संध्याकाळचे धुनी पेटवणे, जी काही मामुली भिक्षा मिळाली असेल तीच रांधून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि तो प्रसाद ग्रहण करणे, काही शारीरिक कष्ट वा रोग असल्यास ईश्वरावर भार टाकून हसत हसत दु:ख सहन करणे, आपली गरज भागवण्यासाठीही कोणाला त्रास न देणे; असा त्यांचा व्यवहार तो निरखीत असे. त्याच वेळी साधूचा वेष करून लोक स्वार्थ आणि सुखासाठी कसे ढोंगीपणा करतात हेही त्याला पाहायला मिळे. धर्माची, शास्त्रांची, पुराणांची, ईश्वराची, अध्यात्माची, जगाच्या व्यवहाराची, जगाच्या नश्वरतेची माहिती, ज्ञान, तोंडओळख बालकाला या धर्मशाळेत होऊ लागली.

एकदा असाच साधूंचा एक गट धर्मशाळेत मुक्कामाला आला. चालण्याचे श्रम झाले असल्याने त्यांनी पुष्कळ दिवस तिथे मुक्काम केला. गदाधराची त्यांच्याशी छान ओळख झाली. एक दिवस त्यांनी त्याला अंगाला राख फासून, टिळे लावून सजवून घरी पाठवले. बालकाच्या आईला त्यामुळे चिंता वाटली. हे साधू लोक आपल्या मुलाला पळवून घेऊन गेले तर कसे या चिंतेने तिने गदाधराला धर्मशाळेत जायला मना केले. हे सांगायला बालक दुसऱ्या दिवशी तिथे गेला तेव्हा त्याचे ऐकून घेतल्यावर ते साधू त्याच्याबरोबर त्याच्या घरी आले. आपण बालकाला पळवणार नाही, साधूंच्या दृष्टीने तसे करणे पाप आणि भयंकर गुन्हा आहे; असे सांगून त्यांनी चंद्रादेवीची समजूत घातली.