सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

भस्म्या

चीनमध्ये १ ते ६ ऑक्टोबर साजऱ्या होणाऱ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ५० पदरी महामार्गावर २० किमी लांबीचा जाम लागला. सगळी वाहतूक ठप्प झाली होती. ५० पदरांचा हा मार्ग त्यावेळी काही तांत्रिक कारणांनी २० मार्गांचा करण्यात आला होता. म्हणजे वाहतुकीसाठी ५० पैकी २० मार्गच उपलब्ध होते. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली, असे त्याचे स्पष्टीकरण आहे.

एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला की त्याला जाणीवा राहत नाहीत म्हणतात. लागलं, खुपलं, रक्त आलं, चिरलं, खरचटलं, मारलं... काहीही नाही. आजच्या मानवाला जणू असाच कुष्ठरोग झाला आहे का? त्याला काही जाणवतच नाही. उलट, `अडचणींवर मात करणे म्हणजे पुरुषार्थ' या तत्वाचं महाविडंबन करण्याचा सपाटा जणू मानवाने लावला आहे. स्वत:च्या मनाचं अन बुद्धीचं इतकं स्तोम मानवाने सध्या माजवलं आहे की त्याला तोड नाही. यातूनच `मन:पूतं समाचरेत' (मन म्हणेल तसं करत सुटायचं) सुरु झालं आहे.

अतिशय निरर्थक गोष्टी करायच्या, त्यांची गौरवगीतं गायची, नवे घोळ- नवे गोंधळ निर्माण करायचे, कशाचीही काहीही पर्वा करायची नाही, जीवन आपल्याला जेवढं निरर्थक वाटतं तेवढंच इतरांनाही वाटायला हवं असा आग्रह धरायचा, तसं न वाटणाऱ्यांना हिणवत राहायचं, जीवनातील गांभीर्य- सकसता- सार्थकता- खोली- व्यापकता- यांचं अवमूल्यन करायचं, अन कोणत्यातरी अज्ञात उन्मादात चित्कारत राहायचं; हीच आधुनिकता, हीच जीवनशैली, हेच जगणं.

त्यामुळे एक पदरीचे अनेक पदरी रस्ते झाले, रस्त्यांवर उड्डाणपूल आले, उड्डाणपुलांचे मजले वाढले; आम्हाला झालेला भस्म्या रोग संपायला मात्र तयार नाही. एखाद्याला झालेला भस्म्या रोग त्याच्या मृत्यूनेच संपतो म्हणतात, माणसाला जडलेला हा भस्म्या रोग मानवजातीच्या अंताशिवाय संपणार नाही, कदाचित.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा