शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

Black money declaration

black money declaration च्या काल संपलेल्या योजनेत ६५ हजार कोटी रुपये एवढा काळा पैसा उघड झाला आहे. सुमारे ६५ हजार नागरिकांनी हा जाहीर केला आहे. हा आकडा वार्षिक अर्थसंकल्पाच्या ३-४ टक्के आहे. यातून सुमारे ३० हजार कोटी रुपये सरकारला करापोटी मिळणार आहेत. हा आकडा सुमारे १.५-२ टक्के एवढा आहे. हा आकडा फार मोठा नक्कीच नाही. पण तो लहानही नाही. चिदंबरम यांनी देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती, तो आकडा ६०-६५ हजार कोटी एवढाच होता. ठीक आहे. छोट्या प्रमाणात का होईना, काहीतरी सकारात्मक घडले.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

सर्जन- विसर्जन

आजपासून १० दिवसांचे शक्तीपर्व सुरु झाले. मां वैष्णोदेवी पासून मां कन्याकुमारी पर्यंत आणि मां कामाख्या पासून मां अंबादेवी पर्यंत संपूर्ण भारतभर, सगळ्या प्रांतात शक्तीचा हा जागर चालणार आहे. गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गापूजा आणि उत्तरेतील रामलीला यांची चर्चा होते. त्यांचे मार्केटिंग देखील चांगले झाले आहे. त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहेत. मराठी लोकांना घटस्थापना माहिती आहे. मात्र सगळ्या प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे शक्तीपर्व साजरे होते. अगदी दक्षिणेतील पाच प्रांतात सुद्धा.

या सगळ्या प्रकारच्या शक्तीपूजेत कुठे ना कुठे मातीचा संबंध आहे. घट या स्वरुपात, दुर्गा प्रतिमा या स्वरुपात किंवा तामिळनाडूतील कोलू बाहुल्या अथवा शेती अवजारांच्या पूजेच्या स्वरुपात. माती हे सर्जन आणि विसर्जन दोन्हीचं प्रतिक आहे. संपूर्ण जीव सृष्टीचं सर्जन मातीतून होतं आणि त्याचं विसर्जन सुद्धा मातीतच होतं. सिमेंटकॉंक्रीट किंवा टाईल्स किंवा फरशा यातून सर्जनही होत नाही, अन त्यात विसर्जनही होत नाही. शक्तीपूजा हे सर्जन-विसर्जन यांचं केवळ प्रतिक बनून राहू नये. शक्तीपूजा जीवनाचा, जगण्याचा भाग बनावी. आपल्या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये हे सर्जन-विसर्जन आहे. अगदी देवांचं सुद्धा. याचा आशय खूप मोठा अन जीवनव्यापी आहे. त्याचा जेवढा विचार माणूस करत जातो, तेवढं ते त्याच्या क्षणोक्षणीच्या जीवनात झिरपत जातं.

या सणांच्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने त्यांच्यामागील भावांचं कालसुसंगत प्रतिपादन सुद्धा सयुक्तिक असतं. सध्याच्या काळात सर्जन आणि विसर्जन यांचं प्रतिक असलेल्या मातीकडेच लक्ष वेधण्याची गरज आहे. अनेक प्राणी, पक्षी लुप्त होत आहेत. त्याविषयी जागृती आणि त्यांचं संगोपन यांचा प्रयत्नही सुरु झालेला आहे. हळूहळू मातीही लुप्त होईल का असा प्रश्न भेडसावू लागला आहे. शहरांमध्ये तर तशी वेळ आलेलीच आहे. सर्जन आणि विसर्जन यांचा आधार असलेली माती आता विकत घेतली जाऊ लागली आहेच. आपले अहंकार, आपले दंभ, आपले दर्प, आपली कथित सौंदर्यदृष्टी, आपला कथित आरोग्यविचार, आपले तथाकथित विकासधोरण यांनी आपण आणि माती यांची तोडलेली नाळ या शक्तीपूजेनिमित्त पुन्हा जोडून घेऊ या. विकास, आनंद, celebration इत्यादी ज्या आपल्यासाठी आहे; त्या आपलेच अस्तित्व उरणार नाही अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल तर; ज्या मातीतून आपण आलो आहोत आणि ज्या मातीत पुन्हा परतून जायचं आहे; त्या मातीशी जोडून घेऊ या.

जगदंबा आम्हाला तशी शक्ती, बुद्धी, युक्ती देवो.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

समता

समता !! काय आहे समता? समता ही मनाची एक उच्च अवस्था आहे. संपूर्ण समता हीच वास्तविक माणूस गाठू शकेल अशी सगळ्यात उन्नत अवस्था आहे. and it has to be attained. कोणतीही कारणे असोत, पण आम्ही मात्र तिला अवस्थेऐवजी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहोत. गेल्या कित्येक दशकांचा किंवा वैश्विक पातळीवर बोलायचे तर गेल्या काही शतकांचा या प्रयत्नांचा परिणाम मात्र अपेक्षेच्या नेमका विरुद्ध आहे. कारण जी बाब आंतरिक आहे, जिच्या साहाय्याने माणसाची आतली उंची वाढत जाऊन परिणामी बाह्य व्यवहार स्पृहणीय होऊन जाईल, त्या आंतरिक गुणसमृद्धीला आम्ही बाह्य व्यवहाराचा मापदंड ठरवला. आंतरिक गुण समुच्चयाच्या परिणामी बाह्य व्यवहार परिष्कृत व्हावा याऐवजी, धरून बांधून केलेल्या बाह्य व्यवहारावरून आंतरिकता जोखण्याने; खोटेपणा, फसगत, फसवणूक, लबाडी, उथळपणा हे सारे ओढवून घेतले आणि आंतरिक गुणसमृद्धीच्या ठिकाणी गुणात्मक अधोगती पदरात पाडून घेतली. समता ही बाह्य व्यवहाराचा मानदंड स्वीकारून आम्ही- १) भावना शांतवणारे भारतीय शास्त्रीय संगीत आणि भावना उत्तेजित करणारे संगीत यांना एका पातळीवर आणले, २) लहान मुले आणि वृद्ध यांना समान ठरवून त्यांच्या अधिकार आदींची भंपक मांडणी केली, ३) स्त्री आणि पुरुष समान ठरवून दोघांनाही स्वाभाविक विकासापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ४) साधने, अनुभव, वातावरण यातील फरक लक्षात न घेता ग्रामीण आणि शहरी लोकांना एकाच पारड्यात तोलू लागलो, ५) शेती आणि उद्योग यांना सारखेच मापदंड लावण्याचा वेडा अट्टाहास धरू लागलो, ६) ज्ञान आणि चावटपणा यांची गल्लत समाजाच्या माथी मारू लागलो, ७) शत्रू आणि मित्र ओळखण्याची दृष्टी गमावून बसलो, ८) जीवनातील उदात्त आणि शाश्वत गोष्टींसाठी बाजी लावणारे आणि बटबटीत हिंसक जीवनवादी यांना एकाच दृष्टीने पाहू लागलो. आंतरिक विकासाच्या असंख्य शक्यता, भावनांचा, जाणिवांचा विकास बाधित केला. परंतु मानवी विचार व्यवहाराच्या अन्य सगळ्याच बाबींप्रमाणे या बाबतीतही होते आहे. आम्हाला काय हवे आहे अथवा काय वाटते याने; आमच्या विचार व्यवहाराचे होणारे परिणाम आकार घेत नाहीत. कारण आम्ही `सत्याचा' शोध घेण्याऐवजी, `सत्याचा' मार्ग अनुसरण्याऐवजी आम्हाला काय वाटते याचा दुराग्रह धरून ठेवलेला आहे. आयुष्यभर `सत्याचा' आग्रह धरणाऱ्या महात्म्याची उद्या जयंती आहे. सगळ्यांना `सत्यमार्गाची' आस लागो हीच त्या महात्म्याने कधीही ज्याचा हात सोडला नाही त्या ईश्वराला प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१८

रक्तदान

आज राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे पण रक्तदान करता आलं नाही याची रुखरुख आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त  स्वतःच्या जन्मदिनाला दरवर्षी रक्त द्यायचं असं ठरवलं. आजवर तसं होतही आलं. त्याशिवाय वर्षातून एक दोनदा मागणीनुसार देत आलो. आतापर्यंत ५० वेळा देऊन झालं आहे. ६० चा आकडा गाठण्याची इच्छा आहे. अजून पाच वर्ष हाती आहेत. तीन चार महिन्यांपूर्वी रक्तपेढीतून फोन आला. त्याप्रमाणे गेलो. पण पहिल्यांदाच त्यांनी परत पाठवलं. हिमोग्लोबिन कमी आहे म्हणाले. मला हरकत नव्हती. म्हटलं, ही काही मोठी गोष्ट नाही. हिमोग्लोबिन लवकर पूर्ववत होईल. त्यांनी मात्र नकार दिला. आशा करतो की हिमोग्लोबिन लेव्हल त्यांना समाधानकारक होऊन पुन्हा रक्त देता येईल आणि ६० पर्यंत पोहोचता येईल. यातील 'मी'कडे दुर्लक्ष करून सदिच्छा असू द्याव्या.

सध्या देशभरातील रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या ०.९० टक्के एवढीच आहे. ती वाढायला हवी. त्यामुळे सगळ्या सुदृढ महिला पुरुषांनी वर्षाला एकदा तरी रक्त देण्याचे ठरवावे. एखादा दिवस निश्चित करता येऊ शकेल. आजकाल रक्त न देता प्लेटलेट्स देता येतात. माझा भाचा गेली काही वर्षे देतो आहे. त्याला रक्त देण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पण दोन दानामधील काळ कमी असला तरी चालतो. त्यामुळे अधिक लोकांची गरज पूर्ण करता येते. ज्याला जे योग्य वाटेल त्यानुसार करावे. सगळ्यांनी पुढाकार घ्यावा.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१९

मर्यादा

व्यक्तिगत संबंधांमध्ये मा. न्यायालये आजकाल खूप निर्णय देतात आणि मतप्रदर्शन पण करतात. यावर साधकबाधक विचार झाला पाहिजे. व्यक्तिगत संबंध हे केवळ व्यक्तिगत असतात म्हणून नाही, तर त्यांचे स्वरूप असे असते की, ते सरसकट कायद्याने define करता येत नाहीत. शिवाय त्यातील अनेक खाचाखोचा कितीही बुद्धिमान वकील किंवा न्यायाधीश असले तरीही लक्षात येतील वा समजतील असेही नसते. गुण, अवगुण, गरजा, परिस्थिती, क्षमता, स्वभाव, अन् या सगळ्यांची व्यक्तिगत संबंधात असलेली सरमिसळ ही कठोर चौकटीत बसवता येईल का? त्यामुळे व्यक्तिगत संबंधातील समस्या हाताळण्याचा वेगळ्या पद्धतींवर भर दिला पाहिजे. न्यायालयांनी देखील लोकांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. तसेच शक्यतो अशा केसेस दाखल करून घेण्यास नकारही द्यावा. छोट्या मोठ्या गोष्टीत किमान समजूतदारपणा न दाखवणाऱ्या लोकांसाठी न्याय व्यवस्थेने तरी आपला वेळ आणि ऊर्जा का खर्च करावी?

अशाच प्रकारे सरकारने काय करावे आणि करू नये याचाही विचार व्हायला हवा. जुन्या इमारती कोसळतात. त्यावेळी जुन्या इमारतींची तपासणी करण्याचे आदेश इत्यादी देण्यात येतात. त्याप्रमाणे तपासणी होते का आणि त्याचे पुढे काय होते हे ठाऊक नाही, पण या खाजगी इमारतींची तपासणी सरकारने का करावी? जोवर प्रत्यक्ष, दृश्यमान स्वरूपात समाजाला त्याचा त्रास नसेल तोवर सरकारला त्यात लक्ष घालण्याचे काय कारण? कारण जुन्या इमारतींची देखभाल इत्यादीमध्ये पुष्कळ गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. त्याची आर्थिक बाजू ही तर फारच महत्त्वाची असते. सगळ्या खाजगी जुन्या जीर्ण इमारतींची डागडुजी, बांधणी, देखभाल इत्यादी खर्च आणि अन्य बाबी सरकार करेल का? ती जबाबदारी जर सरकार घेत नसेल तर उगाच त्या लोकांमागे सरकारी ससेमिरा का लावायचा? ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडावे. आपल्या मर्यादा ओळखाव्या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

संस्कृती, व्यवस्था, कायदे, नियम, उत्तेजन, धोरणे, सल्ला, उद्दिष्टे, इत्यादी अनेक उपायांनी समाजाला सुशासित ठेवता येते, पण ते समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी लागणारी क्षमता राज्यकर्त्यांच्या ठाई अभावानेच आढळते...

कळप नसावे

सध्या प्राजक्ता माळी या अभिनेत्रीच्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे. तिला हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्नही होतो आहे. ज्यांना हिंदुत्वाला विरोध करायचा आहे त्यांनी तसे करणे ठीक आहे पण ज्यांचा हिंदुत्वाला विरोध नाही त्यांनी प्राजक्ताचे हिंदुत्ववादी projection करू नये. याच प्रक्रियेतून गांधी काँग्रेसचे, आंबेडकर दलितांचे, टिळक सवर्णांचे असे होत जाते. सावरकर हिंदूंचे याचीही प्रक्रिया अशीच असेल. मुळात या सगळ्या महापुरुषांचे विचार, भावना यांचे आवाहन अखिल मानवजातीसाठी आहे. त्यांच्या धोरणाबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु त्यांना कळपात ढकलणे हे जेवढे चुकीचे तेवढेच त्यांना कळपात स्वीकारणे हेही अयोग्य. ने मजसी ने परत मातृभूमीला... ही प्रभू रामापासून सावरकरांपर्यंत एक परंपरा आहे. तो भारताचा इथॉस आहे. विरोधकांनी असो वा समर्थकांनी त्याचा कळप बनवू नये. विचारांना, भावनांना आणि महापुरुषांना लहान करू नये. तसे न केले तर बाजू थोडी पडती झाल्यासारखे वाटेल, कळप तयार केला तर थोडा पुरुषार्थ केल्यासारखे वाटेल, संघर्षाची अन् विजयाची थोडी खुमखुमी जीरेल; पण तेवढेच. त्यापेक्षा अधिक काही नाही. आपण सगळेच मोठं होण्याचा प्रयत्न करू या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

चीड

चीड यायलाच हवी कधीकधी. प्रत्येक वेळी समजून घेण्याचा अतिरेक नकोच. अर्थात राग, चीड हेही प्रमाणात हवे. पण हवेच. कोणत्याही कारणाने अन्न बाहेर टाकणाऱ्यांबद्दल चीड यायलाच हवी. १) अन्नाचा अपमान, २) अस्वच्छता, ३) दुसऱ्यांना त्रास; यासाठी कारण ठरणाऱ्या लोकांची चीडच यायला हवी. अन्नाला आपण खूप महत्त्व देतो. सगळ्यांनी पोटभर जेवले पाहिजे (कधीकधी पोटापेक्षा जास्त झाले तरी चालेल पण आग्रह करायचा) ही आपली वृत्ती असते. कोणाला उपाशी ठेवले तर शाप लागतील असे आपल्याला वाटते. परंतु या वृत्तीचा अतिरेक झालेला आहे की काय असे वाटते. दोन घास कमी जेवावे पण अन्न टाकण्याची वेळ येऊ नये, असे सांगण्याची वेळ आलेली आहे. पाहुणे असतील तर त्यांना दोन घास कमी खाऊ घालावे किंवा स्वतः दोन घास कमी खावे पण अन्न रस्त्यावर, उघड्यावर, टाकू नये. भूकेचे शाप लागत असतील तर अन्नाचे शाप लागत नाहीत का? आपल्याला मोठाल्या मोटारी हव्यात, महागडे फोन हवेत पण वृत्ती मात्र गावंढळ. आपल्याला भूकेचे शाप नकोत पण अन्नाचे चालतात. मुळात आपण ग्राम संस्कृतीतून एका वेगळ्या नागर संस्कृतीत आलेलो आहोत. गाय खाऊन घेते, कुत्री खाऊन घेतात वगैरे करणं आपल्याला शोभत नाही. कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा यजमानाला सांगितले पाहिजे - अपेक्षित लोकांपेक्षा दहा वीस कमी संख्येचा स्वयंपाक करा. वेळेवर कमी पडलं तर काय करायचं याची पद्धत विकसित करायला हवी. कारणं सांगत अन्न फेकून वा टाकून देण्याची सवय मोडली-च पाहिजे.

अन् अन्न बाहेर टाकून दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या, अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांबद्दल आपला कटाक्ष तिटकाऱ्याचाच असला पाहिजे. मोक्ष वगैरे नाही मिळाला तरी चालेल.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२३

द्वेष प्रवचन

आज राहुल गांधी केरळमध्ये जे बोलले त्याचं मी स्वागत करतो. द्वेष करणं सोपं आहे पण योग्य नाही. त्याने राष्ट्र निर्माण होत नाही, असं ते म्हणाले. हे विचार योग्यच आहेत. फक्त एक प्रश्न विचारावा वाटतो की, त्यांचे हे विचार त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक अन् ते स्वतः यांच्यासाठीही आहेत की नाहीत. म्हणजे द्वेष बाकीच्यांनी केला तर वाईट पण आपण केला तर वाईट नाही, असे तर नाही ना? कारण महात्मा गांधीजींच्या हत्येपासून, तर आणीबाणी, त्यानंतर इंदिरा गांधी यांना झालेली अटक, नागपूरचे nsui अधिवेशन ते तहत श्री. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात येईपर्यंत; देशाचा अनुभव शंका घेण्यासारखा आहे. अन् देशाचा अनुभव केवळ ऐकीव नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या अटकेनंतर तर घरावर दगड आल्याचेही अनुभवले आहे. तेव्हा राहुलजींनी त्यांचे विचार थोडे आणखीन स्पष्ट केले तर बरे. अन् रोजच संघावर तोंडसुख घेत असतानाच आपण संघाचा द्वेष करतो की नाही हेही सांगून टाकावे. संघाचा द्वेष करत नसतील तर मोठे मन दाखवून नागपूरला भेट घ्यायला येणार का? तसेही त्यांचे भाऊ वरुणजी नागपूर संघाच्या उत्सवात आले होतेच. त्यामुळे संघाला गांधींचे वावडे नाहीच. आता आपल्याला संघाचे वावडे नाही, आपण संघाचा द्वेष करत नाही हेही स्पष्ट झाले तर दुधात साखर.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२२

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

भैणी साहिब

GNT नावाची एक वृत्तवाहिनी आहे. त्याचा full form आहे good news today. नाव इंग्रजी असलं तरी आहे हिंदी वाहिनी. त्याच्यावर पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील भैणी साहिब इथली माहिती दाखवली. तिथे बारावीपर्यंतच्या सगळ्या मुलामुलींना शास्त्रीय संगीताचं शिक्षण अनिवार्य आहे. गेल्या शंभर वर्षांपासून ही पद्धत आहे. मुलेही आवडीने शास्त्रीय संगीत शिकतात. काही मुलांनी जे शिकलो त्याची थोडी झलक दाखवली. तीही फार छान होती. सगळी मुले पुढे जाऊन गायक, वादक होणार नाहीत. पण किमान सगळ्यांचा कान आणि मन तयार होतं. गोडी लागते. अन् अनायासे शास्त्रीय संगीताची भरपूर माहिती तर होतेच होते.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०२२

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

अधीरता आणि गाणी

अधीरता (anxiety), धीराचा अभाव ही अलीकडे मोठी समस्या झाली आहे. या समस्येला खतपाणी घालणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये, आजकालची गाणी हे देखील एक कारण आहे. त्यातील शब्द, नृत्य या गोष्टी तर आहेतच पण ताल/ ठेका/ तालवाद्यांचा वापर हा खूपच मोठा भाग आहे. सामान्य आवाजात सुद्धा ऐकली तरीही त्यांचा परिणाम विपरीतच होतो. शिवाय न ऐकणाऱ्यांना त्रास हा भाग वेगळाच. घराघरात यावरून होणारे वाद हा आणखीन एक मुद्दा. शिवाय दुसऱ्यांचा विचार करणे म्हणजे पाप ही समजूत. अशा स्थितीत या गाण्यांच्या निर्मितीवरच बंदी का घातली जात नाही? हेही तर प्रदूषणच आहे नं? गाड्यांच्या प्रदूषणासाठी हजारो रुपयांचा दंड करता येऊ शकतो तर या प्रदूषणासाठी काहीच का नाही? अशी गाणी वाजवणारे 'माणूस' म्हणण्याच्याही लायकीचे नाहीत एवढे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

२४ सप्टेंबर २०१९

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कष्ट आणि पैसा

वर्तमान व्यवस्थेत केवळ लोकसंख्येचे केंद्रीकरण होत नाही तर; संपत्तीचे, सत्तेचे, निर्णय प्रक्रियेचे, उद्योगांचे, शहरांचे, साधनांचे, बुद्धिमत्तेचे; सगळ्याच गोष्टींचे केंद्रीकरण होते. संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याने आर्थिक विषमता सतत वाढत राहते. यातून एकीकडे १०२ कोटी रुपये रोज मिळवणारे बोटावर मोजण्याएवढे लोक निर्माण होतात तर, दुसरीकडे अनेक पिढ्या मिळूनही १०२ कोटी रुपये ही स्वप्नापलीकडील बाब ठरणारे बहुसंख्य तयार होतात. यातून खोटी स्वप्ने, फसवे प्रयत्न, खोटी प्रतिष्ठा तयार होत जातात. जगण्यासाठी लागणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी अधिक पैसा गाठीशी असणारे तरीही पैशाकडे धावत राहतात. त्या पैशाचे काय करणार? काय करायचे? कशासाठी? हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. पैसा हे एक व्यसन होऊन जाते. अन् ज्यांना जगताना ओढाताण करावी लागते त्यांचा सगळा वेळ त्यातच जातो. त्यांची दृष्टीही अपरिहार्यपणे, नाईलाजाने पैशाकडेच असते. जीवनाचे अन्य पैलू त्यांनाही लाभत नाहीतच.


अब्जावधी रुपये कमावणारी माणसे आपल्या कष्टाने तो कमावतात. कोणाला त्यावर आक्षेप का असावा, असा वरवर बिनतोड वाटणारा प्रश्न केला जातोच. परंतु त्यांच्या या कष्टाची तुलना कष्टकरी व्यक्तीच्या कष्टाशी होऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या तथाकथित कष्टात आणखीन काय काय मिसळलेले असते तेही ध्यानात घ्यावे लागतेच. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक शोषण किती होते; विविध ठिकाणी लाच, चापलुसी, दबाव, धमक्या इत्यादींचा वापर किती होतो; वलयाचा गैरफायदा किती घेतला जातो; संबंध कसे तयार केले जातात आणि वापरले जातात; या सगळ्याचा विचार केला तर; रोज करोडो रुपये कमावणाऱ्या लोकांच्या तथाकथित कष्टाची काळी बाजू आपोआप स्पष्ट होते. याशिवाय त्यांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षा समाजातील अन्य घटकांवर जो अप्रत्यक्ष अन्याय करते तोही गुन्हेगारीपेक्षा कमी म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०२२

(अनिवासी भारतीयांच्या बाबत आज प्रकाशित एक बातमी वाचल्यावर एकूण वर्तमान अर्थकारणात बद्दल आलेले विचार.)

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

योग नव्हे योगासन

गोष्टी सोप्या करत जाण्याला मर्यादा असावी. फार जास्त सोपिकरण गोंधळ आणि विकृती निर्माण करतात. कठीण गोष्टी समजून घेण्याची वृत्ती हवी. त्याने आपलीही उंची वाढते. उदाहरण म्हणून - योग - हा शब्द घेता येईल. योग म्हणजे कसरती नाहीत. पण हल्ली योग करतात म्हणजे कसरती करतात एवढाच अर्थ झाला आहे. मग वेगळं सांगावं लागतं की, योग म्हणजे काय ते. त्यामुळे मी किंवा ते किंवा ते किंवा ते योग करतात असे न म्हणता/ बोलता/ सांगता; योगासन करतो/ करतात असं प्रचलित करावं.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०२२


संघशाखेत विनोबाजी

संघ कार्यालयात राहणारे ज्येष्ठ प्रचारक शंकरराव तत्ववादी यांनी लिहिलेली एक आठवण काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. भूदान आंदोलनाच्या वेळी देश भ्रमण करताना, १९६० मध्ये विनोबा भावे काशीला गेले होते. त्यांना संघाच्या शाखेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आणि ते स्वीकारून विनोबा काशी येथील संघाच्या शाखेत गेले होते. तिथे थोडा वेळ बोलले होते. ही आठवण लिहिणारे शंकरराव यांनी स्वतः त्या कार्यक्रमात गीत म्हटले होते. एक ऐतिहासिक तथ्य म्हणून ही आठवण महत्त्वाची आहेच, पण भारत जोडो म्हणजे काय किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजे काय किंवा साधे सहजीवन म्हणजे काय; हे सांगणारी ही आठवण आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विनोबांना बोलावणे आणि विनोबांनी शाखेत जाणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. ही आठवण लिहिताना शंकररावांनी विनोबांचा उल्लेख पूज्य विनोबा असा केलेला आहे हेही आवर्जून सांगितले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०२२

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

जगणं म्हणजे

माणूस जगतो, वागतो म्हणजे काय? खूपदा वर्णन केलं जातं- जन्म आणि मृत्यू यांच्या मधील काळ म्हणजे जगणं. तरीही जगणं म्हणजे काय याचा उलगडा होत नाहीच. जो जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? त्यामुळे हे वर्णन फार काही पदरात टाकत नाही. मग जगतो, वागतो म्हणजे काय? तर जगणे, वागणे म्हणजे respond करणे. अगदी आईच्या पोटातून निघालेल्या बाळापासून तिरडीवर ठेवण्याच्या अवस्थेपर्यंतचा माणसाचा प्रवास म्हणजे रिस्पॉन्स देणे. प्रत्येक क्षण म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिसाद !! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजांना प्रतिसाद. अगदी कोणतीही कृती घ्या किंवा कोणताही विचार घ्या; कशा ना कशाला दिलेला तो प्रतिसाद असतो. आपण प्रत्येक जण जिला प्रतिसाद देतो, ती साद येते कोठून? ती आपल्याच आतून येते. भूक लागली की आतून साद येते. प्रश्न पडतो तो आतून येतो. कोणतीही गरज जाणवते ती आतून जाणवते आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण कृती वा विचार करतो. ही प्रत्येकाला येणारी साद वेगळी असते. म्हणूनच एकाच वातावरणात राहणारे वेगवेगळा प्रतिसाद देतात. एखादं निसर्गदृश्य किंवा चित्र किंवा अपघात किंवा घटना किंवा काहीही; त्याला किती प्रकारांनी प्रतिसाद मिळतो. का? कारण त्या बाह्य सादाला दिलेला आतला प्रतिसाद वेगळा असतो. हा आतला प्रतिसाद पुन्हा आपल्याला साद घालतो आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देतो. ही आतल्या - बाहेरच्या साद आणि प्रतिसादाची एक अखंड मालिका म्हणजे जीवन. हे प्रतिसाद आपल्या गरजा भागवण्यासाठी असतात. गरज भागली की प्रतिसाद थांबतो वा बदलतो. यातूनच सुखदु:ख, हर्षविषाद, आकर्षण अपकर्षण, उत्साह निराशा; एवढंच काय सगळं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक, शिक्षण, कला, साहित्य सगळं सगळं आकाराला येतं. सांगण्याची गरजसुद्धा साद घालते आणि त्यातून साहित्य, ग्रंथ आकाराला येतात. कला जन्म घेतात. अनेकानेक व्यवस्था याच गरजांना दिलेल्या प्रतिसादातून विकसित होतात. आपल्या गरजांचे प्रकार आणि प्रमाण यानुसार आपण विविध व्यवस्था, संघटना, गट इत्यादीत सामील होत असतो. अन गरज पूर्ण झाली की त्यातून बाहेर पडतो. एवढेच काय त्या त्या व्यवस्थेत, गटात वा संघटनेत, संस्थेत सुद्धा गरजेप्रमाणे बदल घडवून आणतो. अन आपल्याला suit होईल त्याप्रमाणेच त्यांचे आचारविचार पाळतो. याला कोणीही अपवाद नाही. कोणता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आपापल्या धार्मिक आज्ञा वा नियम आदी काटेकोरपणे पाळतो? कोणता कम्युनिस्ट कम्युनिझमच्या तत्वांचे तंतोतंत पालन करतो? किती कम्युनिस्टांनी व्यक्तिगत संपत्तीचा त्याग केलेला आहे? किती जण आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यघटना वाचली आहे? अन पूर्ण राज्यघटना वाचणाऱ्यांपैकी किती जण रोज ती वाचत वाचत आपले दैनंदिन व्यवहार करतात? जेव्हा कुठेही कधीही व्यवहाराचा संघर्ष होतो तेव्हा, घटना म्हणा, कायदा म्हणा, धर्मग्रंथ म्हणा वा कोणताही प्रमाणग्रंथ काढून त्यानुसार चर्चा सुरु होते. पण तेव्हाही फक्त चर्चाच. वरचढ ठरतात गरज आणि तिला द्यावयाचा प्रतिसाद हेच. मग काय, हे सगळे ग्रंथ, शास्त्र, घटना, व्यवस्था, संस्था, संघटना, रचना निरर्थक म्हणायच्या? नाही. त्या निरर्थक नक्कीच नाहीत. नसतात. ते वरवर चढतानासाठी आधाराचे कठडे असतात. आपल्यापूर्वी जे चढले त्यांनी तयार केलेले. तोल जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग. तसेच त्याला टेकून अंमळ दम खाता येतो. अन त्याच्या आधारे थोडे थांबून किती चढलो याचा अंदाज घेता येतो. मात्र कठडा म्हणजे शिखर नाही. जगणे म्हणजे कठडा धरून ठेवणे नाही. जगणे म्हणजे शिखर सर करणे. शिखर गाठणे. अन प्रत्येकाला हे शिखर गाठावे लागते. इतके लोक चढले, असं म्हणून भागत नाही. आपल्या पूर्वी अनेकांनी शिखर गाठले म्हणून थांबता येत नाही. आपल्या पूर्वीचेही चढले, आपल्यालाही चढायचे आहे आणि आपल्यानंतरचेही चढणारच आहेत. नव्हे शिखर चढणे हीच होऊन गेलेल्या, असलेल्या वा येणाऱ्या सगळ्यांची नियती आहे. अन प्रत्येकाला चढाईची ही सुरुवात पहिल्या पावलानेच करावी लागणार आहे. ही relay race नाही. हे शिखर सतत साद घालत असते आणि आपण त्याला प्रतिसाद देत पुढे पुढे चालत असतो. ग्रंथ, गट इत्यादी आधाराला घेऊन. शिखर चढताना असंख्य वाटावळणे. कधी वाटतं आलं शिखर अन पोहोचावं तर लक्षात येतं किती फसगत झाली ते. मग कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून बोटे मोडणे, नावे ठेवणे, आणखीन किती चालायचे आहे? असे प्रश्न उपस्थित करणे; असे सगळे सुरु असते. पण थांबता येत नाही. कारण शिखराची साद थांबू देणार नसते. शिखर गाठेपर्यंत. हो- अज्ञात शिखर गाठेपर्यंत. शिखर गाठले की मग सगळं निवांत...!!! ना प्रतिसाद देणे, ना कठडे धरणे.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१७

पाणीपुरवठा

निसर्ग सध्या भरपूर पाणी देतो आहे. बहुतेक सगळीकडे साठवण क्षमता उरलेली नाही. आणखीन मिळणारे पाणी साठवण्यासाठी असलेले वापरावे लागेल. त्यामुळे रोज पाणीपुरवठा करावा. परंतु पाऊस थांबल्यावर, पुढचे चार-पाच महिने एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. असे केल्यास उन्हाळ्यात रोज पुरवठा करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील आणि पुढील मान्सून विलंबाने आला तरीही फार ओढाताण होणार नाही. पुढले चार-पाच महिने पाण्याची गरज तशीही कमी असते. रोज पाणी देऊन लोकांची वाया घालवण्याची सवय पोसण्यापेक्षा एक दिवसाआड देऊन पाणी वापराला थोडी शिस्तही लावता येईल.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१९

कळकळ ठीक, समाजवाद नको

- वेळ आलीच तर मुले आई वडिलांनाही सांगतात, आमची जास्त काळजी करू नका.

- सरकारनेही कधी लोकांवर असं सांगण्याची पाळी आणू नये.

- समाजाविषयीची कळकळ आणि समाजवाद या भिन्न बाबी आहेत. कळकळीच्या भावनेतून समाजवाद यायला नको.

- आपल्या देशात व्यवहाराची गरज म्हणून नियम आदी राहिले आणि सोबत जीवनाच्या आदर्शांचा जागरही राहिला. त्यातून व्यक्ती आणि समाज यांचं संतुलन साधण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.

- आज आदर्शांचा जागर मोडीत काढून केवळ नियमांच्या आधारे समाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न होतो. तो अपूर्ण, चुकीचा, अयोग्य आणि घातक आहे.

- व्यक्तीने समाजाची आणि समाजाने व्यक्तीची बूज राखली तरच शांति आणि संतुलन राहील. वरचढ होण्याचा प्रयत्न विनाशकारी.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१९

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

भोंदू संतांची यादी

संत समाजाने (???) भोंदू संतांची यादी जाहीर केल्याची एक बातमी आज वाचली. गमती किती प्रकारच्या असू शकतात याची मौज वाटली. परंतु हा प्रकार इथेच थांबला तर बरे, असेही वाटले. आजच्या एकूणच engineered thought process मध्ये ज्या मुलभूत गडबडी आहेत त्यावर व्यापक चर्चा होऊन विचारपद्धतीला नवीन वळण लावण्याची गरज आहे. १) `जगणं' ही गोष्टच मुळात मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही बाबींनी मिळून साकारली आहे. २) त्याचा एक भोग पक्ष आहे, तर एक भाव पक्ष आहे. ३) परस्पर विरोधी किंवा चांगल्या आणि वाईट, हव्या असलेल्या आणि नको असलेल्या; अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती ही एकच क्रिया असते. एकाच क्रियेचा एक भाग हवासा आणि एक नकोसा असतो. एक भाग चांगला तर दुसरा वाईट असतो. वाईटाशिवाय चांगलं किंवा नकोशा गोष्टीशिवाय हवीशी गोष्ट; हे असंभाव्य आहे. `जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात' हे शाश्वत सत्य आहे. हवा असणारा प्राणवायू घेणे आणि त्याचाच नको असलेला कार्बन डायऑक्साईड तयार होऊन त्याचा त्याग करणे; ही एकच क्रिया आहे. सुग्रास अन्नाचे आंबलेले अन्न होणारच. कितीही पौष्टिक अन स्वादिष्ट अन्न खाल्ले तरीही त्यातून त्यागण्याच्याच योग्यतेची विष्ठा तयार होणारच. नव्हे ती व्हायलाच हवी. हे जसे मूर्त, दृश्य, आकलनीय गोष्टींच्या बाबतीत आहे; तसेच ते अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय गोष्टींच्या बाबतीतही असते. मात्र त्यांच्या अंगभूत मर्यादांमुळे मूर्त, दृश्य, आकलनीय भोग पक्षाचे चौकटबद्ध शास्त्र बनवता येते. वास्तविक तेही वारंवार तपासून पहावे लागते आणि बदलावेही लागतेच. ते अंतिम नसते. त्याचे अर्थही वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे असतात. अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षाची तर गोष्टच वेगळी. त्याचे धड शास्त्रही बनवता येत नाही. चाचपडत चाचपडतच अनेक गोष्टी कराव्या लागतात. धरून बांधून त्यांची चौकट तयार करणे अनिष्ट आणि घातक ठरते. धर्म, आध्यात्म, साधना इत्यादी गोष्टी या अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षात मोडतात. त्यामुळे त्या चौकटबद्ध, संघबद्ध होऊ शकत नाहीत, होऊ नयेत. हिंदूंच्या धर्मविचारात ही फार महत्वाची गोष्ट आहे. या भाव पक्षाला चौकटबद्ध, संघबद्ध न केल्यानेच त्याचा अद्भुत विकास आणि विस्तार झाला. भारताबाहेरील धर्मविचार चौकटबद्ध, संघबद्ध असल्याने तो आध्यात्मिक उंची तर गाठू शकला नाहीच उलट, त्याने मूर्त आणि अमूर्त; भोग पक्ष आणि भाव पक्ष; दोन्ही बिघडवून टाकले. आमच्यावर कोणत्याही कारणाने साचलेली भारतेतर विचारांची पुटे खरवडून काढल्याशिवाय हे लक्षात येणे कठीण आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे. `आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही' किंवा `तुम्ही म्हणता त्यात आम्ही तुमच्यापेक्षा आघाडीवर आहोत' हे प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज नाही. चुकीच्या विचारांवर पोषित आजचा मानव समाज त्याच्या पद्धतीने मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करीत असतो. त्या जाणून फेकलेल्या अथवा अजाणपणे अंथरलेल्या सापळ्यात अडकणे योग्य नाही. आजच्या बातमीच्या संदर्भात बोलायचे तर `धर्म'संघ निर्माण करणे पूर्णत: चुकीचे. `धर्म'संघ, विश्व हिंदू परिषद, आखाडे, उपासना पंथ, आश्रम हे सारे वेगवेगळे आहेत. त्यांची गल्लत होऊ नये.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ११ सप्टेंबर २०१७

देव नसण्याची श्रद्धा

'`देव नाही' असे अद्याप कोणीही सिद्ध केलेले नाही. अगदी विज्ञानानेही. देव दिसत नाही, बोलत नाही म्हणून तो नाही. पण हे अनुमान झाले, सिद्धांत नाही. उलट `देव आहे', आपण तो पाहिला आहे, त्याच्याशी बोललो आहे, असे म्हणणारे अनेक आहेत. मुळात `देव' ही पाहणे, स्पर्शणे, ऐकणे याची बाबच नसून तो याच्या अतीत आहे असा तर्क करणारेही आहेत. थोडक्यात काय तर, `देव आहे' हे जसे सिद्ध झालेले नाही; तसेच किंवा त्याहूनही अधिक `देव नाही' हेदेखील सिद्ध झालेले नाही. मग `देव नाही' असे आग्रही प्रतिपादन करून तेच सत्य आहे आणि देव मानणे ही भावना व श्रद्धा आहे, असे जे म्हणतात त्यांचे काय? सिद्ध न झालेली गोष्ट सत्य कशी काय म्हणता येईल? `देव आहे' ही जशी श्रद्धा, तशीच `देव नाही' हीदेखील श्रद्धाच नाही का?

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१५

अमेरिकेचा ढोंगीपणा

अमेरिकेचा ढोंगीपणा आणि अंतर्विरोध वेळोवेळी उघड होत असतोच. जगभरातील त्याची युद्धखोरी तर प्रसिद्धच आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ते ठळकपणे दिसतं. काल एक जण सांगत होते- तिथे उदबत्ती लावता येत नाही. कारण प्रदूषण होतं. हे नेमकं कुठलं माहीत नाही. कारण तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे कायदे आहेत. पण प्रदूषणासाठी उदबत्तीवर निर्बंध घालतानाच -

१) स्वयंचलित वाहनांनी होणारे प्रदूषण,

२) फटाक्यांनी होणारे प्रदूषण, (नववर्ष, नाताळ आणि अन्य वेळी किती आतिषबाजी होत असते)

३) औषधे, सौंदर्यप्रसाधने, air purifiers, deodorants, शेतीपासून अन्य अनेक ठिकाणी वापरण्यात येणारी रसायने,

या वा यासारख्या असंख्य गोष्टींनी होणारे प्रदूषण दुर्लक्षित केले तर चालते का?

american culture चा ढोंगीपणा आणि अंतर्विरोध तर आहेच; पण आपले अमेरिकाधार्जिणेपणही काही कमी नाही. अमेरिकेतील सगळे छान, आदर्श, अनुकरणीय इत्यादी. अन त्याचवेळी आपण, आपला देश, जीवन सगळं बोगस, त्याज्य, किळसवाणं किंवा किमान आवडू नये असं. आमचे रस्ते, व्यवस्था इत्यादी इत्यादीही. मात्र २ दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका व्हिडीओने अशा लोकांना वेगळे दर्शन घडवले आहे. १०-१२ मिनिटांचा हा व्हिडिओ अमेरिकेतील एका गणेशोत्सवाचा आहे. स्थापनेपूर्वी तिथे जी मिरवणूक काढली त्याचा. ते चित्रण पाहताना हा भारतच असावा अशी शंका यायला भरपूर वाव. कारण रस्त्यांना ठिगळे, रस्त्याच्या कडेला कागदाचे कपटे वगैरे, विजेच्या तारा लोंबत असणाऱ्या असं चित्र. अमेरिका अशीही आहे हे सांगणारं. परंतु तिथे गेलेल्यातील बहुसंख्य (काही अपवाद अर्थात आहेतच) आणि जाण्याची सुप्त इच्छा असणारे यांचे अमेरिका कौतुक मात्र विसविशीत आहे असेच वाटते.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१६

ध्वनी प्रदूषण व सिमेंट रस्ते

नागपूर शहरात ध्वनी प्रदूषण खूप वाढलं असून ५५ ठिकाणे red zone आहेत. यावर उपाय करण्यासाठी एक मोठी बैठक झाली. यात NEERI या महत्त्वाच्या संस्थेचाही सहभाग होता. त्यामुळे या प्रयत्नाला वजन प्राप्त होते. या बैठकीत ज्या उपायांची चर्चा झाली त्यात 'डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान' असा एक उपाय आहे. हा उपाय थोडा संभ्रम निर्माण करणारा वाटतो. डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान म्हणजे रस्ते डांबरीच असावेत याचा पुरस्कार का? तसे असेल तर झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या सिमेंट रस्त्यांचे काय? किंवा झाले गेले सोडून देऊन पुढे जायचे असल्यास, यापुढे सिमेंट रस्ते बंद अशी काही भूमिका असू शकते का? तसे असेल तर सध्याचा सिमेंट रस्त्यांचा निर्णय आणि आग्रह नीट विचार न करता घेतला होता असं म्हणावं का?

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०२१

ऋषीपंचमीनिमित्त मनातले दोन तरंग...


*********

मानव जातीच्या इतिहासात इतके महान लोक होऊनही जग सुंदर, सुखी का झालं नाही? हा प्रश्न प्रत्येक माणसाला कधी ना कधी पडतोच. अन हे सत्यही आहे. कोणीच हे नाकारू शकत नाही. हां, त्रास आणि दु:ख यांचे विषय आणि प्रकार बदलले असतील, पण ते संपले मात्र नाहीत. आशावादी माणसाने सारवासारव करायची आणि निराशावादी माणसाने तक्रारीचा सूर वाढवायचा हे चालूच राहतं, बदलत मात्र काही नाही. का? कारण ते कधीच बदलणार नाही. हे मान्य करायला कठीण आहे. पचायला तर त्याहून कठीण आहे. पण सत्य हेच आहे की हे जग बदलणार नाही. मग दुसरा प्रश्न येतो, महान लोकांचा उपयोग काय? महान लोकांचं प्रयोजन काय? त्यांचा उपयोग आणि प्रयोजन एवढंच की; प्रत्येक जण, प्रत्येक कण, प्रत्येक क्षण, प्रत्येक भौतिक व अभौतिक (मानसिक, भावनिक, बौद्धिक इत्यादी) तरंग; महानतेकडे निघालेला आहे हे सांगणे. प्रत्येक प्रारंभ वेगळा आहे आणि पूर्णता ही त्या प्रारंभाची नियती आहे. हा प्रवास प्रत्येकाचा स्वतंत्र आहे. इकडून तिकडून काही घेणे, काही सोडून देणे, काही टाकून देणे; असं करत करत; प्रत्येक स्पंदन, प्रत्येक तरंग, प्रत्येक सृजन, प्रत्येक निर्मिती, प्रत्येक माणूस; पूर्णतेच्या दिशेने जातो आहे. प्रत्येकाचा प्रारंभबिंदू वेगवेगळा आहे. प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे. ही प्रारंभाची वेळ आणि गती यामुळे अनंत विविधता, विषमता, संघर्ष असं सगळं दिसतं. हा प्रत्येकाचा प्रवास आहे. कोणाचाही प्रवास कोणी दुसरा करत नाही, करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणत असत, या विश्वाचे असंख्य केंद्रबिंदू आहेत पण त्याचा परीघ मात्र एकच आहे. मग काय स्वतःसाठी किंवा इतरांसाठी चांगल्याचा प्रयत्न वगैरे करायचा नाही? किंवा का करायचा? तर प्रयत्न करायचाच. प्रयत्नाशिवाय, काहीतरी केल्याशिवाय कोणीही राहूच शकत नाही. फक्त एवढेच की, काही करताना स्वतःचं किंवा जगाचं अमुक असं होईल/ होऊ शकतं/ व्हायलाच हवं/ होणारच; असं जे काही त्या कृतीला चिकटलेलं असतं, ते सोडून द्यायचं. निरपेक्ष कर्म करत राहायचं. कारण ना आपल्या ना महान लोकांच्या काही करण्याने जगबिग बदलणार आहे. तर, आपलं कर्म, आपलं करणं, आपली कृती, आपली क्रियाशीलता आपल्याला पूर्णतेकडे नेणार आहे. प्रत्येक कणाला पूर्णतेकडे नेणे हेच या जगाचं प्रयोजन आहे. जग घडवणे वगैरे मानवाचं प्रयोजन नाही.

*********

'शेवटी सत्याचाच विजय होतो' हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इथे दोन प्रश्न निर्माण होतात - १) सत्याचा विजय शेवटीच का होतो? आधी का होत नाही? नेहमीच का होत नाही? या जगाच्या रहाटगाडग्याचा शेवट ठरवायचा कसा? २) विजयी होणारी प्रत्येक गोष्ट सत्यच असते का? दोन्ही प्रश्न एकत्रितच मनात ठेवून विचार करू.

एक ताजं उदाहरण घेऊ. छगन भुजबळ निर्दोष सुटले. त्यांची बाजू सत्याची आहे का? कोणी म्हणतील हो, कोणी म्हणतील नाही. वादाला अंत नाही. मग सत्य नेमके काय? कसे ठरवायचे? थोडं आजूबाजूला पाहिलं, थोडा इतिहास चाळला, थोडी तर्कबुद्धी वापरली; तर लक्षात येतं की; विजय पराजय हा तर एक खेळ आहे. कधी उजेडाचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी सद्गुणांचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी हिंसेचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी शौर्याचा विजय होतो कधी पराजय. कधी बुद्धीचा विजय होतो कधी पराजय होतो. अगदी देवांचा सुद्धा कधी विजय तर कधी पराजय होतो. कधी प्रयत्नांचा विजय होतो कधी पराजय. कधी जीवनाचा विजय होतो कधी मृत्यूचा. कधी प्रेमाचा विजय होतो कधी द्वेषाचा. मग आपण स्वाभाविकपणे एक कौल देतो, आपल्याला पटणाऱ्या बाजूने. आपल्याला suit होईल तो शेवट आपण ठरवतो आणि आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा उद्योग करतो. थोडा बुद्धीचा ताणतणाव झाला, आपलं वाटणं सिद्ध करताना ओढाताण झाली तर आपण तडजोडीवर येतो आणि हे चक्र फिरत असतं असं म्हणायला लागतो. पण हे चक्र फिरत असतं असं म्हणताना आपल्या हे लक्षात येत नाही की, 'शेवटी विजय सत्याचा होतो' हे वाक्य अर्थहीन ठरतं आहे. कारण चक्र फिरत राहणे याचा अर्थ शेवट नाहीच. अन कधी विजय सत्याचा तर कधी असत्याचा. मनाचा हा गुंता होतो कारण 'सत्याचा विजय' याचा नीट अर्थ आपल्याला प्रतीत झालेला नसतो. सत्याचा विजय याचा अर्थ, मर्यादित सापेक्ष सत्याचा विजय असा नसतो; तर निरपेक्ष, कालातीत, सार्वकालिक, सार्वजनीन, सार्वदेशिक परम सत्याचा विजय असा त्याचा अर्थ असतो. एखाद्या मर्यादेपर्यंत जाऊन थांबणाऱ्या शारीर-मनो-बौद्धिक अस्तित्वाला प्रतीत होणाऱ्या सत्याचा तो विजय नसून, ज्यातून या सगळ्याची सुरुवात आणि ज्यात या सगळ्याचा लय; त्या परम सत्याचा तो विजय असतो. ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. दुर्गुण पराभूत होवो की सद्गुण, हिंसा पराभूत होवो की अहिंसा, एखादा गट पराभूत होवो की दुसरा, बुद्धी पराभूत होवो की भावना, एक देश पराभूत होवो की दुसरा, स्त्री पराभूत होवो की पुरुष, प्रेम पराभूत होवो की द्वेष, मृत्यू पराभूत होवो की जीवन; हे विजय आणि पराजय ज्या तत्वातून प्रसूत होतात - ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. चांगल्याचा विजय झाला तरी तेच विजयी असते आणि वाईटाचा विजय झाला तरीही तेच विजयी असते. परम सत्य नेहमीच विजयी ठरते.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१८

कठोर... पण‌ कुठे?

रस्ता अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी अधिक कठोर उपाय अवलंबिण्यात येतील, असे वाहतूक मंत्र्यांनी काल बंगलोर येथील कार्यक्रमात सांगितले. त्याचे स्वागत करतानाच फक्त एक सुचवावेसे वाटते की, हा कठोरपणा दोषींबाबत असावा. आजच्या वृत्तपत्रात नागपुरात काल झालेल्या अपघातांची जी माहिती आली आहे ती उदाहरण म्हणून घेता येईल.

नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी पडले. तीन दुचाकींना एका भरधाव मोटारीने धडक दिल्याने हा अपघात झाला. दुसऱ्या बातमीनुसार पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या बतामीतही अवजड वाहन धडकल्याने अपघात झाला असे आहे. यात दोषी कोण, निर्दोष कोण याची चर्चा करायची तर, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते का हे विचारता येईल. किंवा कोणी पदपथावर का झोपावे असे विचारता येईल. किंवा वाहनचालकांची बाजू योग्य होती की अयोग्य हेही विचारता येईल. हे सगळे प्रश्न येतीलच. त्यावर काथ्याकुट होईल. अन् मृत्युमुखी पडणारे दोषी होते असं आढळलं तर त्यांना बोलही लावला जाईल. या सगळ्यात ज्या कारणामुळे अपघात होतात त्याकडे दुर्लक्षच होईल. कायदेशीर दृष्ट्या कदाचित बेफाम गाडीचालकांना शिक्षा होईलही पण अपघात कमी होणार नाहीत अन् त्यात प्राण गमावणेही थांबणार नाही. कारण बेल्ट, हेल्मेट, दंड इत्यादी कठोर करत जाणे हे जखम पायाला अन् पट्टी कपाळाला असे आहे. चोरी करणे हा चोराचा अधिकारच आहे. तुम्ही कुलूप व्यवस्थित का लावले नाही, असे विचारण्यासारखे आहे. कठोर उपाय मूळ कारण जिथे आणि जे आहे त्यावर करायला हवेत.

सक्करदारा उड्डाणपुलावरील अपघातात बेफाम मोटार चालवणारा हाच मुख्य दोषी आहे हे स्पष्ट आहे. हाताच्या काकणाला आरसा कशाला अशी स्थिती आहे. अशा वेळी त्या दोषीला लगेच आठ पंधरा दिवसात अपघाताच्या ठिकाणीच जाहीर मृत्युदंड द्यावा. पोलिस, न्यायालय, प्रसार माध्यमे आणि सामान्य माणूस यांच्या मदतीने; संपूर्ण अधिकृतपणे ही कठोर कारवाई करावी. अनागोंदी माजणार नाही आणि कायदा हातात घेण्याची वृत्ती तयार होणार नाही, याची काळजी घेऊन हे करावे. देशभरात अशा पाचपन्नास कठोर कारवाया झाल्या की आपोआप धाक निर्माण होईल. शासनाचा धाक असलाच पाहिजे पण तो दोषींना. निर्दोष लोकांना नव्हे. आजच्या उपायांमुळे पापभिरू माणसे दहशतीत राहतात आणि मग्रूर माणसे मनास येईल तसे करत राहतात. कठोरता या मग्रूर लोकांसाठी हवी. कायदा कायदा करून सामान्य निरुपद्रवी माणसांना वेठीला धरल्यास दोनच गोष्टी होतात : शासनाला/ राज्यकर्त्यांना/ मंत्र्यांना शिव्याशाप मिळतात आणि अपघात होतच राहतात.

अपघात आणि त्यातील मृत्यू हे बाकी घटकांपेक्षा मानसिकतेचे बळी आहेत. पैसा, तंत्रज्ञान, वय, सामाजिक स्थान, आधुनिकतेच्या कल्पना, राजकीय ओळखीपळखी; यातून येणारी बेफिकिरी वृत्ती, बेपर्वा वृत्ती, अहंकार, दादागिरी इत्यादी कठोरपणे चिरडायला हवे. तसे झाल्यास अपघात आपोआप कमी होतील. बाकी कठोरपणा निरर्थक आहे.

कमीत कमी वेळात का आणि कुठे पोहोचायचे आहे? या प्रश्नावर समाजाला विचार करायला लावणेही गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०२२

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

रस्ते अपघात

सध्या रस्ते, वाहतूक यांची पुष्कळ चर्चा होते आहे. स्वाभाविकच सीट बेल्ट, हेल्मेट यांचीही चर्चा आहे. सहज एक दोन गोष्टी मनात आल्या.

- बेल्ट न लावता, हेल्मेट न घालताही बहुसंख्य लोक सुखरूप आहेत, अन् सुखरूप गाड्या चालवतात.

- शहरात एखादा अपघात वगळल्यास, वेगच कमी राहत असल्याने जीव गमावण्याचे प्रमाण कमी असतेच. मग बेल्ट, हेल्मेट यांचा अमर्याद आग्रह शहरात/ गावात असावा का?

-  रस्ते अपघातात जे जीव जातात ते वाईटच पण, अपघातांपेक्षा वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न नाही का? अपघातात चार जीव जात असतील तर चारशे लोकांचे वाहतूक कोंडीमुळे किरकोळपासून गंभीरपर्यंत नुकसान होते. शिवाय मनुष्यतास, मानवी ऊर्जा, मानवी मन, पेट्रोलियम ऊर्जा यांच्या स्वरूपात राष्ट्राचे फार मोठे नुकसान होते.

- बाकी रस्त्यांची स्थिती, सिग्नल इत्यादी इत्यादी इत्यादी आहेच.

- भर कशावर हवा? आग्रह कशासाठी हवा?

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०२२

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

संघर्ष

जीवनात प्रत्येक ठिकाणी आपण संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतो. दोन माणसांचे संबंध असोत की दोन देशांचे, संघर्ष टाळण्यालाच प्राधान्य दिले जाते. ते योग्य आहे अन आवश्यकही. पण खरंच-

१) संघर्ष पूर्णपणे टाळता येऊ शकतो का?

२) संघर्ष टाळणे केवळ आपल्यावर (म्हणजे एकावर) अवलंबून असते का?

३) संघर्ष नेहमी वाईटच असतो का?

४) संघर्ष योग्य की अयोग्य हे कसे ठरवायचे?

५) संघर्षबिंदूपर्यंत ढकलणाऱ्याचे काय करायचे?

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१३

जातीव्यवस्था

जाती व्यवस्थेबाबत बहुसंख्य लोकांचा गैरसमज आहे की, जाती तयार करून त्या लादण्यात आल्या. आजच्या संसदेप्रमाणे किंवा अन्य एखाद्या व्यवस्थेने त्या तयार करून लादल्या. खरे तर आजच्या व्यवस्थेनुसार सर्वशक्तिमान व्यवस्थाच (तुरळक अपवाद सोडल्यास) नव्हती. त्यामुळे लादण्याचा प्रश्नच नाही. जाती या विकसित होत असत. अन खरे तर जाती या सतत विकसित होत असतात. अगदी आजही. या मानवी जीवनाच्या प्रवासात विकसित होत असत. म्हणूनच सगळीकडे वेगवेगळ्या शेकडो जाती पाहायला मिळतात. त्यांचे आचार, त्यांच्या समजुती वगैरे भिन्न आहेत. काही जाती एखाद्या भागात उच्च मानल्या जातात, तर दुसऱ्या भागात निम्न. त्या तयार करून लादल्या असत्या तर असे झालेच नसते. या जाती कायम राहत असत असेही नाही. जुन्या जाती क्षीण होऊन लयाला जाणे अन नवीन जाती तयार होणे सतत चालत असे. तसेच निम्न जाती उच्च होणे अन उच्च जाती निम्न होणे हेही चालत असे. आजच्या संदर्भात पाहायचे तर- विजेचे काम करणारे, टीव्हीचे काम करणारे, संगणकाचे काम करणारे, ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारे, प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे... अशा शेकडो जाती विकसित झाल्या आहेत. त्यांच्या संघटना, त्यांचे प्रश्न, त्यांचे नफा-नुकसान हे सगळे सुरूच असते. वास्तविक, ही जगभरात अखंडपणे चालणारी बाब आहे. मात्र भारत हा एकमेव देश आहे ज्याने या स्वाभाविक, नैसर्गिक प्रक्रियेला नीट रूप देऊन तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया दुर्दैवाने मध्येच खंडित झाली. अन तिचे फक्त विकृत रूप आणि विकृत चित्रण आपल्यापर्यंत पोहोचले. मान-सन्मान, उच्च-नीचता, रोटी-बेटी निर्बंध या मानवी वैगुण्यांनी तिचे मूळ रूप व उद्देश निकालात काढले. अन ही मानवी वैगुण्ये आजच्या व्यवस्थांनाही सुरुंग लावीत आहेतच. ही मानवी वैगुण्ये व्यवस्था निर्मितनसतात, उलट व्यवस्थांना नासवून टाकतात. त्यांचा स्वतंत्र सखोल विचार व्हायला हवा. हे समजून न घेता येताजाता जाती अन जातीव्यवस्था यावर तोंडसुख घेणे, अन त्यावरून भांडत बसणे, संघर्ष करणे; फारच झाले तर मनोरंजक असू शकेल एवढेच.

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१५

तटकतोड

'इस्रो प्रमुखांनी रडायला नको होते' या मतावर काय म्हणाल?

- हे सांगणारे आपण कोण? असं मत व्यक्त करणाऱ्या टीकोजीरावांना व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे मान्य आहे की नाही?

- असं मत व्यक्त करणाऱ्यांना कशातलंही काही समजतं असं वाटत नाही.

- ज्यांना काही समजत नाही त्यांच्यासाठी वेळ, ऊर्जा वाया घालवत नाही.

- आणखीन काही हवं?

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१९

उगाच भरकटणे

जग ज्यांना माझी माणसं म्हणतं वा म्हणू शकतं त्यांना कदाचित आवडणार नाही. तरीही - 'विक्रम'चा संपर्क तुटणे हा पराजय आणि 'विक्रम'चा ठावठिकाणा सापडणे हा विजय, असं असतं का/ असावं का/ असू शकतं का? माझ्या खांद्यावर असलेले पिल्लू गाईचे आहे की बकरीचे आहे की गाढवाचे आहे की घोड्याचे आहे; हे मला निश्चित माहीत असणे पुरेसे का नसावे? कोणी तरी भरीस घालतात म्हणून लगेच अरे ला का रे करून; साध्य काय होते आणि नुकसान काय होते, याचा हिशेब मांडायला हवा की नको? माणसाला माणूसपणाच्या दिशेने नेणाऱ्या गोष्टीच करण्याचा प्रयत्न योग्य वाटतो. बाकी गोष्टी टाकून देणे वा दुर्लक्षित करणेच श्रेयस्कर. स्वतःला वाया घालवणे कसे थांबवता येईल हा माणसांच्या चिंतनाचा विषय होऊ शकला तर ते अधिक उपयोगाचे होईल, असं वाटतं.

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१९

संस्कृतीचा विस्तार

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशोदेशीचे गणेश, त्यांची मंदिरे, त्यांच्या कथा, परंपरा, रीतीरिवाज; या साऱ्याचा उहापोह होतो आहे. सोबत एक वाक्य असतं - भारतीय संस्कृती किती पसरलेली आहे, प्राचीन आहे इत्यादी. असं वाटतं की, या चर्चा अधिक खोल आणि अर्थपूर्ण व्हायला हव्यात. संस्कृती म्हणजे प्रतिमा, मंदिरे, कथा, कहाण्या, परंपरा, रीतीरिवाज नाही. संस्कृती म्हणजे या साऱ्यातून प्रवाहित होणारा भाव, विचार, चिंतन, दृष्टी, जीवनाशय. मूर्त, दृश्यमान गोष्टीतून प्रतीत होणारे अमूर्त म्हणजे संस्कृती. जसे शरीरातून प्रवाहित होणारे चैतन्य म्हणजे 'मी'. तसेच. चैतन्य विरहित शरीर असले काय, नसले काय. तसेच कला, साहित्य, शिल्प, प्रतिमा किंवा मूर्त, दृश्यमान, वचनीय अशा गोष्टीतून वाहणारी अमूर्त बाब कोणती? ती म्हणजे संस्कृती. त्याची चर्चा, त्याचे विवेचन व्हायला हवे. त्या अमूर्त भावाचा, विचारांचा, चिंतनाचा, दृष्टीचा, जीवनाशयाचा विस्तार म्हणजे संस्कृतीचा विस्तार; त्यांचा विकास म्हणजे संस्कृतीचा विकास. या अंगाने पाहिलं तर लक्षात येतं की ज्या काही खुणा आढळतात त्या बाहेरील सांगाड्याच्या खुणा आहेत. संस्कृतीचा विकास आणि विस्तार खऱ्या अर्थाने थोडाच झाला आहे. म्हणूनच एक खंडप्राय भारत वगळला तर उर्वरित ठिकाणी मानवी जीवन फारसे वेगळे नाही. गणेशोत्सव किंवा अशा निमित्ताने भारतीय संस्कृतीची चर्चा होते तेव्हा ती खऱ्या अर्थाने ज्याला संस्कृती म्हणता येईल अशा गाभ्याची जर होत राहिली तर तो मानवी जीवनाला आकार देणारा, संस्कृतीचा विकास आणि विस्तार राहील.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ८ सप्टेंबर २०१९

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

रस्ते अपघात

रस्ता अपघात यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सीट बेल्ट न लावणे यापासून रस्ता तयार करताना सादर केले जाणारे अहवाल इथवर अनेक कारणे देण्यात येत आहेत. अन् त्यावर उपाय यांचा खल होतो आहे. मात्र, रस्ते अपघातांना सर्वाधिक जबाबदार असलेल्या वेगावर मात्र कोणी बोलायला तयार नाही. वेग कमी करा हे ठणकवण्याची आज कोणाची छाती नाही. पालक, शिक्षक, मित्र, सहकारी, नेते, विचारक, संत महंत; कोणीही वाईटपणा (???) घ्यायला तयार नाहीत. आकार कमी करा, वेग कमी करा, पैसा कमी करा (कारण पैसा खूप झाला की त्यांच्यासोबत माज वाढतो); हे म्हणायलाही जीभ रेटत नाही. रस्ते अपघात कमी होणार कसे?

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०२२

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

आर्थिक महासत्ता नसावी

काल महालक्ष्मीच्या मुहूर्तावर एक बातमी झळकली - इ.स. २०३० पर्यंत भारत तिसरी आर्थिक महासत्ता होणार. मनापासून सांगतो, मला थोडं वाईट वाटलं. कारण भारतीयांच्या मनात असलेल्या महालक्ष्मी भावाशी ते विसंगत आहे. महालक्ष्मी सगळ्यांना पोषण देणारी, सगळ्यांना सुख देणारी आहे. सत्ता गाजवणे हा तिचा ना स्वभाव आहे ना धर्म. अन हा केवळ शब्दांचा खेळ नाही. त्यापाठी जीवनाला वेढून टाकणारी आशयगर्भता आहे. सायरस मिस्त्री आणि झुनझुनवाला ही दोन नावे सहजच आठवतात. दोघांचाही अंत फार दुर्दैवी आहे. पण आर्थिक महासत्ता म्हणजे काय याची ती दोन उदाहरणे आहेत. त्यांच्या अकाली अंताबाबत करुणा बाळगूनही एक मान्य करायला हवे की, महासत्तेचा हा भाव स्वीकारणीय नाही. आजचीच एक बातमीही या संदर्भात लक्षणीय आहे. पुणे - देहू या सहा पदरी रस्त्याची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे कदाचित हा रस्ता बारा पदरी करतील, नंतर अठरा पदरी किंवा असेच. किंवा सहा पदरी रस्त्यावर सहा पदरी उड्डाणपूल बांधतील. काहीही केलं तरी ते पुरणार मात्र नाही. मग माणसांना सांगितलं जाईल : बाबांनो, आता तुमच्यासाठी या पृथ्वीवर जागाच नाही. इथे रस्ते, पुल, उड्डाणपूल, विमानतळे, लोहमार्ग, कारखाने बांधायचे आहेत. तेव्हा तुम्ही इथून कुठे निघून जा. आम्ही अब्जावधी रुपये भरपाई देतो. पण जा. अन् मग त्या रस्त्यांचा, पुलांचा, गाड्यांचा उपयोग करायलाही या पृथ्वीवर कोणी उरणार नाही. आमची राक्षसी महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्वप्ने या भस्मासूरी स्तराला पोहोचली आहेत. मिडास राजाची गोष्ट माणसाने बासनात गुंडाळून ठेवली आहे. हा भस्मासूर केवळ नाही रे वर्गाची कुरकुर नाही हेच मिस्त्री व झुनझुनवाला यांचे अंत सांगताहेत. परंतु ते ऐकण्याची क्षमता कदाचित हा भस्मासूर गमावून बसला आहे.

आध्यात्मिकता ही अपूर्ण आणि असंबद्ध जगात माणसाला शांति आणि समाधान देणारी बाब आहे असे मलाही काही काळ आधीपर्यंत वाटत होते. पण आता हे लख्ख दिसू लागले आहे की, आध्यात्मिकता केवळ आतील अवकाश, आतील पोकळी भरण्यासाठी नाही. बाह्य, ऐहिक जीवनदेखील सुखी व संतुलित करण्यासाठी गरजेची आहे. भारत आणि भारतीय समाज आध्यात्मिक होता, हे विश्लेषण, भारत व भारतीय समाज आध्यात्मिक आहे, येथवर यायला हवे. त्यासाठी भारताने आर्थिक महासत्ता न होणेच इष्ट.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०२२