फेसबुक पेज वरखाली करताना एक व्हिडिओ दिसला. एक महिला आलिशान गाडी चालवत येते आणि एका ठिकाणी थांबते. खिडकीची काच खाली करते आणि भीक मागणारी काही मुलं खिडकीजवळ येतात. ती आपल्याजवळच्या पोलिथिनमधून दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब काढते अन् एकाच्या हातावर ठेवते. तोवर छोट्या छोट्या मुलामुलींची रांग तयार झाली असते. गाडीतील महिला प्रत्येकाला दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब देते. हे काम आटोपल्यावर खाली उतरते आणि त्या मुलामुलींना जवळ घेते. कोणाला मिठी मारते, कोणाचा मुका घेते. कोणाच्या डोक्यावरून हात फिरवते.
ती मुलेही खुश होतात. हसतात. फळे खातात. नव्वदेक किलोची पंचतारांकित पोशाख केलेली ती महिला आलिशान मोटारीत बसून निघून जाते. त्या महिलेची गाडी, पोशाख, व्यवहार सगळं पाहून; ती उच्चभ्रू वर्गातील असल्याचं स्पष्टच होतं. अन् तिची कृती पाहून तिच्या मनात करुणा होती हेही स्पष्ट होतं. नेमकी याच ठिकाणी सामान्यत: गल्लत होते. करूणेचं पारडं जड होतं. गरीबांना मदत ही नीती मनावर ठसते. अन् हळूच माणूस भरकटतो. त्याची विचारशक्ती खुंटते.
करुणा ही चांगली गोष्ट आहे. गरीबांना मदत ही आदर्श बाब आहे. पण मूळ प्रश्न हा आहे की, गरीबांना मदत करण्याची वेळ का येते? भुकेल्या मुलांना फळे देऊन आपल्या मनातील करुणा शांत करण्याची आणि मिळालेली फळे खाऊन आनंदी होण्याची स्थिती का उत्पन्न व्हावी?
ती महिला अमर्याद जीवनशैलीची प्रतिनिधी होती. ही अमर्याद जीवनशैलीच विषमता आणि करुणा व आनंदाचे कृतक समाधान यासाठी कारण आहे, हे लक्षात घेतले जात नाही किंवा लक्षात येत नाही किंवा दुर्लक्षित केले जाते. अमर्याद पैसा, अमर्याद स्वातंत्र्य, अमर्याद भोग, अमर्याद सुख, अमर्याद काम, अमर्याद संग्रह, अमर्याद सत्ता, अमर्याद घरे, अमर्याद फार्म हाऊसेस, अमर्याद गाड्या, अमर्याद वेग, अमर्याद तंत्रज्ञान, अमर्याद स्वप्ने, अमर्याद इच्छा... जे जे काही असेल ते अमर्याद. ही मर्यादाशून्यता विषमतेला जन्म देते. कारण अमर्यादपणाची लालसा आपली space मर्यादित करण्याला नकार देते आणि त्याच वेळी दुसऱ्यांना त्यांची space देण्यालाही नकार देते. यातून संघर्ष निर्माण होतो. ज्याला या अमर्याद संस्कृतीने स्पर्धा असं फसवं नाव दिलेलं आहे. त्या स्पर्धेत टिकला तो टिकला. पुढे गेला तो पुढे गेला. त्याचं अनावश्यक समर्थन केलं जातं. स्पर्धेतील हा विजय आपल्या अमर्यादपणाचे pampering आहे याकडे डोळेझाक केली जाते. पण कधीकधी मूळ मानवी वृत्ती उसळी मारते आणि करुणेचे शमन करण्यासाठी सेवेचा आसरा घ्यावा लागतो. हे सगळंच फार उथळ आणि दिखाऊ असतं. अमर्यादपणाचा सोस कमी करणं हाच उपाय आहे. हा उपाय कोण आणि कसा करणार? ते शक्य होईल?
- श्रीपाद कोठे
शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३
सर्वांजवळ सर्वच असेल, हे होऊ शकणार नाही.
याचा केवळ समतेच्या दृष्टीने विचार केला तर तो फार वरवरचा होईल.
प्रत्येकाला त्याच्या क्षमते नुसार काम व गरजे येवढा पैसा मिळायला हवा, हे आदर्श तत्त्वज्ञान.
आपण जरा विद्वानांच्या भाषेत बोलू....
उच्च कोटीचाया विद्वानाच्या प्रवचनाला फारच तोकडे लोक असतात व इंदूरीकरांचे समोर जागाच उरत नाही.
यात न उच्चकोटीचे चुकीचे आहेत ना इंदूरीकर. यात इंदूरीकरांनी जाहिरात केली होती वगैरे पळवाटा आहेत.
प्रश्न समरसतेचा वा जिव्हाळ्याचा आहे. जे माझ्याकडे भरभरून आहे, व इतरांकडे नाही, ते मी त्यांच्यासोबत वाटून घेणे (sharing) हा भाव महत्त्वाचा.
हाच भाव कमी होत चालल्याने कम्युनिस्ट व कम्युनलांचे फावते.
आपल्याकडे म्हणूनच लहानपणापासून वाटण्याची सवय लावतात.
मला आजही आपल्या उत्पन्नाच्या १०% समाजावर खर्च करणारे काहीजण माहित आहेत.
Kishor Paunikar मला वाटतं थोडा अधिक खोल, शब्द आणि त्यांचे अभिनिवेशी समर्थन किंवा विरोध यांच्या बाहेर पडून विचार करायला हवा. समता वगैरे मी म्हटलेले नाहीच. दुसरे म्हणजे आपण म्हणता त्या प्रमाणे प्रत्येकाला गरजे एवढे कसे मिळेल? आज जो अनिर्बंध आणि अमर्यादपणा विचार, योजना, धोरण, सिद्धांत या सगळ्यात आलेला आहे त्याने प्रत्येकाला गरजे एवढं मिळेल का? अंबानी आणि मोटारीच्या खिडकीतून फळं घेणारे यात काही वावगे वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. सगळ्यांना सगळे मिळणार नाही वगैरे तत्वज्ञान, माणसाच्या लालसा आणि हाव झाकण्यासाठी वापरले जाऊ नये. मानवी प्रयत्न सगळ्यांना सगळे मिळावे हाच असायला हवा. त्यात निसर्गत: जे कमी अधिक राहील ते राहील. पण प्रयत्न करतानाच सगळ्यांना सगळं मिळू शकत नाही याला मान्यता दिली तर तो ढोंगीपणा, स्वार्थ आणि लालसा यांचेच पोषण करेल. सर्वेपी सुखिन: संतु म्हणजे कमुनिझम वगैरे होत नाही.
Shripad Kothe रस्त्यावरचा मजूरही श्रम करतो व अंबानी पण करतो. पण अंबानी लाखो लोकांना पोसतो व मजूर मोठ्या मुष्किलीने आपले पोट भरतो.
आता अंबानीची क्षमता जास्त असल्याने तो जास्त कमावतो, हा रोष साम्यवादाकडेच झुकतो.
मजुराची क्षमता वाढणे शक्य नसल्याने अंबानीला लुटून गरीब करणे, हाच पर्याय बाकी राहतो.
त्यामुळे सर्वैपी सुखिनः म्हणजे ज्याला जितकी मुलभुत गरज आहे तितके किमान मिळणे. यासाठी जास्त साधन संपत्ती असलेला माणूस खिडकी उघडतो ही सांस्कृतिक समृद्धीच आहे.
Kishor Paunikar मोठा विषय आहे. वाद घालायला मला वेळ नाही. पण तुमची चूक होते आहे हे निर्विवाद. राग आला तरी - अधिक अभ्यास आणि चिंतन करण्याचा आणि निरपेक्ष चिंतन करण्याचा सल्ला देईन. 🙏
अन् हो, अंबानींची क्षमता जास्त वगैरे तद्दन फालतू तर्क सोडता आले तर बरं. 🙏
Shripad Kothe आपले मार्गदर्शन नक्कीच शिरोधार्य!
निरपेक्ष चिंतन वगैरे कळत नसल्यानेच मी याविषयी कुठे मार्गदर्शन मिळेल का हे शोधत असतो.
आपला रामशास्त्री बाणा मला नेहमीच आवडतो. 🙏
Kishor Paunikar गरीब, वंचित वगैरेंबद्दल बोललं की; कम्युनिझमच्या नावाने खडे फोडणारे खूप वाढले आहेत. त्यांनी फक्त दोन गोष्टी माहिती करून घ्याव्या - कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधीचा आहे आणि मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलेले - 'मी संपूर्ण भारत पालथा घातला पण मला कुठेही भिकारी दिसला नाही, घरांना कुलुपे दिसली नाहीत' - हे विधान कधीचे आहे ते माहिती करून घ्यावे. भारताने हे कसे साध्य केले होते आणि कसे साध्य केले असावे याचा विचार करावा. अन् त्यानंतर ऊर्जा आणि उत्साह उरलाच तर - 'ईशावास्यमिदं सर्वं' हा आर्थिक विचार सांगणारा मंत्र कशातला आणि कधीचा आहे हे माहिती करून घ्यावे. उथळपणे कम्युनिस्ट कम्युनिझम करत राहणारे लोक स्वार्थी, हावरट, विचारशून्य आणि संवेदनाहीन भांडवलशाही समर्थक असतात.
#श्रीपादचीलेखणी
Shripad Kothe अरेऽव्वा! आज आपण मुक्त विद्यापीठात फिरवून आणत आहात.
हे सारे मी टिपून ठेवतो. कधीतरी तर या साऱ्यांवरून नजर फिरवण्याचा योग येईलच! 🙏