थोड्या वेळापूर्वी डोंबिवलीहून फोन होता. 'तुमचा योगी अरविंद यांच्यावरील लेख वाचला. मला उत्तरापारा भाषणासंबंधी पुस्तक हवं आहे. कुठे, कसं मिळेल?' त्यावर बोलणं झाल्यावर थोडं अवांतर बोलले. गृहस्थ निवृत्त आहेत अन मूळ कोकणातले आहेत. गेल्या वर्षी विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद आणि अन्य सतसाहित्याची २०० पुस्तके त्यांनी खरेदी केली आणि कोकणातल्या आपल्या गावी जाऊन तेथील शाळेत दिली. मुलांनी वाचावी म्हणून. शाळेतल्या शिक्षिकांनाही आनंद झाला. किती माणसे अनामपणे काय काय करत राहतात नाही. जग चालतं ते अशा माणसांमुळेच. २००५ साली आम्ही एक उपक्रम संस्कार भारती अंतर्गत घेतला होता. संत मीराबाईंच्या जन्माला ५०० वर्षे झाल्यानिमित्त. नागपुरातल्या ३२ शाळांमध्ये मीराबाईंचे चरित्र कथाकथन रुपात सांगण्याचा. शाळांना तो कार्यक्रम इतका आवडला होता की, असा उपक्रम सतत चालवा. आम्ही वेळ देत जाऊ, असे त्यांचे म्हणणे होते. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. पण शाळांमध्ये खूप काही करता येतं. अनेक जण करतातही. पण प्रमाण खूप वाढायला हवे.
- श्रीपाद कोठे
२५ एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा