शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

कळप नसावे

सध्या प्राजक्ता माळी या अभिनेत्रीच्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे. तिला हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्नही होतो आहे. ज्यांना हिंदुत्वाला विरोध करायचा आहे त्यांनी तसे करणे ठीक आहे पण ज्यांचा हिंदुत्वाला विरोध नाही त्यांनी प्राजक्ताचे हिंदुत्ववादी projection करू नये. याच प्रक्रियेतून गांधी काँग्रेसचे, आंबेडकर दलितांचे, टिळक सवर्णांचे असे होत जाते. सावरकर हिंदूंचे याचीही प्रक्रिया अशीच असेल. मुळात या सगळ्या महापुरुषांचे विचार, भावना यांचे आवाहन अखिल मानवजातीसाठी आहे. त्यांच्या धोरणाबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु त्यांना कळपात ढकलणे हे जेवढे चुकीचे तेवढेच त्यांना कळपात स्वीकारणे हेही अयोग्य. ने मजसी ने परत मातृभूमीला... ही प्रभू रामापासून सावरकरांपर्यंत एक परंपरा आहे. तो भारताचा इथॉस आहे. विरोधकांनी असो वा समर्थकांनी त्याचा कळप बनवू नये. विचारांना, भावनांना आणि महापुरुषांना लहान करू नये. तसे न केले तर बाजू थोडी पडती झाल्यासारखे वाटेल, कळप तयार केला तर थोडा पुरुषार्थ केल्यासारखे वाटेल, संघर्षाची अन् विजयाची थोडी खुमखुमी जीरेल; पण तेवढेच. त्यापेक्षा अधिक काही नाही. आपण सगळेच मोठं होण्याचा प्रयत्न करू या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा