मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

चीड

चीड यायलाच हवी कधीकधी. प्रत्येक वेळी समजून घेण्याचा अतिरेक नकोच. अर्थात राग, चीड हेही प्रमाणात हवे. पण हवेच. कोणत्याही कारणाने अन्न बाहेर टाकणाऱ्यांबद्दल चीड यायलाच हवी. १) अन्नाचा अपमान, २) अस्वच्छता, ३) दुसऱ्यांना त्रास; यासाठी कारण ठरणाऱ्या लोकांची चीडच यायला हवी. अन्नाला आपण खूप महत्त्व देतो. सगळ्यांनी पोटभर जेवले पाहिजे (कधीकधी पोटापेक्षा जास्त झाले तरी चालेल पण आग्रह करायचा) ही आपली वृत्ती असते. कोणाला उपाशी ठेवले तर शाप लागतील असे आपल्याला वाटते. परंतु या वृत्तीचा अतिरेक झालेला आहे की काय असे वाटते. दोन घास कमी जेवावे पण अन्न टाकण्याची वेळ येऊ नये, असे सांगण्याची वेळ आलेली आहे. पाहुणे असतील तर त्यांना दोन घास कमी खाऊ घालावे किंवा स्वतः दोन घास कमी खावे पण अन्न रस्त्यावर, उघड्यावर, टाकू नये. भूकेचे शाप लागत असतील तर अन्नाचे शाप लागत नाहीत का? आपल्याला मोठाल्या मोटारी हव्यात, महागडे फोन हवेत पण वृत्ती मात्र गावंढळ. आपल्याला भूकेचे शाप नकोत पण अन्नाचे चालतात. मुळात आपण ग्राम संस्कृतीतून एका वेगळ्या नागर संस्कृतीत आलेलो आहोत. गाय खाऊन घेते, कुत्री खाऊन घेतात वगैरे करणं आपल्याला शोभत नाही. कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा यजमानाला सांगितले पाहिजे - अपेक्षित लोकांपेक्षा दहा वीस कमी संख्येचा स्वयंपाक करा. वेळेवर कमी पडलं तर काय करायचं याची पद्धत विकसित करायला हवी. कारणं सांगत अन्न फेकून वा टाकून देण्याची सवय मोडली-च पाहिजे.

अन् अन्न बाहेर टाकून दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या, अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांबद्दल आपला कटाक्ष तिटकाऱ्याचाच असला पाहिजे. मोक्ष वगैरे नाही मिळाला तरी चालेल.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा