आज तीन चांगल्या गोष्टी वाचल्या.
१) विद्यापीठाच्या जागेत आठ हजार वृक्ष लावणार. हवेचा दर्जा चांगला करण्यासाठी महापालिकेला उपलब्ध झालेल्या निधीतून हे होणार आहे. अशीच छोटी छोटी पुष्कळ वनं तयार करावीत. अन सोबत छोटे छोटे अनेक पाणवठेही. पण यासोबत हवेचा दर्जा कमी करणाऱ्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्नही व्हावा. नाही तर हवेचा दर्जा आणखी आणखी खालावणार अन त्यावरचे उपाय निरर्थक होणार. असे होऊ नये.
२) कपडे खरेदी टाळा, प्रदूषण टाळा; हा लेख. लेख एका महिलेनेच लिहिला आहे हे विशेष. कारण खरेदी अन त्यातही कपडे खरेदी यासाठी महिलांचा विशेष पुढाकार असतो. हा विषय नवीन नसला तरीही नव्याने पुढे आला आहे. वास्तविक कपडेच नव्हे तर एकूणच खरेदीचा जो रोग माणसाला लागला आहे त्याचा विविध अंगांनी विचार आवश्यक झालेला आहेच.
३) प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव निर्माण करण्याच्या केंद्राच्या योजनेशी संबंधित बातमी. ही योजना चांगली आहे यात वादच नाही. ती यशस्वी होईल यावरही शंका घेण्याचे कारण नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या तलावांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा व्यवसाय होऊ नये. व्यवसाय झाल्याने कदाचित gdp वाढेल पण त्याचा मोह टाळून; नैतिकता आणि कोणीही (यात पशु पक्षी वृक्ष वेली झाडे हेही आले) तहानलेलं राहणार नाही हे समाधान यांना महत्व द्यावं. 'आमचा gdp कदाचित थोडा कमी असेल, पण आमच्या येथे कोणीही तहानलेलं नाही अन आमची नैसर्गिक प्राणवायू निर्मिती तुमच्यापेक्षा जास्त आहे' हे जगाला ठणकावून सांगण्याची तयारीही केली पाहिजे. शिवाय आज नद्यांचे पाणी अडवून जलसाठे केले जातात. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या जलसाठ्यांमुळे आता, या तलावांमधून नद्या उगम पावाव्यात.
- श्रीपाद कोठे
१ मे २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा