रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

भारतीय व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.

१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.

२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा