एकच प्रश्न शेकडो वेळा विचारला गेला आहे. त्याला नेहमीच शांतपणे उत्तर दिलेलं आहे. पण आता त्याचं irritation व्हायला लागलं आहे. त्रास व्हायला लागला आहे. प्रश्न आहे - 'काहीच करत नाही म्हणतो मग तुझं चालतं कसं?' अरे बाबांनो, चालतं. एक तर तुम्हाला एवढी पंचाईत का? यात दोन प्रकार असतात. १) एक असतात प्रामाणिक चिंता आणि स्नेह असणारे. त्यांना माझ्याकडून काही नको असतं पण कळकळ असते. अन २) दुसरे असतात ज्यांना माझ्याकडून काही अपेक्षा असते. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना वाटतं हा थापा मारतो किंवा बहाणे करतो आपल्याला टाळण्यासाठी. पहिल्या प्रकारचे असतात त्यातही वेगवेगळ्या छटा असणारे असतात. याने आपल्याकडे काहीही मागितलं नाही, मागत नाही; याची थोडी रुखरुखही असणारे. आपली कळकळ सिद्ध करण्याची संधी मिळत नाही याची मनात बोच असणारे. काही असतात जे आपल्या मनातील भीतीचं विरेचन करत असतात. याचं कसं चालतं हे आपल्याला कळायला हवं. कुठे आपल्यालाच तर हा कधी पकडणार नाही ना याची त्यांना खात्री करून घ्यायची असते. काही तर काही विचारण्याच्या वगैरे भानगडीत पडतच नाहीत. ते थेट आरोपच करतात किंवा त्यांचा अगदी पक्का समजच असतो की, याला कुठून तरी काही तरी माल मिळत असणारच. त्यातही अनेकांचा समज असतो, हा संघ संघ करतो म्हणजे संघच याला पोसत असणार. याच्याएवढं हास्यास्पद तर दुसरं काहीच नसावं. बरं तर बरं, काही मठ देवस्थान वगैरेही नाही चालवत किंवा कोणत्या मठाशी देवस्थानाशी काही संबंधही नाही. मग चालतं कसं? या प्रश्नाला शेकडो वेळा दिलेलं उत्तर आहे - 'त्याच्या इच्छेने.' अन हे शंभर टक्के खरं आहे. पण खरं सांगू का, या उत्तरालाही काही अर्थ नाही. कारण, समोरच्या प्रश्नामुळे अनिच्छेने ते द्यावं लागतं. मूळ असं आहे की, मला हा प्रश्नच पडत नाही की, माझं कसं चालतं वा चालेल. हा प्रश्न पडला असता तर काही तरी केलंच असतं. असा प्रश्न पडणारी व्यक्ती शांत राहूच शकत नाही. मला तो प्रश्नच पडत नाही. अर्थात चोवीस तासात अनेकदा हा प्रश्न पडणाऱ्या लोकांचा यावर विश्वास तरी कसा बसावा? चूक त्यांचीही नाहीच. पण ज्याच्या इच्छेने चाललं आहे त्याला एवढंच सांगायचं आहे, बाबा रे, कृपा करून पुन्हा असे प्रश्न माझ्यासमोर नको आणू. शांतपणे आणि आनंदाने जे काही करतो आहे ते करू दे. त्यात दगड टाकून अकारण विक्षेप आणू नको.
- श्रीपाद कोठे
२७ मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा