रस्ता अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी अधिक कठोर उपाय अवलंबिण्यात येतील, असे वाहतूक मंत्र्यांनी काल बंगलोर येथील कार्यक्रमात सांगितले. त्याचे स्वागत करतानाच फक्त एक सुचवावेसे वाटते की, हा कठोरपणा दोषींबाबत असावा. आजच्या वृत्तपत्रात नागपुरात काल झालेल्या अपघातांची जी माहिती आली आहे ती उदाहरण म्हणून घेता येईल.
नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी पडले. तीन दुचाकींना एका भरधाव मोटारीने धडक दिल्याने हा अपघात झाला. दुसऱ्या बातमीनुसार पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या बतामीतही अवजड वाहन धडकल्याने अपघात झाला असे आहे. यात दोषी कोण, निर्दोष कोण याची चर्चा करायची तर, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते का हे विचारता येईल. किंवा कोणी पदपथावर का झोपावे असे विचारता येईल. किंवा वाहनचालकांची बाजू योग्य होती की अयोग्य हेही विचारता येईल. हे सगळे प्रश्न येतीलच. त्यावर काथ्याकुट होईल. अन् मृत्युमुखी पडणारे दोषी होते असं आढळलं तर त्यांना बोलही लावला जाईल. या सगळ्यात ज्या कारणामुळे अपघात होतात त्याकडे दुर्लक्षच होईल. कायदेशीर दृष्ट्या कदाचित बेफाम गाडीचालकांना शिक्षा होईलही पण अपघात कमी होणार नाहीत अन् त्यात प्राण गमावणेही थांबणार नाही. कारण बेल्ट, हेल्मेट, दंड इत्यादी कठोर करत जाणे हे जखम पायाला अन् पट्टी कपाळाला असे आहे. चोरी करणे हा चोराचा अधिकारच आहे. तुम्ही कुलूप व्यवस्थित का लावले नाही, असे विचारण्यासारखे आहे. कठोर उपाय मूळ कारण जिथे आणि जे आहे त्यावर करायला हवेत.
सक्करदारा उड्डाणपुलावरील अपघातात बेफाम मोटार चालवणारा हाच मुख्य दोषी आहे हे स्पष्ट आहे. हाताच्या काकणाला आरसा कशाला अशी स्थिती आहे. अशा वेळी त्या दोषीला लगेच आठ पंधरा दिवसात अपघाताच्या ठिकाणीच जाहीर मृत्युदंड द्यावा. पोलिस, न्यायालय, प्रसार माध्यमे आणि सामान्य माणूस यांच्या मदतीने; संपूर्ण अधिकृतपणे ही कठोर कारवाई करावी. अनागोंदी माजणार नाही आणि कायदा हातात घेण्याची वृत्ती तयार होणार नाही, याची काळजी घेऊन हे करावे. देशभरात अशा पाचपन्नास कठोर कारवाया झाल्या की आपोआप धाक निर्माण होईल. शासनाचा धाक असलाच पाहिजे पण तो दोषींना. निर्दोष लोकांना नव्हे. आजच्या उपायांमुळे पापभिरू माणसे दहशतीत राहतात आणि मग्रूर माणसे मनास येईल तसे करत राहतात. कठोरता या मग्रूर लोकांसाठी हवी. कायदा कायदा करून सामान्य निरुपद्रवी माणसांना वेठीला धरल्यास दोनच गोष्टी होतात : शासनाला/ राज्यकर्त्यांना/ मंत्र्यांना शिव्याशाप मिळतात आणि अपघात होतच राहतात.
अपघात आणि त्यातील मृत्यू हे बाकी घटकांपेक्षा मानसिकतेचे बळी आहेत. पैसा, तंत्रज्ञान, वय, सामाजिक स्थान, आधुनिकतेच्या कल्पना, राजकीय ओळखीपळखी; यातून येणारी बेफिकिरी वृत्ती, बेपर्वा वृत्ती, अहंकार, दादागिरी इत्यादी कठोरपणे चिरडायला हवे. तसे झाल्यास अपघात आपोआप कमी होतील. बाकी कठोरपणा निरर्थक आहे.
कमीत कमी वेळात का आणि कुठे पोहोचायचे आहे? या प्रश्नावर समाजाला विचार करायला लावणेही गरजेचे आहे.
- श्रीपाद कोठे
११ सप्टेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा