आज पर्यावरण दिवस. वृत्तपत्रे त्याबाबतच्या बातम्या, लेख यांनी भरून जातील. त्यात वावगे काही नाहीच. किमान निसर्गाची, पर्यावरणाची आठवण जागी ठेवण्याचं काम होतं. हेही नसे थोडके हे खरंच आहे, पण हेही नसे पुरेसे हे त्याहून खरं आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, उपभोग मर्यादित करणे; हेही आवश्यक आणि योग्यच. परंतु हे होत नाही असा आपला अनुभव असतो. कोणत्याही स्थानिक वा जागतिक परिषदांनी ठेवलेले एकही लक्ष्य पूर्ण होत नाही. कारण? कारण या सगळ्याच्या मुळाशी भय आणि कोरडा बुद्धिवाद असतो. जीविचा उमाळा त्यात नसतो. पर्यावरण, निसर्ग याबद्दल हा जीविचा उमाळा उत्पन्न झाला पाहिजे. पंचमहाभूते, झाडे, माती, जीवजंतू, पशुपक्षी, माणसे या सगळ्यांबद्दल आतून प्रेम वाटले पाहिजे. आतून प्रेम वाटणे याचा अर्थ विवेकाला तिलांजली नाही. जीवन जगताना अनेक पण परंतु येतीलच. मात्र प्रेमाचा उमाळा असेल तर -
: स्वतःबद्दल थोडे कठोर होणे, permissible limits ला प्राधान्य न देता आणि त्यांची ढाल न करता त्याकडे अपरिहार्य म्हणून पाहणे, सहनशीलता वाढवणे; इत्यादी करता येईल. नाही तर बहाणेबाजी करून निसर्गाशी शत्रुत्व करणे सुरूच राहील.
: थोडासा पालापाचोळा, अंगाला लागणारी माती यांचा बाऊ न करता आणि सौंदर्याच्या अन आरोग्याच्या चकचकीत कल्पना बाजूस सारून योग्य अयोग्य असा विवेक करता येईल.
: शरीराच्या सुखलोलुपतेला मर्यादित करून शारीरिक श्रमांबद्दलची अनास्था आणि तिटकारा बाजूला सारता येईल.
: जाहिराती, प्रचार, बौद्धिक दहशत मोडीत काढून आपले स्वतःचे मापदंड आणि जीवनशैली विकसित करता येतील.
: सौंदर्यासोबतच प्रतिष्ठा, मानसन्मान, उच्च जीवन, high class यांच्या तकलादू आणि दिखाऊ कल्पना बासनात गुंडाळता येतील.
हे सारे केल्याशिवाय पर्यावरण आणि पर्यायाने आपण संतुष्ट होऊ शकणार नाही. त्यासाठी निसर्ग, पर्यावरण याविषयी आंतरिक उमाळा दाटो हीच प्रार्थना.
- श्रीपाद कोठे
५ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा