शक्ती शब्दात नसते. ती असते व्रतस्थ तपश्चर्येत. व्रतस्थता म्हणजे स्वतःला नि:शेष करणे. तपश्चर्या कधीच प्रदर्शनाचा भाग नसतो. रोज वाहणाऱ्या निरर्थक शब्दांच्या नद्या पाहिल्या तरी प्रामाणिक माणसाला हे पटल्याशिवाय राहणार नाही. अन व्रतस्थ तपश्चर्येच्या या शक्तीपुढे लाखो राज्यसत्तांची किंवा तथाकथित प्रतिनिधीशाहीची शक्ती केवळ फिकीच नाही तर कुचकामी असते. राज्यसत्तेची वा प्रतिनिधीशाहीची शक्ती नसते असं नाही. त्याचंही एक स्थान आणि प्रयोजन असते. मात्र व्रतस्थ तपश्चर्येची मृण्मयालाही चिन्मय करण्याची शक्ती त्यात नसते अन येऊही शकत नाही. कोट्यवधी वर्षांच्या मानवी जीवनात कोणती बाह्य शक्ती टिकून राहिली आहे? स्थायी, सृजनशील जर काही असेल तर ती आंतरिक शक्तीच असते. शब्दांच्या बाह्य आवरणालाही ही आंतरिकताच शक्ती पुरवते. ती असेल तर शब्दांना अर्थ असतो. ती नसेल तर सगळं निरर्थ. आंतरिक शक्ती, व्रतस्थतेची शक्ती, तपश्चर्येची शक्ती; पहाटेच्या दवबिंदूंप्रमाणे आवाज न करता, नकळत पाकळ्या उघडून देत असते. हां, ती अर्जित करणं तर कठीण आहेच; पण ती आकलन होणंही फार कठीण आहे.
- श्रीपाद कोठे
१६ मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा