शनिवार, ३ जून, २०२३

गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग

आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी आणि उद्या ५ जून. म्हणजे आज तिथीने व उद्या तारखेने, गोळवलकर गुरुजींचा स्मृतिदिन. 'फुल होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक' असं त्यांचं वर्णन करण्यात येतं. त्याचं प्रत्यंतर त्यांच्या जीवनात पाहायलाही मिळतं. बॅ. मुंजे यांच्या स्मारक समितीवर सदस्य म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि बाबू जगजीवनराम यांची संमती मिळवणं काय; किंवा मृत्यूशय्येवर असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, नंतर मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यासारख्या लोकांनी त्यांना भेटायला डॉ. हेडगेवार भवनात येणे काय; 'मित्र होंगे सब विरोधक' याचंच प्रत्यंतर. त्यांच्या तिरोधानाला आज ४९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग. दोन वेगळ्या गुणांचं दर्शन घडवणारे.

१) विभाजनानंतर साधारण तीनेक आठवड्यांनी म्हणजे ९ सप्टेंबर १९४७ रोजी कराची शहरातल्या शिकारपूर कॉलोनीतील संघ कार्यालयात बॉम्बस्फोट झाला. त्यासाठी पाकिस्तान सरकारने १९ स्वयंसेवकांना अटक केली. खटला चालला आणि बॅ. खानचंदजी यांना आजीवन कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड, तर बाकीच्यांना प्रत्येकी दहा वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड, अशा शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचा अर्थ होता, या १९ जणांना पाकिस्तानच्या कारागृहातच राम म्हणावे लागणार. संघाचे नेतृत्व यासाठी पुढे सरसावले. भारत आणि पाकिस्तानातील कैद्यांचे हस्तांतरण हाच एक उपाय होता. सरदार पटेल व केंद्रीय प्रशासनाचेही सहकार्य मिळाले आणि कैद्यांच्या हस्तांतरणावर सहमती झाली. पाकिस्तानला भारताच्या कैदेतील जिना यांचे मित्र डॉ. कुरेशी हवे होते. एका कैद्याच्या बदल्यात एक अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. याचा अर्थ कुरेशीच्या बदल्यात बॅ. खानचंद परत मिळणार. पण बाकी १८ स्वयंसेवकांचे काय? श्री. गुरुजी लगेच कामाला लागले. त्यावेळचे पंजाब सरकारचे सचिव भिडे यांच्या सहकार्याने गुरुजी केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्याशी बोलले आणि कैद्यांचे हस्तांतरण व्यक्तीच्या आधारावर न होता केसच्या आधारावर व्हावे अशी भूमिका त्यांना समजावून सांगितली. काकासाहेबांनी देखील त्याला मान्यता दिली आणि फिरोजपूर येथे होणारे कैद्यांचे हस्तांतरण थांबवले. पाकिस्तानला डॉ. कुरेशी कोणत्याही स्थितीत हवा होता. त्यामुळे महिनाभरानंतर पाकिस्तानने केसच्या आधारावर हस्तांतरणास मान्यता दिली आणि सगळे १९ स्वयंसेवक भारतात परत आले. या १९ स्वयंसेवकांपैकी एक नंद बदलाणी यांना ते पाकिस्तानच्या कारागृहात असताना गुरुजींनी पाठवलेले एक गुप्त पत्रही आता उपलब्ध आहे. भारताच्या आणि संघाच्या इतिहासातील हा एक सुवर्णअध्याय आहे. कृष्णघनाची एक रुपेरी कडा आहे.

२) इ. स. १९७२ च्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रवासाअंतर्गत २५ मे रोजी ते ग्वाल्हेरच्या संघ शिक्षा वर्गात पोहोचले. वर्गाचे सर्वाधिकारी रामरतन तिवारी यांनी त्यांना 'राष्ट्र रक्षा के मोर्चे पर' हे नवीनच प्रकाशित झालेले पुस्तक दिले. भारत-पाक युद्धाच्या वेळी संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचे सचित्र वर्णन त्या पुस्तकात होते. पुस्तक पाहून गुरुजी म्हणाले, या प्रकारचे पुस्तक मी स्वीकारू शकत नाही. त्यांनी पुस्तक परत केले. सर्वाधिकाऱ्यांनी तर्क मांडला की, 'या पुस्तकातील सामुग्री भविष्यात इतिहासाचा महत्त्वाचा भाग होईल. याने संघकार्याचा प्रचारही होईल.' गुरुजींचे उत्तर होते - 'कोणी आपल्या आईची सेवा करून त्याची बातमी प्रसिद्ध करेल तर ते उचित होईल का? ते तर स्वाभाविक कर्तव्य आहे. त्यात प्रचार कसला?'

- श्रीपाद कोठे

४ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा