गुरुवार, २० एप्रिल, २०२३

हिंदुत्व

साम्यवाद, समाजवादी, इस्लाम, ख्रिश्चनीती इत्यादी वाईट वा जगाला भारभूत का आहेत? त्यांची ती नावे आहेत म्हणून का? याचं नि:संदिग्ध उत्तर आहे नाही. त्यांची ती नावे आहेत म्हणून ते भारभूत नाहीत. तर त्यांनी शिकवलेल्या, पुरस्कारलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे ते भारभूत झाले आहेत. द्वेष, सूड, प्रतिशोध, बदला, अद्दल घडवणे, वर्चस्व गाजवणे, सत्ताकांक्षा, धनाकांक्षा, आकंठ उपभोग, इच्छा- वासना- मनोभाव- यांना अवाजवी महत्व, संकुचितता, अपुरे विचार आणि त्याला मिळालेली करुणेची जोड यामुळे जन्माला घातलेली भ्रामक शब्दावली; या आणि यासारख्या बाबींमुळे हे सगळे विचार, त्यांच्या विचारधारा, त्यावर आधारित व्यवस्था आणि रचना; जगाला भारभूत झाले आहेत.

हिंदुत्व जगासाठी कल्याणदायी आहे तेही त्याचे नाव हिंदुत्व आहे म्हणून नाही. तर त्याने शिकवलेल्या, पुरस्कारिलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे. सगळ्यांचा आदर, विसरा आणि क्षमा करा वृत्ती, सहकार्याची भावना, धन आणि सत्ता हे आकांक्षेचे विषय नाहीत ही शिकवण, संयमित उपभोग, इच्छा, वासना, मनोभाव यांना मर्यादित महत्व, विशालता, पूर्ण विचार आणि त्याला करुणेची जोड यातून विकसित झालेली भ्रम उत्पन्न न करणारी शब्दावली, या आणि यासारख्या बाबींमुळे हिंदुत्व हा जगाला आधार वाटतो, भार नाही.

कोणत्याही कारणाने हिंदुत्वाचं हे कॅरॅक्टर बदललं तर ते हिंदुत्व राहणार नाही आणि जगाला आधारही देणार नाही. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूगर्भातील कणांची फक्त संख्या जरी किंचित बदलली तरी ते मूलद्रव्य काही तरी वेगळं होऊन जातं. ते ते राहत नाही. हिंदुत्वाच्या अणूगर्भातील कणांचाही गंभीर साक्षेप हवा.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा