संत समाजाने (???) भोंदू संतांची यादी जाहीर केल्याची एक बातमी आज वाचली. गमती किती प्रकारच्या असू शकतात याची मौज वाटली. परंतु हा प्रकार इथेच थांबला तर बरे, असेही वाटले. आजच्या एकूणच engineered thought process मध्ये ज्या मुलभूत गडबडी आहेत त्यावर व्यापक चर्चा होऊन विचारपद्धतीला नवीन वळण लावण्याची गरज आहे. १) `जगणं' ही गोष्टच मुळात मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही बाबींनी मिळून साकारली आहे. २) त्याचा एक भोग पक्ष आहे, तर एक भाव पक्ष आहे. ३) परस्पर विरोधी किंवा चांगल्या आणि वाईट, हव्या असलेल्या आणि नको असलेल्या; अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती ही एकच क्रिया असते. एकाच क्रियेचा एक भाग हवासा आणि एक नकोसा असतो. एक भाग चांगला तर दुसरा वाईट असतो. वाईटाशिवाय चांगलं किंवा नकोशा गोष्टीशिवाय हवीशी गोष्ट; हे असंभाव्य आहे. `जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात' हे शाश्वत सत्य आहे. हवा असणारा प्राणवायू घेणे आणि त्याचाच नको असलेला कार्बन डायऑक्साईड तयार होऊन त्याचा त्याग करणे; ही एकच क्रिया आहे. सुग्रास अन्नाचे आंबलेले अन्न होणारच. कितीही पौष्टिक अन स्वादिष्ट अन्न खाल्ले तरीही त्यातून त्यागण्याच्याच योग्यतेची विष्ठा तयार होणारच. नव्हे ती व्हायलाच हवी. हे जसे मूर्त, दृश्य, आकलनीय गोष्टींच्या बाबतीत आहे; तसेच ते अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय गोष्टींच्या बाबतीतही असते. मात्र त्यांच्या अंगभूत मर्यादांमुळे मूर्त, दृश्य, आकलनीय भोग पक्षाचे चौकटबद्ध शास्त्र बनवता येते. वास्तविक तेही वारंवार तपासून पहावे लागते आणि बदलावेही लागतेच. ते अंतिम नसते. त्याचे अर्थही वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे असतात. अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षाची तर गोष्टच वेगळी. त्याचे धड शास्त्रही बनवता येत नाही. चाचपडत चाचपडतच अनेक गोष्टी कराव्या लागतात. धरून बांधून त्यांची चौकट तयार करणे अनिष्ट आणि घातक ठरते. धर्म, आध्यात्म, साधना इत्यादी गोष्टी या अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षात मोडतात. त्यामुळे त्या चौकटबद्ध, संघबद्ध होऊ शकत नाहीत, होऊ नयेत. हिंदूंच्या धर्मविचारात ही फार महत्वाची गोष्ट आहे. या भाव पक्षाला चौकटबद्ध, संघबद्ध न केल्यानेच त्याचा अद्भुत विकास आणि विस्तार झाला. भारताबाहेरील धर्मविचार चौकटबद्ध, संघबद्ध असल्याने तो आध्यात्मिक उंची तर गाठू शकला नाहीच उलट, त्याने मूर्त आणि अमूर्त; भोग पक्ष आणि भाव पक्ष; दोन्ही बिघडवून टाकले. आमच्यावर कोणत्याही कारणाने साचलेली भारतेतर विचारांची पुटे खरवडून काढल्याशिवाय हे लक्षात येणे कठीण आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे. `आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही' किंवा `तुम्ही म्हणता त्यात आम्ही तुमच्यापेक्षा आघाडीवर आहोत' हे प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज नाही. चुकीच्या विचारांवर पोषित आजचा मानव समाज त्याच्या पद्धतीने मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करीत असतो. त्या जाणून फेकलेल्या अथवा अजाणपणे अंथरलेल्या सापळ्यात अडकणे योग्य नाही. आजच्या बातमीच्या संदर्भात बोलायचे तर `धर्म'संघ निर्माण करणे पूर्णत: चुकीचे. `धर्म'संघ, विश्व हिंदू परिषद, आखाडे, उपासना पंथ, आश्रम हे सारे वेगवेगळे आहेत. त्यांची गल्लत होऊ नये.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ सप्टेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा