गॅस सिलेंडर संपलं होतं. नंबर लावला अन आज आलं. त्याला बिल दिलं अन नेहमीप्रमाणे त्याने वरचे पैसे घेतलेच. त्याला सहज म्हटलं - एकीकडे सरकार लुटते, दुसरीकडे तुम्हीही. त्याला ते लागलं. नंतर वाटलं बरं झालं आपण असं बोललो अन त्याला ते लागलं. कारण त्यावर तो मनातलं सगळं बोलला. तो म्हणाला, 'आम्हाला एका सिलेंडरमागे १४ रुपये मिळतात. दिवसाला २०-२५ सिलेंडर पोहोचवतो. गाडी आमचीच. गाडीत डिझेल आमचं. दुरुस्ती वगैरे आमचीच. गोडाऊनला जाणे. गाडी भरणे. सिलेंडर पोहोचवणे. सगळं मीच करायचं. साथीदार वगैरे नाही. कंपनी पगार देत नाही. फक्त कमिशन. काय करावं आम्ही?' खरंच वाईट वाटलं. रागही आला. अन लाजही वाटली. एका सिलेंडरचे १४ रुपये म्हणजे, दिवसाला ३५० रुपये. त्यातले १०० रुपये तरी गाडी, डीझेलवर जात असणार. कसा चालवत असेल घर? गाडीचे हप्ते कसे भरत असेल? अन तो वरचे पैसे घेतो त्याचा राग मावळला. त्याला विचारलं - 'सगळ्याच कंपन्यांचं असं आहे का?' ते काही तो सांगू शकला नाही. पण एवढं बोलला जाता जाता - 'पगार मिळाला असता तर कशाला तुम्हाला दहा वीस रुपये मागितले असते?'
एक मनात आलं - गॅस कंपन्यांचे चपराशासह general manager पर्यंतचे सगळेच कर्मचारी नक्कीच एवढ्या हलाखीत नसणार. इकडे रोज भाव वाढत असतातच. कारण त्यांचे पगार, भत्ते, बोनस सांभाळायचे असतात. नफेखोरी आणि संवेदनहीनता फोफावली आहे एवढं खरं.
खूप लिहिता येईल. बोलता येईल. ते अनेकांना न पटणारं असतं. कारण, 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' हे फक्त प्रतिज्ञेपुरतं तोंडात असतं. ते हृदयात उतरतच नाही. भारत माझा आहे अन सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण तूप फक्त माझ्या पोळीवर आलं पाहिजे. ते आलं म्हणजे बाकी काही उरतच नाही. जग हे नंदनवनच असतं. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात तरी ही प्रतिज्ञा सगळ्यांच्या हृदयात उतरो. प्रत्येक घरावर तिरंगा हा उत्सव न राहता, ती उर्मी व्हावी; हीच अमृत महोत्सवी प्रार्थना.
अशा विचारांसाठी कोणाला मला डावा वगैरे म्हणायचं असेल तर खुशाल त्याचा आनंद घ्यावा. मी मात्र 'जे का रंजले गांजले...' सांगणाऱ्या तुकोबांचा वारसा जपत राहणार.
- श्रीपाद कोठे
२५ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा