काल थोडं शिवचिंतन करण्याची संधी मिळाली. त्यातील काही बिंदू -
१) हिंदू म्हणून काही अस्तित्वात आहे की नाही अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मशाल पेटवली. अन जिथे हिंदू म्हणून बोट ठेवायला जागा नव्हती त्या नकाशावर एक चिंचोळी पट्टी का होईना, हिंदू म्हणून मिळवली.
२) आता फक्त अंतिम संस्कार बाकी आहे अशा अवस्थेतील हिंदूंचं सिंहासन निर्माण केलं. पण हे करताना हिंदूपणाची दोन लक्षणे : सर्वेपि सुखीन: संतु आणि एकं सत विप्रा: बहुधा वदंती, यांचा त्याग केला नाही.
३) त्यांच्या शत्रूनेच केलेल्या नोंदीप्रमाणे, लूट वा युद्ध करताना हाती लागलेले कुराण; महाराज पवित्र भावनेने आपल्या मुस्लिम शिपायाकडे देत असत.
४) केळशीच्या याकूब बाबांचे आशीर्वाद महाराजांनी घेतले होते.
५) महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने उद्गार काढले होते - 'शत्रूची स्त्री हाती लागल्यावर तिची बेअब्रू न करता तिला परत पाठवणारा महामानव देवाघरी गेला.'
६) लढाई वा लुटीच्या वेळी कोणत्याही प्रार्थना मंदिराला धक्का लावू नये, असे महाराजांचे आदेश असत. त्यांनी सैन्यात हजारो पठाण व मुस्लिम घेतले होते. त्यांचा पायदळाचा पहिला सरसेनापती नूरखान होता. कोणीही दगाफटका केला नाही. मदारी मेहतरला सिंहासनाच्या पूजेचे काम दिले.
७) तिरुनेलवल्ली येथील महादेवाचे मंदिर पाडून बांधलेली मशीद हटवून महाराजांनी तिथे पुन्हा मंदिर बांधले.
८) धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांनी वरचा रस्ता दाखवला.
९) अन्याय व अधर्माचा प्रतिकार करताना कोणाचाही द्वेष केला नाही, सूड घेतला नाही, स्वतः अन्याय व अधर्म केला नाही.
१०) द्वेष, सूड, अन्याय, अधर्म न करताही हिंदूपद पातशाही उभी केली. तीही इतकी ऊर्जावान की, त्या चिंचोळ्या पट्टीचा विस्तार होत आज हिंदू म्हणून, काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते मणिपूर अस्तित्वात आहे.
११) आम्ही अमुक गमावले, तमुक गमावले यापेक्षा; सगळंच गेल्यानंतर आम्ही काय काय कमावले असाही विचार करता येऊ शकतो. उरलेले कमावू शकतोच आणि विस्तारही करू शकतो.
११) हाती शून्य असताना आणि आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी विपरीत परिस्थिती असताना; आपले हिंदुपण, त्या हिंदुपणातील सद्गुण सोडून देण्याची गरज महाराजांना वाटली नाही; हिंदू म्हणून असलेला सद्गुण समुच्चय न सोडता त्यांनी त्याला पुनः जीवन मिळवून दिले. मग हाती खूप काही असताना आपल्याला आपल्या सद्गुणांचं ओझं का वाटतं?
१२) यश प्रयत्नांचं असतं तसंच ज्यासाठी प्रयत्न करायचे त्या तत्त्वांच्या, त्या भावांच्या; सत्यतेचं, शुद्धतेचं अन सात्विकतेचंही असतं. कदाचित बौद्धिक तर्कविचारांनी हे पटवून देता येणं कठीण असेल; पण म्हणून ते असत्य ठरत नाही. बौद्धिक तर्कटे बाजूला सारून सत्य समजून घेण्याची आमची शक्ती आणि क्षमता आपल्याला वाढवावी लागेल.
१३) द्वेषरहित, चिंतारहित होऊन सदधर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा महाराज आणि भवानी साऱ्यांना देवो.
(सगळे संदर्भ : शककर्ते शिवराय, श्री. विजय देशमुख)
- श्रीपाद कोठे
१३ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा