सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (५)

शक्तीच्या सर्वमंगल आविष्कारासाठी संतुलनशक्तीची सर्वाधिक गरज असते. या संतुलनशक्तीसाठी संयम, समजुतदारी, सात्विकता, सद्भाव अशा अनेक गुणांची गरज असते. पण या गुणांच्या संदर्भात दोन अडचणी असतात. एक म्हणजे, केवळ इच्छा केल्याने वा सांगितल्याने, बोलल्याने हे गुण निर्माण होत नाहीत. अन दुसरी अडचण म्हणजे, या गुणांची कठोर परीक्षा पाहणारी परिस्थितीही वेळोवेळी उत्पन्न होत असते.

यातील पहिली अडचण जी ही गुणसंपदा निर्माण होण्याची; त्यासाठी सातत्याने खूप प्रयत्न करावे लागतात. संस्कार, घरापासून समाजापर्यंत सर्वत्र विशिष्ट वातावरण, स्पृहणीय गुणांना अनुसरून अधिकाधिक व्यवहार करणारी भरपूर माणसे, या गुणांबद्दल सार्वत्रिक आस्था आणि आदर, या गुणांच्या बळाचं आणि मर्यादांचं भान असणारे सर्व क्षेत्रातील नेतृत्व, ही गुणसंपदा वृद्धिंगत व्हावी आणि जोपासली जावी याचा प्रयत्न करणारा बुद्धिजीवी वर्ग; अशा अनेक गोष्टी असाव्या लागतात. त्याही सतत. आज आहेत आणि उद्या नाहीत असे चालत नाही. हे सगळे असावे यासाठी किंमत चुकवावी लागते. ही किंमत आर्थिक असते, नावलौकिकाची असते, पदप्रतिष्ठेची असते, लोकमान्यतेची असते, जीवनाची असते, सन्मानाची असते, सहकार्याची असते, सोबतीची असते. आणखीनही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. ही किंमत चुकवल्याशिवाय गुणसंपदेची निर्मिती शक्य नसते. अशी गुणसंपदा भरपूर प्रमाणात निर्माण होते तेव्हाच लोकांची आंतरिक शक्ती वाढते. अन ही आंतरिक शक्ती आणि परिपक्वता वाढली की त्यातूनच संतुलनशक्ती विकसित होते. आदेश देऊन, कायदे करून, जबरदस्तीने, बलपूर्वक संतुलनशक्ती निर्माण करता येत नाही.

यासोबतच या गुणांची कठोर परीक्षा पाहणाऱ्या, दुसऱ्या अडचणीचाही विचार करावाच लागतो.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा