गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

जातीव्यवस्था

जाती व्यवस्थेबाबत बहुसंख्य लोकांचा गैरसमज आहे की, जाती तयार करून त्या लादण्यात आल्या. आजच्या संसदेप्रमाणे किंवा अन्य एखाद्या व्यवस्थेने त्या तयार करून लादल्या. खरे तर आजच्या व्यवस्थेनुसार सर्वशक्तिमान व्यवस्थाच (तुरळक अपवाद सोडल्यास) नव्हती. त्यामुळे लादण्याचा प्रश्नच नाही. जाती या विकसित होत असत. अन खरे तर जाती या सतत विकसित होत असतात. अगदी आजही. या मानवी जीवनाच्या प्रवासात विकसित होत असत. म्हणूनच सगळीकडे वेगवेगळ्या शेकडो जाती पाहायला मिळतात. त्यांचे आचार, त्यांच्या समजुती वगैरे भिन्न आहेत. काही जाती एखाद्या भागात उच्च मानल्या जातात, तर दुसऱ्या भागात निम्न. त्या तयार करून लादल्या असत्या तर असे झालेच नसते. या जाती कायम राहत असत असेही नाही. जुन्या जाती क्षीण होऊन लयाला जाणे अन नवीन जाती तयार होणे सतत चालत असे. तसेच निम्न जाती उच्च होणे अन उच्च जाती निम्न होणे हेही चालत असे. आजच्या संदर्भात पाहायचे तर- विजेचे काम करणारे, टीव्हीचे काम करणारे, संगणकाचे काम करणारे, ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारे, प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे... अशा शेकडो जाती विकसित झाल्या आहेत. त्यांच्या संघटना, त्यांचे प्रश्न, त्यांचे नफा-नुकसान हे सगळे सुरूच असते. वास्तविक, ही जगभरात अखंडपणे चालणारी बाब आहे. मात्र भारत हा एकमेव देश आहे ज्याने या स्वाभाविक, नैसर्गिक प्रक्रियेला नीट रूप देऊन तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया दुर्दैवाने मध्येच खंडित झाली. अन तिचे फक्त विकृत रूप आणि विकृत चित्रण आपल्यापर्यंत पोहोचले. मान-सन्मान, उच्च-नीचता, रोटी-बेटी निर्बंध या मानवी वैगुण्यांनी तिचे मूळ रूप व उद्देश निकालात काढले. अन ही मानवी वैगुण्ये आजच्या व्यवस्थांनाही सुरुंग लावीत आहेतच. ही मानवी वैगुण्ये व्यवस्था निर्मितनसतात, उलट व्यवस्थांना नासवून टाकतात. त्यांचा स्वतंत्र सखोल विचार व्हायला हवा. हे समजून न घेता येताजाता जाती अन जातीव्यवस्था यावर तोंडसुख घेणे, अन त्यावरून भांडत बसणे, संघर्ष करणे; फारच झाले तर मनोरंजक असू शकेल एवढेच.

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा