गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

पत्रकारिता

झी न्यूज के संपादक सुबीर चौधरी ने बताया कि, कल (२८ सितंबर रात को) भारत का कोई एक पत्रकार अपने मोबाईल में सेव्ह प्रधानमंत्री मोदी जी की तस्वीर दिखाकर न्युयोर्क के लोगों से पूछ रहा था- आप इन्हें पहचानते है क्या? बहुत स्वाभाविक था की न्युयोर्क में रहनेवाले अमरिकी लोग या अन्य देशों से आए लोग कहते थे- नहीं. उसका ये तमाशा कोई चैनल लाइव्ह दिखा रहा था. और ये साबित करने की कोशीश हो रही थी की- देखिये, प्रधानमंत्री मोदी जी को यहाँ कोई जानता तक नहीं. उनकी अमरिका यात्रा केवल media hype है. अब ऐसे पत्रकार और ऐसी पत्रकारिता को क्या कहेंगे? क्या ऐसे लोगों पर विश्वास किया जा सकता है? करना चाहिए? ये तो बहुत सामान्य बात है की किसी भी देश के मुखिया को अन्य देश में वहां का सामान्य नागरिक कम ही पहचानेगा. बराक ओबामा की तस्वीर कितने भारतवासी पहचान सकेंगे? इसका अर्थ यह तो नही होता की उनका कोई महत्व नही या उनकी कोई ताकत या हैसियत नही. ऐसी पत्रकारिता पर सिर्फ दया आ सकती है.

- श्रीपाद कोठे

३० सप्टेंबर २०१४

प्रेरणा माणुसकीच्या

आज दोन बातम्या पाहिल्या. एका सरदारजीने आपली पगडी सोडून, तिच्या साहाय्याने बुडणाऱ्या युवकांचे प्राण वाचवले. दुसरी बातमी- एक बिबट्या पाणी प्यायला गेला अन पाणी पिता पिता त्याचा पूर्ण चेहरा स्टीलच्या घागरीत अडकला. मोठी जोखीम घेऊन, प्रयत्नपूर्वक लोकांनी त्याला वाचवले.

निव्वळ भौतिक, आर्थिक लाभहानीच्या पलीकडच्या प्रेरणाच माणसाला माणूस बनवतात. अन मुळात त्या असतातच. त्यांचं जागरण, त्यांची चर्चा, त्यांच्यासाठी पोषक वातावरण, त्यांच्या संवर्धनाची खटपट, त्यांची जोपासना, त्यांना प्राधान्य, त्यांना उचलून धरणे; यावर अधिक भर देण्याला पर्याय नाही. असंख्य अनावश्यक गोष्टी कमी करून त्या गोष्टींकडे लक्ष दिले तर आणि कदाचित तरच, भविष्य बरं राहील. हिशेब शिकवत राहणे अन हिशेब करत राहणे बिघाडच करत राहतील.

- श्रीपाद कोठे

३० सप्टेंबर २०१५

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

बुद्ध आणि शिवाजी

परवा मोदीजी म्हणाले, 'भारताने जगाला बुद्ध दिला.' आज भिडे गुरुजींनी त्यावर आक्षेप घेतल्याची बातमी पाहिली. हे योग्यही झालं अन अयोग्यही. योग्य यासाठी की, भ. बुद्धाला अवतार वगैरे ठरवल्यानंतरही समग्र हिंदू समाजाने तसं मानलेलं नाही, हे स्पष्ट झालं. या वास्तवावर वाद घालण्यापेक्षा असं ठरवून वगैरे सगळ्यांची मान्यता मिळणे शक्य असते का, या प्रश्नाचा विचार व्हायला हवा. हे केवळ बुद्धाच्या बाबतीतच नाही तर वेद, श्रीराम, श्रीकृष्ण, येशू, पैगंबर साहेब, मार्क्स, अब्राहम लिंकन, मदर टेरेसा, न्यूटन, आइन्स्टाइन, विज्ञान, लोकशाही.... किंवा गेला बाजार अगदी श्रीपाद कोठे; यांच्या बाबतीतही लागू होतं. मुळातच असं मतैक्य वगैरे या फक्त कल्पना असतात. प्रत्यक्षात सर्वसाधारण पद्धतीने, विवेकाने, तारतम्यानेच विचार व्यवहार करावा लागतो. मतैक्य वगैरेचा आक्रस्ताळे पणा समर्थनीय म्हणता येत नाही.

दुसरा मुद्दा भिडे गुरुजींच्या प्रत्यक्ष आक्षेपाचा. भारताने जगाला बुद्ध नाही तर शिवाजी इत्यादी दिले असं त्यांचं म्हणणं. अगदी बरोबर आहे. पण शिवाजी कशासाठी? समर्थांच्या शब्दात 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया' यासाठी किंवा 'गो ब्राम्हण प्रतिपालना'साठीच ना? शौर्य, पराक्रम, रिपू निर्दालन या गोष्टी नाकारता येत नाहीतच, त्या योग्यच आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी अंतिम नाहीत. शौर्याला मानवी जीवनाचा आदर्श मानणारी रॉबिनहूड संकृती ही भारतीय संस्कृती नाहीच. शौर्य कोणत्या हेतूने केलेलं आहे त्यावर त्याची स्वीकार्यता किंवा अस्वीकार्यता अवलंबून असते. शौर्यासाठी शौर्य नाही तर, पूर्णतेचा जो आदर्श इथल्या माणसाने प्रस्थापित केला त्यासाठी शौर्य; हा आहे भारत. भगवान बुद्ध हे त्या पूर्णत्वाचं एक नाव आहे. शौर्यासाठी शौर्य या आदर्शानेच जगात आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, पांथिक संघर्ष जन्माला घातले, पोसले आणि सुरू ठेवले. त्यातून मार्ग काढण्यासाठीच शौर्याचा हेतू आणि अधिष्ठान सिद्ध करायला हवे. भगवान बुद्ध हे त्या हेतूचे आणि अधिष्ठानाचे एक नाव आहे. मोदीजींनी तेच जगासमोर मांडले आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २९ सप्टेंबर २०१९

हृदयविकाराचे मूळ

आज 'हृदय दिन' आहे, 'हृदयविकार दिन' आहे; असे दोन व्हर्शन्स वाचण्यात आले. नेमकं काय माहिती नाही. पण दोन्हीऐवजी, 'हृदयस्वास्थ्य दिन' असं असावं अशी माझी सूचना. चळवळ्या कार्यकर्त्या लोकांना वाटलं तर त्यांनी यासाठी प्रयत्न करावा. ते असो. तर या दिनानिमित्त माहिती, चर्चा, मुलाखती हे सगळं शिस्तीने होईलच. ते आवश्यकही आहेच. योग्यही. या सगळ्यात आकडेवारी, वाढघट यासोबत विश्लेषणही असतं. त्यात न चुकता येणारा मुद्दा म्हणजे, ताणतणाव आणि जीवनशैली. प्रदूषण इत्यादी बाकीचे विषयही असतातच. पण मुख्य जीवनशैली. याबाबत दुमत नसतं आणि दुमत होण्याचं कारणही नाही. त्यामुळे जीवनशैली बदलायला हवी यावर भर देऊन, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा विचार केला जातो. मात्र यापलीकडे जाताना कोणी दिसत नाही. मनातील सुप्त द्वंद्व यासाठी कारण असावे. कारण जीवनशैली बदलायला हवी एवढं म्हणून उपयोगाचं नाही. या नको असलेल्या जीवनशैलीच्या मुळाशी काय आहे? ही जीवनशैली का आणि कशी विकसित झाली? ही बदलायची असेल तर मुळातून काय काय करावे लागेल? हे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा विचार केला तर तो शोध आम्हाला घेऊन जातो, जीवनाचं तत्त्वज्ञान बदलण्याच्या गरजेपर्यंत. अन नेमकी इथेच मेख आहे. कारण आज मानवाने स्वीकारलेले संपत्ती, सत्ता, स्पर्धा, संचय, उपभोग यांचे जीवनतत्त्वज्ञान सोडण्याची आपली समाज म्हणून तयारी नाही. आजच्या स्वीकृत जीवन तत्त्वज्ञानाची ओढ आणि मोह आम्ही सोडू शकत नाही. मग मैत्री, बोलणे, व्यक्त होणे, सामूहिक उपक्रम, व्यायाम, अवकाश अशाच चौकटीत आपले उपाय फिरत राहतात. व्यवहारात फार काही बदलत नाही. बाह्यतः काहीही केलं तरी मन दुसरीकडेच घुटमळत राहतं. मुख्य म्हणजे जी जीवनशैली योग्य आहे असं बुद्धीला वाटतं ती आचरण्याचं तार्किक आणि तात्त्विक बळ आम्हाला लाभतच नाही. कारण आमच्या लोभ आणि मोहापायी जीवनाच्या सत्याला सामोरे जाण्याचेच आम्ही टाळतो. आमची स्वप्ने, शब्दावली या गोष्टी बदलायला देखील आम्ही भितो. आज धरलेलं सोडलं तर करायचं काय, यासारखे भाबडे प्रश्न मग सतावायला लागतात. अन सर्व क्षेत्रातील नेतृत्व बोटचेपेपणा करत रोखठोक बोलायला, सांगायला घाबरतं. कोणाला काय वाटेल, काय वाटेल याची इतकी प्रचंड भीती माणसांना व्यापून आहे की विचारता सोय नाही. शिवाय संतत्वाचं आणि सात्विकतेचं विचित्र भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे ते निराळंच. योग्य अयोग्य सांगताना कठोर व्हावं लागलं तरी व्हायला हवं. पण त्यासाठी कोणाची तयारी नाही. सगळ्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. हे असंच सुरू राहील की बदलेल? काळच सांगू शकेल.

- श्रीपाद कोठे

२९ सप्टेंबर २०२१

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

शास्त्रीय संगीत

सहज रिमोटची बटनं दाबत होतो. डीडी-भारती वाहिनी लागली. तिथे चक्क भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे तो राहू दिला. पूर्ण ऐकला. पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे गायन आणि राजेंद्र प्रसन्न यांचं बासरीवादन अशी जुगलबंदी सुरु होती. नव्हाळीचं म्हणून आणि गायन-वादन चांगलं होतं म्हणून ऐकत होतो, पण ऐकताना वारंवार मनात येत होतं- दुपारी एक वाजता राग ललित ऐकायचा म्हणजे थोडं जास्तंच, नाही का? राग ललित सकाळचा राग आहे. दुपारी मधुवंती, सारंग वगैरे लावावे; हे दूरदर्शनच्या लोकांना माहिती असणे कठीण आहे. शिवाय सकाळी शास्त्रीय संगीतासाठी वेळ आहे का? वगैरे तांत्रिक कारणेही असतीलच. एक मात्र खरं की, शास्त्रीय संगीताकडे होणारं दुर्लक्ष थोडं तरी कमी व्हायला हवं आणि संबंधित लोकांचं त्याबद्दलचं ज्ञान जरा वाढायला हवं.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०१४

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

विसर्जन टाकी

काल सोनेगाव तलावावर गणेश विसर्जनासाठी जाण्याचा योग आला. तिथे आवडलेली अन सगळ्यांना सांगावीशी वाटलेली गोष्ट म्हणजे विसर्जन व्यवस्था. आजकाल प्रदूषण समस्येमुळे निर्माल्य वेगळे काढणे, ते गोळा करण्याची व्यवस्था अन कृत्रिम टाक्यात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यासाठी तेथे मोठे कलश तर आहेतच, पण विसर्जनासाठी तलावाला लागूनच एक पोहोण्याच्या टाक्यासारखे मोठे १२ फूट खोल सिमेंटचे टाकेच बांधले आहे. कृत्रिम वगैरे नाही खरेखुरे. त्यात गणेश विसर्जन करताना तलावातच विसर्जन केल्यासारखे वाटते. हा `फील' येणेही महत्वाचे असतेच. अनेक जण कृत्रिम तलावात विसर्जन करत नाहीत कारण तो `फील' येत नाही. पुण्यालाही गणेश विसर्जन करण्याचा २-४ दा योग आला. पण नदीच्या काठावर असलेल्या टाक्या फारच कृत्रिम वाटतात. डबक्यासारख्या. गणपती पाण्यात बुडवणे असाच `फील' तेथे आला. पण सोनेगाव तलावावरील आटोपशीर टाके गणेश विसर्जन केल्याचे समाधानही देते. सगळीकडे अशी व्यवस्था झाली तर लोकांचा प्रतिसादही चांगला मिळू शकेल.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१५

संस्कृत

जगभरातील ९७ टक्के भाषा संस्कृतने प्रभावित आहेत असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटल्याची माहिती वाचायला मिळाली. संस्कृत शब्दकोशात सर्वाधिक म्हणजे १ अब्ज ७८ कोटी ५० लाख शब्द आहेत. जगातील कोणत्याही भाषेत एवढी शब्दसंख्या नाही. संस्कृत ही सगळ्यात स्पष्ट बोलली जाणारी भाषा असून जिभेचे सगळे स्नायू त्यासाठी उपयोगात आणले जातात. कठीणातले कठीण उच्चार संस्कृतच्या सरावाने शक्य होतात. सहाव्या सातव्या पिढीच्या संगणकाचा आधार संस्कृत भाषा राहील.

एवढी सगळी माहिती कानी पडल्यावर मनात म्हटलं- शिक्षण क्षेत्राचंच नव्हे तर सगळ्या समाजाचंच अधिकाधिक भगवीकरण होवो. शेवटी `करण' कोणत्या रंगाचं आहे यापेक्षा समाजाचं, जगाचं भलं होणं जास्त महत्वाचं नाही का? संयुक्त राष्ट्रसंघाला अन जगाला भगवीकरणाचं वावडं नाही हे किती चांगलं आहे नाही.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१५

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

विपर्यास

'आरक्षण मुद्यावर राजकीय पक्ष राजकारण करतात. या विषयाचा सविस्तर उहापोह करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. त्यात राजकीय व्यक्ती असायला हरकत नाही, पण त्याचे स्वरूप अन निर्णयात्मकता अ-राजकीय असावी.' - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत.

या वाक्यांचा अर्थ... आरक्षण बंद करावे. कोणालाही आरक्षण वगैरे देऊ नये. आरक्षण म्हणजे विशिष्ट गटाचे लाड पुरवणे आहे... इत्यादी इत्यादी आहे असं जगातला कोणताही भाषातज्ञ म्हणू शकेल का? पण प्रसार माध्यमे, विद्वान, विचारवंत, राजकीय नेते, राजकीय पक्ष, सर्वसाधारण समाज तसा अर्थ घेतात. भाषा विषय गांभीर्याने न घेण्याचे हे परिणाम. गेली २६-२७ वर्षं वाचन, लेखन, भाषण करण्यात घालवतानाही ही गोष्ट पदोपदी जाणवतेच. आज पुन्हा जाणवली. वेळ, पैसा, साधनसामुग्री, बुद्धिमत्ता, उर्जा वगैरे किती गोष्टी आपण त्यामुळे वाया घालवतो. त्यापेक्षा समाजावर भाषा आणि बौद्धिक संस्कार करण्यात ते सारे लावले तर जास्त उपयुक्त ठरणार नाही का? की आमची बुद्धीशून्यता अन विचारशून्यताच आम्हाला प्रिय आहे?

की राजकीय पक्ष अन नेते यांना या विषयापासून दूर करावे हा सरसंघचालकांचा मुद्दा वर्मी बसला आहे?

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१५

श्रद्धा

दोन रात्री orange city hospital ला काढाव्या लागल्या. हॉस्पिटलच्या फाटकाजवळ सकाळी ५.३० वाजता एक चहावाला येतो. त्याने बनवलेला पहिला चहा पिण्याचाही योग आला. त्याचं दिवसाचं चहाचं पहिलं भांडं शेगडीवरून उतरलं की, तो फक्त एका पेल्यात चहा ओततो. मग पेलाभर पाणी अन पेलाभर चहा जमिनीवर टाकतो. त्यानंतर गिऱ्हाईकी सुरु. श्रद्धा ही गोष्ट किती खोलवर रुजली आहे आपल्यात. जणू आपल्या गुणसुत्रांमधूनच येते आपल्यापर्यंत. याच श्रद्धेने मानवाला जगवले अन वाढवले आहे. श्रद्धेला नमन असो.

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१५

अर्थ मानसिकता

गरज, आनंद, चैन आणि उधळपट्टी या अर्थमानसिकतेच्या चार अवस्था आहेत. गरज आणि आनंद यांचा संबंध जीवनाशी आहे, तर चैन आणि उधळपट्टी स्वत:च्या आणि बाकीच्यांच्याही जीवनाला अडचणीत टाकणारे आहेत. मुख्य म्हणजे या चारही अवस्था अतिशय व्यक्तीकेंद्रित आहेत. त्यामुळेच यांचा सखोल, साधकबाधक विचार करून; योग्य अर्थमानसिकता जोपासून; त्यानुसार जगणाऱ्या माणसांची संख्या जेवढी अधिक तेवढे अर्थकारण आणि सामाजिक जीवन सुखी, समाधानी, शांततापूर्ण राहू शकते. व्यवस्था, कायदे, नियम, रचना हे सगळे नंतरचे विषय. आपण यासाठी किती सक्षम आहोत?

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१७

कौतुक अमेरिकेचे

वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणांनी अमेरिकेचं कौतुक, आकर्षण, ओढ असते. तसंही जगभरात अमेरिकेच्या संपन्नतेचा प्रभाव आहेच. मी काही अमेरिका विरोधी नाही पण सहज मनात आलं - एवढं काय अमेरिका अमेरिका. अमेरिकेपेक्षा अर्धी जमीन असूनही अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे (कदाचित त्याहून जास्तच) लोक भारतातही सुस्थितीत आहेत. शिवाय त्यांच्या लोकसंख्येच्या दीड ते दोन पट लोक वेगवेगळ्या स्तरांवर जगत आहेत. हा स्तर योग्य आणि समाधानाचा नसला तरीही हे सगळे लोक अगदीच नरकात नाहीत. याचा निष्कर्ष काढायचा तर तो अगदीच निराशाजनक म्हणता येणार नाही. शिवाय अमेरिकेला डोक्यावर घेण्याचीही गरज वाटत नाही. तरीही आपलं आणि बाकीच्यांचंही perception नकारात्मक असतं. कुछ तो गडबड है.

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१९

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

आधुनिकता

अत्याधुनिक हवामान यंत्रणा असूनही वादळावर वादळे अमेरिकेला तडाखे देत आहेत.

भूगर्भ संशोधनात प्रचंड संशोधन होऊनही भूकंप शेकडो, हजारो बळी घेतोच आहे.

मानसशास्त्रात आणि व्यवस्थापन शास्त्रात नवनवे प्रयोग, संशोधने, समुपदेशने होत असतानाही `मनोरोग' हा जगातला सगळ्यात मोठा रोग होऊ पाहतो आहे.

व्यवस्थापन शास्त्रात नवनवे प्रयोग, संशोधने होऊनही सगळ्या अर्थव्यवस्था डबघाईला येत आहेत.

तरीही- आमच्या सगळ्या त्रासाचं, अडथळे आणि अडचणीचं खापर आमचा धर्म, परंपरा आणि ते मानणाऱ्या लोकांवर फोडण्यात दिवसरात्र आनंद अनुभवणाऱ्या `आत्मनिंदक' आणि `आत्मवंचकांचा' विजय असो.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१७

स्मृतिभ्रंश

आज स्मृतिभ्रंश दिवस देखील आहे. स्मृतिभ्रंश हा आजार म्हणून जाहीर केलेला आहे हे मात्र फारसे पचत नाही. पश्चिमेचा जो एकांतिक व्यक्तिवादी विचार आहे, त्याचा हा परिणाम आहे. हा व्यक्तिवाद माणसाला निसर्गचक्रातून वेगळे काढून विचार करतो. सोबतच मानवी श्रेष्ठत्वाचे पोवाडे गातो. त्यामुळेच मानवी शरीराचा विकास त्याला मान्य आहे पण मानवी शरीराचा ऱ्हास तो विचार स्वीकारू शकत नाही. मानवी शरीराचा ऱ्हास हा त्याच्या दृष्टीने चुकीचा ठरतो. मानवी शरीर कायम तसेच राहावे आणि त्याच्या शक्ती सतत वाढत जाव्या, असा काहीसा अट्टाहास तो विचार करतो. मानवी जीवनाच्या विकासाइतकाच त्याचा ऱ्हास स्वाभाविक आहे हे मान्य करणे त्याला अवघड जाते. मानवाचे श्रेष्ठत्व आणि अमरत्व भारतीय चिंतनानेही मान्य केले आहे. परंतु हे श्रेष्ठत्व आणि अमरत्व पाच-सहा फुटी शरीराचे, त्यातील सदा चंचल मनाचे किंवा अपूर्ण बुद्धीचे नाही. तर त्याहून व्यापक, त्या पलीकडील अनिर्वचनीय अशा अस्तित्वाचे श्रेष्ठत्व आणि अमरत्व आहे. मानवी मापांनी मोजणाऱ्या पश्चिमेच्या विचारांना सध्या तरी त्याचे आकलन झालेले नाही. त्यामुळेच तो विचार हट्टी आणि आग्रही होतो. अन स्मृतीभ्रंश स्वाभाविक म्हणून स्वीकारू शकत नाही.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०२०

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

मृतदेहांची विक्री

मृतदेह विकून जमवले १०० कोटी

आयएसआयएसची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. सर्वशक्तीमान अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तर छोटेमोठे सगळे देश त्या संघटनेमुळे चिंतेत आहेत. त्या आयएसआयएसचा प्रमुख असलेला बगदादी पैसा कसा जमवतो? आश्चर्य वाटेल, पण तो पैसा मिळवतो मृतदेह विकून. आजवर क्रूरतेच्या अनेक कहाण्या जगाने पाहिलेल्या, ऐकलेल्या आहेत. लाखो लोकांना पापणीही हलू न देता यमसदनी पाठवणारे अनेक क्रूरकर्मा जगाने पाहिले आहेत. हिटलर, इदी अमीन, स्टालीन, पोल पॉट, गद्दाफी, मुगाबे, पाट्रीक लुमुम्बा अशी कितीतरी नावे; अगदी एका शतकातील. पण त्यांच्याही संबंधात मृतदेह विकण्याचा प्रकार कधी पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आला नाही. बगदादी मात्र त्या सर्वांवर ताण करणार अशी चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने सिरीयाच्या २५० लोकांचे शिरकाण केले. त्यांना नि:शस्त्र एका रांगेत उभे करून गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना निरोप पाठवले- तुमच्या माणसाचे शव आम्ही तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी देऊ. सोबत त्या मृतदेहाच्या किंमतीदेखील सांगितल्या. स्वाभाविकच अनेकांनी आपल्या आप्तांचे मृतदेह स्वीकारले आणि अबू बकर अल बगदादीने मृतदेह विकून थोडेथोडके नव्हे सुमारे १०० कोटी रुपये उभे केले. अमेरिकेला टक्कर देणे किंवा इस्लामी साम्राज्य उभे करणे यासाठी ही रक्कम म्हणजे `दरिया मे खसखस'. त्यामुळे असे प्रकार यानंतरही पाहायला मिळणार नाहीत असे नाही.

वेळी अवेळी `भगवा आतंकवाद'च्या नावाने गळा काढणाऱ्या सगळ्यांनी प्रथम आतंकवाद काय आणि कसा असतो ते समजून घ्यावे. बगदादीच्या वरील कृत्यातून त्याची थोडीफार कल्पना येऊ शकेल. `ते तसे वागतात म्हणून आपणही तसेच वागावे काय?' असे त्यांच्याच सुरात सूर मिसळून गळे काढणाऱ्या तथाकथित बुद्धीवाद्यांनीही आतंकवादाचा अर्थ आणि आशय आधी समजून घ्यावा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २० सप्टेंबर २०१६

दप्तराचे ओझे

दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा होते.

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शिकवलीच पाहिजे, त्याने शिकलीच पाहिजे, त्याला आलीच पाहिजे...

या ओझ्याचं काय? हे ओझं कमी केलं की दप्तराचे ओझे आपोआप कमी होईल. 'प्रत्येकाने प्रत्येक' हे मनावरचं, बुद्धीवरचं ओझं उतरवायला हवं असं वाटतं का?

ढोंगीपणाचा विजय असो !!!

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१८

जात म्हणजे काय?

ज्यांना खरंच विचार करायचा आहे त्यांच्याचसाठी केवळ.

१) जात म्हणजे काय?

२) किती सुतार आज लाकूडकाम करतात?

३) किती सोनार दागिने घडवतात?

४) किती यादव दुधदुभत्याचा व्यवसाय करतात?

५) किती कुंभार मडकी बनवतात?

(लांबलचक यादी करता येईल.)

६) goldsmith म्हणजे काय?

७) blacksmith म्हणजे काय?

८) bootmaker म्हणजे काय?

९) oilman म्हणजे काय?

१०) carpenter म्हणजे काय?

११) scavenger म्हणजे काय?

१२) fisherman म्हणजे काय?

(लांबलचक यादी करता येईल.)

मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक गरजांमधून जगभर विविध पद्धतीने जातींचा विकास होतो. आजही होतो आहे. पुढेही होत राहील. कोणीही ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. भारतात त्याचे योजनापूर्वक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी ओशाळवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही. अगदी रोटी बेटी व्यवहार सुद्धा (अयोग्य असले तरीही) मोठ्या प्रमाणात गरजेपोटी जन्माला आले. आज जातीव्यवस्था अस्तित्वातच नाही. राज्यघटनेने ती मोडीत काढली आहे आणि व्यवहारात सुद्धा ती अस्तित्वात नाही.

तरीही एवढी चर्चा का होते?

- सत्ता वा संपत्ती यासाठी.

- सूडभावना.

- राजकारण.

- मनातील किल्मिष आणि अविश्वास.

- मनाचा, वृत्तीचा कोतेपणा.

याशिवाय अन्य काहीही आज जुनी जात म्हणून अस्तित्वात नाही. वरील पाच कारणे दूर करणे हे घोषणांचे, कायद्यांचे काम नाही. मी काय करतो हा विचार प्रत्येकाने करणे हा एकच उपाय आहे.

जात हाच घटक लक्षात घेऊन घडणाऱ्या घटनांची चर्चा करतानाही, suffering and sufferer एवढ्याच मर्यादेत करण्याची मर्यादा आणि दक्षता घेणे हे सुबुद्ध माणसांचे कर्तव्य आहे. समोर दिसत असूनही, त्याला खतपाणी न घालता, सत्याचा वगैरे अतिरेकी आवेश न आणता, त्याकडे दुर्लक्ष करून त्यातील हवा काढून टाकण्याची शहाणीव दाखवायला हवी. प्रामाणिक कळकळीच्या लोकांची ही जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटते किंवा आपण स्वत:चे वर्चस्व कसे सिद्ध केले किंवा दुसऱ्याला कसे कोंडीत पकडले याचा विचार करणे आणि समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेकडे लक्ष न देणे; हे शोभणारे ठरत नाही. असा विचार न करता, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या महात्मा गांधींचा अनुयायी म्हणवणारी व्यक्ती जेव्हा तर्कशून्य शेरेबाजी करताना दिसते तेव्हा फक्त एकच शब्द तोंडी येतो - अरेरे !!

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१८

थोडी गंमत

काल्पनिक संवाद, वास्तवाशी सांगड घालण्यासाठी.

.........१.........

- तुम्ही महालक्ष्मी नाही मांडल्या का?

- नाही.

- का?

- आमच्याकडे महालक्ष्मीचा सण नाही.

- पण खूप जण करतात महालक्ष्मी.

- हो. पण आमच्याकडे नाही.

- पण तुम्ही का करत नाही?

🤣🤣🤣

.........२.........

- वांग्याची भाजी का केली?

- तीच होती घरात.

- मला वांगी नाही आवडत.

- ओके. पण मला माहित नव्हतं. तू जेवणार आहेस का?

- नाही. मी जेवूनच आलोय.

- मग?

- काही नाही असंच विचारलं. पण मला नाही आवडलं वांग्याची भाजी करणं. अन पटलंही नाही.

- बरं. आता बाजारातून भाजी आणली की दुसरी भाजी करीन.

- ते ठीक. पण आत्ताचं काय?

😄😄😄

हसावंसं वाटलं तर भरपूर हसा. किंवा नका हसू. पण कालपासून जाती वगैरेबाबत जी चर्चा, मतमतांतरे सुरु आहेत ती पाहून हेच संवाद सुचले. मला काय म्हणायचे आहे ते ज्यांना लक्षात येईल त्यांचेही भले होवो, ज्यांना येणार नाही त्यांचेही भले होवो.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१८

गृहितकांची चिकित्सा

एका चर्चेत काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले - संघाने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात भाग घेतल्याचा पुरावा नसल्याचे भाजप सरकारने rti ला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

या मुद्यावर मी काहीही टिप्पणी करणार नाही. पण एक मूलभूत मुद्दा, जो अनेक ठिकाणी लागू होतो. आजवर माणसांनी जे काही केले, आजही जे काही करीत आहे अन पुढेही करेल; ते करताना भविष्यात असे असे वाद होतील असा विचार करून त्याचे पुरावे सुरक्षित ठेवण्याचे काम होते का? अन समजा जपून ठेवले तरीही मानवी, नैसर्गिक वा उधई वगैरे सारख्या आपत्ती, पुरावे जपून ठेवणारे जग सोडून गेल्यानंतर अन्य लोकांना ते महत्वाचे न वाटून लावली जाणारी विल्हेवाट; अशा अनेक बाबी असतात. आणि समजा बरेच पुरावे, दस्तावेज असले तरीही अमुकच घडले असावे अन अमुकच पद्धतीने घडले असावे, असे कसे म्हणता येईल? अभ्यास, संशोधन, निष्कर्ष यांची आज जी पद्धत प्रचलित आहे त्यातील या भयंकर त्रुटी आहेत. पण तेच तेच मुद्दे रवंथ करण्यातच बुद्धी खर्च करायची असेल तर त्याला उपाय नाही. मूळ गृहितकांची चिकित्सा हा आजचा मूळ बौद्धिक प्रश्न आहे.

 - श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१८

अद्वैत हाच भारतीय विचार

अद्वैत हा खऱ्या अर्थाने भारतीय विचार आहे. किंबहुना असं म्हणता येईल की, भारतीय विचारधारेची ती पूर्णता आहे. अन्य म्हणजे - द्वैत, त्रैत, विशिष्टद्वैत, ऐहिक, पारलौकिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक; असे सगळे विचारधन यात भारतीय आणि अभारतीय म्हणून फार फरक नाही. अगदीच फरक नाही असे नाही. परंतु जो फरक आहे त्याचा आधार अथवा कारण अद्वैत वृत्ती (अद्वैत विचाराहून ही वेगळी) हेच आहे. हे नजरेआड करून जर विचार केला तर, भारतीय आणि अभारतीय विचारातील समस्या, मर्यादा, अडथळे; त्यांचे परिणाम; त्यांनी व्यवहाराला मिळणारे वळण; या सगळ्या बाबी कमीअधिक सारख्या आहेत. मानवी जीवनासाठी भारतीय चिंतन महत्त्वाचे, आवश्यक, उपयुक्त असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ, अद्वैत चिंतन असा असायला हवा. हां, मात्र अद्वैताचा नीट बोध मात्र आवश्यक आहे. 'आमचं दोघांचं अद्वैत आहे किंवा त्या दोघांचं अद्वैत आहे किंवा या सगळ्या गोष्टीत अद्वैत आहे' असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अद्वैत बोध नीट नाही असाच त्याचा अर्थ होऊ शकतो. एकात्म मानववादाचे प्रतिपादन करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हे विशेषत्वाने मांडले होते की, एकात्म मानववादासाठी (समजण्यासाठी आणि चरितार्थासाठी) अद्वैत बोध आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१९

राजा नको

श्री गणेशाचे आता राजे झाले आहेत. लालबागच्या राजापासून वेगवेगळ्या गावांचे, शहरांचे, गल्ल्यांचे सुद्धा 'राजा'. प्रतिष्ठा होते ती 'राजा'ची, विसर्जन होते ते 'राजा'चे, दर्शन घेतात ते 'राजा'चं. सामान्य मनासाठी 'राजा' ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट हे ठीक आहे. पण श्री गणेश हे कोणत्याही 'राजा'पेक्षा खूप खूप मोठे आहेत. ते अब्जावधी राजे निर्माण करतात अन मोडीत काढतात. हे समजण्यासाठीच श्री गणेश भक्ती, आराधना, उपासना करायची असते. श्री गणेशाची भक्ती करून आपलं सामान्यत्व थोडं तरी ऊणं करायचं असतं. त्याऐवजी श्री गणेशालाच 'राजा' बनवणं बरंही नाही वाटत अन योग्यही. बरी अन योग्य न वाटणारी गोष्ट बदलायलाही काही हरकत नाही नं. आपल्या इथे म्हणतात की, सहज एखाद्याला नावाने हाक मारताना जरी देवाचं नाव तोंडी आलं तरी पुण्यसंचय होतो. इथे तर प्रत्यक्ष देवाचं नाव घेतानाही तोंडी 'राजा' येतं. पुण्यसंचय कसा होईल?

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०२१

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

माणूस आणि गुन्हेगार

तिहार कारागृहावर एक कार्यक्रम पाहिला. तेथील अव्यवस्था, कारागृहातील गुंडगिरी, त्या कारागृहाचा इतिहास, किरण बेदी यांनी त्या तिहारच्या अधिकारी असताना सुरु केलेले कैद्यांच्या सुधारणेचे प्रयत्न इत्यादी. मन सहज १०-१२ वर्षापूर्वीच्या प्रसंगात पोहोचलं. १०-१२ वर्षांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. मुळात कारागृहात जाण्याची (कार्यक्रमाला का होईना !!) पहिलीच वेळ. त्याआधी एकदा एका लेखासंबंधी कारागृह अधीक्षकांना भेटायला कारागृहात त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं झालं होतं. शिवाय अगदी शाळेत असताना इंदिरा गांधींच्या कृपेने लावण्यात आलेल्या आणीबाणीत कारागृहात असलेल्या मामांना भेटायला आईसोबत गेलो होतो. पण गुन्हेगार कैद्यांची भेट, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे; याची पहिलीच वेळ होती. शिवाय त्यांच्यासमोर भाषण काय करायचे असाही मनात प्रश्न होता. परंतु कार्यक्रम छान झाला. समोर बसलेल्या कैद्यांच्या डोक्यावरील टोप्या आणि त्यांचे वेश बदलून त्यांना सर्वसामान्य कपडे दिले असते तर समोर कैदी बसले आहेत असेही जाणवले नसते. समोर नीट रांगेत बसलेले कैदी, मंचावर अन्य कार्यक्रमांप्रमाणेच व्यवस्था, सुरुवातीला पूजन, दीपप्रज्वलन वगैरे रीतसर. नंतर भाषण. आभार प्रदर्शन. सगळा कार्यक्रम पार पडला. पुष्पगुच्छ देणे, आभार प्रदर्शन ही कामे कैद्यांनीच केली. आभार प्रदर्शन ऐकताना मात्र सगळेच चाट पडले होते. भाषा, शुद्ध उच्चार, मंचावरून बोलण्याचा सराव, आत्मविश्वास त्यात वापरलेल्या ओळी आणि मुद्देही; कोणालाही आश्चर्यात टाकतील असेच. स्वाभाविकच कार्यक्रमानंतर विचारपूस केली. तेव्हा कानावर विश्वासच बसेना. ज्या व्यक्तीने आभार प्रदर्शन केले होते ती व्यक्ती आळंदीची होती. ज्ञानेश्वरीवर प्रवचने देत होती आणि एका खुनाच्या आरोपाखाली नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होती. फार तपशील कळला नाही. पण हेही कळले की, कारागृहात असे काही कार्यक्रम असले की आभार प्रदर्शन वगैरे त्याच्याकडेच राहत असे. अतिशय मनमिळावू आणि समंजस. छोट्या छोट्या गोष्टीत अन्य कैद्यांचा मार्गदर्शक. समेट घडवून आणणे वगैरे त्याचेच काम. त्याने खरंच खून केला असेल? केला असेल तर का? ज्ञानेश्वरीचा उपासक एवढा तोल गमावू शकतो? अशी काय परिस्थिती असेल? माणूस आणि गुन्हेगार यात काय फरक असतो? माणसाचा गुन्हेगार का होतो? कोणाचा आणि किती दोष? या गोष्टी अपरिहार्य आहेत?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१४

अनुदार

मित्र यादीतील एका मित्राने काल एक पोस्ट टाकली की, `अनेक जण देवादिकांचे फोटोबिटो टाकतात. वैताग असतो. अशा मित्रांना यादीत ठेवावे की नको याचा विचार करतोय.' शब्द इकडे तिकडे होऊ शकतात पण आशय मात्र हाच आहे. पोस्ट टाकणारे नामांकित व्यक्ती आहेत. पण किती अनुदार. कोणी देवादिकांचे फोटो टाकतात तर टाकतात. त्याने आपल्याला काय त्रास? पण सहनशीलता दूर पळाली की मग ती हळूहळू दुष्प्राप्य होते. मला आवडते किंवा नावडते, मला पटते किंवा न पटते; हेच स्नेह, मैत्री, आपलेपणा यांचे निकष आहेत का? असावेत का? `मी' ला इतके गोंजारायचे की हळूहळू `मी'चंच एक छोटं बेट तयार होतं. हे अगदी खरं आहे की, आपले बिलकुल मतभेद होणार नाहीत, अशी कदाचित एकही व्यक्ती जगात नसते. विविध मुद्यांवर विविध लोकांशी कमीअधिक सूर जुळत असतात. पण ते बाजूला ठेवून जगासोबत राहण्यात काहीही गैर नाही. आपल्याला ते जमत नसेल तर ती आपली मर्यादा म्हणायला हवी. `हो आहे माझी मर्यादा. माझी माझ्याजवळ. तुम्हाला काय घेणेदेणे?' असा प्रश्न यावर येऊ शकतो. अर्थात, आपल्या अनेक वैयक्तिक आणि असंख्य सामाजिक अडचणी याच भूमिकेतून जन्म घेत असतात याचा विचार करण्याची, असा युक्तिवाद करणाऱ्यांना फिकीर करण्याची गरज नसते. पुलंनी रंगवलेले `रावसाहेब' पुन्हा एकदा समाजाने नीट समजून घेण्याची निकड मात्र जाणवते. ज्यांच्या पोस्टवरून हे लिहिलं ते आता त्यांच्या यादीत मला ठेवतात की नाही माहीत नाही.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१५

न पटणारे

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या लोकांचे पगार थांबवणार, हा आसाम सरकारचा निर्णय...

आणि

पत्नीला त्रास देणाऱ्या अनिवासी भारतीयाचा पासपोर्ट रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय...

दोन्ही न पटणारे. भलं करण्याच्या नादात खूप चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यातल्याच या दोन. मागणी करणारे, कार्यवाही करणारे, विचार आणि विश्लेषण करून शिफारस करणारे आणि निर्णय घेणारे; सगळ्यांनीच विचारांची कास सोडली आहे. दुसरे काय?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१७

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

भाषा

अपेक्षेप्रमाणे श्री. अमित शहा यांच्या भाषाविषयक वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे. यातील बहुतेक चर्चा फारशा गंभीर अन महत्वाच्या नाहीत. कारण नेहमी प्रमाणेच त्यात 'माझा रस्ता' की 'तुझा रस्ता' एवढेच आहे. भारतात भाषेचे हे संघर्ष गेल्या शंभरेक वर्षातले आहेत. त्याआधी ते नव्हते. लोक आसेतू हिमाचल फिरत, व्यवहार करत, व्यापार करत, तीर्थयात्रा करत, वसती करत, चिंतन करत; ते या साऱ्या भाषांसह. कसे करीत असतील हे सारे? आम्ही कधीच हा प्रश्न विचारत नाही. त्रिपुराला गेलो असताना मला याचा उलगडा झाला. सगळ्या ईशान्य भारतात डझनावारी जमाती आहेत. त्यांच्या त्यांच्या भाषा आहेत. या सगळ्या जनजातींमध्ये व्यवहारही होत असतात. कसे होतात हे व्यवहार? व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या भाषेचा प्रश्न त्यांनी कसा हाताळला? तर त्यांच्या वेगवेगळ्या बोली असल्या तरी परस्पर व्यवहार करताकरता एक मिसळ संपर्क भाषा निर्माण झाली. त्याला म्हणतात कोकब्रोक.

असाच प्रकार भारतीय भाषांच्या संबंधात ही होता. उर्दू हेदेखील याचे एक उदाहरण. परंतु मानवी जीवनाकडे इतक्या सहजतेने पाहणे न जमणाऱ्या अभारतीय लोकांच्या सव्वाशे वर्षांच्या सत्तेने भारतीय समाजदेखील दांभिक मानवीय अहंमन्यतेने भरून गेला. श्रेष्ठ कनिष्ठ भाव, मान सन्मानाच्या दळभद्री कल्पना, वर्चस्व गाजवण्याची लालसा, शास्त्रीयतेचे कृत्रिम मापदंड; अशा एक ना अनेक विकृती या समाजात फोफावल्या. दुर्दैवाने आता तेच सारे योग्य वाटू लागले आहे. पूर्वीही इतक्या सगळ्या भाषा असून संघर्ष झाले नाही कारण आम्ही एक राष्ट्र होतो. आज भाषेच्या आधारे एक करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मूलतः एक असणे आणि विविध गोष्टींचे ऐक्य निर्माण करणे यात फरक आहे. हीच दांभिक मानवीय अहंमन्यता. 'फुलणे' आणि 'घडवणे' या दोन शब्दात भारतीय आणि अभारतीय यांचा सारा आशय येऊन जातो. भारताचे चिंतन, भारताचा विचार, भारताची दृष्टी 'फुलणे' आहे. अभारतीय चिंतन, अभारतीय विचार, अभारतीय दृष्टी 'घडवणे' आहे. मानवी कृती, कर्म, प्रयत्न, अचूकता, शास्त्र इत्यादी 'फुलण्याला' सहायक व्हावे म्हणजे भारतीयता. मानवी कृती, कर्म, प्रयत्न, अचूकता, शास्त्र इत्यादी 'घडवण्यासाठी' करणे म्हणजे अभारतीयता. हे थोडे क्लिष्ट, जटील वाटू शकते. पण सगळे सोपेसोपेच असायला हवे अशी अपेक्षा का बाळगावी? उत्तम, उदात्त, उन्नत यासाठी सोपेपणाचा आग्रह जरा बाजूला सारायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १८ सप्टेंबर २०१९

सुशांत सिंह आणि अध्यात्म

सुशांतसिंहबद्दल पाहत होतो. त्याच्या डायरीतील धार्मिक नोंदी, कबिराच्या ओळी इत्यादी. तसेही तो धार्मिक होता अशी चर्चा आहेच. हे मान्य करायलाही हरकत नसावी. पण इथे एक गोम आहे. म्हणजे कोणाच्याही बाबतीत, कोणत्याही संदर्भात इथे एक गोम असते/ असू शकते. ईश्वरी कृपा प्राप्त करून सगळं जग 'माझ्या मुठीत' आणण्याचा प्रयत्न केला जातो. तशी इच्छा बाळगली जाते. जग नियंत्रित करण्याची आस लागते. जग प्राप्त करण्याची अभिलाषा धरली जाते. 'आपणच ईश्वर आहोत. आपण काहीही करू शकतो', असा अद्वैत सिद्धांत पण साथीला घेतला जातो. पण हे आध्यात्म नाही हे लक्षात घेतले जात नाही. ईश्वरी कृपेने जग नियंत्रित करणे, जग मुठीत ठेवणे; ही शुद्ध जडवादी ऐहिकता आहे. त्यात ईश्वर वगैरे असला तरीही. ईश्वरी कृपेने जग मुठीतून सोडून देऊन, जगावरील असले नसलेले नियंत्रण सोडून देऊन, स्वतःला नियंत्रित करणे, म्हणजे आध्यात्म.

- जग नियंत्रित करण्यासाठी ईश्वरी कृपा म्हणजे ऐहिकता.

- स्वतःला नियंत्रित करण्यासाठी ईश्वरी कृपा म्हणजे आध्यात्म.

- श्रीपाद कोठे

१८ सप्टेंबर २०२१

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

ड्रेस कोड

'सीएनबीसी आवाज'वर एक चर्चा झाली. कोलकाता येथे एक महिला एका हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे गेल्यावर तिने आपल्या गाडीचालकालाही जेवायला बरोबर नेले. त्यावेळी हॉटेलने त्या चालकाला आत घेण्यास मज्जाव केला. या घटनेचा निषेध करून महिलेने ती सोशल मिडीयावर टाकली. त्यावरील चर्चा. एक वकील, एक हॉटेल व्यावसायिक संघटनेचा पदाधिकारी, एक पर्यटन व्यवसायाचा प्रतिनिधी आणि सूत्रसंचालक. सगळ्यांनी अर्थातच या घटनेचा निषेध वगैरे केलाच. पण या चर्चेत हेही स्पष्ट झाले की, काही क्लब्ज इत्यादी आहेत जेथे `ड्रेस कोड' असतो. तिथली सदस्यता सुद्धा तुमची आर्थिक क्षमता पाहूनच दिली जाते. हे सगळे नियमानुसार असते आणि त्यात बेकायदेशीर काहीही नाही. तुम्ही कोणताही अन कसाही पोशाख करून तिथे जाऊ शकत नाही. अन असे क्लब्ज भरपूर आहेत.

सहज तृप्ती देसाई आठवल्या. त्यावेळी धार्मिक मठमंदिरे यांच्याबद्दल झालेल्या चर्चा आठवल्या. नुकतेच मुंबईत एका गणेश मंडळाने येणाऱ्या भक्तांच्या पोषाखासाठी काही मर्यादा निश्चित केल्याचे अन त्यावर टीकाटिप्पणी झाल्याचे आठवले.

आर्थिक आधारावर भेदभाव केला अथवा मर्यादा निश्चित केल्या तर चालतात, पण धार्मिक श्रद्धांनी काही मर्यादा निश्चित केल्या तर मात्र ते घटनेच्या विरुद्ध ठरते, असाच याचा अर्थ. आधुनिकता आणि पुरोगामित्वाचा जयजयकार असो.

- श्रीपाद कोठे

१७ सप्टेंबर २०१६

चिरंतनाचे रहस्य

या देशाला जिंकायचं असेल तर त्याचा धर्म, संस्कृती, मूल्य, आदर्श यांच्यावर आघात करायला हवा; हे मेकॉलेचं मत जगजाहीर आहे. जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडचा प्रतिनिधी असूनही पैसा, सैन्यबळ, सत्ता यांनी भारत जिंकता येणार नाही हे त्याचे मत होते. म्हणजेच भारताचा चिरंतनत्वाचा आधार धर्म, संस्कृती, मूल्य, आदर्श हा होता. पैसा, सैन्यबळ, सत्ता हा चिरंतनत्वाचा आधार होऊ शकत नाही. आज किमान आमच्या मनात आम्ही या सत्याला तिलांजली दिली आहे का? स्वाभाविक दुसरा प्रश्न येतो - भारत भारत राहील का? तिसरा प्रश्न येतो - भारत किती काळ भारत राहील? चौथा प्रश्न येतो - भारत भारत राहिला नाही तर मानव मानव राहील का?

- श्रीपाद कोठे

१७ सप्टेंबर २०१९

खूप

खूप काम,

खूप पैसा,

खूप नाव,

खूप प्रसिद्धी,

खूप घरे,

खूप गाड्या,

खूप पुस्तके,

खूप लिहिणे,

खूप वाचणे,

खूप बोलणे,

खूप चालणे,

खूप फिरणे,

खूप पाहणे,

खूप माणसे,

खूप शांतता,

खूप मस्ती,

खूप खाणे,

खूप व्यायाम,

... ... ... ... ...

यादी कितीही वाढेल.

यातलं 'खूप' हीच फक्त समस्या आहे.

तीन गोष्टी -

१) 'खूप'ला अंत नाही. त्यामुळे समाधानाचा प्रश्नच येत नाही. कायम असमाधान.

२) यातूनच स्पर्धा, संघर्ष, असमानता, द्वेष, आकस इत्यादी इत्यादी इत्यादी. शांततेचा अभाव. ताण, नैराश्य, प्रकृतीच्या तक्रारी इत्यादी. याचा गैरफायदा घेणाऱ्या संघटित शक्तींचा उदय आणि त्यांचे साम्राज्य. या शक्तींचा जीवनाला विळखा.

३) 'खूप'च्या यादीतील कोणत्याही गोष्टीला स्वतंत्रपणे ना अस्तित्व ना अर्थ. या सगळ्या गोष्टींना जीवनाच्या संदर्भात अर्थ. 'खूप' म्हटल्यानंतर त्या त्या गोष्टींना महत्व आणि प्राधान्य मिळतं, दिलं जातं. त्यातून त्या जीवनापासून दूर होतात. परिणामी जीवन आणि ती ती गोष्ट दोन्ही अर्थहीन होतात.

- श्रीपाद कोठे

१७ सप्टेंबर २०२०

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

पेपरवाला

मध्यंतरी कोल्हापूरला जाणं झालं. तिथे अभियांत्रिकीला शिकणाऱ्या भाच्याच्या खोलीवर एक दिवस मुक्काम केला. चार-पाच मित्र मिळून दोन खोल्या घेतल्या आहेत. वरच्या मजल्यावर. मोठ्ठं घर, मोठ्ठं आवार. आंगण, झाडं वगैरे. घरमालक निवृत्त बँक कर्मचारी. साधे, मितभाषी, मनमिळावू. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो तेव्हा एक छान गोष्ट पाहता, अनुभवता आली. उठून, फ्रेश होऊन बाल्कनीत येउन उभा राहिलो. भूरभूर पाऊस पडून गेला होता. आकाश ढगाळलेलं होतं. शांत, प्रसन्न वातावरण. फाटकाजवळ प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला. तेवढ्यात वृत्तपत्र टाकणारा माणूस आला. त्याने आवाज दिला- पेपर. आत ऐकू गेलं नसावं. दोन-तीन मिनिटे वाट पाहून त्याने पुन्हा आवाज दिला- पेपर. तरीही कोणी बाहेर आलं नाही. तेव्हा त्याने आपली सायकल पुढे घेऊन स्टँडवर लावली. पेपर काढले, त्याची नीट घडी घातली आणि पडणार नाही, भिजणार नाही अशा बेताने फाटकात खोचून ठेवले. मला घरी पेपर टाकणारा पोरगा आठवला. पेपर भिजतात का, उडून जातात का, वगैरे कशाचाही विचार न करता, आवाज वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता भिरकावून देणारा. कोल्हापूरचा तो पेपरवाला तिथल्या पेपरवाल्यांचा प्रतिनिधी होता की नाही हे नाही सांगता येणार. पण तो लक्षात राहणारा आणि अनुकरणीय मात्र नक्कीच होता. त्याचं तसं वागणं फुललेल्या पारिजातकाचा परिणाम होता, लहान शहराचा स्वभाव होता की त्या व्यक्तीचा पिंड? कोणास ठाऊक.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०१४

विचारीपण आणि सहिष्णुता

विचारीपण आणि सहिष्णुता या एकच गोष्टी आहेत का? मला तसे वाटत नाही. माणूस विचारी असेल तरी सहिष्णू असेलच असे नाही, अन माणूस सहिष्णू असेल तरी विचारी असेलच असेही नाही. एखाद्याचे विचार अगदी छान असतील, बरोबरही असतील; पण तो सहिष्णू नसू शकतो. आपण करतो तसाच विचार सगळ्यांनी करायला हवा अशी त्याची अपेक्षा असते. किंवा आपण करतो तोच विचार योग्य, सर्वोत्तम वगैरे आहे असा त्याचा दावा असतो. किंवा आपण इतका चांगला विचार करीत असूनही बाकीचे तसा विचार का करीत नाहीत यावरून तो त्रागा करीत असतो. मग वागण्यात- बोलण्यात- लिहिण्यात- व्यक्त होण्यात- अव्यक्त राहण्यात- हा त्रागा प्रकट होतो. अनेकदा यापायी मतभेदांचे मनभेदात रुपांतर होते. कधी आग्रही स्वभावासाठी अहंकार कारण असतो, तर कधी आपल्या विचारांचा- बुद्धिमत्तेचा दंभ. हळूहळू तर अन्य विचारातील योग्य अयोग्यता पाहण्याची, तपासण्याची सुद्धा गरज अशांना वाटत नाही. या जगात काय ते आपणच, अशी ही वृत्ती. वास्तविक सर्वंकष विचारांपासून आपण दूर जातो आहोत याचे भानही मग उरत नाही. आपण या पृथ्वीवर येण्यापूर्वीही जग चालत होतं अन आपण राम म्हटल्यावरही जग चालणार आहे याचं अवधान निसटून जातं. दूध आणि पाण्याच्या मिश्रणातील दूध वेचून घेण्याची हंसवृत्ती मग लोप पावते. मग आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याचा उपहास, उपेक्षा, टिंगलटवाळी, कुचेष्टा करण्याचा प्रयत्न सुरु होतो. आजकाल ही वृत्ती वाढल्यासारखी वाटतेय.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०१५

विमर्श

पुण्याच्या दीर्घ मुक्कामानंतर परतल्यावर आवरणे, साफसफाई आदी गोष्टी म्हणजे एक कामच. त्यात अंगणात लक्ष द्यायला दोन दिवस लागले. तुळशी वृन्दावनाच्या बाजूला आळ्यात एक पाकीट पडलं होतं. सततच्या पावसाने पाणी आणि मातीने भिजलेलं, थिजलेलं. ते कचऱ्यात टाकून द्यावं म्हणून उचललं आणि स्वाभाविकच काय आहे म्हणून पाहिलं. तो होता 'विमर्ष' त्रैमासिकाचा ताजा अंक. अतिशय दर्जेदार असं हे त्रैमासिक. संपादक श्री. अरुणराव करमरकर अतिशय नियमितपणे अंक पाठवतात. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. त्यांच्या कल्पक चिंतनातून विविध विषय हाताळले जात असतात. या अंकातही असाच महत्वाचा विषय आहे. विषयावर नजर गेली आणि पाकीट टाकून देण्याचा विचारच टाकून दिला. विषय आहे - समाजरचना. संपूर्ण अंकच या विषयाला वाहिलेला. ओला झालेला तो अंक प्रथम सुकवणे आणि नंतर एकेक पान सावकाश न फाडता वेगळे करणे. मग वाचणे. तर सध्या अर्धा अंक मोकळा झालेला आहे. (ज्ञानासाठी कष्ट हवेतच ना? 😊) नरहर कुरुंदकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, विवेकानंद, अरविंद, गोळवलकर गुरुजी, चाणक्य; अशा महनीय व्यक्तींचे विचार आणि समाजरचना, समाजव्यवस्था आणि समाजधारणा यांची विविध अंगाने चर्चा अंकात आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर मिळवून वाचा.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०१९

तमाशा कुणाच्या जीवावर?

बिग बॉस सारखे कार्यक्रम नैतिकता, संस्कृती, विचार यांच्याबरोबरच अर्थकारणावरही विपरीत परिणाम करतात. त्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांचे मानधन, त्यांच्यावर होणारा खर्च, त्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च, जाहिराती, छोट्या पडद्यावरील वेळ विकत घेण्याचा खर्च; हा सगळा कुठून होतो? 'त्याला प्रायोजक असतात', असं अगदी छान, शांत, साळसूद आणि वैध उत्तर दिले जाऊ शकतेच. पण प्रश्न हा आहे की, हा खर्च प्रायोजित करणारे तरी तो पैसा कुठून आणतात? त्यांचे उत्पादन विकूनच ना? हे उत्पादन कोण खरेदी करतात? सामान्य माणसेच ना? याचा अर्थ बिग बॉस सारख्या निरर्थक आणि घातक गोष्टींना सामान्य माणसेच मदत करतात. शिवाय हा इतर खर्च उत्पादन खर्चात जोडल्याने, उत्पादने महाग होतात. (असेच गौडबंगाल विविध करांच्या आकारणीतही पाहायला मिळते.) हे समजायला फारच कठीण आहे का? कळत असूनही आपण व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून काय करतो? अशा गोष्टींचे सामाजिक अंकेक्षण व्हावे ही किमान मागणी सुद्धा करताना कोणी दिसत नाही. एकीकडे समाज बिघडवणारे आणि दुसरीकडे पैसा वाया घालवणारे, पैशाबद्दल casual approach निर्माण करणाऱ्या या गोष्टी बंद करण्यासाठी सरकारे, राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, जनहित याचिका; काहीही करत नाहीत. आम्ही दिलेल्या करातून कल्याण योजना कशाला, असा प्रश्न विचारणारेही, आमच्या पैशातून ही थेरं कशाला, असा प्रश्न विचारत नाहीत. समाजाचे धार्मिक, नैतिक प्रबोधन करणारेही याबाबत स्पष्ट, ठाम भूमिका मांडून समाजाचे बळ वाढवत नाहीत. आपल्या विचार, व्यवहारांची क्ष किरण तपासणी केली पाहिजे; हे सांगताना कोणीही दिसत नाही. समाजाप्रति कर्तव्य, देशभक्ती, आध्यात्म; म्हणजे फक्त गोड गोड बोलणे असते का? केवळ शस्त्रसज्जता असते का? केवळ पाकिस्तान आणि चीन बद्दलचा त्वेष असते का? अशा असंख्य गोष्टी समाजात घडत असताना, सारासार विचार करायचा नसेल, सारासार विचारांसाठी व्यक्तीला आणि समाजाला प्रेरित करायचे नसेल तर; आपल्या नैतिकतेच्या, देशभक्तीच्या, अध्यात्माच्या गप्पांना काय अर्थ उरतो? अस्मिता आणि शौर्य याबरोबरच, जीवन आणि जगणेही महत्वाचे असते. गौरव आणि रक्षण जीवनाचेच करायचे असते. मातीच्या तुकड्याचे आणि झुंडीचे नाही.

(आगामी लेखनातून)

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०२०

अर्थहीन

पुन्हा एकदा अर्थहीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी आणि मोहनजी भागवत अशी काहीतरी तुलना करून पोरकट चर्चा सुरू केली. मग महिलांचा आदर करण्यात कोण आघाडीवर याचा वाद सुरू झाला. एक फोटो पाहण्यात आला - काही मुली मोहनजींचे पाय धुवत आहेत असा अन दुसरा मुलींशी हस्तांदोलन करतानाचा. अन टिप्पणी होती आम्ही स्त्रियांना बरोबरीने वागवतो. म्हणजे भागवत आणि त्यांचे अनुयायी स्त्रियांना बरोबरीने वागवत नाहीत. वास्तविक या वादात बोलण्याचं कारण नाही. राजकारण चुलीत जाऊन त्याचं व्हायचं ते होवो. पण खंत या गोष्टीची वाटते की या समाजाची वीण उस्कटते आहे. ज्येष्ठांचे पादप्रक्षालन हा या समाजाच्या संस्कारांचा भाग आहे. यात स्त्री पुरुष असा भेद नाही. शिवाय प्रसंग विशेषी लग्न आदी वेळेला मुलामुलींचे पाय ज्येष्ठ माणसे धुतात. या सगळ्यामागे विशिष्ट अर्थ असतो. अन तो चांगलाच असतो. आदराचा असतो. नवीन युगात कोणाला ते गैर वाटू शकेल. त्यांना तसे न वागण्याची मोकळीक आहे. तशी उदाहरणेही पाहायला मिळतातच. पण सामाजिक मान्यतांचे विकृत अर्थ लावून राजकारण करताना आपण नीच पातळीला जातो आहोत आणि समाजाच्या गाभ्याला धक्का लावतो आहोत याचं भान ठेवण्याची गरज न वाटणे हे समाजाचे दुर्दैव आहे. पाय धुण्यामागील भावार्थ विरोध करणाऱ्यांनाही माहिती असतोच पण राजकारणासाठी भूमिका घेतली जाते. त्यात जात आदी घटक मिसळतात. त्या सगळ्याला वेगवेगळे कंगोरे लाभतात आणि समाजातला काही भाग चांगल्या गोष्टींचेही विकृतीकरण करतो. अन एक नासका आंबा सगळी गाडी नासवतो तसा समाज नासवला जातो. आज तर अशी स्थिती आली आहे की पुन्हा देश गुलाम झाला तरी चालेल पण हे दळभद्री राजकारण भस्मसात होवो असे वाटायला लागते. राजकारणापायी आपण गलिच्छ समाज होतो आहोत.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०२१

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

जीवनरस आणि ऐक्य

कावेरी पाणीवाटप प्रश्न, मराठा महामोर्चे आणि त्याच्या उत्तरी मोर्चे या दोन्ही गोष्टीत ऐक्याचा अभाव दिसतो. आज सुरु असलेल्या गणेश विसर्जनात मात्र ऐक्याचं दर्शन होतं. ऐक्य नसणं वा ऐक्य असणं हे नेमकं काय असतं? ऐक्य आहे म्हणजे काय आणि ऐक्य नाही म्हणजे काय? एकतेसाठी एक उदाहरण अनेकदा सांगितलं जातं. काड्यांच्या मोळीचं. एक काडी तोडता येते, पण काड्यांची मोळी मात्र तोडता येत नाही. त्यामुळे एकमेकांना धरून ठेवणे. खरं तर हे खूपच बाळबोध उदाहरण आहे. त्याची काही कारणे आहेत. १) मोळी बांधलेली दोरी तुटली तर काड्या पुन्हा विखरून जातील. २) ही दोरी कुजून तुटू शकते किंवा कोणी ती तोडूही शकतं. ३) एकदा मोळी बांधली की बाहेरच्या काडीला त्यात जागा नाही मिळू शकत. बाकी काड्यांची दुसरी मोळी बांधावी लागते. ४) दोरी ढिली बांधली तर काड्या सुटून जातील आणि करकचून बांधली तर काड्यांना काच बसेल, त्या तुटून जातील. ५) एकाच दोरीच्या साहाय्याने बळाने कडूनिंब, चंदन, साग, तुळस, अशोक सगळ्या काड्या एकत्र बांधता येतील. या वेगवेगळ्या काड्या एकत्र राहतील, पण एक होणार नाहीत. त्यांचे त्यांचे गुण तसेच राहतील.

हे सगळे माणूस, मानवी समाज, त्याला एकत्र ठेवण्यासाठी असणाऱ्या कुटुंब, जाती (species), वर्ण, वंश, राज्य, कायदे इत्यादी गोष्टी यांना लावून पाहिले तर... माणसांना बांधून ठेवणाऱ्या या दोऱ्या कधी काचतात, कधी तुटतात, कधी मर्यादित करतात, कधी त्यावर आघात होतात. विचार, भावना, गरजा, भय, इच्छा किंवा एखादे बाह्य कारण यांनी एकत्र येणे हे खरे ऐक्य नसते. एक तर त्यातून ऐक्य निर्माणच होऊ शकत नाही अन झालेच तर ते तात्पुरते राहते. बरे काड्या एकत्र बांधल्यावर काही काळ तरी निमूट राहतील एकत्र. पण माणूस तर सतत बदलता, एके जागी शांत राहणार नाही. सतत चळवळ. कारण सतत बदलणाऱ्या जाणीवेचेच नाव आहे माणूस. त्याची मोळी कशी बांधायची? शक्य आहे का ते? अशी मोळी बांधल्याशिवाय चालूही शकत नाही आणि अशी मोळी बांधताही येत नाही. बांधली तर टिकत नाही. असं हे त्रांगडं आहे.

दुसरं एक उदाहरण झाडाचं आहे. मूळ, खोड, फांद्या, फुलं, फळं, शेंगा इत्यादी वेगवेगळं पण झाड मात्र एकच. त्यांची मोळी न बांधताही. शिवाय एक फुल तोडलं, एखादी फांदी तुटली तरीही नवीन येते. कारण मुळापासून शेंड्यापर्यंत एकच जीवनरस वाहत असतो. त्या जीवनरसामुळेच झाडाच्या सगळ्या घटकात ऐक्य असतं. हे आंतरिक ऐक्य असतं. म्हणूनच त्यात संघर्षही नसतो आणि मारूनमुटकून घडवलेल्या एकतेचे धोके वा मर्यादाही नसतात. ते अंगभूत ऐक्य असतं. मानवी ऐक्य उत्पन्न होण्यासाठी असाच जीवनरस मानवी समाजात वाहायला हवा. जाणीवांचा विकास (भावनांचा नव्हे) हाच तो जीवनरस राहील. त्याला पर्याय नाही. देवाणघेवाण, हिस्सेवाटे, तागडीचे मोजमाप, स्वातंत्र्य, समता, हक्क, कर्तव्य, न्यायअन्याय इत्यादी कशानेही ऐक्य येणार नाही. जाणीवांचा विकास हाच ऐक्याचा महामार्ग आहे आणि तो महामार्ग चालला तर अन्य प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

श्री गणेश मानवी समुदायाला जाणीवांच्या विकासाचा आशीर्वाद देवोत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, १५ सप्टेंबर २०१६

विमा

आज गप्पांमध्ये एक मुद्दा आला विम्याचा. आजकाल सगळ्या गोष्टींचा विमा आहे. मुळात विमा काय आहे. मला त्याचा इतिहास ठाऊक नाही पण विमा ही सामाजिक जाणिवेतून आलेली व्यवस्था असावी असा माझा तर्क आहे. म्हणजे अनेकांनी थोडं थोडं जमा करायचं आणि ज्याला गरज पडते त्याला कमी/ जास्त मदत द्यायची. प्रत्येकाला मदत लागेलच असं नाही. तरीही सगळ्यांनी contribute करायचं. हे मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्याला व्यवसायाचं रूप मिळालं. परंतु हळूहळू अन्य सगळ्याच क्षेत्रात जसं, वृत्तीचं व्यवसायात आणि व्यवसायाचं व्यभिचारात रूपांतर झालं तसंच विम्याचंही झालं. परिणामी जो विमा व्यक्तिगत निर्णयाचा भाग असायला हवा (आणि अजून काही प्रमाणात आहे) तो अपरिहार्य होऊ लागला. आरोग्य क्षेत्रात हा प्रकार वाढू लागला आहे. पुष्कळदा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी विमा आहे की नाही याची चौकशी होते. त्यातून आर्थिक चाचपणी होते. विदेशी जातानाही आरोग्य विमा महत्वाचा ठरतो. स्वयंचलित गाड्यांसाठी तर तो अपरिहार्यच करण्यात आला आहे. नुकतीच त्यासाठीची रक्कम वाढवण्यात आली आणि अलीकडे त्यासाठीचा दंड वाढवण्यात आला. खरं तर विमा ही ऐच्छिक बाब असायला हवी. त्याचा फायदा किंवा तोटा त्या त्या व्यक्तीला होईल. त्याची जबरदस्ती कशाला असावी? तो गुन्हा का ठरवण्यात यावा? इथे आठवण होते महात्मा गांधी यांची. जीवनात एका क्षणी त्यांनी काढलेली विमा पॉलिसी रद्द केली होती. का? त्यांचे म्हणणे असे की, सगळं जग ही ईश्वराची निर्मिती आहे आणि प्रत्येक जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी जर ईश्वराची तर मी काळजी का करू? सगळे लोक या स्तराचा विचार करू शकत नाहीत, त्या स्तरावर जगू शकत नाहीत हे खरे. मात्र जे त्या पातळीवर विचार करतात त्यांना त्यानुसार राहता यायला हवे की नाही?

दुर्दैवाने आज माणसाला आर्थिक प्राणी किंवा राजकीय प्राणी किंवा सामाजिक प्राणी समजून सगळा विचार केला जातो. त्यामुळे सगळ्यांना एकच मापदंड लावले जातात. परंतु माणूस असा आहे का? खरं तर माणूस कसा आहे, काय आहे हे माणसापूर्वी अस्तित्वात असलेली एखादी गोष्टच सांगू शकेल. माणूस हा माणसापूर्वी अस्तित्वात नव्हता हे मात्र निश्चित. तरीही त्यासाठी त्याने घेतलेल्या सातत्यपूर्ण ध्यासाने तो या निष्कर्षापर्यंत आला आहे की, माणूस हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या जाणीवस्तरांवर जगतो. उद्या यात आणखीनही भर पडू शकेल. आज मात्र त्याला हे चार स्तर माहिती आहेत. दुर्दैवाने आजचा सगळा विचार आत्मा हा स्तर लक्षात न घेताच केला जात असल्याने, सगळे विचार, सगळ्या व्यवस्था, सगळ्या रचना, सगळ्या पद्धती, सगळे उपाय, सगळी विश्लेषणे close ended असतात. बाहेर पडण्यासाठी, नकार देण्यासाठी, बाजूला होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी; जो openness हवा तोच हरवला आहे. Open ended विचार केला तर अराजक निर्माण होण्याची भीती, हा सुद्धा आत्मा या स्तराचा विचार न करण्याचाच परिणाम आहे. स्वामी विवेकानंदांनी या संदर्भात काही संकेत वेळोवेळी दिले होते. मूलभूत विचारांचा जागर केल्याविना वर्तमान भुलभुलैय्यातून मार्ग निघणे दुरापास्त आहे हे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १५ सप्टेंबर २०१९

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

उज्जैन च्या नोंदी

मध्यंतरी दोन दिवस उज्जैनला होतो. काही निरीक्षणे.

- शहर छान आहे.

- क्षीप्रा नदी मोठी, वाहती, स्वच्छ, देखणी आहे.

- क्षीप्रा नदीत मासोळ्या भरपूर आहेत. मुरमुरे, कणिकगोळे टाकले की झुंडी धावत येतात. त्यांच्याशी खेळणे हा निरागस आनंद.

- श्री महाकाल मंदिर मोठे, विस्तीर्ण आहे. व्यवस्था चांगल्या आहेत. धक्काबुक्की नाही. पंडे नाहीत.

- शिवलिंगाचे स्पष्ट दर्शन होईल अशी व्यवस्था.

- महाकाल मंदिर क्षीप्रा नदीपासून थोडे दूर आहे. रुद्रसागर तलावाकाठी.

- महाकाल मंदिराच्या जवळच देखणे, शांत, पवित्र `भारत माता मंदिर' आहे.

- खाणे पिणे, रिक्षा आदी महाराष्ट्रापेक्षा थोडे स्वस्त.

- डास नाहीत.

- श्री भैरवनाथ ही वेगळी स्वतंत्र देवता. श्री भैरवनाथ म्हणजे श्री महाकालाचे सेनापती.

- त्यांचे मंदिर शहरापासून लांब जंगलात आहे.

- मदिरा जेथे अर्पण केली जाते ते मंदिर श्री भैरवनाथाचे. तेथे अनेक भक्त, मुली, महिला सुद्धा फुलांच्या टोपलीसोबत मदिरेची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात. त्याची जबरदस्ती नाही. दारू चढवलीच पाहिजे असे नाही.

- मदिरापान न करणारेही बाटली अर्पण करतात आणि परत मिळणारी अर्धी बाटली तिथल्याच रिक्षावाला किंवा अन्य कोणाला देऊन टाकतात.

- मदिरा अर्पण करण्याची पद्धत असूनही श्री भैरवनाथ मंदिरातील वातावरण मात्र अन्य मंदिरांप्रमाणेच सामान्य. कुठेही असभ्यता, अश्लीलता, तमाशे नाहीत.

- शहराच्या जवळच जंगलात नीतिशतक कर्ते श्री. भर्तृहरी यांची गुहा आहे. नाथ संप्रदायाचे हे एक महत्वाचे स्थान आहे. या जागेला तपश्चर्येचा सुगंध आहे.

- श्री. भर्तृहरी हे सम्राट विक्रमादित्य याचे बंधू. एक बंधू सम्राट आणि एक बंधू नाथजोगी फकीर.

- बाजारात मलाईदार दूध, रबडी, भांग आदी भरपूर उपलब्ध

- श्रीपाद कोठे

१४ सप्टेंबर २०१८

हिंदी

आज सकाळी मी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कारण ती छान भाषा आहे. मला आवडते आणि थोडीफार येतेही. सोबतच ती तुलसी, मीरा, प्रेमचंद, दुष्यंतकुमार, निराला आदींचीही भाषा आहे. या भाषेतील अनेकानेक गाण्यांनी करोडो लोकांच्या भावविश्वाला आकार दिला आहे. पण संध्याकाळ होता होता या सगळ्या विचारावर एक विशादाची सावली पडली. बातम्यांमध्ये ऐकण्यात आलं की, देशाची एक भाषा असावी, असं मत गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील कार्यक्रमात व्यक्त केलं. आश्चर्य वाटलं आणि दु:खही झालं. त्यांनी असं मत मांडलं असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही होऊ शकत. फेसबुकवर सुद्धा या विषयाची चर्चा सुरू झालेली दिसली. One nation, one language. या पोस्टवर तर त्यापुढे जाऊन one religion असंही मत व्यक्त झालं आहे. समाज माध्यमात आणि समाजात अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच आहे. एकता, ऐक्य अथवा एकत्व म्हणजे एकरूपता हेच गेल्या शे दोनशे वर्षात आमच्या कानीकपाळी सांगितलं गेलं. त्याचा हा परिणाम आहे. परंतु प्रश्न हा आहे की उच्चपदस्थ आणि देशाचे कर्तेधर्ते यांनीही असाच विचार करावा? अनेकतेत एकता. विविधतेत एकता. हा विचार आणि तशी माणसांची आणि समाजाची घडण हीच तर भारताची जगाला देणगी आहे. एवढेच नाही तर आज जग त्यासाठी आसुसलं आहे. अशा वेळी आम्ही मात्र आमच्या प्रकृतीशी न जुळणारा मार्ग धरणार आहोत का? त्याहून महत्वाचा प्रश्न आहे, भारतावर अभारतीयत्व लादले जाणार आहे का? का लादले जावे? भाषेच्या संबंधाने गोळवलकर गुरुजींनी केलेले एक मतप्रदर्शन आठवते. ते म्हणाले होते - भारताच्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. केवळ त्यांनी म्हटले म्हणून तसा विचार करावा असे नाही. माणूस, मानवी सभ्यता आणि मानवी जीवन या व्यापक संदर्भात सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. तसे न होता आपण अधिकाधिक लघु होतो आहोत का हा मूळ प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

१४ सप्टेंबर २०१९

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

वेळ नाही

दीपिका पदुकोणची good day बिस्किटांची एक जाहिरात सध्या येते आहे. आपल्याच तालात असणाऱ्या २-४ जणांना त्यांच्या तंद्रीतून बाहेर काढण्यासाठी ती प्रत्येक ठिकाणी काही क्षण रेंगाळते. त्यातलं हे रेंगाळणं  फार छान आहे. अन ती एक सामाजिक टिप्पणीही आहे. जाहिरात करणाऱ्याच्या मनात सामाजिक भाष्य करावं असं नसेलही कदाचित. पण सहजपणे ते झालं आहे. आज लोकांकडे जर कशाची सगळ्यात जास्त कमतरता असेल तर ती वेळेची. त्यामुळे रेंगाळण्याला वेळ नाही, व्यायामाला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, भेटायला वेळ नाही, साधनेला- विचारांना- चिंतनाला- वेळ नाही... अशी भली मोठी यादी. त्यामुळे एक तर तणाव किंवा खुरटलेपण. बरं तर बरं- यात काही चूक आहे असेही वाटत नाही आणि असंच चालणार किंवा असंच चालावं याला मूक संमतीही आहे. `आपल्याला वेळ नाही' ही विचार करण्याची गोष्ट नसून फुशारकीची बाब आहे असा समज पसरला आहे. एखाद्याकडे वेळ आहे म्हणजे तो `रिकामटेकडा' अथवा निरर्थक असाच सार्वत्रिक समज. प्रत्येकाला मोकळा वेळ असलाच पाहिजे. ती एक मोठी आवश्यकता आहे. पण त्याचा फारसा विचार होत नाही. तो व्हायला मात्र हवा.

एखाद्याच्या वेळेवरील आक्रमण हाही एक मोठा विषय. तो पुन्हा कधीतरी.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०१६

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

मनाचे उन्नयन

- जुगार आणि स्त्रीची विटंबना (अपमान नव्हे) यातून महाभारत घडलं. जुगार आणि स्त्रीची विटंबना आजही सुरू आहे.

- त्या त्या वेळी संघर्ष आवश्यक असला तरीही, संघर्षाने मूळ प्रश्न सुटत नाही.

- मानवी मनाचं उन्नयन जेवढं अधिक तेवढं जीवन सुखी, समाधानी.

- कित्येक युगं लोटली. मनाच्या उन्नयनाकडे अधिक लक्ष देण्याची, संघर्षाच्या अन शांततेच्या काळातही त्यावर भर देण्याची गरज माणसाला अजून मनापासून पटत नाही.

- mankind is content with flexing muscles.

- शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, तसेच मनाच्या उन्नयनाची जबाबदारी दुसऱ्यांनी उचलावी. हाच आहे मानवी प्रगतीचा सारांश.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०२०

आवाज आणि भक्ती

श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत, `मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज सुद्धा ईश्वराला ऐकू जातो.' महात्मा कबीराचाही याच आशयाचा दोहा आहे. संत महात्म्यांनी आम्हाला हे समजावले तरीही आम्ही देवभक्ती करताना आवाज किती जास्तीत जास्त वाढवता येईल आणि किती अधिकाधिक वेळ त्यासाठी वापरता येईल हेच पाहतो. असे का? खरे तर मुक्याने बोलतो तेव्हाच ईश्वराशी खरा संवाद होतो. पोलिसांनी परवानगी दिली असली तरीही आम्ही डीजे वगैरे लावणारच नाही, असे भक्त लोक कधी सांगू लागतील? मोठ्या आवाजाने शक्ती वाढत नाही, उलट शक्तीचा क्षय होतो.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१३

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

स्मारके

जुन्या किल्ल्यांच्या वापरावरून सध्या चर्चा सुरू आहे. सरकारनेही बचावात्मक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने एक प्रश्न मनात येतो की, अस्मिता आणि अस्मितेशी जोडलेल्या वस्तू, वास्तू, नावे इत्यादींचे महत्व किती? या साऱ्यात गुरफटायचे किती? ही पृथ्वी 'विपुला' आहे. तिच्या निर्मितीपासूनच तिने कर्मवीर, ज्ञानी, पराक्रमी, त्यागी अशा अगणित स्त्री पुरुषांना जन्म दिला आहे. आजही देते आहे आणि भविष्यातही देईल. प्रत्येकाला अनुयायी असतातच. प्रत्येकाचे कमीअधिक कर्तृत्व असतेच, योगदान असतेच. त्याविषयी कृतज्ञता बाळगणे एक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी जतन करण्याचा अट्टाहास ही वेगळी गोष्ट आहे. अशी वेळ न येवो की, पृथ्वी फक्त स्मारकांनी भरून जाईल आणि माणसांना जागाच उरणार नाही. भूतकाळाचे सिंहावलोकन करायचे असते त्यात गुंतायचे नसते आणि त्याचे अवास्तव दैवतीकरण करायचे नसते हे समजून घ्यायला हवे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ९ सप्टेंबर २०१९

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

शास्त्र आणि भाव

ॐ नम: शिवाय

आज श्रावणातला शेवटला सोमवार. शास्त्रापेक्षा भाव मोठा असतो हे सांगणारं हे छायाचित्र. शास्त्र सांगतं- शिवाला पांढरं फुल वाहा. भाव जास्वंदीचं लाल फुल वाहतो. अन भगवान ते स्वीकारतातही. शास्त्र पद्धती सांगतं. भाव म्हणतो- `पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति'. या भावाचं आकलन झालं की, श्रावण सोमवारची खुलभर दुधाची कहाणी समजते. मग, सगळेच लोक ट्राफिक सिग्नल तोडतात मीच का पाळू? हा प्रश्न विरघळून जातो. अन मनातला मूर्तिकार जागा होऊन दगडातील मूर्ती, अन मूर्तीतील ईश्वर दिसू लागतो. तो मूर्तीत असूनही चराचर विश्वाच्या कणाकणात असतो. चांगल्यात अन वाईटातही असतो. माझ्यात अन तुझ्यातही असतो. उजेडात अन अंधारातही असतो. सगळंच त्याचं असतं, अन सगळं तोच असतो. शास्त्र जागं असेल तोवर दगडच दिसतात. दगडातील मूर्ती अन मूर्तीतील ईश्वर नाही दिसत. शास्त्र `मी'ला चालवतं, भाव `मी' घेऊन जातो. म्हणून शास्त्र आवडतं, पटतं, समजतं. भाव आवडत नाही, पटत नाही, समजत नाही. पण भाव जागल्याशिवाय अभाव मात्र दूर होत नाही.

- श्रीपाद कोठे

७ सप्टेंबर २०१५

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

Privacy

privacy हा मुलभूत अधिकार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. माझं शरीर माझं आहे. त्यामुळे कोणते कपडे घालायचे हे मी ठरवेन. काय खायचं हे मी ठरवेन. असेही युक्तिवाद ऐकायला मिळाले. मात्र, हेल्मेट घालायचे की नाही हे मी ठरवेन, असा काही सूर ऐकू आला नाही. माझ्या शरीरावर माझा हक्क मान्य करायचा तर हेल्मेटसक्ती कशी योग्य ठरू शकते? कपडे वा खाणेपिणे यांनी काही सामाजिक उपद्रव तरी होऊ शकतो. हेल्मेट परिधान न करण्याने तर तेही नाही. तेव्हा हेल्मेट विरोधकांनी privacy अधिकाराच्या अंतर्गत हेल्मेटसक्तीला आव्हान द्यायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०१७

मानवी hardware कडून, मानवी software कडे

भारतीय राज्यघटनेचे `कलम ३७७' आज चर्चेचा मोठा विषय आहे. अपवाद वगळता फारशी सार्थक चर्चा दिसली नाही. `संस्कृतीवर आघात' आणि `संस्कृतीवाद्यांना चपराक' हे दोन्हीही बुद्धीची मर्यादा अधोरेखित करणारे. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण आदर करूनही, त्यांचे काही शेरे विनाकारण म्हणावे असे. १५८ वर्षे जुने हे कलम रद्द केले याचा अर्थ त्यापूर्वी समलिंगी व्यक्तींना गुन्हेगार समजले जात नव्हते. त्याचा दुसरा अर्थ समाजात अन्य लोकांसारखेच ते होते. त्यामुळे त्यावर अश्रू ढाळणे किंवा `जितं मया' हे दोन्ही बरोबर नाही. अन सगळा प्रश्न मुळात हाच आहे. इंग्रजी विचार आणि व्यवस्थांनी व्यक्ती आणि समाज यांच्या ज्या धारणा इथे रुजवल्या त्याचा हा परिणाम आहे. समाज म्हणजे काय? तर सरकार. सरकारने ठरवायचे आणि सगळ्यांनी आपले सगळे जीवन त्याप्रमाणे जगायचे. त्यापेक्षा वेगळे काही असेल तर तो गुन्हा. व्यक्तीचे बरेवाईट, व्यक्तीचे जगणे सगळे सरकारच्या अधीन. दुसरीकडे व्यक्ती म्हणजे काय? फक्त मी मी आणि मी. मला जसे वाटेल तसे वागण्याचा, जगण्याचा मला पूर्ण अधिकार आणि त्या जगण्या वागण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला पाहिजे. ते अगदी अधिकृतपणे मान्य केले पाहिजे. त्यावर मोहोर उमटवली गेली पाहिजे. ही जी मानवी अस्तित्वाची सुप्त सत्ताकांक्षा आहे तीच सत्तावाद आणि व्यक्तिवाद यातून डोकावत राहते. या दोन्हीच्या सत्ताकांक्षेतून वारंवार संघर्षाची स्थिती निर्माण होते. तीच आजही झालेली पाहायला मिळते. मुळातच व्यक्तीचे व्यक्तित्व किंवा सत्तेची शक्ती या दोन्हीही जीवनप्रवाहाच्या अवस्था आहेत, हे लक्षात घेतले जात नाही. भारतेतर विचारांची अपूर्णता आणि खंडित पद्धत यांचा हा परिणाम आहे. मानवाला ज्ञात असलेले आजवरचे सारेच विभ्रम आणि अजून ज्ञात नसलेले किंवा नवनवोन्मेषशालिनी सृष्टीच्या कालगर्भातून प्रत्यक्षात येऊ शकणारे सारेच विभ्रम; यांना भारतीय विचार मान्यता देतो. अगदी ठाऊक नसलेल्या आणि कल्पना करू शकणार नाही अशाही गोष्टींना. कारण या सृष्टीची चक्र आपल्या हाती नाहीत हे त्याचे स्वच्छ आणि प्रामाणिक मत आहे. मात्र त्याच वेळी आमचे अस्तित्व ही केवळ एक अवस्था आहे त्यामुळे त्यावर आमची मालकी नाही. आमचे अमुक एक स्वरूप घट्ट धरून ठेवणे वेडेपणा होय, हेही भारतीय चिंतन सांगते. आम्ही जन्माला आलो तेच परिपूर्ण आहोत किंवा आम्ही जन्माला आलो तसेच राहू, हे दोन्ही विचार सुद्धा केवळ आडमुठेपणा आहेत. स्वत:च स्वत:ला नाकारणे आणि संकुचित करणे होय. आमच्या वृत्ती, रुची, इच्छा, गरजा, यांचे महत्व आहेच, पण त्याचवेळी तो काही पूर्णविराम नाही. हे मूळ सूत्र व्यवधानातून सुटलं की समस्या आणि संघर्ष होतात. आज विद्यमान विचारात आणि व्यवस्थात हे सूत्र पूर्ण लोपल्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक घटक कुरघोडी करायला पाहतो. कुरघोडीचे एक स्वरूप प्रत्यक्ष दाबण्याचे असते, तर दुसरे स्वरूप सिद्ध करणे किंवा माघार घ्यायला लावणे असे असते. समलिंगी संबंधांना जगभरात अन्यत्र कशी आणि केव्हा मान्यता मिळाली हे पाहिले तर भारतीय समाजाची प्रगल्भता उठावदार होते. याच्याही मुळाशी विचारांची व्यापकता हेच कारण आहे. लैंगिक orientation ही स्वाभाविक बाब असली तरीही त्यातील कोणतेही orientation ही फार मोठी बाब नाही. एवढेच नाही तर त्याने माणूस सुखी वा दु:खी होत नाही. ते म्हणजे पूर्णता नाही. ती समाधानाची हमी नाही. खाणे पिणे चालणे फिरणे अशा असंख्य क्रियांपैकी ती एक क्रिया आहे. त्याचा गवगवा किंवा त्यात अडकून पडणे हा काही शहाणपणा नाही. बाकी राहिले दोन मुद्दे - एक समाजाची धारणा. ज्याशिवाय घोर व्यक्तिवादी सुद्धा एखादा दिवस सुद्धा जगू शकणार नाही. त्या समाजधारणेचा साधकबाधक विचार करावाच लागतो. केलाच पाहिजे. त्याबाबत उगाचच आव्हानात्मक भाषा ही बुद्धीशून्यता आहे. दुसरा मुद्दा व्यक्तिगत मान/ अपमान, प्रतिष्ठा/ अप्रतिष्ठा यांचा. हे मानापमान प्रकरण मुदलातच बरेचसे सापेक्ष असते. त्यास समाज वगैरे रंग देणे किंवा प्रत्येक वेळी उठसूठ सरकार, न्यायपालिका किंवा तत्सम यंत्रणांना भरीस घालणे हा बावळटपणा आहे. त्याचा काही अंश व्यक्तीच्या विकासाला साहाय्यकच असतो आणि त्यातील अतिरेक केवळ मानवी जाणिवांच्या प्रगल्भतेने कमी होऊ शकतो. रडक्या मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेकडे `पाहा हा आम्हाला चिडवतो' असा गळा काढणे निरर्थक आहे. त्याबाबतीत समलैंगिकच काय अगदी सामान्य असलेल्या, परंतु लैंगिकतेपासून ठरवून वा परिस्थितीवश दूर राहिलेल्या; महिलाच नव्हे तर पुरुषांनाही मस्करी आणि टोमणे सहन करावे लागतातच. अशी मस्करी वा टोमणे मारणारे पुरुषही असतात आणि महिलाही. मात्र विचार, समज आणि जाणीवा परिपक्व असलेले लोक अशी टीकाटिप्पणी करीतही नाहीत आणि विचार, समज आणि जाणीवा परिपक्व असलेले भुक्तभोगी ते मनावरसुद्धा घेत नाहीत. मानवाला मानवी hardware कडून, मानवी software कडे घेऊन जाणारे आणि त्याविना पर्याय नाही हे सांगणाऱ्या युगात आपण पोहोचलेलो आहोत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ६ सप्टेंबर २०१८

संघ आणि भाजप

संघाची तालिबानशी तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांचे चित्रपट चालू देणार नाही, असं भाजपने म्हटल्याचं वृत्त वाचण्यात आलं. माझ्या समजुतीप्रमाणे, संघाची ही पद्धत नाही. संघावरील टीकेमुळे व्यथित होणाऱ्या स्वयंसेवकांनाही भाजपची भूमिका योग्य वाटू शकते. संघाबद्दलचाच विषय असल्याने ही संघाचीच भूमिका आहे असाही समज होऊ शकतो. तसेही भाजपच्या मुखाने संघच बोलतो ही जनसाधारणांची समज आहेच. ती चुकीची आहे असं म्हणूनही ती बदलता मात्र येत नाही. हिंदुत्वाची संघधारा आज एका नवीन वळणावर उभी आहे असे वाटते. (हा विषय सार्वजनिक चर्चेचा आहे का? आदी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण सगळंच चव्हाट्यावर येण्याच्या आणि त्यावर विचार करीकरीपर्यंत त्याचे परिणाम होऊन जाण्याचा हा काळ आहे. या काळात असे प्रश्न अर्थहीन ठरतात.)

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०२०

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

आचरट निखिल वागळे

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर जे काही विचारमंथन झाले त्यावेळी पुरोगामी विचारवंतांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी व्यक्त केलेली शंका इतक्या लवकर खरी होईल असे मलासुद्धा वाटले नव्हते. संदर्भ कोणताही असो, या लोकांचा हिंदूविरोधी वा धर्मविरोधी कार्यक्रम लपून राहत नाही. मदरश्यांना अनुदान देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून झालेल्या चर्चेत तेच दिसून आले. आचरट निखिल वागळेने आपल्या अकलेचे तारे तोडलेच. प्रश्न होता, मदरश्यांना अनुदानाचा. स्वाभाविकच त्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक बाजूंची चर्चा झाली. मदरशातील शिक्षण यावरही चर्चा झाली. शिवसेनेच्या रावते यांनी सूचना केली की, मदरसे बंद करून त्यांना आश्रमशाळा असा दर्जा द्यावा. भाजपचे माधव भंडारी यांनी सूचना केली की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा असतात त्या अधिक चांगल्या करून मुस्लिम मुले-मुली त्यात जातील अशी व्यवस्था करायला हवी. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. त्यावर सर्वज्ञानी वागळेंनी काय म्हणावे? ते म्हणाले, तुम्ही वेद पाठशाळा बंद करायला तयार आहात का सांगा? मुळात कोणीही इस्लामचे शिक्षण बंद करावे असे म्हटलेले नव्हते. पण त्याचा सोयीस्कर अर्थ काढून वेद पाठशाळा बंद करण्याची सूचना काय दर्शवते? वेद पाठशालांना काही सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे मुद्दाच गैरलागू आहे. दुसरे म्हणजे इस्लाम आणि हिंदू अशी तुलनाच होऊ शकत नाही. अगदी, हिंदुत्वाचा दुरान्वयानेही ज्यांच्यावर आरोप होत नाही, वा होऊ शकत नाही असे डॉ. आंबेडकर, नरहर कुरुंदकर, आचार्य रजनीश वा अन्य अनेक भारतातील वा भारताबाहेरील अभ्यासक, चिंतक यांनी इस्लामचे जे विश्लेषण केले ते स्वीकारण्याची या ढोंगी लोकांची तयारी नाही. वेदांनी तर `आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:' (संपूर्ण विश्वातून सर्व दिशांनी मंगल विचार आमच्याकडे येवोत) अशीच प्रार्थना केली आहे. थोडीशी अक्कल असणारा गाढव सुद्धा स्वप्नातही हिंदू धर्म असहिष्णू आहे वा हिंदू धर्माची शिकवण असहिष्णू आहे असे म्हणणार नाही. पण सोने आणि विष्ठा दोन्हीही सारखेच आहे असे दाखवले तरच ती समानता, अशी या पुरोगाम्यांची कल्पना आहे. तत्व आणि व्यवहार हा झगडा अनादी काळापासून सुरूच आहे. त्यासाठीच मानवी सभ्यतेची धडपड सुरु आहे. तो एक संपूर्ण वेगळा विषय आहे. तसेच धार्मिकता आणि इहवाद याचेही. माणसाला (केवळ हिंदूंना नव्हे) नीतिमान बनवण्यात इहवादापेक्षा धार्मिकतेनेच आजवर मोठी भूमिका बजावली आहे. १९५० मध्ये इहवादी राज्यघटना स्वीकारल्यानंतरही सुमारे सहा वर्षे चिंतन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. इहवादी घटना देणाऱ्या आंबेडकरांनी धर्माची आवश्यकता सुद्धा आग्रहाने प्रतिपादन केली आहे. परंतु विचार या गोष्टीशी काहीही देणेघेणे नसलेल्या निखिल वागळेने याचा विचार का करावा हाही प्रश्नच आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की, त्याच्यासारखे विद्वान(!!!) आपली हिंदूविरोधी आणि धर्मविरोधी मळमळ ओकत राहून आणखी किती घाण करून ठेवणार आहेत? त्यांचा हा आचरटपणा थांबव रे देवा.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०१३


Hindu view of life

भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस एकत्रितपणे साजरा होण्याचा योगायोग आज आला आहे. या सगळ्यांना विनम्र प्रणाम. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आज शिक्षक दिनही आहे. त्यानिमित्त सगळ्या शिक्षकांना विनम्र प्रणाम.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. अन त्यासोबतच महान तत्वज्ञ अन विचारवंतही होते. विज्ञानी होण्याची इच्छा असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन योगायोगाने तत्वज्ञानी झाले. मनाविरुद्ध होणारी एखादी गोष्ट सुद्धा आपल्याला आपल्या जीवन ध्येयाकडे कशी घेऊन जाते याचे ते उदाहरण होते. माहिती आणि दृष्टीकोनाच्या अभावी पाश्चात्य विचारवंत हिंदू तत्वज्ञान, हिंदू चिंतन, हिंदू जीवन मूल्ये यांच्यावर टीका करतात किंवा त्याचे विपरीत अर्थ लावतात. त्याला उत्तर देण्यासाठी आणि विचारांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी आपली सगळी बुद्धिमत्ता अन कौशल्य पणाला लावले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे हिंदुत्वाचे प्रखर प्रवक्ताही होते. हिंदू तत्वज्ञानावर त्यांनी विपुल लेखनही केले आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर-

`The challenge of Christian critics impelled me to make a study of Hinduism and find out what is living and what is dead in it. My pride as a Hindu, roused by the enterprise and eloquence of Swami Vivekananda, was deeply hurt by the treatment accorded to Hinduism in missionary institutions.'

त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी १९२६ साली लिहिलेले The Hindu View of Life हे पुस्तक.

http://isites.harvard.edu/fs/docs/icb.topic1172135.files/13047494-A-Hindu-View-of-Life-Dr-S-Radhakrishnan.pdf

डॉ. राधाकृष्णन : काही नोंदी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त तीन गोष्टींची नोंद अवश्य घ्यायला हवी.

१) त्यांचे पहिले पुस्तक होते- The Philosophy of Rabindranath Tagore. टागोरांचे तत्वज्ञान हा भारतीय आत्म्याचा सच्चा आविष्कार होता, असे त्यांचे मत होते.

२) राष्ट्रपती झाल्यावर त्यांना १० हजार रुपये पगार मिळत होता. त्यातील केवळ २५०० रुपये ते घेत होते. त्यातील उत्पन्न कर वजा करून १९०० रुपये ते स्वीकारत असत. आपली गरज तेवढ्याने भागत असल्याने त्यापेक्षा अधिक घेणे योग्य नाही असे त्यांचे मत होते. उरलेले ७५०० हजार रुपये, म्हणजे ७५% पगार ते पंतप्रधान निधीत जमा करीत. समाजाच्या आजच्या मानसिकतेला हा आरसा दाखवण्याची गरज आहे.

३) ते स्वत: देश विदेशात प्राध्यापक होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. कोलकाता विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी स्वत:च आपला जन्मदिवस साजरा न करता, करायचाच असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले होते. यातील आपला जन्मदिन साजरा करू नये ही सूचना त्यांचे मोठेपण दाखवते. त्याच वेळी शिक्षक दिन म्हणून आज असलेली अवस्था डोळ्यात झणझणीत अंजन घालते. वास्तविक प्राथमिक शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिकवणारे शिक्षकच. मात्र त्यांचा जन्मदिवस शिक्षकांसाठी म्हणजे शालेय शिक्षकांसाठी म्हणजे कमी प्रतीच्या शिक्षकांसाठी असल्याचा समज समाजाने करून घेतला आहे. प्राध्यापक मंडळी स्वत:ला शिक्षक समजत नाहीत. महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होत नाहीत. अगदी पंतप्रधान वा राष्ट्रपती यांचे कार्यक्रम सुद्धा शालेय वर्तुळापुरते मर्यादित असतात. दुर्दैव याशिवाय दुसरे काय म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे 

५ सप्टेंबर २०१७

व्यवहाराचा आधार

गणरायाचे आगमन आणि वास्तव्य शांततेत पार पडले आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोब्बर मुहूर्त साधल्याने विसर्जन दणाणून जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जो काही भाग बातमीत प्रकाशित झाला त्यावरून असं वाटतं की, त्यात थोडासा वैतागाचा भागही आहे. वैताग बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरायला हवा होता असे वाटते. खरं तर प्रत्येक गोष्टीला न्यायाच्या फुटपट्ट्या, कायद्याची चौकट, मानकीकरण (standardization) यामुळे मानवी जगणं गुंतागुंतीचं अन त्रासदायक होतं. पण करणार काय? कारण आज तर प्रत्येकाचं `वाटणं' एवढाच एक महत्वाचा मुद्दा असतो. प्रत्येकाचं `वाटणं', प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचं मन; हे सर्वोच्च झाल्याने; कोट्यवधी मने, कोट्यवधी इच्छा, कोट्यवधी मते; यांचा संघर्ष अपरिहार्य ठरतो. मग न्याय, कायदा, मानक हे पुढे येते. तरीही मार्ग निघत नाहीच. ज्याचे ग्रह साथ देतात तो नाचतो, ज्याचे ग्रह साथ देत नाहीत तो रडतो, कुढतो, वैतागतो. मात्र प्रत्येकाचं `मन', `मत', `इच्छा' एवढ्याच आधारे विचार करणे बरोबर नाही असे मात्र कोणी म्हणताना दिसत नाही. `मन', `मत', `इच्छा' चुकीचे नक्कीच नाहीत. पण आज त्या सगळ्याला एवढी sanctity देण्यात येते की, त्यावर साधकबाधक चर्चा होण्याची गरजच वाटत नाही. `मन', `मत', `इच्छा' यावर चालण्यापेक्षा, यानुसार जगण्यापेक्षा; साधकबाधक विचार करून चालावं, जगावं ही भूमिका पुढे यायला हवी. `आनंद' याच गोष्टीचं उदाहरण घेऊ. आनंद म्हणजे काय? आनंद कसा व्यक्त करावा? या प्रश्नांना प्रत्येकाचे `मत' हे उत्तर नाही होऊ शकत. `मत' असावं, पण त्याची सगळ्या अंगाने चिकित्सा होत राहावी आणि त्या चिकित्सेतून जे योग्य असेल ते बाणवण्याची वृत्ती असावी. माझे मत, प्रत्येकाचे मत; अशा भाषेपेक्षा आणि अशा भावनेपेक्षा; साधकबाधक विचार आणि विवेक, अशी भाषा उपयोगात यायला हवी. आनंद किंवा कला आणि त्यांची अभिव्यक्ती; यांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, आरोग्यशास्त्रीय अशा विविध अंगांनी चर्चा होत राहायला हवी. तिची दुराग्रही नको, पण आग्रही मांडणी; हा समाजाचा मुख्य प्रवाह व्हायला हवा. ज्येष्ठ नागरिकांच्या द्वारे असा प्रवाह अगदी कालपर्यंत वाहत होता. आता ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवाहपतितासारखेच जगायचे वागायचे असते. बाकीच्यांचे काय बोलणार? केवळ अभ्यासापुरती, पुस्तकांपुरती, विद्वानांच्या चर्चेपुरती, पीएचडीच्या प्रबंधापुरती चिकित्सा करायची आणि समाजाचा आणि व्यक्तीचा व्यवहार `ज्याचे त्याचे वाटणे' असाच चालू द्यावा; हे योग्य नाही. एका मानसोपचार तज्ञानेच आत्महत्या केल्याची कालची ठाण्याची बातमी अभ्यास, व्यवहार आणि व्यक्तिवाद यांचा एकत्रित विचार किती आवश्यक आहे यावर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ५ सप्टेंबर २०१७

करुणा आणि कर

नोंद घ्यावी अशा दोन गोष्टी अलीकडे लक्षात आल्या. महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जो हैदोस घातला त्यानंतर मदतीची जी वृत्ती सगळीकडे दिसून आली, त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. दुसरी नोंद घेतली ती स्व. अरुण जेटली यांच्या निधनानंतर आलेल्या माहितीची. त्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या सहायकांना, त्यांच्या मुलांना केलेल्या मदतीची.

या दोन्ही बाबतीत मानवीय भावना, करुणा स्पर्श करून जाते. समाजावर त्याचा सकारात्मक परिणामही होतोच. परंतु मानवी व्यवहाराच्या या पैलूचा सामाजिक, आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता येईल का? तसा तो व्हायला हवा.

त्या अनुषंगाने मनात आलेली कल्पना -

जिल्हा स्तरावर एक कोष तयार करावा. ज्याला जेव्हा आणि जेवढी मदत द्यावीशी वाटेल तेवढी त्यात जमा करता यावी. हा कोष पूर्णतः गैर सरकारी असावा. फक्त अधिकृतता म्हणून जिल्हा प्रशासनाची मोहोर असावी. बाकी शासनाचा प्रतिनिधी, शासकीय दखल, निर्बंध, निर्णय काहीही नसावे. राजकारण आणि प्रशासन यांचा संबंध नसलेल्या, समाजात चांगली ओळख असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच ज्येष्ठ व्यक्ती विश्वस्त असाव्या. दर दोन वर्षांनी विश्वस्त बदलावे. हा निधी फक्त त्या जिल्ह्यात उपयोगात यावा. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, कुपोषण, प्रबोधन, सुरक्षा; अशा कामांसाठी तो खर्च करावा. या कोशात जमा होणाऱ्या निधीची चौकशी नसावी. काही संशय आल्यास संबंधित व्यक्तीच्या अन्य व्यवहारांवर नजर ठेवून चौकशी इत्यादी करावी. कर पाव टक्का कमी करण्यापासून सुरुवात करावी. हळूहळू कर कमी करत न्यावे. हे काम सरकारचे. टप्प्याटप्प्याने विविध कामातून सरकारने बाहेर पडावे.

- सरकारवरील बोजा कमी होईल.

- गरजा फोकस होतील.

- कामे निश्चित होऊ शकतील.

- जबाबदारी आणि सहभाग वाढेल.

- आवश्यक त्या गोष्टींची पूर्ती होऊ शकेल.

- कुठे काय गरज आहे त्यानुसार कामे करता येतील.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०१९


नियम आणि दंड

कठोर नियम आणि दंड यांनी माणूस चांगला होत असता तर - इस्लाम आज जगापुढील संकट झाला नसता, रशियाला पेरेसरॉईका ग्लास्नोस्ट आणि गोर्बाचेव्हची गरज पडली नसती, चीनपुढे कोणतीच समस्या उरली नसती, हिटलर आणि किम जोंग आदर्श महापुरुष ठरले असते.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०१९

चांगला जरूर होत नसेल पण शिस्त नक्की च येते।

हा प्रश्न संविधान निर्मात्यांना देखील पडला नसेल काय...?

चाणक्याने अर्थशास्त्र नामक ग्रंथ रचला. त्यात अनेक‌ नियमावली आणि संहितांचा उल्लेख आढळतो, राजा, न्याय शास्त्र, समाज आणि नीतिमुल्यांचा आदर न बाळगणारांना धाक बसवून राज्यशासनाची घडी बसवून दिली, ती कशा साठी...?

स्वतः होवून नियम पाळणे, हेच उत्तम. एका‌ विशिष्ट अनुशासनात राहण्याची संवय झाल्यास कालांतराने समाजात सुधारणा दिसून‌ येतात.

शंभर सव्वाशे वर्षांपुर्वी लोकांना‌ रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याची संवय नव्हती, घड्याळ नव्हते तेंव्हा लोकांना वेळेचे बंधन‌ पाळणे जमत नव्हते, आज ती स्थिती नाही.

आज काही लोक संवयीने कार्यालयात वेळेवर जातात, तर काही जण नियमाच्या धाकाने वेळ पाळतात.

मुजोर लोक नियम करा वा शिक्षा करा, ते‌ नियम‌ पाळतच नाहीत.

माणूस चांगला होण्यासाठी दंड व नियम नसतात. सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून व सगळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी असतात. नियम पाळले तर दंड भरावा लागणार नाही

मला वाटतं ही पोस्ट नीट समजून घ्यायला हवी. सविस्तर लिहायला जमेल तेव्हा पाहू पण काही मुद्दे - 

नियम, कायदे नसावेत असं म्हटलेलं नाही. अन तशी स्थिती व्यवहारात येणं कठीणच. त्यामुळे नियम, कायदे असायलाच हवेत, असतातच, असतीलही. पण नियम, कायदे करताना किती विचार केला आहे, त्याची अंमलबजावणी आणि मर्यादा, हेतू व्यतिरिक्त अन्य अनेक बाबी; हे लक्षात घेतले नाही तर ते चुकीचे ठरते. त्रुटी, चूक, गुन्हा, बदमाशी, अपरिहार्यता, मर्यादा; या आणि यासारख्या गोष्टी लक्षात न घेता जेव्हा नियम आणि कायद्यांचा विचार होतो तेव्हा त्याचे मुळीच समर्थन करता येत नाही. तसे ते केले जाते तेव्हा ती दांभिकता आणि मग्रुरी असते. न्याय, न्याय व्यवस्था इत्यादीचाही यात विचार आहे. दोन गोष्टी अगदी कोरून ठेवल्या पाहिजेत - चाणक्य सहित कोणीही अखेरचा बिंदू नाही आणि the worm also turns हा इंग्रजीतील वाक्प्रचार. ज्या वर्तमान संदर्भात ही पोस्ट आहे, त्या मोटर वाहन कायद्यात विचारांची शून्यता दिसते हे माझे विचारपूर्ण स्पष्ट मत आहे.

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

विजया मेहता आणि तृप्ती देसाई

काल रात्री `पेस्तनजी' पाहिला. पुन्हा. पारशी कुटुंबावर आधारित हा चित्रपट. यात ब्रेक झाला की, दिग्दर्शक विजया मेहता यांचं मनोगत ऐकायला मिळत होतं. तो एक वेगळा आनंद होता. विजयाबाईंबद्दल बोलायलाच नको. त्यांचं दिग्दर्शन, बुद्धिमत्ता, क्षमता, कौशल्य, समज वादातीत आहेच. त्यांनी सांगितलं- `पारशी लोकांनी आम्हाला अमाप सहकार्य केलं. चित्रपट पूर्ण होईपर्यंत एका कुटुंबाने त्यांचं घर पूर्ण आम्हाला देऊन टाकलं होतं. पण त्यांच्या धार्मिक विधीत मात्र खूप व्रतस्थता असते. धार्मिक सोहोळा पाहायला कोणीही अन कितीही लोक जाऊ शकतात, पण ते एका विशिष्ट परिघाबाहेर. परिघाच्या आत ते लोक सोडून कोणालाही प्रवेश नाही. आम्हाला `उठमना' विधिचं चित्रीकरण करायचं होतं. पण त्यांनी सांगितलं की, तुम्हाला परिघाच्या आत येता येणार नाही. तुम्ही लोक खूप प्रामाणिक तळमळीने काम करता म्हणून परीघ थोडा लहान करू पण प्रत्यक्ष विधीच्या जागेपासून ३५ फुटावरूनच चित्रीकरण करता येईल. त्याच्या आत नाही. तुम्ही झूम करा किंवा काहीही करा. त्याच्या आत नाही.' विजयाबाई पुढे म्हणाल्या- `आम्हीही त्यांच्या म्हणण्याला होकार दिला. we must respect each other.'

मनात फक्त एकच विचार आला- आज जगाला विजया मेहता हव्या आहेत, तृप्ती देसाई नकोत.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१६

ढोंगी

बोलायला, लिहायला कोणालाच बंदी नाही. मग थयथयाट कशाचा आहे? आमचं ऐकत नाही. अरे दीड शहाण्यांनो, कितीतरी दशके तुम्ही केलेली उपेक्षा, अवहेलना, दुर्लक्ष, निंदानालस्ती, दडपशाही तुम्ही विसरला असलात तरी लोकांच्या लक्षात आहे. तुमचंच ऐकलं पाहिजे असा कायदाही नाही अन नीतीही नाही. राहिला प्रश्न लाभहानीचा तर त्यातही तुमच्या शिल्लक खाती नुकसान नाहीच. त्यामुळे ढोंगीपणा बंद करा, सहनशील व्हा, जी अक्कल पाजळता ती जगण्यात उतरवा, जग म्हणजे आपण नाही हे रोज जपत जा. अन यातलं काहीच नाही जमलं तर ********************

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१८

कठोर होणे आवश्यक

इ.स. २०३० नंतर म्हणजे फक्त १२ वर्षांनी पाण्यासाठी संघर्ष सुरु होतील असा इशारा खुद्द नीती आयोगाने दिला आहे. १९९६ साली केलेल्या सूचना अद्याप अमलात आलेल्या नाहीत आणि सरकारचे अजूनही याकडे लक्ष नाही, अशा दोन टिप्पण्याही आयोगाने केल्या आहेत. थोडक्यात म्हणजे संकट दार ठोठावते आहे. किंबहुना दारावर धडका मारते आहे. दार कधी मोडेल सांगता येत नाही. आपल्याला याचं गांभीर्य समजतं आहे का? पाण्याचा प्रश्न केवळ साठवणूक वाढवून आणि बचत करून सुटणारा नाही. जमिनीतील पाणी वाढणे, झरे निर्माण होणे, वाहते होणे महत्वाचे आहे. आपण, आपली जीवनपद्धती, आपली अनास्था अमानुष आणि राक्षसी आहे; हे मान्य करण्याचं धाडस आणि समंजसपणा दाखवण्याला पर्याय नाही. वाईट वाटो, राग येवो, अपमान वाटो; पण घरातले पाण्याचे भांडे घेऊन रस्त्यावर उतरणे आणि मारामारी करणे यापेक्षा आजच अपमानाचा घोट गिळणे चांगले. गाड्या, सिमेंट-कोन्क्रीटचे प्रेम, मातीचा द्वेष, अमाप सुखसाधनांचा हव्यास, महानगरांचे वेड; हे सारे कठोरपणे आणि क्रूरपणे सोडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. केवळ झाडे लावा झाडे लावा हे नाटक पुरेसे नाही. झाडे पाउस पाडतील कदाचित पण माती नसेल आणि त्यात पाणी झिरपणार नसेल तर त्याचा काय उपयोग? उलट असले नसलेले पाणी झाडे शोषून घेतील. ते माणसाने पाणी देण्याची वाट पाहत नाहीत. झाडे उपकार करतात तसेच स्वत:च्या अस्तित्वासाठी माणसाला बाजूलाही सारतील. आज खनिज तेलाने आमच्या नाकी नऊ आणले आहेत. उद्या आमच्या उन्मत्त दांभिकतेने आणि मानवी कर्तृत्वाच्या आत्यंतिक उन्मादाने माणूसच माणसाचा भस्मासुर होऊ नये. आम्ही वाट्टेल ते करत राहू अन त्यावर उपाय शोधणे म्हणजेच पुरुषार्थ हे आत्मफसवेपण नालायकांचे उद्योग म्हणूनच शोभू शकतात. नाक, कान, डोळे, हृदय, मेंदू, सगळे कमकुवत होत असल्याच्या बातम्या पाहायच्या. सर्वेक्षणे करायची, अन दुसऱ्याच क्षणी पुरुषार्थाचा अविचारी ढोंगी टेंभा पाजळायचा हे चुकीचे आहे. केवळ आणि केवळ मन आणि इच्छा यांची गुलामी हे माणसाचे लांच्छन आहे. सरकारने देखील लोकानुरंजन बाजूला ठेवून धोरणे आणि अंमलबजावणी याकडे पाहिले पाहिजे. अन अंमलबजावणी म्हणजे केवळ कायद्याचे कठोर पालन, कठोर शिक्षा इत्यादी नसते हेही लक्षात घेतले पाहिजे. जसे व्यक्तीने व समाजाने तसेच सरकारनेही स्वत:च्या संदर्भात कठोर व्हायला पाहिजे. नीती आयोग म्हणजे एक प्रकारे सरकारच. खुद्द पंतप्रधान त्याचे अध्यक्ष. त्यामुळे सरकार आता याबाबत काही करते का हे पाहावे लागेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१८

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

`महानगरे' - एक मानसिक रोग

ऑलिम्पिक गाजवणारी पी.व्ही. सिंधू badminton academy सुरु करणार अशी बातमी ऐकली. छान वाटलं. आपल्याच पदकात रममाण न होता, खेळासाठी, देशासाठी काही करणार हे अभिनंदनीयच आहे. पण बातमीचा पुढचा भाग ऐकून मात्र जरा निराशा झाली. कारण प्रस्तावित academy ती दिल्लीत काढणार आहे. अर्थात यात सिंधूची चूक नाही. academy काढायची म्हणजे जागा अन अन्य मदत आलीच. त्यात सिंधू ऑलिम्पिक रजतपदक विजेती. त्यामुळे जागा व अन्य मदत ज्यांच्या हाती असते त्या राजकारण्यांनी दिल्लीची निवड करणे स्वाभाविकच. किंबहुना त्यासाठी आग्रह धरणे, मन वळवणे असेही प्रकार झालेले असू शकतात.

फारच विचित्र दिवस आलेले आहेत. सगळं काही एकाच पोत्यात कोंबण्याचा प्रयत्न होतो. पूर्वी राजेरजवाडे, सरदार, एवढेच नव्हे उद्योजक किंवा अन्य कर्तृत्ववान लोकही नगरं, शहरं नव्याने वसवीत असत. त्यामुळे अनेक शहरं राजधानीची होती असं इतिहासात वाचायला मिळतं. शहरं भरभराटीला येत अन त्यांना उतरती कळाही लागे. आता `महानगरे' हा एक मानसिक रोग झाला आहे. शासन, प्रशासन, सरकार, नेते, उद्योजक, हेच काय, लोकांना सुद्धा महानगर म्हणजे खूप काही तरी वाटू लागलं आहे. अगदी नागपूरसारख्या ३०-३५ लाख लोकसंख्येच्या शहराचाही उल्लेख टीव्ही मालिकांमध्ये गाव असा केला जातो. कारण ते संवाद लिहिणाऱ्याची मानसिकता विकृत आहे. एक-दीड कोटीच्या मुंबईत राहणे म्हणजे आधुनिकता, पुढारलेपण, काळासोबत चालणे, विकास इत्यादी महामूर्ख कल्पना डोक्यात कोंबूनच तो जगत असतो. त्या महानगराचे हजार प्रश्न असतील, त्याचा जगण्यावर, जीवनावर मोठा विपरीत प्रभाव होत असेल तरीही तिथल्या त्रासाचाच गौरव करण्याची, त्यालाच पुरुषार्थ ठरवण्याची एक विकृती समाजात शिरली आहे. राजकारणी, संपत्तीपूजक, सत्ताकांक्षी लोक, गुंड प्रवृत्ती यांना हे सोयीचे आहे आणि हीच विकृती कायम राहावी, वाढावी अशी त्यांची इच्छा आणि प्रयत्न आहेत. जागतिकीकरण, आधुनिकता, विकास, चांगले राहणीमान इत्यादी गोंडस नावांखाली हे सगळे चालते. प्रश्न आणि समस्या यांनाच जन्माला घालणारी ही विकृती कायम ठेवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न वगैरे निरर्थक आहे.

आधुनिक जीवनशैली स्वीकारूनही समस्यांच्या जंजाळातून बाहेर पडायचे असेल, अन चांगल्या जीवनशैली सोबतच जीवनाची सार्थकता हवी असेल तर शहरांचा आकार या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक कल्पना सार्वजनिक चर्चेसाठी मांडतो. आजच्या किमान ५० टक्के समस्याच उरणार नाहीत अशी ही कल्पना आहे. कल्पना अशी- १० लाख लोकसंख्येची २ हजार नगरराज्ये विकसित करावी. आपण ज्या ग्रीस, रोम इत्यादीची खूप चर्चा करतो ती नगरराज्येच होती हे लक्षात घ्यावे. आपल्या देशातही अशी अनेक नगरराज्ये होती. आजच्या सुमारे अडीच डझन राज्यांच्या ऐवजी दोन हजार राज्ये. एका केंद्रीय सत्तेअंतर्गत ही राज्ये राहतील. म्हणजे दोन हजार लोकांना मुख्यमंत्री होता येईल. हजारो लोकांचं मंत्रीपदाचं स्वप्नही पूर्ण होईल. मुख्य म्हणजे ही मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण होऊ शकतील आणि असंख्य समस्या निकाली काढता येतील. सुटसुटीत आणि आटोपशीर कारभारामुळे, निर्माण होणारे प्रश्न आणि समस्या सोडवणे सोपे होईल.

अर्थात यासाठी काही गोष्टींची पूर्वतयारी हवी.

१) लोकांची मानसिकता.

२) आपल्या हातातील सत्ता सोडण्याची आजच्या सत्ताधारी लोकांची तयारी.

३) सहकार्याचे वातावरण.

४) देशांतर्गत आणि बाह्य दडपण झुगारण्याची जिगर.

५) वेगळी जीवनदृष्टी आणि विचारशीलता.

या सगळ्याचा आधार अर्थात समाज म्हणजेच सामान्य माणूस आहे. तो याबाबत विचार करणार नाही तोवर काहीही होणार नाही अन त्याने गांभीर्याने विचार केला तर कोणीही हे होण्यात अडथळे आणू शकणार नाही. म्हणूनच तुमच्या- माझ्या विचारांसाठी ही कल्पना.

- श्रीपाद कोठे 

३ सप्टेंबर २०१६


पबजीवर बंदी

पबजी वगैरेवर बंदी घातली. अतिशय स्वागतार्ह. पण हे पाऊल फार पूर्वीच उचलता आलं असतं. का नाही उचललं, हा प्रश्न आहेच. अनेक मुलांनी गमावलेले जीव हा आधारही होता. शिवाय कोणीही त्याला विरोध केला नसता. बहुतेक सगळ्या ऍपबद्दल असंच म्हणता येईल. शिवाय अन्य वस्तूंप्रमाणे या ऍप्सनी काही अडलंही नसतं. चीनला आर्थिक फटका तर बसलाच असता. ऍप्सवेड्या तरुणांनी दुसरं काही करण्याचा विचार केला असता. पण तसं झालं नाही. ठीक आहे देर आये दुरुस्त आये.

(भाजप समर्थकांनी माफ करावं.)

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२०


खुलभर दुधाची कहाणी

महाकालेश्वराला शुद्ध दुधाचा अभिषेक करावा आणि त्यासाठी संबंधितांनी व्यवस्था करावी, असा आदेश न्यायालयाने दिल्याची एक बातमी वाचण्यात आली.

अन मनात खुलभर दुधाची कहाणी आठवली. श्रावणामध्ये घरोघरी वाचल्या जाणाऱ्या या कहाण्या. आता नसल्या तरी पूर्वीच्या काळी त्या वाचल्या जात असत. त्यातलीच एक खुलभर दुधाची कहाणी. राजा आज्ञा सोडतो मंदिराचा गाभारा दुधाने पूर्ण भरायचा आहे त्यासाठी सगळ्या नागरिकांनी शिवाला सोमवारी दुधाचा अभिषेक करावा. लोक अभिषेक करतात पण गाभारा भरत नाही. एक म्हातारी आपल्या घरचे सगळे आटोपून शेवटी एका छोट्याशा वाटीमध्ये दूध घेऊन जाते आणि तिने ते वाटीभर दूध टाकताच तो मंदिराचा गाभारा पूर्ण भरून जातो. शिपाई हे वर्तमान राजाला सांगतात आणि शेवटच्या सोमवारी राजा पाहायला येतो. त्यालाही तोच प्रकार दिसतो. त्या वेळेला तो त्या म्हातारीला थांबवून विचारतो की हा चमत्कार कसा काय?

म्हातारी उत्तर देते - 'कोणाला दुखवू नये. कोणाला उपाशी ठेवू नये. गाई वासरांच्या तोंडचं दूध काढून घेऊ नये. दिखावा करू नये. आपल्याला शक्य असेल तशी, श्रद्धाभावाने पूजा करावी. त्याने देव संतुष्ट होतो.'

ही केवळ गोष्ट नाही. हा भारतीय ethos आहे. माणूस, समाज यांच्या घडणीची; त्यांच्या सुव्यवस्थित धारणेची ही भागीरथी आहे. आज या भागीरथीकडे दुर्लक्ष करीत, ज्यांनी शे पाचशे वर्षे सुव्यवस्थित समाज उभा केला नाही; त्यांनी सांगितलेलं शहाणपण घेऊन आम्ही चालतो आहोत. असो.

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२०





गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

धर्मचर्चा

social media असो की, mainstream media; सध्या `धर्म' हा चर्चेचा मोठा विषय आहे. यातील चर्चांचा रोख पाहता, हिंदूंच्या धर्मकल्पनेला `इस्लाम' व `ख्रिश्चन' या ऐहिक जडवादी संप्रदायांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न कळत वा नकळत होताना दिसून येतो. हे फार घातक आहे. अगदी हिंदू समाजावरील विविध आक्रमणापेक्षा घातक. कारण यात हिंदूंची धर्मकल्पनाच बदलून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. `धर्म' हीच हिंदूंची आणि पर्यायाने जगाची आध्यात्मिक शक्ती आहे. त्यावर आघात हिंदूंसह सगळ्यांसाठी घातक आहेत. या सगळ्या प्रयत्नात प्रामाणिक सत्प्रवृत्त देवभोळे हिंदूदेखील हातभार लावताना दिसून येतात. छोट्या पडद्यावर येणारे धर्माचे ठेकेदारदेखील हातभार लावतात. कारण ते `धर्म' कल्पना नीट समजून घेत नाहीत.

@ आम्हाला आता देव आणि माणूस यांच्यामध्ये कोणाही मध्यस्थाची गरज नाही.

@ धार्मिक संस्था वा व्यक्तींना पैसा देणे बंद करा.

@ धर्माला राजकारणापासून दूर ठेवा.

@ धर्म व धार्मिक संस्था यांचे नियंत्रण व नियमन आवश्यक आहे.

इत्यादी मते जोरकसपणे मांडली जात आहेत. बाबा रामरहीमच्या घटनेचा या साऱ्याला संदर्भ आहे. त्या घटनेचा राग वा क्षुब्धता या प्रतिक्रियांमधून व्यक्त होते, हेही खरे. परंतु या मतप्रवाहाचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करण्याची फुर्सत मात्र कोणाकडे नसते. एखादी कृती रागाच्या भरात केली म्हणून तिचे परिणाम काही टळत नाहीत. व्यवहारातील हीच बाब विचार आणि मानसिकतेच्या बाबतही खरी आहे. भरीसभर ज्यांना जेवणाची, झोपेची फुर्सत नसते, सतत धावावे लागते; असे media वाले महान विचारवंत. तत्वज्ञ, धर्मज्ञ असल्याच्या थाटात टाहो फोडत असतात. याने साध्य काय होईल सांगता येणार नाही, पण विचारांची-भावनांची जी काही सुव्यवस्था, सुसूत्रता, शहाणपण आज शिल्लक राहिले आहे तेही लयाला जाऊ शकेल. यातून `विचारकोष्ठता' वा `विचारषंढता' निर्माण होऊ शकेल. अगदी रोज मंदिरात जाणारे किंवा घरी गणपती, महालक्ष्मी, सत्यनारायण करणारे अशांनाही अनेकदा यातील बारकावे कळत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे खालील गोष्टी मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे असे वाटते.

१) धर्म कल्पनेची सखोल, व्यापक, विस्तृत चर्चा घडवून आणणे.

२) हिंदूंचे धर्म (रूढ अर्थाने) आणि इस्लाम व ख्रिश्चन यांची तुलनात्मक मांडणी मोठ्या प्रमाणात करणे.

३) देव कल्पनेची सखोल चर्चा व मांडणी होणे.

४) देव आणि धर्म यांच्या संबंधांवर सखोल चर्चा.

५) भारतीय भक्तीकल्पना, तिचा विस्तार, तिची विकासावस्था आणि भारतेतर भक्तीकल्पना यांची तुलनात्मक मांडणी.

६) भारतीय देवकल्पना आणि भारतेतर देवकल्पना.

७) `धर्माच्या' सार्वकालिक, सार्वत्रिक, सर्वव्यापी स्वरुपाची चर्चा.

८) भारताचा `धर्मइतिहास' आणि भारतेतर `धर्मइतिहास' यांची तुलनात्मक चर्चा.

९) धर्मशून्यतेचे परिणाम.

१०) अध्यात्मातील ऐहिकता आणि ऐहिकतेतील आध्यात्म.

हे सगळे विषय समाजापुढे समर्थपणे येणे गरजेचे आहे. भक्तीपंथी व्यक्ती आणि संस्थांनी सुद्धा अधिक सखोल, व्यापक, चिरंतन तत्वांची चर्चा आणि रुजवणूक करण्यात पुढे आले पाहिजे. भक्तीचा पारमार्थिक आशय रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चैतन्यशक्तीला जडाच्या पातळीवर आणण्याचे भक्तीमार्गी प्रयत्न किंवा कला, साहित्य आदी क्षेत्रातील प्रयत्न नेहमीच अनिष्ट गोष्टी जन्माला घालतात. जडाच्या साहाय्याने चैतन्याचा वेध इष्ट परिणाम देतात. गांभीर्याने विचार करणाऱ्या साऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक वाटते.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, २ सप्टेंबर २०१७