शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

स्थैर्याचा अभाव

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा