सध्या माँ काली वरून विवाद सुरू झाला आहे. का होतात असे विवाद? कारण दृष्टी वेगवेगळी असते. मूर्त जीवनाला अमूर्ततेकडे घेऊन जाण्यासाठी प्रतिके असतात, ही हिंदू जीवनदृष्टी आहे. अन अमूर्ततेला मूर्त करण्यासाठी प्रतिके असतात, ही अन्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे प्रतीक म्हणजे ईश्वर नाही. प्रतीक हे, मानवी अपूर्णतेला आकलन झालेले ईशत्व दाखवते. ते प्रतीक हे पूर्णत्व नाही. विकासाच्या एका अवस्थेत प्रतीक बाजूला सारून पूर्णतेकडे जायचे असते. तर हिंदू व्यतिरिक्त अन्य विचार ही भेदपूर्ण सृष्टी म्हणजेच पूर्णता मानतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने प्रतीक म्हणजेच ईश्वर. अन हा ईश्वर या भेदपूर्ण मूर्ततेला साहाय्य करणारा. त्यामुळे प्रतिकांची मोडतोड त्यांना अयोग्य वाटत नाही. मग दोन गट तयार होतात. एक प्रतिकांची मोडतोड होऊ नये असे वाटणारा अन दुसरा प्रतिकांची मोडतोड झाल्यास त्यात काही गैर नाही असे वाटणारा. या वादाला अंत नाही. पण त्यातून मार्ग काढायचा असेल तर जीवनदृष्टी अधिक विस्ताराने, तपशीलाने अन तटस्थपणे वारंवार मांडावी लागेल. त्यातूनच नीट विचार विकसित होईल. अमुक गोष्ट आमची आहे एवढं पुरेसं नाही. आमची असलेली गोष्ट काय आहे? तिचे अर्थ आणि अन्वयार्थ काय? जीवनाच्या व्यापक संदर्भात त्याचे विवेचन. मर्यादा अन बलस्थाने. हे सगळंच मांडत राहावे लागेल. हे सगळं आधीच सांगून झालं आहे. अमक्या पुस्तकात आहे, तमक्याने म्हटलं आहे; याला अर्थ नाही. ते सामान्य माणसाच्या विचारांचा, विचार प्रक्रियेचा भाग झाला आहे का? हा प्रश्न आहे. तसे झाले नाही अन आमचे आणि तुमचे हाच केंद्रबिंदू झाला तर, मूर्ततेला अमूर्ततेकडे घेऊन जाणारी आध्यात्मिकता लोप पावेल. जे कोणाच्याही हिताचे नसेल.
- श्रीपाद कोठे
७ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा