गुरुवार, २ मार्च, २०२३

गांधींच्या आडून

युक्रेन - रशिया युद्धामुळे स्वाभाविकच गांधींची चर्चा होते. हिंसा अहिंसा यांचा चोथा होतो. परंतु या वा त्या बाजूला विचारीपण नसल्याचंच दिसतं. अहिंसेने प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान गांधीविरोधक देताना दिसतात. तर, मानवजातीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अहिंसाच हवी हे गांधी समर्थक सांगतात. अहिंसेची टर उडवणाऱ्यांना त्याने होणारं जगाचं (त्यात आपलंही नुकसान अंतर्भूत) नुकसान दिसत नसेल का? अन वारंवार नुकसान आणि तडाखे सोसूनही अहिंसेचा जप हे अरण्यरुदनच ठरते, हे गांधी समर्थकांना कळत नसेल का? पण दोन्ही बाजूंना विचार करायचाच नाही बहुतेक. जगण्याचा आणि जीवन व्यवहाराचा आधार अहिंसा हाच असू शकतो; हिंसा नाही. मात्र गांधींनी त्याचा सशक्त पुनरुच्चार केल्यामुळे गांधी विरोधकांना, नुकसान कितीही झालं तरी अहिंसा नको. अन गांधी समर्थकांची पंचाईत वेगळीच आहे. त्यासाठी काही गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील. अहिंसेच्या मुळाशी जाताना गांधी म्हणतात, आधुनिक सभ्यता राक्षसी आहे. ही राक्षसी सभ्यता सोडून दिल्याशिवाय अहिंसेला अर्थच उरत नाही. पण हे गांधींच्या समर्थकांना पटत नाही. का? कारण इहवाद, विज्ञानवाद, व्यक्तिवाद, बुद्धिवाद, स्पर्धा, आर्थिक जीवनमूल्ये, संघर्ष, विस्तारवाद, भोगवाद, वर्चस्ववाद; या पुरोगामी होण्यासाठी आवश्यक असलेल्या श्रद्धा सोडणे गांधींच्या समर्थकांना झेपणारे नसते. शिवाय या राक्षसी सभ्यतेला मात द्यायची असेल तर 'ईशावास्यम इदं सर्वम' हे मूळ प्राणतत्त्व स्वीकारावे लागते. ते स्वीकारण्यात दोन अडचणी असतात. एक म्हणजे मानवी दांभिकता सोडावी लागते आणि दुसरे म्हणजे भारत नाकारणे सोडावे लागते. भारताचा स्वीकार लागतो. या दोन्ही गोष्टी सोडण्यासाठी लागणारी हिंमत गांधी समर्थकात नाही. गांधी विरोधकांना 'सबै भूमी गोपालकी' हे बौद्धिक स्तरावर अमान्य नसेल पण वेगवेगळ्या कारणांनी त्याचा सशक्त उच्चार करण्याची हिंमत आणि नैतिकता त्यांच्यात नाही. अन्यथा भारतीय धार्मिक वा आध्यात्मिक विश्वाला, 'सबै भूमी गोपालकी' हे उच्चरवात सांगायला कुणी मनाई केली आहे? प्रश्न हिंसा की अहिंसा हा नाहीच. हिंसेने सगळ्यांचेच नुकसान होते. (बाकीच्यांसोबत रशियाचेही सर्व प्रकारचे नुकसान होतेच आहे.) जीवनाचा आधार अहिंसा हाच असू शकतो. पण ती केवळ जप करून साध्य होत नाही. त्यासाठी आधुनिक राक्षसी सभ्यतेला तिलांजली द्यावी लागेल. गांधींच्या आडून लढाई खेळणाऱ्या समर्थक आणि विरोधक दोघांनाही, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी हे नको आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३ मार्च २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा