- इंग्रजांपासून मुक्ती मिळवल्यावर आपण इंग्रज होऊ नये. (महात्मा गांधी)
हे केवळ भाषा, रीतिरिवाज, वागणंबोलणं, खाणंपिणं, व्यवस्था यापुरतं नाही; तर दृष्टी, वृत्ती, विचार आणि तत्वज्ञान याला अनुलक्षून आहे.
*****
- माझ्या अशिक्षित परंतु समजूतदार आईने शिकवलं आहे की, माणसाला कर्तव्य असतात अधिकार नाही. (महात्मा गांधी - मानवी हक्काचा जाहीरनामा तयार करताना संयुक्त राष्ट्रसंघाने मत मागवले तेव्हा)
साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, भांडवलशाही, आधुनिकता इत्यादी अधिकारावर भर देणारे विचार गांधींशी मेळ कसे खातील?
*****
'ताशकंद फाईल्स' पाहिला अन पुन्हा गांधी आठवले - 'आपण जी सभ्यता स्वीकारण्याच्या तयारीत आहोत ती राक्षसी सभ्यता आहे. ती एक दिवस जगाला खाऊन टाकील.' आज तीच सभ्यता स्वीकारून माणूस न्याय, शांति, सुख, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात गांधींना पाण्यात पाहणारे आणि गांधींना डोक्यावर घेऊन नाचणारे दोघेही आहेत. केवळ सद्भाव आणि करुणा यांनी भागत नाही. जी समस्या आहे ती त्याहून खूप मूलभूत आहे. गांधींचं नाव घेण्याचा आग्रह असो की ते टाकून देण्याचा निर्धार असो. दोन्ही निरर्थक. मुळाचा, गाभ्याचा, तत्वाचा विचार करण्याची सुरुवात जेव्हा होईल ते खरं. मुळात विचार आणि अभ्यास यातही खूप फरक आहे. माणूस तर हा फरक समजून घेण्यापर्यंतही पोहोचलेला नाही. अजून खूप मोठा पल्ला आहे.
- श्रीपाद कोठे
२ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा