अनेकांना हे जग त्यांना हवं तसं पाहिजे असतं. त्यासाठी खूप आटापिटाही चालतो त्यांचा. फक्त एक गोष्ट त्यांना लक्षात येत नाही की, हे जग आपण बनवलेलं नाही. ज्या कोणी हे बनवलं असेल (जर बनवलं असेल तर) तो काही त्यांचा बांधील नाही. या जगाचं सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग त्यानं त्याला हवं तसं केलं. ते मान्य नाही असं हे लोक म्हणू शकतील. पण त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मग अशा लोकांची चिडचिड सुरु होते. आक्रस्ताळेपणा सुरु होतो. शिवराळपणा सुरु होतो. याच्यात्याच्यावर खापर फोडणे सुरु होते. सगळ्यात गंमत केव्हा येते? अनेक जण असतात जे म्हणतात, हे जग काही माझं नाही. ते जसं आहे त्यात जुळवून घेवून चालावं. जग आपल्यानुसार चाललं पाहिजे असं म्हणणारे यांच्यावर जाम भडकतात. तुमच्यामुळेच जग असं आहे असा आरोप करतात. सगळ्यांनी आपल्यासारखंच वागलं, बोललं पाहिजे, तशीच स्वप्न पाहिली पाहिजेत, तसाच विचार केला पाहिजे; असा यांचा आग्रह. आमच्यासारखे नसतील ते चूक, अयोग्य, भरकटलेले, जगातील सगळ्या शिव्या वाहाव्या असे; असेच त्यांना वाटते. मुख्य म्हणजे यांना सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण हवे असते. म्हणजे, नियम, गृहितकं, चूक- बरोबर हेच ठरवणार (ते जगाशी मेळ खाणारे नसले तरीही) आणि स्पष्टीकरण बाकीच्यांनी द्यायचे.
काय म्हणावे अशांना?
मूर्ख शिरोमणी गडे
मूर्ख शिरोमणी...
बाकीच्यांनी काय म्हणायचे, ते त्यांचे त्यांनी ठरवायचे.
- श्रीपाद कोठे
१ जुलै २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा