द्वेषयुक्त भाषण विरोधी कायदा करण्यावर सरकार विचार करीत असल्याची बातमी आहे. ठीक आहे. सरकार सरकारचं काम करेल. पण एखाद्याच्या मनातील द्वेष कायदा करून दूर करता येतो का? उलट कायद्याने दाबून टाकलेला द्वेष अन्य मार्गाने बाहेर पडेल. त्याचा त्रास समाजालाही होऊ शकतो किंवा त्या त्या व्यक्तीलाही. अथवा दोघांनाही. मनातला द्वेष काढून टाकणे ही मुख्य गोष्ट आहे. त्यासाठी काय करायचे यावर खलच होत नाही, तर प्रयत्न कसे होणार? द्वेष या गोष्टीची आज व्याख्या नाही त्यामुळे अडचणी येतात. कायदा करताना द्वेष या शब्दाची व्याख्या केली जाईल. अन कारवाई करताना त्याचा फायदा होईल असाही एक युक्तिवाद करता येईल. पण जगाचा अनुभव काय आहे? अमेरिकेत कालच तेथील स्वातंत्र्यदिन मिरवणुकीवर गोळीबारात सहा जण ठार झाले. याला mass shooting म्हणतात. अशा mass shooting ची कायदेशीर व्याख्या आहे. तरीही अशा घटनांमध्ये अलीकडे दररोज पन्नासेक माणसे मारली जात आहेत. काय उपयोग व्याख्येचा? 'बुद्धी' या गोष्टीची जादू आपल्यावर इतकी आहे की तिची मर्यादा लक्षात घेण्याचीच आपली तयारी नसते. व्याख्या, चर्चा, तर्क, योजना, कायदा, जबाबदारी, शिक्षा, सजा, भय; यापलीकडे आपली धाव जात नाही. दर्शनीय नसलेले घटकही मानवी जगण्यावर परिणाम करतात हे लक्षात येत नाही. वातावरण आणि मानसिक घटक याकडे खूप जास्त लक्ष दिल्याशिवाय तरणोपाय नाही. अन वातावरण आणि मानसिक घटक हे सुद्धा सुटे नसतात. आर्थिक रचना, सामाजिक discourse, इच्छा, आकांक्षा, जगण्याच्या कल्पना अशा सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या असतात. आज या दृष्टीने खूप मोठी पोकळी आहे.
- श्रीपाद कोठे
५ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा