सोमवार, २९ मे, २०२३

सोन्याची खाण

भारतात सोन्याची खाण सापडली असून त्यात २२ कोटी टन सोनं आहे, अशी एक बातमी सध्या आलेली आहे. गणिती डोक्याने लगेच २२ चा पाढा म्हटला. सात माणसांना एक टन सोनं मिळेल. गुगलनुसार एक हजार किलो म्हणजे एक टन. म्हणजे सात लोकांना एक हजार किलो. म्हणजेच प्रत्येकाला १४२.८५ किलो सोनं.

वा वा वा... मज्जाच मज्जा !!

- श्रीपाद कोठे

३० मे २०२२



सत्ता

भर्तृहरीने कालातीत सत्य सांगून ठेवलं आहे. सत्ता (राजनीती हा त्याचा शब्द) वारांगनेसारखी असते. चांगलं किंवा वाईट हा तिचा स्वभाव नसतो, धोरण असतं. जगातल्या कोणत्याही भौगोलिक प्रदेशातील, कोणत्याही काळातील, कोणत्याही प्रकारची, कोणत्याही हातातील सत्ता याला अपवाद नसते. मुळातच अगदी एका व्यक्तीचा विचार केला तरी 'सत्ता गाजवणे', 'सत्ताकांक्षा' हीच प्रामुख्याने त्याच्या almost सगळ्या व्यवहारांच्या मुळाशी दिसते. प्रश्न हा की, त्यातून माणसाला बाहेर कसं काढायचं? व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून सुद्धा. अध्यात्म म्हणजे या सत्ताकांक्षेतून माणसाला बाहेर काढणे. अन हे काम संत आणि संतच करत असतात.

- श्रीपाद कोठे

३० मे २०२२

शनिवार, २७ मे, २०२३

विचारवंताचे नैराश्य

काल पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा स्मृतीदिवस होता. त्यानिमित्ताने काही लेख समाज माध्यमात दिसले. राजू परुळेकर यांचाही 'नेहरू नावाचा हिमालय आणि खुजी आरएसएस' हा लेख दिसला. मी तो पूर्ण वाचला. नेहरूंची मांडणी चांगली केली आहे. काही मुद्दे, काही घटना यावर वेगळी मते, वेगळं आकलन असूच शकतं; पण नेहरू व्यवस्थित मांडले आहेत. मात्र लेख वाचल्यावर मला प्रश्न पडला की, लेख आणि लेखाचं शीर्षक यांचा काय संबंध? नेहरू नावाचा हिमालय असं म्हणताना परुळेकर यांनी तो हिमालय दाखवला आहे. कोणाला तो सातपुडा, कोणाला सह्याद्री वगैरे वाटू शकेल पण त्यांनी तो हिमालय दाखवला. परंतु खुजी आरएसएस म्हणताना हे खुजेपण मात्र दाखवलेलं नाही. मोठ्ठ्या लेखात दोन ठिकाणी संघाचा उल्लेख आहे पण त्यावर हिणकस शेरेबाजी करण्यापुरता. संघाची धोरणे, संघाची वक्तव्ये, संघ नेत्यांच्या प्रतिक्रिया, घटना; असं काही तरी आधाराला घेऊन; त्याचं विवेचन करून संघ खुजा आहे हे दाखवलं असतं तर त्याला किमान वैचारिक मांडणी म्हणता आलं असतं. तसं काहीही न करता नेहरू मांडण्यासाठी किंवा नेहरू मांडताना संघाला खुजे म्हणणे हा फक्त आणि फक्त संघ विरोधाचा कंडू शमवून घेण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल.

आधीही लिहिले आहे पण परुळेकर यांच्यासाठी पुन्हा सांगतो; १९८८ साली आकाशवाणीवर पंडित नेहरू जन्मशताब्दी निमित्त मी केलेल्या भाषणाचं संपूर्ण मार्गदर्शन श्री. दत्तोपंत ठेंगडी या संघ प्रचारकांनी रेशीमबागेच्या भूमीतच मला केलं होतं. सडकछाप पोरकट चर्चा करणाऱ्यांच्या मतांवरून किंवा वागण्या बोलण्यावरून; एखादा विचार, एखादी संघटना याविषयी मूल्यांकन करायचे नसते; हे विद्वान आणि विचारवंत समजल्या जाणाऱ्यांना कळू नये हे दुर्दैव आहे.

या अनुषंगाने नेहरू आणि संघ संदर्भात फक्त काही प्रश्न परुळेकर यांच्यासाठी -

१) तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यावर लावलेले ३०२ कलम तेव्हाच्या केंद्र सरकारने दोन दिवसातच मागे घेतले की नाही? आणि कोणतेही ठोस आरोप नसताना गुरुजींना प्रथम सहा महिने तुरुंगात ठेवले की नाही?

२) दुसऱ्यांदा त्यांना दिल्लीतून अटक करून पुन्हा तुरुंगात टाकताना सरकार कोणतेही आरोप सुद्धा लावू शकले नव्हते हे खरे नाही का?

३) संघावर बंदी घालताना कुठेही चर्चेत नसणारा वा आक्षेप नसणारा संघाच्या घटनेचा विषय, बंदी घातल्यानंतर दीड वर्षाने तयार करून; सूड घेण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला की नाही?

४) गांधीहत्येच्या खटल्याचा निकाल लागून दोषींना शिक्षा होऊन गेली तरी गुरुजींना कारागृहात का ठेवले होते? संघावरची बंदी का उठवली नव्हती?

५) या सगळ्या बाबी न्यायाला धरून होत्या का? संवैधानिक होत्या का? तुमचा हिमालय इतका खुजा का वागला?

६) नेहरूंची कर्तबगारी सांगून त्यांच्या संघद्वेषावर पांघरूण घालता येईल का?

७) संघाने नेहरूंचा द्वेष केला वा त्यांना अडचणीत आणले याचे उदाहरण आहे का?

श्री. परुळेकर, आपण या लेखात नेहरूंनी इंदिरेला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख केला आहे. ज्याचा आशय आहे - 'सगळं काही माणसाच्या हाती नसतं.' हे नेहरूंचंच मत त्यांना लागू होत नाही का? कोणत्याही लहान वा मोठ्या व्यक्तीचं उत्थान व पतन हे त्याच्या त्याच्या हाती पूर्णांशाने नसतं. 'काळ' नावाची गोष्ट हे घडवते. प्रत्येक गोष्टीच्या उत्थान आणि पतनाची बीजे त्या गोष्टीतच एकाच पुरचुंडीत बांधून ठेवलेली असतात. त्याच न्यायाने आजचा काळ  नेहरुंना उचलून धरत नसेल तर त्याचं नैराश्य काढण्यासाठी अन्य कोणाला नावे का ठेवायची? हे यच्चयावत सगळ्या मोठ्या माणसांना लागू होतं. त्यामुळे अभिनिवेश, आवेश, आक्रोश वा आक्रस्ताळेपणा करण्याला काही अर्थ नाही. नेहरू त्यांच्या महानतेसह आणि लहानतेसह इतिहासात कोरले गेले आहेत. आज त्यांचा उदोउदो होत नाही याचं दु:ख तुम्हाला असू शकेल. पण त्यासाठी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची काय गरज?

- श्रीपाद कोठे

शनिवार, २८ मे २०२२

बुधवार, २४ मे, २०२३

राजकारण

लोकांना राजकारणाचं अमाप कौतुक असतं. दिवसातला किती वेळ राजकारण चिवडण्यात घालवतात कोणास ठाऊक. पण राजकारण खरंच समाजाचं भलं करू शकतं का? असे अनेक विषय आहेत की ज्यात राजकारण मीठाचा खडा टाकत असतं. उदा. जात आणि आरक्षण. या दोन्ही विषयांवर कितीही चोथा केला तरी हे दोन विषय मार्गी लागू शकत नाहीत याचं एकमेव कारण आहे राजकारण. ताजा मुद्दा आहे जातीवर आधारित जनगणना. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जातीवर आधारित जनगणनेसाठी कंबर कसली आहे. अन आत्ता बातमी आहे की, भाजप बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देऊ शकतो. वास्तविक जी 'जात' नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही त्यासाठी किती आटापिटा. अन त्याला कारण राजकारण. मग त्यावरून कितीही वाद होवोत, संघर्ष होवोत, वितुष्ट येवो, डोकी फुटोत. कोणाला त्याचं काहीही नाही. अन 'राजकारणाने आपली मर्यादा सोडू नये' हे ठणकावण्याची आपली शक्ती तर समाज केव्हाच गमावून बसला आहे.

- श्रीपाद कोठे

२४ मे २०२२

रविवार, २१ मे, २०२३

सापेक्षता

आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत समजत नसेल तर, नागपूरच्या- मानेवाडा रिंग रोड, तुळशीबाग रस्ता, सेन्ट्रल अव्हेन्यू, पाचपावली उड्डाणपूल, जरीपटका, बैरामजी टाऊन, सुभाष रोड, रुईकर पथ, अमराबवती रोड, वर्धा रोड, तेलंगखेडी, फुटाळा, पश्चिम अंबाझरी मार्ग, उत्तर अंबाझरी मार्ग, दक्षिण अंबाझरी मार्ग- इत्यादी रस्त्यांवर चक्कर मारावी. ४७ अंश उन्हात घट्ट मिठ्या मारून दुचाकीवरून फिरणाऱ्या प्रेमवेड्या जोड्या पाहिल्या की सापेक्षता सहज समजेल.

- श्रीपाद कोठे

२२ मे २०१५

फादर चे आवाहन

दिल्ली चर्चच्या फादरने केलेल्या आवाहनावरून वादळ उठले आहे. ते सर्वत्र उपलब्ध असल्याने त्यावर लिहीत नाही. परंतु या निमित्ताने तीन मुद्दे -

१) राजकारणात धर्माची सरमिसळ करू नये अशी sermons देणारे यावेळीही बिळात लपून स्वतःची निर्लज्जता आणि ***** दाखवण्यात कमी पडणार नाहीत.

२) या विषयावरील चर्चेत कुण्या 'फादर शंकर' यांनी प्रदूषणाचा मुद्दा आणला. तो का हे अजूनही समजले नाही, पण हिंदूंची अंत्यसंस्काराची दहन पद्धती आणि होमहवने प्रदूषण पसरवतात, असा त्यांचा मुद्दा. चर्चला प्रदूषणाची एवढी चिंता असेल तर त्यांनी जगभरातील सगळ्या ख्रिश्चनांना त्वरित श्वास बंद करायला सांगावे. म्हणजे प्रतिक्षणी वातावरणात मिसळणारा कार्बन डायऑक्सईड कमी होईल. त्यांचा गाड्यांचा आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल. अन पुढे जाऊन सगळ्या हिंदूंनी ठणकावून सांगावे - हे जग प्रदूषणात बुडून नष्ट झाले तरी आम्ही दहनक्रिया आणि होमहवन सोडणार नाही.

३) हिंदू विचारक, कार्यकर्ते, चिंतक, धर्मनेते यांनी तत्वज्ञानाचे विश्वव्यापी महाभारत सुरू करून; ख्रिश्चन धर्माची तत्व, धारणा, दृष्टी, गृहीतके, संकल्पना कशा निरर्थक, चुकीच्या आहेत; धर्ममत म्हणून त्यांच्या असलेल्या मर्यादा, अध्यात्मिक उन्नतीसाठी नसलेला त्याचा उपयोग; या साऱ्याची आग्रही सार्वजनिक चर्चा आणि उहापोह करावा. नुसतेच भजनपूजन आणि दोन चार गाड्या अन घरे मिळवण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याच्या हलक्या प्रतीच्या वृत्तीचा त्याग करावा. काळाच्या गरजेनुसार धर्मचर्चा करावी.

- श्रीपाद कोठे

२२ मे २०१८

शनिवार, २० मे, २०२३

मैत्रीण

सध्या एक नवीन मैत्रीण आयुष्यात आली आहे. घरच्या मोगऱ्याच्या वेलाची तिला खूप ओढ आहे. अन त्या ओढीमुळेच ती यायला लागली अन रोज येते आहे. एक वेगळंच छान feeling सध्या आनंद देतं आहे. मोठी गोड आहे ही मैत्रीण. अबोल आहे. भिरभिर नजरेने पाहत असते माझ्याकडे.

ती आहे एक पक्षीण. पंख पसरून भराऱ्या घेणारी. स्वच्छंदी... स्वैर नाही. तिला स्वतःचा छंद आहे. त्यातच रमलेली असते सतत. काहीच दिवसांपूर्वी ती मोगऱ्याच्या वेलीवर आली. वेलीच्या आडव्यातिडव्या फांद्यांमध्ये एक जागा शोधली. अन तिथे वाळल्या गवताच्या काड्यांचा एक बिछाना तयार केला सुंदरसा. नाजुकसा. एक दिवस त्या बिछान्यावर एक मोगऱ्याचं टपोर फूल दिसलं. म्हणून हात पुढे केला तर ते फूल नव्हतं, ते होतं त्या पक्षिणीचं छोटंसं अंडं. पांढरं शुभ्र. पुढे केलेला हात लगेच मागे घेतला.

माझी मैत्रीण ते अंडं उबवायला तिथे रोज येते. खरं तर तिथेच असते. फुलं तोडायला गेलं की नजर रोखून फांद्यांच्या फटीमधून पाहते एकटक. आपणं फुलं तोडावी. ती शांत बसलेली असते त्या अंड्यावर. तिच्या हक्काच्या जागेजवळ फुल असेल तर हात तिकडे जातो. तेव्हा भर्रकन उडते पंख पसरून आणि जाऊन बसते समोरच्या तारेवर. तिला वाटत असेल आपल्याला धरतो की काय? पण तिला ठाऊक नाही की, याने आजवर कोणत्याही मैत्रिणीला धरलेलं नाही. हो, धरतो की काय असेच वाटत असेल. अंड्याची काळजी नसणार. कारण अंडं तिथेच असतं. ती अंडं घेऊन जात नाही. कदाचित अंडं घेऊन जाता येत नाही हेही कारण असावं. कोणास ठाऊक. अजून मैत्रिणीच्या मनात तेवढं जाता आलेलं नाही.

संध्याकाळी गच्चीवर फिरायला जातो तेव्हाही ती असतेच अंड्यावर बसलेली. कितीही वेळ फिरत राहा बाजूला. किंवा नुसतं जवळ उभं राहून पाहात राहा, तिच्याकडे किंवा इकडेतिकडे. ती कसलीही हालचाल करत नाही. बसली राहते गपगुमान. हा काळ किती दिवसांचा ठाऊक नाही. कधीतरी तिचं हे काम संपेल. छोटंसं तिच्यासारखंच पिल्लू अंड्याचं पांढरं कवच फोडून बाहेर येईल. मिचमीचे डोळे उघडेल. अंडं उबवणारी मैत्रीण त्या प्रतिकृतीला काही दिवस आपल्या चोचीने घास भरवेल. पंख हलवण्याचा प्रयत्न करता करता एक दिवस त्या पिल्लाचे पंख उघडतील. अन ते जाईल उडून. देशविदेश फिरायला. आकाश कवेत घ्यायला. असंच होत असतं. अन असंच होवो.

एक मैत्रीण लाभली. तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या काळाचा साक्षीदार होता आलं. आनंद आणखीन काय असतो?

- श्रीपाद कोठे

शनिवार, २१ मे २०२२

साहित्य चर्चेच्या निमित्ताने

उदगीर साहित्य संमेलनातील अध्यक्षांच्या भाषणाची बरीच चर्चा सुरू आहे. त्या भाषणाचे विश्लेषण करणारी एक चर्चा नागपुरात आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेत अध्यक्षांच्या भाषणावर घणाघाती टीका झाली. स्वाभाविकच त्याची प्रतिक्रिया उमटली. वेगळ्या वैचारिक वर्तुळातील एका वृत्तपत्राने नागपुरात झालेल्या चर्चेवर अधिक घणाघाती टीका करणाऱ्या प्रतिक्रिया संकलित करून प्रसिद्ध केल्या. त्यातील राजकारणाचा भाग असेल तो असो. पण नागपुरातील चर्चेवर टीका करणाऱ्या ज्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात व्यक्त झालेले निखळ वैचारिक मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. एक एक मुद्दा घेऊन काही मी लिहिणार नाही. कारण ते मग पोरकट भांडणाच्या दिशेने जाते. त्याऐवजी त्या प्रतिक्रियांच्या लघुत्तम साधारण विभाजकावर मी लिहिणार आहे.

लेखकाने व्यवस्थेला आरसा दाखवायला हवा असा एक मुद्दा त्यात प्रामुख्याने आला आहे. चांगलं आहे. पण फक्त व्यवस्थेला का? व्यवस्था ज्या विचारांवर उभी असते, ज्या विचारांच्या आधारे विकसित होते आणि चालते; त्या विचारांना आणि विचारपद्धतींनाही लेखकाने आरसा दाखवायला हवा की नको; याचेही उत्तर द्यावेच लागेल.

गेल्या दीडेकशे वर्षात व्यवस्था हीच गोष्ट मानवाच्या समस्त गोष्टींसाठी जबाबदार असते असा एक विचार रुजला, रुजवला गेला आहे. हा योग्य आहे का? याचे चिंतन लेखकांनी का करू नये? मानवी जीवन अतिशय गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असते. त्यात व्यवस्था हा एक घटक जसा असतो तसेच अन्यही पुष्कळ घटक असतात. मात्र व्यवस्था व्यवस्था करत सतत उरबडवेपणा करण्याने काय साध्य होणार? दुसरी बाब - मानवी जीवनात व्यवस्थेची भूमिका असते तसेच व्यवस्था ज्या गृहितकांवर उभ्या होतात त्यांचीही भूमिका असते. मानवी बुद्धीचे स्वयंपूर्णत्व, त्या बुद्धीला आकलन होणाऱ्या विज्ञानाची सर्वोच्चता, मानवी बुद्धीच्या आकलनातील व्यवस्थापन आणि नियोजन, मानवी बुद्धीला गम्य नसणाऱ्या बाबींचे अस्तित्व नाकारणे, यातून पुढे आलेले - स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, न्याय इत्यादी; या सगळ्याच गोष्टी आज प्रश्नांकित झालेल्या आहेत. केवळ भारतात नाही तर जगभरात. या सगळ्या धारणांनी आणि गृहितकांनी जगाला आज कुठे आणून ठेवले हे सध्याच्या रशिया - युक्रेन युद्धाच्या एका उदाहरणावरून सुद्धा स्पष्ट होते. बरे, जगाचं थोडा वेळ बाजूला ठेवू. भारताची चर्चा करू. अध्यक्षांना जी मूल्ये खूप महत्त्वाची वाटतात किंवा प्रतिक्रिया देणाऱ्यांची ज्या मूल्यांशी बांधिलकी आहे; ती मूल्ये शिरोधार्य मानणारी व्यवस्था साठ वर्षे भारतात होती. या साठ वर्षात भारताच्या सगळ्या समस्या सुटून भारताचे नंदनवन का झाले नाही? वर्तमान व्यवस्थेला आरसा दाखवायला काहीच हरकत नाही पण साठ वर्षे जी व्यवस्था होती तिच्यासमोरही आरसा धरावा लागेलच ना?

मुळात सगळ्या वादाची मेख इथे आहे. आरसा दाखवताना जी वेचक वृत्ती दाखवली जाते ती मोठ्या असंतोषाला जन्म देते. अमक्याला आरसा दाखवला तर ठीक, तमक्याला मात्र नाही दाखवायचा. अगदी उदाहरणे घेऊन याचा विचार करता येईल. एक उदाहरण तर माझ्याशी संबंधीतच आहे. तीन चार वर्षांपूर्वीची घटना. प्रतिक्रिया देणाऱ्यांमधील एक व्यक्ती आणि मी एका कार्यक्रमात एका मंचावर येणार होतो. त्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी मी एका घटनेवरून एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यात आरसा दाखवला होता. काय विचारता... तो कार्यक्रमच रद्द झाला. आपली पारदर्शिता जर अशी असेल तर मोठमोठ्या गप्पांना अर्थ राहत नाही. अन लोक आपल्याला बेदखल करत जातात. भारत सासणे यांच्या भाषणाची कड घेणाऱ्यांची ही पंचाईत आहे.

आणखीनही उदाहरणे वानगीदाखल... मी एकदा 'साधना' मासिकाच्या संपादकांना (पूर्वीच्या) म्हटले होते - तुम्ही अनेक गोष्टींवर टीका करत असता. हरकत नाही. पण त्यातील काही गोष्टींची वेगळी बाजू मांडणारे माझे दोन चार लेख प्रसिद्ध करा. त्यांचा स्पष्ट नकार होता. ही वृत्ती असेल तर खूप भव्य दिव्य वगैरे गप्पा निरर्थकच ठरणार.

पुन्हा एकदा विचार पद्धतीवरून मूळ वैचारिक भूमिकेकडे येऊ. भारतात सगळं निरर्थकच होतं. हा भारत जो काही होता तो बुडवून नष्ट करण्याचा लायकीचाच होता असं वाटणारे खूप आहेत. त्यात एक विषय असतो शिक्षण. प्राचीन भारतातील शिक्षणासंबंधीचे गैरसमज प्रो. धर्मपाल त्यांनी साधार खोडून काढले आहेत. धर्मपाल हे शुद्ध गांधीवादी होते. आजच्या व्यवस्थेशी संबंधित नव्हते. इतकंच नाही तर त्यांच्या संशोधन इत्यादीसाठी आजच्या व्यवस्थेने पैसा, सवलती दिल्या नव्हत्या. पण प्राचीन भारतीय शिक्षणाविषयीचे गैरसमज टाकून देण्याची तयारी का नसते? कारण तसे केल्यास कोणावर वा कशावर तरी तोंडसुख घेता येत नाही.

मूळ वैचारिक धारणा, विचारांची पद्धत, विश्लेषणातील वेचकपणा; अशा सगळ्याच बाबतीत आज अनेकांची पंचाईत झालेली आहे. भारत सासणे वा त्यांचे पाठीराखे किंवा त्या मंदियाळीतील असंख्य लेखक, वाचक वा सामान्य जन; यांनी कोणाकोणाला आरसे दाखवायचे ते दाखवावेत. पण तेच आरसे आपल्या स्वतःकडे पण वळवावेत. अन त्यावेळी दिसणारे सत्य नाकारू नये. व्यक्तिगत वा वैचारिक कोणत्याही सत्याला सामोरे जाण्यात संकोच करू नये.

- श्रीपाद कोठे

शनिवार, २१ मे २०२२

बुधवार, १७ मे, २०२३

मर्कटलीला

कपिल शर्माच्या कार्यक्रमात नर्सेसचा अवमान होत असल्याच्या कारणावरून पंजाबमध्ये परिचारिका आंदोलन करीत आहेत. त्यातील तथ्य मला माहित नाही. पण तरीही माझा परिचारिकांना पाठींबा आहे. त्यांनी हा मुद्दा खूप ताणावा अन कपिल शर्माच्या त्या कार्यक्रमावर बंधन यावे. तसेच हा मुद्दा न्यायालयात जावून एकूणच अशा कार्यक्रमांच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिले जावेत. आज विनोद, विनोदी कार्यक्रम, विनोदी दृष्टी या सगळ्याचा जो बाजार झाला आहे, तो संपुष्टात यायलाच हवा. जगातील सगळ्या गोष्टी, सगळ्या व्यक्ती, सगळ्या संस्था, सगळे विचार, एकूणच यच्चयावत सगळं काही - आपल्या बा...ची जहागीर असून आपल्या मर्कटलीलांचा कच्चा माल म्हणूनच हे जग अस्तित्वात आलं आहे, असा अनेकांचा समज आहे. असा समज असणारे वाढत आहेत. एकूणच `विनोद' या विषयाची सर्वांगानी गंभीर चर्चा आवश्यक आहे. विनोदाचेही त्यातच भले आहे.

- श्रीपाद कोठे

१८ मे २०१६

हिंदुत्वाच्या कक्षा आणि पैशाचे चलनवलन

एका संघगीतातील एक ओळ आहे - 'हिंदुत्वाच्या असीम कक्षा, संघशक्तीने तेज लुटावे'. आज ही ओळ आठवण्याचे कारण आहे - गहू निर्यातबंदीचा विषय. सध्या जगभरातच अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवतो आहे. त्यात गहू देखील आहे. पोटाशी संबंधित आणि रोज लागणारी गोष्ट. त्यामुळे त्याची चर्चा होणारच. जगाची गरज लक्षात घेऊन भारताने गहू निर्यात मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण स्वीकारले. पण त्याचा परिणाम होऊन भारतात भाव भडकले. मग सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. पूर्वी नोंदणी केलेल्यांना सूट देऊन. त्यामुळे निर्यातदार नाराज झाले. स्वाभाविकच आहे. निर्यातदारांना पैसा हवा. कोणी उपाशी राहू नये, सगळ्यांना भाव परवडावे हे त्यांना का वाटावे? अन आठवला कृष्ण. गोकुळातल्या बालकांच्या तोंडचे दूध बाहेर जाऊ न देणारा. त्यासाठी संघर्ष करणारा. मडकी फोडणारा. पैशासाठी स्वजनांना उपाशी ठेवणं हे हिंदुत्व असू शकत नाही. त्यासाठी नाराजी पत्करावी लागली तरी चालेल. हां, एक गोष्ट मात्र आहे - कृष्णाला कसलीही अपेक्षा नव्हती. धनपिसाट व्यापाऱ्यांकडून त्याला काहीही नको होते. हिंदुत्वाच्या असीम कक्षेतील ही पण एक कक्षा आहे.

************

आर्थिक क्षेत्रातील आणखीन एक विषय सध्या चर्चेत आहे. श्रीलंकेतील परिस्थिती. त्यात घराणेशाही आणि सवलती हे दोन घटक असतात. भोळेभाबडे लोक फारसा विचार न करता मेसेज फिरवत राहतात. दोन घटकातील घराणेशाही हा राजकीय विषय आहे. तूर्त त्यावर काही म्हणायचे नाही. पण सवलती या विषयावर मात्र बोलले पाहिजे.

- जगातल्या कोणत्या देशात, कोणत्या अर्थव्यवस्थेत सवलती नाहीत?

- आर्थिक सवलती खरंच बंद करता येऊ शकतात का? बंद कराव्यात का?

- आर्थिक सवलती बंद करणे माणुसकी, न्याय आणि नीतिमत्ता यांना धरून होईल का?

- किमतीचे नियंत्रण इत्यादी कामे सरकारची नाहीत असे म्हणून सगळी अर्थव्यवस्था बाजाराधीन करताना, जनतेच्या कल्याणाची चिंता हे सरकारचे काम आहे याचा विसर का पडावा?

- अर्थव्यवस्था बाजाराने नियंत्रित केली तरीही, ती समाजाचे एकूण जगणे कठीण करत असेल तर सरकारने त्यात हस्तक्षेप करायला हवा की नको?

- सवलती बंद कराव्यात असे म्हणताना, एकूण समाजाच्या उत्पन्नाच्या parity चा विचार करायचा की नाही?

- पैसा कसा निर्माण होतो आणि मुख्य म्हणजे कसा फिरतो हे ध्यानात न घेता सवलती बंद करा म्हणणे किती शहाणपणाचे म्हणता येईल?

१) डोमेक्स घ्या किंवा घडी घ्या म्हणणाऱ्याला कोट्यवधी रुपये मिळतात अन राबराब राबणाऱ्याला दोन वेळची जुळवाजुळव करताना ओढाताण होते.

२) शिक्षण ही गोष्ट पैसा निर्माण करू शकते वा नाही याचा विचार न करता, शिक्षण क्षेत्र विना अनुदानित केले जाते. त्यातून शिकवणारे पालक कंगाल किंवा भ्रष्ट होतात आणि शिक्षण सम्राट गब्बर होतात.

३) अंगावरचे कपडे उतरवले की लाखो रुपये मिळतात अन दिवसभर पाट्या टाकल्या की कोरडी भाकर मिळते.

४) कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेमके काय काम करतात हे कळत नसले तरीही त्यांचे बंगले आणि गाड्या कशा असतात? या प्रश्नाला काय उत्तर.

५) तेच तेच खेळणाऱ्या खेळाडूंच्या लाखोंच्या आणि कोटींच्या बोली लागतात. त्यांना cheer up करण्यासाठी श्रम किंवा अक्कल काहीही न वापरणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात. शेतात मजुरी करणाऱ्याचे काय?

६) तीच तीच गाणी गल्लीबोळातून गणपती, दिवाळी, स्वातंत्र्यदिन यांना गाऊन हजारो, लाखो रुपये मिळतात. कवी वा लेखक तेच तेच लिहू शकतात का? अन त्यातून पैसा मिळतो का?

पैशाचं चलनवलन कसं होतं याची अक्षरशः हजारो उदाहरणे देता येतील. हे लक्षात न घेता, सवलतीच्या नावाने खापर फोडणे हे निर्बुद्धपणा शिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. सर्वसामान्य माणसाचे विचारशून्यत्व आणि झुंडीत रमण्याची वृत्ती कमी होईल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१८ मे २०२२

शनिवार, १३ मे, २०२३

साम्यवाद आणि भांडवलशाही

- कम्युनिझम संवेदना भडकवून, माणसाला एकांगी आणि क्रूर बनवतो.

- भांडवलशाही संवेदना गोठवून, माणसाला एकांगी आणि क्रूर बनवते.

- कम्युनिझम आणि भांडवलशाही दोन्ही जडवादी आणि भोगवादी आहेत.

- कम्युनिझम आणि भांडवलशाही दोन्ही माणसाला माणूस समजत नाहीत.

- आज भारतासहित बहुतेक सर्वत्र भांडवलशाही आहे.

- भांडवलशाही म्हणजे भांडवलाची शाही, भांडवलाचे राज्य.

- साहित्य, संगीत, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परस्पर संबंध यात भांडवलशाहीचाच बोलबाला आहे.

एक उदाहरण : एका मोठ्या नावाने लिहिलेला लेख सकाळी वाचत होतो. वाढत्या उन्हाचा आर्थिक घटकांवर होणारा परिणाम. त्यात वाढत्या उन्हावर चिंता होती, पण पुढे म्हटले होते की, 'या वाढत्या तापमानाशी जीवनव्यवहार जुळवून घेण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे.' विचार न करता वाचले तर लगेच पटून जाते हे म्हणणे. मात्र, मूळ कारण असलेले वाढते तापमान वाढू नये याचा विचार मात्र मनातही येत नाही. कारण भोगाची वखवख पेरणाऱ्या भांडवलशाहीने संवेदना गोठवून टाकलेल्या असतात. आमच्या ऐषोरामात, सुखसाधनात, उपभोगात; किंचितही कमतरता वा न्यून नको. एवढेच नाही तर ते सतत वाढत राहायला हवे. मानवी दुर्बलता exploit करण्यावरच भांडवलशाही उभी आहे. त्यामुळे माणसाचे माणूसपण रसातळाला जात आहे.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२२

भारतीय संगीत आणि मुसलमान कलाकार

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगीच्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्या छायाचित्रावर पुष्कळ पोस्ट दिसल्या. हे छायाचित्र बोलके आहेच. पण मला त्यात आश्चर्य वा नवल नाही वाटले. नागपुरात 'सप्तक' संस्थेतर्फे एक मैफिल होती रात्रभराची. भारतीय बैठक होती. मध्यरात्रीच्या सुमारास स्वाभाविकच मंडळी सुस्तावली होती. काही जण पाय लांब करून वगैरे आळसावले होते. उस्तादजी त्यावेळी मंचावर होते. त्यांनी सगळ्यांना आवाहन केले होते - 'यह माँ सरस्वती का मंदिर है. उसका अनादर ना करे. ठीक बैठे.' हे म्हणताना ते मुस्लिमच होते. ते हिंदू झाले नव्हते. पण त्यांनी हिंदुत्व स्वीकारले होते, असे म्हणता येईल.

प्रसिद्ध धृपद गायक उस्ताद फहीमुद्दीन डागर यांचाही असाच अनुभव आहे. स्पीक मॅके संस्थेने त्यांचे काही कार्यक्रम नागपुरात ठेवले होते. मी नागपुरातल्या त्यांच्या मुक्कामी त्यांना भेटायला गेलो. त्याही वेळी त्यांच्याभोवती अनेक विद्यार्थ्यांचा आणि रसिकांचा गराडा होता. धृपद मधील अनेक बारकावे ते उदाहरणांसह दाखवत होते. बोलणंही सुरू होतं. विषय त्यांच्या शिवभक्तीवर आला. तेव्हा त्यांनी शिवाच्या गाभाऱ्यातील ओंकार, रुद्र आणि धृपद यांच्यातील साम्य वगैरे उदाहरणांसह स्पष्ट केले.

अशी अनेक उदाहरणे आहेत. हिंदी चित्रपटातील अनेक भजने मुस्लिम शायरांनी लिहिली आहेत.

राजकारण तोडतं.

संस्कृती जोडते.

हिंदुत्व ही संस्कृती आहे.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२२

शुक्रवार, ५ मे, २०२३

बुद्ध दिनानिमित्त

जन्म, ज्ञान आणि निर्वाण एकाच दिवशी झालेल्या गौतम बुद्धांचा आजचा दिवस. अन्य गोष्टींबरोबरच त्यांच्या अहिंसा तत्वाची चर्चाही अपरिहार्यच. मुळात हिंसा अहिंसा चर्चा करताना; अहिंसेचे पक्षधर आणि अहिंसेचे आलोचक दोघेही; हिंसा अहिंसा यांचा संबंध शस्त्र या बाबीशी जोडतात. त्यातून न संपणारी आणि अर्थहीन वादावादी सुरू होते. मुळात हिंसा अहिंसा यांचा शस्त्र या बाबीशी संबंधच नाही. हिंसा अहिंसा या मनाच्या वृत्ती आहेत. त्या नीट समजून घेतल्या की वादाचे कारण उरत नाही. मानवी जीवनात अहिंसा हीच स्वीकारणीय बाब आहे आणि हिंसा ही पूर्णपणे त्याज्य बाब आहे. हिंसा ही अपरिहार्य वगैरे नसतेच. तशी ती असूच शकत नाही. शस्त्र धारण करणाराच नव्हे तर शस्त्र वापरणारा सैनिक हा हिंसक नसतोच आणि शस्त्र वापरणारा अतिरेकी आणि शाळकरी मुलगा देखील हिंसक असतो. फरक कोणता आहे? फरक आहे मनोवृत्तीत. स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू; म्हणजे हिंसा. हिंसा ही हाती शस्त्र घेऊनच होते असे नाही. शस्त्राला हात न लावताही हिंसा होते, होऊ शकते. हिंसेचे उघड समर्थक किंवा हिंसा अपरिहार्य असते असं म्हणणारे; अप्रत्यक्षपणे स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू यांचेच समर्थन करत असतात. त्यांना म्हणायचे असते शस्त्र अपरिहार्य असतं पण ते म्हणतात हिंसा अपरिहार्य असते. मात्र ते योग्य नाही. शस्त्र अपरिहार्य असू शकतं पण हिंसा अपरिहार्य नसतेच. ती त्याज्यच असते. शस्त्राला आत्यंतिक विरोध करणारेही असाच घोळ करतात. ते शस्त्राला विरोध करतात पण हिंसेचे समर्थन करतात. शस्त्र न धरता स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू त्यांना चालतात वा दुर्लक्षणीय वाटतात. याचे कारण हिंसा अहिंसा या बाबी नीट समजून न घेणे.

भगवान बुद्ध वा महात्मा गांधी यांच्यावर अहिंसेसाठी होणारी टीकाही यासाठीच पोरकट असते. त्या दोघांचेही कार्य माणसाच्या मनातील हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) काढून टाकण्याचे होते. त्यात आक्षेप घेण्यासारखे वा टीका करण्यासारखे काहीच असू शकत नाही. याचा प्रतिवाद करण्यासाठी लगेच गांधींची काही वचने वगैरे उद्धृत केली जाऊ शकतील. विनंती एकच की, आधी हिंसा अहिंसा याबाबत गांधींचा मुळातून आणि पूर्ण अभ्यास करावा. त्यांची चार दोन वाक्ये वा टीकाकारांची मते यावर न जाता स्वतंत्र अभ्यास करावा.

दुसरे म्हणजे, आपल्याला मान्य होते की नाही याचा काहीही विचार न करता, नियती मानवजातीला पुढे घेऊन जात असते आणि त्यासाठी युगपुरुष जन्माला घालत असते. त्यांचे कार्य मानवजातीच्या शतकांच्या किंवा सहस्रकांच्या घडणीचे असते. अनेकदा ते त्या युगपुरुषांनाही ठाऊक नसते. त्यांना माध्यम करून नियती डाव मांडत आणि मोडत असते. आपल्या छोट्याशा बुद्धीला त्याचे आकलन होईलच असे नसते. भ. बुद्ध आणि गांधीजी हे असे युगपुरुष होते.

उरला शस्त्रांचा वापर. तर जोवर बहुसंख्य मानवी मनांमध्ये हिंसा (स्वार्थ, असंयम, दुष्टता, सूड भावना, अविवेक, वाईट हेतू ) ठाण मांडून आहे तोवर ती थोपवण्यासाठी शस्त्रांचा कमीअधिक वापर होतच राहील. व्हावा लागेल. परंतु शस्त्र वापरणारा सुद्धा अहिंसक असावा लागेल. तो अहिंसक नसेल तर त्यातून अतिरेकी आणि दहशतवादी तयार होत राहतील. रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोप, मध्य आशिया आदी हिंसक आहेत आणि शस्त्रांचा वापर करतात म्हणून जगासमोर संकट निर्माण होते. भारत अहिंसक आहे आणि शस्त्र वापरतो तरीही जगासमोर संकट उत्पन्न होत नाही.

अहिंसेचे पक्षधर - ज्यांना शस्त्रे नकोत आणि हिंसेचे समर्थक - ज्यांना दहशतवाद नको; या दोघांच्याही मनातील चित्र साकार होण्यासाठी मानवी मनातील हिंसा निपटून काढली जायला हवी. मानवी मनात अहिंसा रुजायला हवी. भगवान बुद्धांना प्रणाम. 🙏

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, ५ मे २०२३

बुधवार, ३ मे, २०२३

इतस्ततः

 - चूक बरोबर करून सहजीवन आकाराला येत नाही.

- तू वाईट हे सिद्ध करून मी चांगला हे सिद्ध होत नाही.

- आदर, विश्वास मागून मिळत नाही. कमवावे लागतात.

- कायदे, नियम आततायीपणा थांबवण्यापुरते उपयोगाचे असतात.

- कायदे आणि नियमांनी सद्गुण, सदाचरण, सद्विचार निर्माण होत नाहीत.

महागाई आणि मुजोरी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी out of the way जाऊन पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले होते. अन आज रिझर्व्ह बँकेने महागाईच्या चिंतेने Monetary policy ला वेळ असताना मधेच कर्जावरील व्याजदर वाढवले. मला पडलेला एकच प्रश्न - जे पंतप्रधानांना वाटतं, जे रिझर्व्ह बँकेला वाटतं; ते भाजप समर्थकांना वाटतं का? वाटेल का? किमान महागाई आणि अर्थकारण याबाबत फक्त राजकीय मुजोरी करणं बंद होईल का? त्या मुजोरीने आपण केवळ हास्यास्पद आणि अविश्वसनीय ठरतो हे समर्थकांना कळेल तो सुदिन. कोण जबाबदार वगैरे प्रश्न नंतरचे असतात. पहिले वास्तव स्वीकारणे महत्त्वाचे असते. अन वास्तव स्वीकारणे हा मनाचा उमदेपणाही असतो.

- महागाई, inflation, stagnation, stagflation इत्यादी इत्यादी इत्यादी दोन जागतिक महायुद्धांनंतरचा अर्थकारणाचा स्वभाव झाला आहे. तेच तेच उपाय, त्याच त्याच चर्चा यांचे दळण उबग येईपर्यंत दळले जाते. होत काहीच नाही. तातडीची आणि मूलभूत गरज आहे ती 'शास्त्रीय'च्या बाहेर पडण्याची. कोणतंही शास्त्र, अगदी कोणतंही शास्त्र अंतिम नसतं, पूर्ण नसतं. जीवनाचा परीघ शास्त्रापेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे शास्त्राला जीवनाशी जोडणं, जीवनाप्रमाणे नवीन घाट देणं आवश्यक असतं. अर्थशास्त्र जीवनाशी जोडण्याची गरज फार कोणाला वाटत नाही हे दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे

४ मे २०२२

मंगळवार, २ मे, २०२३

अयोग्य

बुलढाणा जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मुस्लिमांना भोंगा भेट दिल्याची एक बातमी पाहिली. Gesture वगैरे ठीक पण तद्दन अविचारी कृती. राजकारणाने हा प्रश्न हिंदू विरुद्ध मुसलमान असा केला. पण समाजाने अक्कल गहाण ठेवावी का? मोठमोठ्या आवाजात भोंगे वाजवणे, रस्त्यावर किंवा कुठेही सामान्य व्यवहारात अडथळे येतील अशा कृती; हे चांगले की वाईट? हे योग्य की अयोग्य? मग जे चांगले, जे योग्य त्यासाठी सगळ्यांना तयार करायला हवे की नको? राजकारणी राजकारणच करणार. त्यांना तेच करायचे असते. त्यासाठी विधिनिषेध नसतात. तुमची आमची काय मजबुरी आहे? आपली आपल्याला लाज वाटणं पुन्हा सुरू व्हायला हवं आहे.

- श्रीपाद कोठे

३ मे २०२२