बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

कहाणी महासत्तेची

आपण ज्यांना डोक्यावर घेतो; कपडेलत्ते, दागदागिने, शृंगार इत्यादीत ज्यांचं अनुकरण आणि अनुसरण करतो; ज्यांच्या मतांना, विचारांना वजन आणि महत्व देतो; त्यांना स्वयंपाकातलं काही येत नाही, हे उत्तम स्वयंपाक करणारे महिला पुरुष आवडीने पाहतात. त्यांचा स्वयंपाकातील 'ढ' पणा enjoy करतात. अन अशा तऱ्हेने आपण एक 'आनंदी (!??)' समाज होतो. अशा तऱ्हेने ते सेलिब्रिटी तसेच सेलिब्रिटी राहतात. त्यांची किंमत आणखीन वाढते. तुम्हा आम्हाला  'आनंदी (!??)' करून ते कोट्यवधी रुपये कमावतात. त्यासाठी अनेक जण उदार होऊन त्यांना कोट्यवधी रुपये देतात. हे कोट्यवधी रुपये त्यांना देण्यासाठी हे दानशूर कोट्यवधी लोकांकडून ते कमावतात.

अन सरतेशेवटी आपण सगळी लाजलज्जा कोळून पिऊन 'महासत्ता' होतो.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. पंढरीनाथ महाराज की जय.

- श्रीपाद कोठे

२९ डिसेंबर २०२१

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

चर्चा हिंदुत्वाची

हिंदू इतिहास, हिंदू परंपरा, हिंदू रूढी इत्यादींची जेवढी चर्चा आणि विश्लेषणे होतात; तेवढी चर्चा आणि विश्लेषणे हिंदू आर्थिक दर्शन, हिंदू सामाजिक दर्शन, हिंदू राजकीय दर्शन, हिंदू भक्ती दर्शन, हिंदू मानव दर्शन, हिंदू जीवन दर्शन, हिंदू कला दर्शन, हिंदू नीती दर्शन इत्यादींची होत नाहीत. जे होत नाही त्यावर आता फोकस हवा. ते जास्त गरजेचेही आहे आणि शक्ती प्रदान करणारेही.

- श्रीपाद कोठे

२२ डिसेंबर २०२१

मनोबौद्धिक कुष्ठरोग

१) भारतीय वंशाच्या एका गृहस्थाला १७,५०० कोटी रुपये वेतनाचे पॅकेज देण्यात आले आहे.

२) टेस्ला कंपनीचे सीइओ ८५ हजार कोटी एवढा कर भरणार आहेत.

- एस.टी. संपाचे घोंगडे भिजत पडले आहे.

- चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त कडाक्याच्या थंडीत मोबदला मागण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात उघड्यावर झोपत आहेत.

- कुपोषणाचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अर्थकारण, अर्थतज्ज्ञ, अर्थपंडित, नियोजनकार यांना हे सगळं ठाऊक असतं का? यावर त्यांना काही उपाय सुचतात का? मानव समाजाला बहुतेक मनोबौद्धिक कुष्ठरोग झालेला आहे.

- श्रीपाद कोठे

२२ डिसेंबर २०२१

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

गुरूचरित्र ग्रंथातील विश्वरूप दर्शन

'विश्वरूप दर्शन' म्हटलं की आपल्याला भगवद्गीतेची आठवण होते. ते योग्यही आहे आणि स्वाभाविकही. अन भगवद्गीतेशिवाय अन्यत्र कुठे 'विश्वरूप दर्शनाचा' उल्लेख आहे का? तसा प्रसंग आहे का? यावर बहुतेक नकारार्थीच उत्तर येईल. मात्र भगवद्गीतेशिवाय अन्यत्र असा एक उल्लेख आहे. तो आहे दत्त संप्रदायातील गुरुचरित्र या ग्रंथात. भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचा हा ग्रंथ. त्यात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे त्रिविक्रम भारती नावाच्या मुनींना विश्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. बहुधा २४ व्या अध्यायात. भगवद्गीता आणि गुरुचरित्र या दोन्हीतील विश्वरूप दर्शनाच्या वर्णनात मात्र थोडासा फरक आहे. गीतेतील हे दर्शन सृजन आणि विसर्जन दोन्ही दाखवणारं थोडं भयोत्पादक दर्शन होतं. श्रीकृष्णच हे सारं करत होते. गुरुचरित्रात मात्र त्रिविक्रम भारती यांना फक्त सगळीकडे लहानमोठे नृसिंह सरस्वतीच दिसत होते. हे थोडं शांत दर्शन होतं.

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

संन्याशाचा अहंकार

असं म्हणतात की, संन्याशाचा अहंकार सगळ्यात मोठा असतो. संन्यस्त असणं ही फारच मोठी गोष्ट असते अन कठीणही. नि:संशय संन्यासी थोरच. पण ही थोरवीच त्याचा अहंकार तयार करते, वाढवते, जोजवते, जोपासते. मात्र हा अहंकार का एकदा त्याच्या डोक्यावर बसला की सगळंच बिनसतं. त्यामुळे त्याचं संन्यस्तपण उणावत नाही. मात्र ते दोषपूर्ण होतं. अन्य सारं कमअस्सल असं वाटायला लागतं. व्रत जोपासण्यासाठी जवळ केलेले उपाय गुलाबाच्या संरक्षक काट्यांसारखे न राहता बाभळीसारखे होतात. हाच तो दोष. सगळ्याच व्रतांचं आणि व्रतस्थतेचं असंच असतं बहुधा.

- श्रीपाद कोठे

१५ डिसेंबर २०२१

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

छायाचित्राचा संदेश

काशी कॉरिडॉरचं काम करणाऱ्या कामगारांसोबत जेवतानाचं पंतप्रधानांचं छायाचित्र काल भरपूर व्हायरल झालं. ज्यांना मोदी सलतात त्यांचा प्रश्नच नाही, पण मोदी समर्थकांनी त्यातून काही मेसेज घेतला असेल का? 'मोदीजी किंवा नेतृत्व असं असं आहे' एवढं कौतुक पुरेसं म्हणता येईल का? नक्कीच नाही. श्रमप्रतिष्ठा, शारीरिक श्रमांचा आदर, शरीर श्रमाचा निश्चय, साधेपणा, गरीब - श्रीमंत भावनेला तिलांजली, सत्ता आणि संपत्ती नसलेल्यांबद्दल आदराची सहृदय वागणूक; हे सगळं त्या छायाचित्रातून झिरपलं तर त्याचं सार्थक म्हणता येईल. काशी विश्वनाथ त्यासाठी आशीर्वाद देवो.

- श्रीपाद कोठे

१४ डिसेंबर २०२०

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

हिंदू अर्थशास्त्र

सध्याच्या चर्चांमध्ये एका गोष्टीची आठवण झाली. इ.स. १९९३. अयोध्येतील विवादित बाबरी ढाचा पडल्यानंतर रा.स्व. संघावर बंदी घालण्यात आली होती तो काळ. नागपूरला रेशीमबाग येथे एक बैठक होती. त्यावेळी सहसरकार्यवाह असलेले सुदर्शनजी त्या बैठकीला होते. २५-३० जणांची ती दिवसभराची बैठक होती. त्यात दुपारी चहानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. म गो. बोकरे यांना बोलावले होते. त्यांनी नुकताच Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी त्यांचा विषय मांडला आणि मग त्यावर अघळपघळ चर्चाही झाली. एक नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, संघटनेवर बंदी असतानाही रा. स्व. संघ अशा गोष्टी करीत असतो. राजकीय डावपेच, बंदी, त्यासाठी करावयाच्या बाबी हे सगळे असतानाही मुलभूत कामही सुरूच असते. हा संघाचा विशेष आहे. तर कट्टर कम्युनिस्ट असलेले डॉ. म. गो. बोकरे दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रयत्नाने अन संपर्काने पूर्ण हिंदुत्वनिष्ठ होऊन त्यांनी Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. त्यातील चार महत्वाचे मुद्दे-

१) हिंदू अर्थशास्त्र विपुलतेचे अर्थशास्त्र आहे.

२) वर्तमान अर्थशास्त्रानुसार वस्तू वा सेवांचे भाव सतत वाढतात. हिंदू अर्थशास्त्रानुसार भाव सतत खाली यायला हवेत.

३) इस्लामी अर्थशास्त्रातील बिनव्याजी कर्जाची कल्पना उत्तम असून तिचा अंगीकार कसा करता येईल याचा सखोल विचार व्हायला हवा.

४) हिंदू अर्थशास्त्र हे दानाचे अर्थशास्त्र आहे.

- श्रीपाद कोठे

१३ डिसेंबर २०१६

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कायदा व विश्वास

रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांची एक आठवण संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांनी नोंदवली आहे. बाळासाहेब तामिळनाडू प्रांतात एका शिबिरात गेले होते. नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरे झाली. एका स्वयंसेवकाने संघाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बाळासाहेबांचं उत्तर महत्वाचं आहे. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या स्वयंसेवकाला त्याची माहिती विचारली. मग त्याला म्हणाले, 'तुमच्या घराची कागदपत्रे असतील. ती तुम्ही पाहिली का?' तो नाही म्हणाला. बाळासाहेब पुढे म्हणाले, 'तरीही कागदपत्रे असणारच. ती काढण्याचं, त्यांची चर्चा करण्याचं प्रयोजन तेव्हाच येईल जेव्हा, तुम्हा चार भावांना काही हवं आहे. जोवर काही नको असेल तोवर कपाटातल्या कागदांची आठवण येत नाही.' पुढे म्हणाले, 'आपल्या घटनेची प्रत कार्यालयात उपलब्ध असते. तुम्ही पाहू शकता.'

मानवी जीवन आणि कायदे, नियम याबद्दलचं मूलभूत चिंतन स्व. बाळासाहेबांच्या या उत्तरात आहे. आज सर्वत्र जो discourse चालतो तो पाहून वारंवार या प्रसंगाची आठवण येते. विश्वास आणि निखळ मन... That's all.

- श्रीपाद कोठे

१२ डिसेंबर २०१९

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

Conversion

1) hindus were converted by every hook and crook for last centuries.

2) country of hindus was looted and devided for centuries with the tool of conversion.

3) Pope threatens to convert the country to christianity.

4) rajiv gandhi promised mizoram to make it a christian state, in an election campaign. was it not `LALACH'?

5) what these secularists want? hindus to be decimated?

6) if global forces can prepare budgets for conversion of hindus, why not hindus to protect themselves?

7) you can only sermon not to be reactionary. you can't stop reaction.

- shripad kothe

Dec. 11, 2014

भुर्दंड

नागपूरचा शुक्रवार तलाव (गांधीसागर तलाव) रिकामा करण्याचं काम सुरू आहे. स्वच्छता आणि नवीन कामे या दोन कारणांसाठी. ही चांगली गोष्ट आहे. हा जुना तलाव एक चांगले स्थळ होईल अशी आशा करू. अशी आशा करतानाच एक गोष्ट मात्र खटकते. ती म्हणजे, यापूर्वी जी जी कामे झाली, सौंदर्यीकरण झालं, व्यावसायिक सुविधा झाल्या; ते सगळं मातीत गेलं आहे. बरं, या साऱ्या गोष्टींचा पुरेसा वापर करून झाल्यावर त्या मातीत गेल्या तर काही वाटणार नाही. मात्र याआधीच्या सगळ्या गोष्टी वापर/ उपयोग न होताच वाया गेल्या. त्यावर झालेला खर्च हा नागरिकांवर एक प्रकारे भूर्दंडच नाही का? शुक्रवार तलाव हे एक उदाहरण झाले पण अशी असंख्य उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला, अनुभवायला मिळतात. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी 'आम्ही अमुक केले' हे सांगण्यापुरत्या आणि हे सांगण्यासाठीच केल्या जातात की काय असे वाटते. या भुर्दंडाचा गंभीरपणे विचार व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे

११ डिसेंबर २०२१

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

निरभ्र

कपड्यावर भांडे हा प्रकार माहिती होता, पण आज दारावर एक बाई आली होती - केसांवर भांडे. या वेगळ्या प्रकाराला किती दाद मिळते, कोण कोण कशी कशी दाद देतात पाहायला दारात उभा होतो. कोणी काही दाद दिली नाही. तेव्हा उत्सुकतेने पाहत असलेल्या माझ्याकडे वळून तिने मलाच विचारले. मी डोक्यावरून हात फिरवत म्हटले - केसच नाहीत काय देऊ? ती इतकं मनमोकळं हसली की कित्येक दिवसात इतकं मोकळं, निरभ्र हसू पाहायला मिळालं नव्हतं.

- श्रीपाद कोठे

९ डिसेंबर २०१७

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

शेतीवर आयकर

शेती उत्पन्नावर आयकर लावावा अशी चर्चा होत असते. मात्र शेतीतील अडचण ही की सरसकट निर्णय घेणे शक्य नाही. अमिताभ सारखे किंवा अनेक डॉक्टर्स, वकील, सीए, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी आदींनी आपले खरे उत्पन्न लपवण्यासाठी शेती घेतली आहे. पण करोडो शेतकरी असे आहेत की ज्यांना शेतीचा खर्च आणि जगणे यांची तोंडमिळवणी करणेही कठीण होते. शिवाय शेतीच्या समस्याच वेगळ्या आहेत. एकाच गावी आजूबाजूला असलेल्या शेतीतून सुद्धा सारखे उत्पन्न होईल असे नाही. एकाने माल काढून घरी आणला अन दुसऱ्याचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आला तर एक तरला दुसरा बुडला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सरसकटीकरण नाही करता येत.

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२०

जबाबदारी

साधेपणा, सचोटी, सद्भाव या मार्गाने चालणारा समाज असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण त्यासाठी प्रथम समाजाला याविषयी किमान आस्था असायला हवी. चांगुलपणा ही सिद्ध करण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची आणि अनुभव देण्याची गोष्ट आहे ही समज हवी. घरातल्या दोन व्यक्तींमध्येही चढाओढ सुरू झाली तर त्याचे रूपांतर कलहात होते. समाज तर कधीच कुटुंबाएवढा एकजिनसी नसतो. समाजात कलह होऊ नये आणि तो अधिकाधिक एकजिनसी व्हावा यासाठी केवढी काळजी घ्यावी लागेल? कोणी घ्यायची ही काळजी? ज्याला ती जबाबदारी आपली वाटते त्याने.

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२०

ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ

संजीवन समाधीच्या दिवशी सहज एक मनात आलं; ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दोन्ही रचना माऊलींच्याच, पण दोन्हीच्या भाषेत एवढा फरक का? ज्ञानेश्वरीची भाषा कष्टपूर्वक समजून घ्यायलाही कष्टच होतात. उलट हरिपाठ सहज लक्षात येतो. असं का असावं. भाषेचा हा फरक कसा समजून घेता येईल?

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२१

आशयानुसार भाषा जड वा सुलभ असूच शकते, नव्हे असतेच. जसे गीतारहस्य वाचताना अर्थ कदाचित लागणार नाही पण भाषा जड असूनही अडचणीची वाटत नाही. ज्ञानेश्वरीचा अर्थ हृदयंगम होणे हा मुद्दा नाहीच. भाषा सहज वाचणे शक्य आहे वा नाही हा आहे. बाकी हरिपाठ सुद्धा समजणं एकदम सोप्पं आहे वगैरे मी म्हणणार नाही. त्यासाठीही एक बैठक आणि तयारी हवीच. असो. एखाद्या भाषातज्ज्ञाकडून फुरसतीने समजून घ्यावे लागेल.

@@@@@@

अगदी हेच माझ्या मनात येतं ...नेहमीच येतं....

मला हरिपाठ पाठ आहे.. त्यामुळे नेहमीच हा फरक जाणवतो...🙏🙏

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥ 

मला माझ्या श्रीगुरु निवृत्तिनाथांनी दिलेले ज्ञान 'प्रमाण' आहे . ते ज्ञान मी हरिपाठामध्ये दिले आहे आणि त्यायोगेच मी संजीवन समाधी साधली आहे . 

हरिपाठरूपी ज्ञानप्रकाशात सतत रहाणे हीच संजीवन समाधी .

॥ सद्‌गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज की जय ॥

🙏🙏🙏

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

सरस्वती वंदना

'नाशिकच्या साहित्य संमेलनात माता सरस्वतीची वंदना केली नाही म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?'

'ज्यांनी सरस्वती वंदनेला नकार दिला ते असहिष्णू, कोत्या वृत्तीचे अन क्षुद्र मनाचे आहेत.'

'पण अपमानाचे....'

'मला नाही वाटत मा सरस्वतीचा अपमान वगैरे कोणी करू शकेल? कोणाचीही ती औकात नाही. सूर्यावर थुंकणारे सूर्याचा अपमान करू शकतील का? त्यामुळे अपमान वगैरे नाही. अन या घटनेमुळे यानंतर सरस्वती वंदन बादच होईल वगैरेत तथ्य नाही. माँ सरस्वतीचे भक्त तिची वंदना थांबवतील का कधी? शक्यच नाही. भागीरथीच्या विशाल प्रवाहात दगड फेकून तो प्रवाह थांबवू असं वाटणारे येडपट असतात. दुसरं काही नाही. हां; ते असहिष्णू, कोते, अन क्षुद्र मात्र आहेत.'

- श्रीपाद कोठे

५ डिसेंबर २०२१

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

फसवणूक

आदर म्हणजे काय? तो तयार कसा होतो? नष्ट कसा होतो?

आत्ता. १० मिनिटे झालीत. फाटक वाजलं म्हणून पाहायला गेलो. फाटकात एक बाई उभी होती. भाषा हिंदी. विचारलं- काय आहे? म्हणाली- हम मेहतर है. आज मातारानी का जुलूस है. दक्षिणा चाहिये. हातात खराटा होता. कटकट नको म्हणून अन गरीब बाईला चार पैसे दिल्याने काही बिघडत नाही म्हणून; आत गेलो २१ रुपये आणले अन दिले. त्यावर तिचा पट्टा सुरु झाला. ऐसा नही देना. आज बंदे कि पूजा होती है. तिने खराट्यात खोचलेली १०० रुपयांची नोट दाखवली. मी स्पष्ट सांगितले- मला द्यायचे तेवढे दिले. आता निघा. त्यावर पुन्हा तिचे सुरु- जितना आपको देना, उतनाही दो. लेकीन बंदा दो. हम आपको हमारे पास कि चिल्लर देते है. म्हटलं- काय ताप आहे. पण असेल त्यांचं काही. म्हणून आत गेलो अन १०० ची नोट घेऊन आलो. तिच्या हातात दिली. ती घेऊन तिने तिच्या हातातील खराट्याची काडी तोडली अन ८ तुकडे करून मला देऊ लागली. म्हटले चिल्लर कुठे आहे? त्यावर तिचे उत्तर हीच आमची चिल्लर. तुमची याने बरकत होईल. आता माझा पारा चढला. मी आवाज चढवून म्हटले- मला माझे आधीचे २१ रुपये अन ८० रुपये चिल्लर परत दे. बडबड बंद कर. तिने चक्क काढता पाय घेतला. तिने दिलेले खराट्याच्या काडीचे ८ तुकडे तिच्या अंगावर भिरकावून, तू चोर आहेस हे चार घरी ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने सांगून मी दार बंद केले. घरी बाईमाणूस नव्हते, अन माझ्याशी बदमाशी करणारी बाई होती म्हणून. अन्यथा रस्त्यावर पाडून चेहरा सुजवायला कमी केले नसते. nonsense किती असावा?

एक मात्र नक्की- यानंतर कोणीही बाई काही मागायला येईल तेव्हा तिला उभीही करणार नाही. समोरची व्यक्ती मेहतर आहे की नाही हे तर कळू शकणार नाही ना... पण मेहतर अन मागणाऱ्या बाया यांच्याबद्दल मनात पुन्हा काहीही वाटणार नाही.

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१५

चलनाचे काय?

भारतात काय किंवा जगात काय, सगळीकडे नोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र चलनाबद्दल कुठे बोलले जात नाही. चलन वाढतेच आहे अन त्यामुळेच चलनवाढही. व्यावहारिक भाषेत महागाई वाढतच राहते. अमेरिकेतील बँक्स कोसळल्या. त्यांच्या मदतीसाठी अब्जावधींचे packages दिले गेले. जपानच्या बँक्स अडचणीत आल्या, त्यांनीही अब्जावधींचे packages दिले. युरोपातही तेच आणि भारतातही तेच. बँकांचे npa manage करण्यासाठी भारत सरकारनेही बँकांना packages दिलेत. याचाच अर्थ जगातील पैसा वाढतोच आहे. त्याचे परिणामदेखील जगापुढे आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी अर्थक्रांती फारशी महत्वाची नाही. त्यासाठी अर्थदृष्टी बदलावी लागेल. काल नागपुरात सरसंघचालकांचे एक व्याख्यान झाले. त्यात त्यांनी उपभोगांवर नियंत्रणाचा मुद्दा मांडला. अर्थात हे नियंत्रण सरकारी वा अन्य बाह्य नियंत्रण नक्कीच नाही. हे मानवाने स्वत:वर विचार आणि विवेकाने घालून घ्यावयाचे नियंत्रण आहे. ज्या अर्थदृष्टीची जगाला गरज आहे त्याचा हा एक पैलू म्हणता येईल. पण अमक्याने म्हटले, तमक्याने म्हटले याला फारसे महत्व नाही. सर्वसामान्य माणूस, वरपासून खालपर्यंत सगळा समाज यादृष्टीने किती अन कसा विचार करतो ते महत्वाचे आहे. रोज नवीन तंत्रज्ञान, रोज विकासाची नवीन चित्रे आणि मग पूर्ण उपभोग घेण्यापूर्वीच वस्तू, सेवा इत्यादी मोडीत काढणे, use and throw असले प्रकार सुरु राहिले तर विश्वकल्याणी अर्थदृष्टी निर्माणच होणार नाही. भविष्याचा वेध घेऊन उड्डाणपूल बांधायचा आणि त्याची उपयोगिता पूर्ण व्हायच्या आतच केवळ २० वर्षात तो पाडून टाकायचा. ही दृष्टी असेल तर न बोललेलंच बरं.

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१६

संवाद

१ - तू ती गोष्ट ऐकली नाही का?

२ - कोणती?

१ - पुरात अडकलेल्या माकडीणीची. गळ्यापर्यंत पाणी आल्यावर डोक्यावरच्या पिलाला खाली घेऊन स्वतः त्याच्या डोक्यावर बसणाऱ्या.

२ - ऐकलीय नं. अन हेही माहिती आहे की, त्या स्तरावर जगणारी माणसेही तसंच वागतात.

(१ ला खूपच राग आला बा.)

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१९

विरक्ती

'हे जग नश्वर आहे', 'या जगात काही राम नाही', 'हे जग क्षणिक आहे'... हे कधी ना कधी कानी पडतं. कधी तरी जाणवतं. त्यामुळे ते माहीत असतं. अर्थात या विचारांचा वाराही न लागलेले सुद्धा असतातच. पण आपण बोलतोय ज्यांना हे कुठेतरी मनाला, बुद्धीला स्पर्श करून जातं त्यांच्याबद्दल. मात्र हे फक्त माहिती झाल्याने विरक्ती येत नाही. ही नश्वरता प्रत्यक्ष जीवनच असावं लागतं, ती क्षणिकता श्वास निश्वास असावा लागतो, हे निरर्थकत्व प्रत्यक्ष अनुभूत असावं लागतं; तेव्हा विरक्तीचा उदय होतो. ही विरक्ती हेच अवधूत अवस्थेचं पहिलं पाऊल ठरतं. यातील काहीही ठरवून होत नाही. ध्येय वगैरेला इथे वाव नसतो. असं होतं तेव्हा आपोआप होतं किंवा होतच नाही. मोठी मजेशीर असते ही विरक्ती.

(आठवडाभर भगवान दत्तात्रेयांचा जागर चालणार आहे. त्या अनुषंगाने सहज आलेलं काहीतरी.)

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१९

वेष्टणावर स्वभाषा

नवीन शैक्षणिक धोरण सध्या चर्चेचा विषय आहे. अनेक गोष्टींसोबत भाषा हाही त्यातील प्रमुख विषय आहे. त्याचे परिणाम काय असतील ते दिसेलच. पण शैक्षणिक धोरणातील सगळ्याच बाबी जीवनाशी अन जगण्याशी जोडल्या जायला हव्यात. केवळ अध्ययनापुरत्या नसाव्यात. त्या दृष्टीने सूचना करावीशी वाटते की, विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आवरणावर, वेष्टनावर स्थानिक भाषेत माहिती असावी. खाद्यपदार्थांच्या पाकिटावर विलायची, लवंग, मीठ, आंबा, लिंबू, कणिक; इत्यादी इत्यादी इत्यादी का असू नये? सगळ्यांना हे शब्द समजतात. त्यातून जे सांगायचे ते एका शब्दात लक्षात येते. आकलनक्षमता वगैरेचा प्रश्न नसतो. उलट इंग्रजी शब्दच पुष्कळांना समजत नाहीत. या पाकिटांवरील इंग्रजी भाषेचे समर्थन कोणत्याही तर्काने होऊ शकत नाही. परदेशात पाठवायची पाकिटे वेगळी असतात अन नसतील तर वेगळी करता येऊ शकतात. प्रत्येक राज्यानुसार ती ती भाषा असलेली पाकिटे तयार करणे ना कठीण आहे ना खर्चिक. त्यामुळे केंद्र स्तरावर याचे धोरण असले पाहिजे. स्वदेशी भाषांबद्दलची नकारात्मक भावना त्यामुळे आपोआप कमी होईल. स्वभाषा हा नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग असेल तर उद्योगांचे धोरणही त्याला पूरकच असले पाहिजे ना?

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०२०

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

अमिताभची संपत्ती

कालच अमिताभच्या संपत्तीविषयी एक बातमी वाचण्यात आली. त्यात म्हटले होते की, अमिताभ एका चित्रपटासाठी ७ कोटी रुपये आणि एका जाहिरातीसाठी ५ कोटी रुपये घेतात. मनात शेतकरी आंदोलन आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत हा विषय आला. फार विवेचन करणार नाही. तेवढी सवड नाही अन याआधी वेळोवेळी पुष्कळ लिहीत आलो आहे. फक्त माझा निष्कर्ष सांगतो. अमिताभने ७ वा ५ कोटी रुपये घेणे (अन यासारख्या अनेक disproportionate गोष्टी) बंद होत नाही आणि सामान्य माणसाला/ लोकांना याबद्दल उत्सुकता, आस्था आणि ओढ वाटणे थांबत नाही; तोवर आर्थिक समानता किंवा सर्वेपि सुखिन: सन्तु इत्यादींना काडीचाही अर्थ नाही.

- श्रीपाद कोठे

३ डिसेंबर २०२१

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

परिवर्तन

दोन दिवसांपूर्वी लहान भावाच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याला एक मुलगा. त्या दिवशी मग आईने आणि मुलाने त्यांना ओवाळले. मुलगा, मुलगी, मुली हे करतात मुलांनी का करू नये, बदल, परिवर्तन इत्यादी इत्यादी खूप चालत असतं. हे त्यातील काहीही नाही. आज आपण ज्या भाषेत बोलतो, जी शब्दावली वापरतो तीच खरं तर तोकडी अन भ्रमित करणारी आहे. ११ वीत शिकणाऱ्या पुतण्याने आईवडिलांना ओवाळणे हा स्वाभाविक विकासाचा आविष्कार आहे. अमुक केलं म्हणजे अमुक, अमुक केलं नाही म्हणजे तमुक, अमकी गोष्ट सिद्ध करायला अमुक करायचं वगैरे वगैरेच्या पलीकडचा हा आविष्कार. झाडाला कोंब फुटतात तसा सहज उगवलेला. चांगलं, वाईट, श्रेष्ठ, कनिष्ठ, न्याय, अन्याय या परिभाषात न अडकणारा. थोडं वेगळं आहे म्हणून सगळ्यांना सांगण्याचा मोह झाला.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१६

undefinable

धार्मिक वृत्तीने दैव हे undefinable तत्व जन्माला घातलं, तर इहवादी वृत्तीने मानवी प्रयत्न हे undefinable तत्व जन्माला घातलं.

दोन्हीत नेमकेपणा नाही.

दोन्हीत uncertainty आहे.

दैवाने निष्क्रीयतेसोबत मानवीयता पण जोपासली.

मानवी प्रयत्नांनी सक्रियतेसोबत अमानवीयता, शोषण, स्पर्धा जोपासले.

पर्याय - निष्काम कर्म.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१८

अनाकलनीय

पूर्व दिशा पश्चिम दिशेची विरोधक आहे का?

रात्र ही दिवसाची विरोधक आहे का?

उत्तर हे प्रश्नाचं विरोधक आहे का?

चुंबकाची दोन टोके एकमेकांची विरोधक आहेत का?

जमिनीत जाणारी मुळं आकाशाकडे जाणाऱ्या फांद्यांची विरोधक आहेत का?

एकाच गोष्टीची दोन स्थानं, दोन अवस्था; हे आकलन खरंच खूप कठीण असतं का?

की प्रत्येक गोष्ट 'विरोध' या स्वरूपात पाहण्याचा अमीट असा संस्कार आहे आपल्यावर?

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१९

५०० ची नोट

१५ दिवसांपूर्वी व्यवस्थित शोधल्यानंतरही चार दिवसांपूर्वी सुटकेसमध्ये लपून बसलेली एक ५०० ची नोट सापडली. पैसा हा तसाही आकर्षणाचा विषय नसल्याने त्यात आश्चर्यही काहीच नाही. मग ती जमा करण्याचे काम आले. मधल्या काळात काल पेट्रोल भरायला गेलो. तेव्हा तिथला मुलगा थोडी का-कु करीत होता. चिल्लर नाही वगैरे. बाजूच्या पोराने आवाज दिला- सर इकडे या. त्याला विचारलं, चिल्लर आहे ना? तो म्हणाला. कितीचं भरू? मी उत्तर दिलं- १००. त्यानं पेट्रोल भरलं. चिल्लर पैसे परत दिले. मग म्हणाला- सर खूप दिवसांनी आले. बाहेर गेले होते का? म्हटलं, नाही रे. त्यावर म्हणाला- नाही. दसऱ्याला आले होते. पेट्रोल भरल्यावर मला सोनं पण दिलं होतं. त्यानंतर आजच दिसले. म्हणून विचारलं. मी हसलो आणि निघालो. मी विसरून गेलेली गोष्ट त्याने लक्षात ठेवली होती. मी त्याचा चेहरा विसरून गेलो होतो. त्याने मात्र मला लक्षात ठेवले होते. कदाचित त्या क्रेडीटवरच स्वत: आवाज देऊन ५०० ची नोट स्वीकारली होती त्याने. स्वामी विवेकानंद म्हणत- तुमची दुष्ट कर्मे तुमची पाठ सोडणार नाहीत अन तुमची सत्कर्मे देवदूत बनून सदैव तुमचे रक्षण करतील. कोणास ठाऊक? या सगळ्या मोठाल्या गोष्टी. आपण आपलं करत राहावं काहीतरी...

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१६

समाजसेवा

महिलांच्या आयसीसी २०-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात मिताली राज या माजी कर्णधाराला स्थान न मिळाल्यावरून वाद सुरु आहे. आज तिचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यात बाकी गोष्टींसोबत तिने म्हटलं आहे की, मी देशासाठी जे काही केलं त्याची जाणीव सध्याचे प्रशिक्षक, कर्णधार ठेवत नाहीत. गंमत वाटली. एक जुना प्रसंगही आठवला. शेतकरी आत्महत्या संदर्भात विदर्भाचा प्रवास सुरु होता. मी आणि आमचा छायाचित्रकार शेखर सोनी होतो. बहुतेक अमरावतीच्या विश्रामगृहातील प्रसंग असावा. सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नाश्ता करताना गप्पा सुरु होत्या. शेखर म्हणाला- आपण पत्रकार देखील समाजसेवाच करतो ना? मी त्याला विचारले- आपला पगार बंद झाला तर आपण ही सेवा करू का? त्याला विषय समजला. आपल्या कृतीने side effect स्वरुपात काही चांगल्या गोष्टी होणे, समाजाचा फायदा होणे, समाजसेवा होणे, देशाचे नाव उंचावणे हे ठीक आहे. पण खरंच आपण ते करत असतो का? समाजासाठी, देशासाठी काही करणे ही वेगळी गोष्ट असते. पण कधी कधी आपल्या कृतीच्या side effect चे भांडवल करण्याचीही इच्छा होते माणसाला. अन celebrity असे भांडवल करतात तेव्हा त्याचा प्रवाह होतो. हे फारसं चांगलं नाही म्हणता येत.

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१८

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

संविधान

दोन दिवस संसदेत चाललेल्या `संविधान दिनावरील' चर्चेत मला सगळ्यात आवडलेले भाषण होते बिजदचे (बीजेपीचे नव्हे) कटकचे खासदार भर्तृहरी मेहताब यांचे. अर्थात पंतप्रधानांचा अपवाद. मोदीजींचे भाषण master piece होते. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी काल `गंभीर परिणामांची' धमकी दिली. ज्या मुद्यावरून त्यांनी ही धमकी दिली त्याला श्री. भर्तृहरी मेहताब यांनी आज नेमके उत्तर दिले. अन खडगे यांचे नाव घेऊन, त्यांचा उल्लेख करून त्यांनी हे उत्तर दिले. श्री. मेहताब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्धृत केले. जे भाषण मेहताब यांनी उद्धृत केले त्यात, आंबेडकरांनी अमेरिकेची घटना तयार करणारे thomas jefferson यांना उद्धृत केले होते. त्याचा आशय असा की, `राज्यघटना वर्तमान समाजाच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब असते. भावी पिढ्यांना आम्ही त्याने जखडून ठेवू इच्छित नाही.' जेफरसनला उद्धृत करून बाबासाहेबांनी आपले मतच व्यक्त केले. तेही नि:संदिग्धपणे.

खरे तर हेच तर्कपुर्ण आहे. भारतीय परंपराही हेच सांगते- `नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणं...' कोणाही एकाचं वचन कायम प्रमाण नसतं. या विषयाकडे तटस्थपणे पाहण्याची अन विचार करण्याची गरज आहे. राजकीय भूमिका वेगळी असू शकेल. मोदीजींनी तर ती स्पष्टपणे मांडलीच आहे. देशाचा नेता म्हणून ती अतिशय योग्यही आहे. पण वैचारिक स्तरावर याची तटस्थ चर्चा व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१५

(राज्यकर्ते काय करतात याकडे फार लक्ष देणे थांबवले पाहिजे. ते तटस्थपणे विचार करतील तेव्हा करतील. तुम्ही-आम्ही तटस्थ विचार करणे सुरु केले पाहिजे. समाजाची उंची जेवढी वाढेल तेवढं राजकारणही ठीक होईल. पण समाजच राजकारणाकडे डोळे लावून बसला तर काहीच नीट राहणार नाही.)

मुस्लिम renaissance

मुस्लिम दहशतवाद हा आता anti hindu, anti christian राहिलेला नाही. इजिप्तमध्ये शुक्रवारी मशिदीत झालेला बॉम्बस्फोट याचे ताजे उदाहरण आहे. त्यात थोडेथोडके नव्हे, तीनशेहून अधिक लोक मारले गेलेत. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम देशांमधील अनेक घटना आणि घडामोडी हेच दाखवतात. एक मुस्लिम renaissance आकारास येते आहे. भारतातदेखील त्रिवार तलाक असो किंवा रामजन्मभूमीचा मुद्दा असो; हे दिसून येते आहे. परंतु १३००-१४०० वर्षांचा इतिहास सहजासहजी विस्मरणात ढकलणेही चुकीचेच आणि तोच धरून ठेवणेही अयोग्य. विभिन्न विचारांचा, आचारांचा, व्यवहारांचा, धारणांचा, भावनांचा समन्वय घडवणे आणि त्यांना व्यापक मानवी जीवनाचे एकात्म अंग बनवणे ही भारताची विशेषता आहे आणि नियतीही. त्यामुळे मुस्लिम दहशतवादाच्या संदर्भात cautious and prudent असाच approach हवा. काळानुसार हाही बदल आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१७

वैचारिक आव्हान

काल संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण झाले. त्यांनी अधिकार आणि कर्तव्याचा महत्वाचा मुद्दा मांडला. पण तोही आता जुना झाला आहे. सहज एक लेखमाला आठवली. स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर साप्ताहिक विवेकमध्ये लिहिलेली. दर आठवड्याला लेख येत असत. बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता. त्या लेखमालेचा समारोप करताना एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत बिंदू त्यांनी मांडला होता. 'मी एखाद्याचे शोषण का करायचे नाही' या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय जगातील शोषण थांबणार नाही. या basic, fundamental, philosophical बिंदूपर्यंत विचारप्रक्रिया पोहोचत नाही तोवर सगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अपुरेच ठरणार. सगळ्या षडविकारांचा नाच सुरूच ठेवून, त्याला खतपाणी घालत, त्यांचे चोचले पुरवत; चांगल्या मानवाची अपेक्षा करणे हे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ज्या 'न्याय' या तत्वाची चर्चा होते तो 'न्याय' सुद्धा, अशा स्थितीत संदर्भहीन होतो. 'न्याय' या तत्त्वाने आजवर अन्याय, क्षोभ, अस्वस्थता, अशांती, सूड, प्रतिशोध यांनाच मोठ्या प्रमाणावर जन्म दिला आहे. यात भारतीय, अभारतीय असे काही नाही. विचारांची आव्हाने खूप मोठी आहेत.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१९

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

संविधान दिवस आणि आर्य चर्चा

लोकसभेत आज सुरु असलेल्या `संविधान दिनावरील' चर्चेच्या वेळी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरळण्यावरून काँग्रेसची सहिष्णूता किती पोकळ आहे हे स्पष्ट झालं. गृहमंत्री बोलत असताना काहीही संदर्भ नसताना उठून उभं राहायचं अन `तुम्ही आर्य परके आहात. आम्हीच पाच हजार वर्षांपासून राहतो. हा देश तुमचा नाही', वगैरे बेंबीच्या देठापासून ओरडायचं हीच यांची सहिष्णूता. बरं जो मुद्दा आपण मांडतो आहे त्याचा किंचित तरी विचार करायला हवा की नको. खुद्द ज्यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संविधान दिवस साजरा होत आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `आर्य या देशात बाहेरून आले' हा सिद्धांत खोडून काढलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी तो सिद्धांत फेटाळला आहे. गांधीजींना तो सिद्धांत मान्य नव्हता. विदर्भातील प्रज्ञावंत जन्मांध (वयाच्या ११ व्या महिन्यातील अंधत्व) संत गुलाबराव महाराज यांनीही तो सिद्धांत खोडून काढला आहे. (गुलाबराव महाराजांचा उल्लेख मुद्दाम केला. त्यांची दखल घेणं का आवश्यक आहे हे समजण्यासाठी जिज्ञासूंनी ते अन त्यांचे साहित्य जाणून घ्यावे.) असे अनेक आहेत. `आर्य बाहेरून आलेत' हा सिद्धांत आता कोणीही ग्राह्य धरत नाही. वादासाठी तो ग्राह्य धरला तरीही, खरगे यांनी हे स्पष्ट करावे की, ते ज्यांच्या पायी नतमस्तक होतात ते गांधी घराणे अन त्याचे मूळ पुरुष असलेले समस्त नेहरू, यांनाही ते भारतात उपरेच मानतात का?

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

सेक्युलर : पंथ निरपेक्ष

लोकसभेतील आजच्या चर्चेतला एक अतिशय महत्वाचा मुद्दा- secular या शब्दाचा राज्यघटनेत वापरण्यात आलेला पर्याय आहे `पंथनिरपेक्षता.' त्यामुळेच `धर्मनिरपेक्षता' हा शब्द केवळ चूक नव्हे तर घटनाविरोधी ठरतो. गृहमंत्र्यांनी `पंथनिरपेक्षता' शब्द वापरण्याचे, प्रचलित करण्याचे आवाहन केले आहे. एका अर्थी `धर्मनिरपेक्षता' शब्द वापरणारे घटनाद्रोही ठरतात. सगळ्यांनी घटनेला अभिप्रेत शब्द वापरावा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

असहिष्णुता आणि सर्कस

नागपुरात अमर सर्कस लागली आहे. हे काही मला सांगायचं नाही.

आज आम्ही ती पाहायला गेलो. मला हेही सांगायचं नाही.

सर्कस चांगली आहे. गर्दीही होती. पण सांगायचं हेही नाही.

सांगायचं हे आहे की, तिथे अनेक मुस्लीम महिलाही आल्या होत्या. त्या महिला आहेत, हे त्यांच्या बुर्ख्यांवरून कळत होते. त्या छान हसत खेळत सर्कसचा आनंद घेत होत्या. त्यांचे खाणेपिणे सुरु होते. अन निघताना लक्षात आले की, त्या ऑटोरिक्षाने चालल्या होत्या. म्हणजे आल्याही ऑटोरिक्षानेच असतील. मुद्दा एवढाच की, असहिष्णूता त्यांना जाणवलेली दिसली नाही.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

जनधन खाती

आम्ही वेडे आहोत का? कालपासून जनधन बँक खात्यांची चर्चा सुरु झाली आहे. एकूण जनधन खाती २६ कोटी. (२५ कोटी ८० लाख). त्यात जमा झालेत ६६ हजार कोटी रुपये. त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजे ६-७ कोटी खात्यात काहीच नाही. म्हणजे २० कोटी जनधन खात्यात ६६ हजार कोटी रुपये. म्हणजेच सरासरी २० कोटी खात्यात ३ ते ४ हजार रुपये. ही जनधन खाती बहुतेक ग्रामीण अथवा कामगार (labour) वर्गाची आहेत. त्यांच्याजवळ असलेले ३-४ हजार रुपयेही जमा झालेले असू शकतात. ती रक्कम काही फार मोठी नाही. हां, काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झालेली असू शकते. सगळ्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊच शकत नाही. समजा मोठी रक्कम जमा झाली तर जनधन खात्यातील जमा लाखो कोटीत होईल. पण ती केवळ ६६ हजार कोटी रुपये एवढी आहे. काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाली असेल तर ते सहज लक्षात येईल आणि त्याची चौकशी करता येईल. मग सध्याचा गोंधळ का आणि कशासाठी चालू आहे? कोण हा गोंधळ करीत आहे? जणू काही जनधन खात्यांमध्ये सगळा काळा पैसा जमा होत असल्याचे चित्र का आणि कोण निर्माण करीत आहे? अतिउत्साही मोदी वा भाजपा समर्थक? की, मोदींच्या वा केंद्र सरकारच्या विरोधातील कोणी जाणूनबुजून हे करीत आहे? विरोधक करीत असतील तर समर्थक त्याला बळी पडून स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेत आहेत? एकदा समर्थन करायचे म्हटले की, डोकं गहाण ठेवून ते करायचे का? सरकारचे वा भाजपचे यावर काय मत आहे? भारतीय जनता पार्टी अधिकृतपणे पत्र परिषद घेऊन अशा प्रकारांशी, त्यावर चालणाऱ्या उटपटांग समर्थन लाटेशी आपला संबंध का तोडीत नाही? केवळ अर्थमंत्री वा अन्य काही मोजक्या जबाबदार लोकांचेच म्हणणे हे आमचे म्हणणे आहे, असे जाहीर का करीत नाही? भाजपा अथवा सरकारच्या प्रचार यंत्रणेशी याचा संबंध नाही हे जाहीर का करीत नाही. की, भाजपला हे हवेच आहे?

खरेच आम्ही वेडे होत आहोत. बहुधा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१६

संविधान

Mirror Now वर संविधान दिना निमित्त चर्चा पाहिली, ऐकली. राज्यघटनेचे पाच जाणकार होते. राजकीय व्यक्ती एकही नव्हती. सोली सोराबजी, ऍड. सुंदरम, ऍड. हेगडे असे लोक होते. या वाहिनीचे एकूण स्वरूप लक्षात घेता एकूण चर्चेचा रोख थोडा भाजप विरोधी होता. त्यात नवीन काही नाही अन आक्षेप घेण्यासारखेही काही नाही. पण एकूण चर्चा अतिशय उच्च दर्जाची होती. परंतु ही गंभीर चर्चा ऐकताना हे जाणवले की अजूनही आपली बौध्दिकता स्वप्नाळू गुलाबीपणात वावरते आहे. वेदांनी म्हटले आहे की, वेद वाचून सत्यलाभ होणार नाही. कुठेतरी आपली बौध्दिकता या धाडसापासून दूर राहते. फक्त ऍड. सुंदरम यांनी एक मूलभूत मुद्दा उपस्थित केला की, आज घटनेला धोका आहे असे वाटत असेल तर तो कोणाकडून? ज्यांच्यासाठी ही घटना आहे त्या समाजाकडून. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, ज्या समाजासाठी ही घटना आहे तिला ती आपली का वाटत नाही? अन तिच्यासाठी असलेल्या घटनेनुसार वागताना ती का दिसत नाही?

मला वाटते, यापुढील या विषयाच्या चर्चा या प्रश्नांपासून सुरू व्हायला हव्यात. खूप मोठा विषय आहे. पण तो दृष्टीआड करून चालणार नाही. नाही तर सगळं बरंच बरं आहेच.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१८

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

शाकाहाराचा वाद

`शेलारमामा पुरस्काराचा वाद' किंचित वाचण्यात आला. त्यासाठी असलेली शाकाहाराची अट रद्द करण्यात आल्याचे त्यात होते. तपशील अलाहिदा, पण असे झाले असेल तर ते निषेधार्ह आणि धोकादायक आहे. हा पुरस्कार एका `कीर्तनकार शेलार' यांच्या नावाने म्हणजे कदाचित त्यांच्या देणगीतून असावा. कीर्तनकार असल्याने स्वाभाविक शाकाहाराचा आग्रह असेल. त्यात झुंडशाही करण्याची गरज काय? प्रत्येकच पुरस्कार आमच्यासाठी खुला असलाच पाहिजे ही दादागिरी झाली. आम्ही शाकाहारी नाही त्यामुळे त्या पुरस्कारासाठी पात्र नाही हे स्वीकारण्यात अडचण काय आहे? योगशास्त्रात यम आणि नियम सांगितले आहेत, नीतिशास्त्र करणीय आणि अकरणीय असा भेद करते, इंग्रजीतही do's and dont's असे असतेच. शरीरशास्त्र असो वा मानसशास्त्र `हे करावे, हे करू नये' असे असतेच. तो मानवी जीवनाचा भागच आहे. मग समाजाची नैतिक मशागत करण्याचा वसा घेतलेल्या कीर्तनकारांनी वा त्यांच्या वारसांनी त्यांच्या नावाच्या पुरस्कारासाठी आहाराची अट ठेवली असेल तर त्यात वावगे काय? आम्हाला नको पुरस्कार म्हणून बाजूला व्हावे. झुंडशाही कशाला? गेल्या शंभरेक वर्षात माणसाची आणि समाजाची विचारांशी असलेली नाळ तोडण्याचे जे उपद्व्याप सुरु आहेत त्याचाच हा परिणाम आहे. `ज्याला त्याला त्याच्या विचार व्यवहाराचे स्वातंत्र्य असावे' असा शहाजोगपणा करत, व्यवहारात मात्र आधुनिक- पुरोगामी- बुद्धिवादी- इहवादी- इत्यादी प्रकारची झुंडशाही यांचेच थैमान सुरु आहे. विवेकशून्यतेचा वसाच त्यांनी घेतलेला आहे. आजवरच्या सरकारांनी देखील `राजकीय हिशेब' जमवण्यासाठी या झुंडशाहीची तळी उचलून धरली. विद्यमान सरकारे आणि त्यांचे पक्ष, तसेच समर्थक यांनी या झुंडशाहीच्या मानसिक व व्यावहारिक गुलामीच्या साखळ्या भिरकावून दिल्या पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१७

डॉ. आंबेडकर यांचा वेचा

मनाचे स्थैर्य आणि नीरक्षीरविवेक म्हणजे काय याचा उत्तम नमूना-

`मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

या छोट्याशा वेच्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. ते पुन्हा केव्हा तरी.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१७

गुणांची वर्गवारी

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू प्रत्येक जीवाच्या ठायी असतात. अठरापगड जातीतील कोणतीही जात असो- वरची, खालची, मधली वगैरे; कोणत्याही धर्माचा अनुयायी असो; कोणत्याही देशाचा नागरिक असो; कोणतीही राज्यघटना असो; स्त्री असो की पुरुष असो; वृद्ध असो की बालके असो; सगळ्यांमध्ये हे सहा रिपू inbuilt असतात. याचा अर्थ सगळे सारखे दोषी किंवा निर्दोष, सारखे गुणसंपन्न किंवा अवगुणी असतात असे नाही. या सहा रिपूंचं नियंत्रण, नियमन करत करत जीव जगतो. यांच्या कमीअधिक प्रमाणानुसार, यांच्या त्या त्या वेळच्या प्रयोजनानुसार व्यवहार पाहायला मिळतो. म्हणूनच एखादा शूरवीर सुद्धा प्रसंगी भेकडासारखा वागू शकतो, अन एखादा शेळपट शूरवीरासारखा. सगळ्या परस्परविरोधी गोष्टींना हे लागू होऊ शकते. म्हणूनच कोणतेही watertight classification चुकीचे असते. दुर्दैवाने वैज्ञानिक विचारपद्धती किंवा वास्तववादी विचारपद्धती या नावांनी अशा watertight classification ची सवय लावण्यात आली आहे. जी मुळात अवैज्ञानिक, अवास्तव अन अशास्त्रीय आहे.

सहिष्णूता- असहिष्णूता यावर सध्या जे वादविवाद सुरु आहेत त्या संदर्भात ही मूळ बाब दृष्टीआड झालेली पाहायला मिळते. तशी ती बहुतेक वेळाच दृष्टीआड होते, हा भाग अलाहिदा.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

रज्जुभैय्या चरित्र

खूप दिवसांचं एक काम राहिलं होतं. संघाचे चवथे सरसंघचालक स्व. रज्जुभैय्या यांच्या चरित्राचं वाचन. आज झालं वाचून. या दिवाळीला घेतलं आणि मागच्या ४-५ दिवसात वाचलं. प्रसिद्ध लेखक आणि टीव्ही चर्चांमध्ये येत असल्याने अनेकांना माहिती असलेले श्री. रतन शारदा यांनी लिहिलेलं आणि संपादित केलेलं आहे.

एकच म्हणेन- सगळ्यांनी आवर्जून वाचावं.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१८

संघ व मुस्लिम

 प्रेस विज्ञप्ति

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की एक 

बैठक हुई,जिसमें डॉ फिरोज खान के

संस्कृत विद्या एवं धर्म विज्ञान 

संकाय के साहित्य विभाग में नियुक्ति के संदर्भ में चल रहे विवाद से सम्बंधित सभी पहलुओं पर विस्तृत विचार विमर्श किया गया।संघ का मत है कि डॉ.फिरोज ख़ान का विरोध करना गलत है।संघ उससे सहमत नहीं हैं और संघ का स्पष्ट और दृढ़ मत है कि संस्कृत साहित्य को समर्पित व श्रद्धा भाव से पढ़ाने वाले,वैधानिक चयन प्रक्रिया से नियुक्त किसी भी व्यक्ति का साम्प्रदायिक आधार पर विरोध विधि विरूद्ध व सामाजिक सौहार्द बिगाड़ने वाला है।संघ इस वृत्ति, प्रवृत्ति का विरोध करता है।यह संस्कृत भाषा व साहित्य का प्रसार व प्रभाव है जिसका लाभ संपूर्ण विश्व के सभी को मिलना चाहिए ।

डा.जयप्रकाश लाल

विभाग संघचालक 

काशी

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१९

स्वातंत्र्य आणि व्यवस्था

स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो म्हणून स्वातंत्र्य नको असं म्हणता येत नाही. व्यवस्थेचा दुरुपयोग होतो म्हणून व्यवस्था नको असे म्हणता येत नाही. असे म्हणणे फारच बालीश असते. मग दुरुपयोग थांबवायचा कसा? दुरुपयोग थांबवायचा की नाही? उत्तर स्पष्ट आहे की, दुरुपयोग थांबवायलाच हवा. स्वाभाविकच दुरुपयोग थांबवायला एखादी व्यवस्था उभी केली जाते. त्याचा पुन्हा दुरुपयोग सुरू होतो. मेख आहे ती इथे. व्यवस्था हा व्यवस्थेचा वा स्वातंत्र्याचा दुरुपयोग थांबवण्याचा उपाय नसतो हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था किंवा स्वातंत्र्य यांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी माणूस विचारी, समजूतदार, बहुश्रुत, सुसंस्कृत असायला हवा. त्याच्या वागण्याबोलण्याचा, विचारांचा, समजूतदारीचा विशिष्ट स्तर हवा. करुणा, कौशल्य, माहिती, शिक्षण यापेक्षा हा स्तर भिन्न असतो याचं आकलन वाढायला हवं. या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असला तरी त्यात आणखीन एक घटक असतो सुजाणता. ही सुजाणता निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धत वा प्रक्रिया नाही. अनेक गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. हे सगळे संथपणे, जवळपास अदृश्यपणे होणारे काम आहे. व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून याकडे माणूस फारसे लक्ष देत नाही. स्वातंत्र्याचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग त्यामुळेच थांबत नाही अन गोंधळ वाढत राहतो.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०२०

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

व्यवस्था

व्यवस्था आपोआप निर्माण होतात. वाढत जातात. गुंतागुंतीच्या होतात. आक्रसत जातात. आकार, वजन आणि काच वाढत जातात. अन व्यवस्था कोसळतात. उदाहरण म्हणून - जुन्या चातुर्वर्ण्य व्यवस्था, जाती व्यवस्था, कुटुंब व्यवस्था अशाच निकालात निघाल्या. वर्तमान व्यवस्था सुद्धा याच मार्गाने जातील. जगाचाही इतिहास हेच सांगतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच व्यवस्थांना हे लागू होऊ शकतं.

- श्रीपाद कोठे

२१ नोव्हेंबर २०१९

भारताचा प्रतिनिधी

विस्ताराने लिहीन पण तूर्त एक मुद्दा विचारांसाठी. चाणक्य हा भारताचा एकमेव प्रतिनिधी नाही. ज्ञानेश्वर हा सुद्धा भारताचा प्रतिनिधी आहे. चाणक्य नीतीने पसायदानाचा गळा घोटू नये. आमचे वर्तमान चिंतन अभारतीय विचारांवर सुरू आहे. योग्य विचार आणि मूल्यांचे चिंतन, जे तात्विक स्तरावर व्हायला हवे ते संपले आहे. खूप गंभीरपणे या विषयाकडे पाहिले जायला हवे. विचारांच्या स्तरावर भयावह स्थिती आहे.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१९

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

स्थैर्याचा अभाव

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

कशासाठी? पैशासाठी !

१) शिक्षण कशासाठी? - पैशासाठी.

२) धान्य, भाजीपाला, फळे कशासाठी? - पैशासाठी.

३) दुधदुभते कशासाठी? - पैशासाठी.

४) पाणी कशासाठी? - पैशासाठी.

५) कारखाने कशासाठी? - पैशासाठी.

६) उत्पादन कशासाठी? - पैशासाठी.

७) जमीन कशासाठी? - पैशासाठी.

८) सत्ता कशासाठी? - पैशासाठी.

९) नाती कशासाठी? - पैशासाठी.

१०) कला कशासाठी? - पैशासाठी.

११) ज्ञान कशासाठी? - पैशासाठी.

१२) विज्ञान, तंत्रज्ञान कशासाठी? - पैशासाठी.

१३) लेखन कशासाठी? - पैशासाठी.

१४) प्रेम कशासाठी? - पैशासाठी.

१५) द्वेष कशासाठी? - पैशासाठी.

१६) सेवा कशासाठी? - पैशासाठी.

१७) आनंद कशासाठी? - पैशासाठी.

१८) दु:ख कशासाठी? - पैशासाठी.

१९) व्यवसाय कशासाठी? - पैशासाठी.

२०) सहकार्य कशासाठी? - पैशासाठी.

२१) पैसा कशासाठी? - पैशासाठी.

यादी वाढवायला प्रत्येक जण मोकळा आहे.

गेली सुमारे तीनेकशे वर्षे जगात हीच तत्व मानली जात आहेत. भांडवलशाही असो की समाजवाद की साम्यवाद; सगळ्यांना हे मान्य आहे. त्यांच्यात मतभेद आहेत ते फक्त मालकी आणि प्रमाण यावरून. जे या विचारधारा मानत नाहीत त्यांच्याही मनात हीच उत्तरे विविध मार्गांनी ठसवण्यात आली आहेत. पण हा रस्ता आता एका dead end ला येऊन पोहोचला आहे. गेली ८-१० वर्ष ही जाणीव होऊ लागली आहे. मात्र उपाय सापडत नाही वा दुसरा रस्ता सापडत नाही. `पैशासाठी' या उत्तराऐवजी `जीवनासाठी' हे उत्तर जर मन-बुद्धीवर बिंबवल्या गेलं तर कदाचित उत्तर सापडू शकेल. अन नाही सापडलं तर नाही सापडलं. आज तरी कुठे काही हाती लागलंय?

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

भारत तोडण्याचे कारस्थान

Twitter सीइओने 'smash bramhanical patriarchy' असं पोस्टर me too शी जोडून टाकलं आहे.

भारतीय समाज तोडण्याचे आणि नासवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत याचं ताजं उदाहरण आहे हे.

हिंदू, भारत, ब्राम्हण, परंपरा, संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे, धर्म, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, लज्जा, शालीनता, मर्यादा, आदर, समन्वय, वेळप्रसंगी माघार घेणे, नम्रता, अध्यात्म, आत्मसंयम, व्रते, व्रतस्थता, उपासना, मंदिरे, प्रतिके... या सगळ्यात काहीही कमीपणा नाही. लाज वाटण्यासारखं काहीही नाही. बचावात्मक पवित्रा घेण्यासारखं काहीही नाही. या संबंधात होणारा सगळा गोंधळ हा निर्लज्ज, स्वार्थी, वखवखलेल्या, निर्बुद्ध लोकांचा नीच राक्षसी प्रयत्न आहे. हा प्रयत्न निर्ममतेने हाणून पाडायला हवा. सध्याचा रोख महिला वर्ग आहे. खूप सावधपणे हे हाताळायला हवे. महिलांनी सुद्धा भावनिक न होता या सगळ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१८

वेड्यांच्या जगात

आपण वेड्यांच्या जगात राहतो आहोत का? एकीकडे पेट्रोलियम पदार्थांवर सगळं खापर फोडत असतानाच, 'तुम्ही पुष्कळ दिवसात सिलेंडर बुकिंग केलेलं नाही. लवकर बुकिंग करा नाही तर तुमचं कनेक्शन रद्द होईल' म्हणून गॅस कंपनी फोन करत राहते. काय म्हणायचं याला? कुठे चाललो आहे आपण? उद्या, 'तुम्ही खूप दिवसात गहू तांदूळ घेतले नाही' म्हणून किंवा त्याहीनंतर 'तुम्ही खूप दिवसात चड्ड्या घेतल्या नाही' म्हणून मागे लागणार का? लाखो रुपये घेणारे/ कमावणारे तज्ज्ञ आणि अधिकारी इतके सुमार बालबुद्धीचे आहेत अन आपण भलभलती स्वप्नं पाहतो.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०२१

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

ईश्वर आणि पत्नी भाव

सध्याच्या चर्चायुगात चर्चेला/ विचाराला (गोंधळाला !!) थोडं खाद्य. एक निरीक्षण असं आहे की; हिंदूंचे म्हणून जे उपासना पंथ आहेत, प्रार्थना पद्धती आहे, त्यात ईश्वराची `पती भावाने' उपासना, पूजा तर आहे. तशी पदे, भजने वगैरेही आहेत. परंतु ईश्वराची `पत्नी भावाने' पूजा, उपासना मात्र नाही. माधानचे प्रसिद्ध संत गुलाबराव महाराज यांनी `श्रीकृष्ण पत्नी' म्हणून उपासना केली आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनीही `सखी भावाने' उपासना केली आहे. मीराबाई तर प्रसिद्ध आहेच. क्वचित एखादी सामान्य स्त्रीसुद्धा ईश्वरालाच पती मानून प्रत्यक्ष विवाह आदी करते, अशाही बातम्या वाचण्यात आहेत. (मी देवाला वाहिल्या जाणाऱ्या आणि जबरीने, दबावाने जे प्रकार होतात त्याबद्दल बोलत नाहीय.) मात्र, ईश्वराला पत्नी वा सखी मानून मात्र उपासना नाही. पदे इत्यादी नाहीत. किमान मला ठाऊक नाहीत. (कोणाला ठाऊक असल्यास सांगावे.)

माझी कमेंट??

बऱ्याच कमेंट आहेत. पण सध्या फक्त निरीक्षण with no comments.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०१८

स्वाभिमान आणि अहंकार

आत्मसन्मान आणि अहंकार

स्वाभिमान आणि अहंकार

यांची सीमारेषा कोणती?

संवेदनांचा अंत ही सीमारेषा.

ज्यावेळी संवेदना गाडली जात असेल, जाळली जात असेल, ठार होत असेल; त्यावेळी आत्मसन्मान किंवा स्वाभिमान अहंकारात बदलतो.

हे प्रभू, माझ्यातील संवेदना मरू देऊ नको.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०२१

एस. टी. स्थानकांचा वापर

एस.टी. संपाचा प्रश्न चिघळतो आहे. एक साधी गोष्ट का कोणाच्या मनात येऊ नये हा प्रश्न पडतो. एस.टी.ची शेकडो स्थानके आहेत. त्या जागांचा वापर स्थानकासह व्यावसायिक पद्धतीने केला तर उत्पन्न वाढू शकणार नाही का? व्यवसाय, यात्राजत्रा, लग्नकार्य, कौटुंबिक कामे, शेतीवाडी, नोकरी, सहल; अशा विविध कारणांनी लोक सतत फिरत असतात. मुंबई महानगरापासून तर एखाद्या पाचशे हजार लोकवस्तीच्या गावापर्यंत. या लोकांच्या राहण्या जेवण्याची दर्जेदार सोय माफक दरात करण्यासाठी स्थानकांच्या जागा विकसित करता येऊ शकतात. अशा लोकांना पंचतारांकित सोयींची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते. फक्त स्वच्छता, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, सुरक्षा, चांगले वातावरण एवढेच हवे असते. याशिवाय सौर ऊर्जा तयार करून विकता येऊ शकेल. मर्यादित प्रमाणात साठवणुकीची सोय उपलब्ध करून देता येईल. पण कोणाला काहीच करायचे नाही असेच दिसते. यात राजकीय वादावादी नसावी पण सगळ्यांना त्याची खुमखुमी असते म्हणून फक्त एक नोंद - मध्यंतरी पाच वर्षे भाजपचं राज्य होतं. त्यावेळीही असं काही ऐकू आलं नाही, दिसलं नाही.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०२१

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

दशक्रिया

`दशक्रिया'ची चर्चा सुरु झाली आहे. हे पोटभरू ब्राम्हणांचे उपद्व्याप आहेत असा एक युक्तिवाद असून त्यावरच मुख्य आक्षेपही आहे. प्रश्न असा की- जगातला कोणता व्यवसाय पोट भरण्यासाठी नाही? पोट भरणे हीच कोणत्याही व्यवसायाची मूळ प्रेरणा नसते का? अन व्यवसाय म्हणजे तरी काय? माणसाच्या किंवा पशूच्याही गरजांची पूर्ती करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याबदल्यात चरितार्थ कमावणे. या गरजा भौतिक, दैनंदिन जीवनातील असतात तशाच मानसिक, बौद्धिक, भावनिक आदीही असतात. समजा दशक्रिया हा असाच व्यवसाय आहे हे क्षणभर चर्चेसाठी मान्य केले तरीही त्यात आकाशपाताळ एक करण्यासारखे काय आहे? अन फसवणूक या मुद्द्याचा विचार करायचा तर- ज्या गोष्टी ढळढळीत दिसतात, समजतात; अगदी शेंबड्या मुलालाही लक्षात येऊ शकतात अशा कितीतरी गोष्टीत फसवणूक होतच असते. कोणतीही फसवणूक चूकच. पण त्याचे भांडवल करून उगाच आक्रस्ताळेपणा करण्याचे काय कारण? आधुनिकतेला आक्रस्ताळेपणा करण्याचा देवदत्त परवाना आहे की काय?

- श्रीपाद कोठे

१५ नोव्हेंबर २०१७

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

कार्तिकी

उद्या पुन्हा थिरकतील ती भेगाळलेली, काळवंडलेली शुभ पाऊले पंढरीच्या वाळवंटात. नाचतील तल्लीन होऊन. अशीच नाही येत ही तल्लीनता. त्यासाठी लीनता यावी लागते. कटीवर हात, विटेवरी उभा असा तो पांडुरंग भेटला की तोच देतो लीनता आणि तल्लीनता. पण कसा भेटावा तो?

हा काही साधासुधा देव नाही. वेदांनाही ज्याचा थांग लागला नाही असा ईश्वरी भावच सावयव झाला आहे तिथे. साकार पण निर्गुण !! हो, साकार पण निर्गुण. म्हणून तर हात कमरेवर ठेवले आहेत त्याने. त्याच्या हाती शस्त्र नाहीत, शास्त्र नाहीत, शाप नाहीत, आशीर्वाद सुद्धा नाहीत. विराग नाही, अनुराग नाही. त्याचा भाव ओळखूनच वामांगीही नाही. कारण त्याच्या ठायी पुरुष नाही आणि प्रकृती पण नाही. त्या अखंड चिन्मयाचा कोणताही विकार नाही आणि विलासही नाही. सारीच विलसीते विराम पावलेली. विश्वाच्या विभवाचा मागमूस नाही. तो फक्त आहे. नाकारता येत नाही अन आकारता येत नाही असा.

नाही करता येत त्याच्याशी वाटाघाटी. नाही साधता येत कुठली देवाणघेवाण. फक्त पोहोचायचं त्याच्या जवळ. त्याच्या सारखंच नि:संग होऊन. धनाचा, मानाचा, दानाचा, ज्ञानाचा, कर्त्याचा, अकर्त्याचा, विनयाचा, ताठरतेचा, माणसांचा, पशूंचा, सुखाचा, दु:खाचा, भक्ताचा, भक्तीचा... कसला कसलाही संग न धरता जायचं त्याच्याजवळ. मग तोच घालतो मिठी. देतो लीनता अन तल्लीनता. सारं सारं लोपून जातं आणि थुई थुई नाचू लागतो एकच सत चित आनंद... आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे !!

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२१

कशासाठी?

असंख्य लोकांना आवडणार नाही, तरीही...

मित्र मैत्रिणींनो- मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला एक महत्वाचा निर्णय घेतला. तो योग्य आणि आवश्यक होताच. सगळ्यांनी त्याचं अभिनंदनही केलं. त्याला आज सहा दिवस झालेत. अजूनही आपण त्यातच का अडकून आहोत? जो निर्णय निर्विवाद योग्य आहे त्याची पाठराखण करण्यासाठी आपण वेळ, बुद्धी, पैसा का खर्च करीत आहोत? आपल्याला विश्वास नाही का? किती प्रचारी आणि प्रतिक्रियावादी असावं? मोदी किंवा ३०० खासदारांचा पाठींबा असलेल्या सरकारला याची गरज आहे का? हा पटवून देण्याचा विषय आहे का? आक्षेपकांशी तू-तू, मी-मी करण्याचा विषय आहे का? `हाथी चले बजार, कुत्ते भोंके हजार' ही पारंपरिक शहाणपणाची उक्ती आपण विसरलो आहोत का? रोज वेगवेगळी आवाहने काय? नवनवीन कथा कहाण्या आणि अनुभव काय... कशासाठी हे सारे? कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा, गुरुनानक जयंती हे सगळं संचित विसरून जावं इतका कैफ येण्याचं काय कारण? आपण अनावश्यक, अवास्तव, अयोग्य राजकीय प्राणी झालो आहोत की काय? कशासाठी हे सारे? या सगळ्या प्रकारात देशभक्तीसारखी गंभीर आणि पवित्र गोष्ट आपण आठवडी बाजारात विकायला काढल्यासारखी मांडली याचंही भान सुटावं? कशाला घाबरतो आपण? की या राष्ट्राची प्रकृती नसलेली धुंदी आपल्याला चढली आहे? काहीच काम नसेल तर ध्यान लावून बसावे. त्याने अधिक फायदा होईल जगाचा.

`निर्माणो के पावन युग मे, हम चरित्र निर्माण न भूले' चरित्र म्हणजे केवळ पैशाचे स्वच्छ व्यवहार किंवा स्त्रीविषयीची निर्मळ दृष्टी एवढेच नाही. ते तर आहेच, पण त्यासोबत आणखीनही खूप काही आहे. तूर्त एवढेच. नमस्कार.

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०१६

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

cashless economy

cashless economy ची मोठी चर्चा देशात सुरु झाली आहे. त्याचे स्वरूप, गरज, शक्यता, फायदे, तोटे याकडे मात्र ती चर्चा अजून वळलेली नाही. विचारासाठी काही बिंदू-

१) जगात किती देश पूर्णांशाने cashless झालेले आहेत?

२) cashless याचा अर्थ चलन नाही असा होईल का?

३) रुपया ही गोष्ट अस्तित्वातच राहणार नाही का?

४) रुपया नसला तर विनिमय कसा होईल?

५) याचाच अर्थ रुपया राहणार फक्त तो हातात राहणार नाही.

६) पगार, वस्तू वा सेवांच्या किमती चलनातच राहणार.

७) ही barter system राहणार नाही.

८) प्रत्येकाला तंत्रज्ञान अवगत असणे, त्याचा वापर करणे बंधनकारक होईल.

९) तंत्रज्ञानाचा वेग वाढत जाईल आणि त्याच्याशी जुळवून घेणे आवश्यक ठरेल. हे किती शक्य आणि योग्य ठरेल?

१०) बिना रोखीचे अधिकाधिक व्यवहार असणाऱ्या देशांमध्ये भ्रष्टाचार, dirty money आहे वा नाही?

११) अतिशय घट्ट आर्थिक रचना सामाजिक स्थैर्य आणि स्वास्थ्यासाठी खरंच लाभकारी असते का?

१२) अमेरिकेतील subprime crisis आणि युरोपची सद्यस्थिती (ग्रीसचे दिवाळे आणि इंग्लंडने युरोपीय युनियनमधून बाहेर पडणे यासह) यांचे उदाहरण.

१३) पैसा न कमावणारे पण पैशांचा व्यवहार करणारे यांचे निर्माण होऊ शकणारे प्रश्न.

१४) मानवी जीवनाचा फार मोठा इतिहास cashless economy चाच आहे. त्यातून ज्या गरजांपोटी cash आली त्या कारणांचा विचार.

१५) पूर्वीच्या व आताच्या cashless economy चे अनुभव.

१६) cashless आणि excess cash यांचा तोल.

१७) व्यवहाराच्या आणि जीवनाच्या पद्धती बदलायच्या म्हणजे काय?

१८) देवाणघेवाण, खरेदीविक्री, व्यवसाय पद्धती, सवयी, भावना, उत्पादन, वितरण, उपभोग यांच्या पद्धती स्वीकारणे किंवा नाकारणे याचा आधार काय असावा? उदा. - credit card वापराने झालेले दुष्परिणाम.

१९) जंगल, जमीन, पाणी, नद्या, सगळी साधनसंपत्ती आणि चलन संपत्ती खाजगी अथवा सरकार नावाच्या मालकीची करून cashless economy करण्याचे परिणाम.

२०) रशियातील १९२० पासून साधारण सात दशकांचा प्रवास थोडाफार cashless economy चा म्हणता येईल. त्याच्या अनेक अंगांचा विचार.

आणखीनही पुष्कळ गोष्टी. विचारमंथन व्हावे. केवळ frenzy नको यासाठी.

- श्रीपाद कोठे

१३ नोव्हेंबर २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

समाज

- समाज अथवा सरकार माणसाला सुख देऊ शकतात का? सुखाची जाणीव किंवा समाधान या अर्थाने नाहीच देऊ शकत. परंतु सुखसाधने, व्यवस्था, वातावरण या अंगानेही माणसाला किती सुखी करू शकतात, किती सुख पुरवू शकतात? स्वप्नाळूपणा बाजूला ठेवून शक्यतांचा विचार करायला हवा.

- समाज ही सुद्धा मानवी विकासाची अंतिम अवस्था राहू शकत नाही.

- मानवी शरीराच्या उत्क्रांतीप्रमाणे त्याच्या मानसिक, बौद्धिक, भावनिक, जाणीवयुक्त, सांस्कृतिक, आध्यात्मिक उत्क्रांतीचाही विचार महत्वाचा आहे.

- आदर्श समाज नव्हे मानवमुक्ती हा भारतीय जीवनाचा आदर्श आहे. त्यासाठी सुव्यवस्थित समाज हा एक टप्पा आहे.

- श्रीपाद कोठे

१२ नोव्हेंबर २०१८

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कागदपत्रे

एखादा महत्वाचा कागद/ कागदपत्र हाताशी असतं आणि पुस्तक वाचताना ते त्यात ठेवलं जातं. नंतर एखाद्या वेळी त्याची गरज पडते. आपण अतिशय व्यवस्थित असतोच. जिथे सगळी कागदपत्रे असतात तिथे शोधतो. पण हवा असलेला दस्तऐवज सापडत नाही. मात्र पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी शोध शोध शोधतो. खाली, वर, आत, बाहेर, उलट, सुलट... सगळं होतं. दस्तऐवजाचा मात्र ठाम नकार. जिथे आपण कधीच कागदपत्रे ठेवत नाही तिथेही थकेपर्यंत शोधतो. पण निरर्थक. मग प्रथम चिडचिड, नंतर वैताग, नंतर हताशा, नंतर नशिबाला दोष. मग सगळं शांत. मग पूर्ण विसर. त्या कागदपत्रामुळे अडलेलं काम कृष्णार्पण. महिने जातात. अन कधीतरी पुन्हा ते पुस्तक हाती घेतो. कामाने वा बिनकामाने हाताळत असतो. अन ज्याने आपला प्रचंड छळ केला तो कागद अचानक दृष्टीस पडतो. तेव्हा होणारा आनंद, आपल्याच बावळटपणाचं हसू, अन हुश्श करणारं समाधान; यांचं रसायन निव्वळ अद्भुत असतं.

- तर, सगळ्यांना त्यांची त्यांची कागदपत्रे वेळेवर सापडोत. 😊

- श्रीपाद कोठे

११ नोव्हेंबर २०२०

पाणीदेयक

नागपूर महापालिकेचे पाणीदेयक फक्त paytm ने भरता येते. अन्य कोणत्याही ऍपने भरता येत नाही. अगदी भीमने सुद्धा. ही आर्थिक लोकशाही तर नाहीच पण याला unfair trade practice का म्हणू नये? शासन, प्रशासनाने एकाच व्यवसायाला प्रमोट करावे का? का करावे?

- श्रीपाद कोठे

११ नोव्हेंबर २०२१


बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

पथसंचलन बंदी

तामिळनाडूत रा. स्व. संघाच्या पथसंचलनावर राज्य सरकारने बंदी घातली होती. त्याविरुद्ध संघाने न्यायालयात धाव घेतली आणि राज्याच्या उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द करून सात ठिकाणी पथसंचलन काढण्यासाठी परवानगी दिली. मात्र तामिळनाडू सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि पथसंचलन काढू दिले नाही. त्याविरुद्ध संघ स्वयंसेवक आणि समर्थक अशा सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी राज्य सरकारच्या या वृत्तीचा निषेध करीत अटक करवून घेतली. निर्माण होणारे प्रश्न-

१) मनमानी करणारे, आकस बाळगून काम करणारे राज्य सरकार त्वरित बरखास्त का करू नये?

२) अत्यंत उथळ, निरर्थक `चुंबन आंदोलना'वर तासंतास बातम्या आणि चर्चा घडवणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी `बातमीमूल्य' वगैरे गुंडाळून ठेवले आहे का?

३) मोदी सरकारने देशातील प्रसार माध्यमांची झाडाझडती घ्यायला हवी की नको?

४) वृत्तवाहिन्यांचे आपल्या जीवनावरील आक्रमण आपण किती सहन करायचे?

५) वृत्तवाहिन्यांवर किती आणि कुठवर विश्वास ठेवायचा?

६) वृत्तवाहिन्यांचे खरे पोशिंदे आणि सामाजिक, आर्थिक व्यवहारातील त्यांची भूमिका उघड कधी होणार? त्यासाठी त्यांना योग्य सजा मिळेल का?

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०१४

व्यवस्थांचा पसारा

मानवी सभ्यता आणि संस्कृती यांच्याविषयीची मूळ जीवनदृष्टी बदलली नाही तर, चांगल्या व प्रामाणिक प्रयत्नांचा विपरीत परिणाम होईल. अमेरिका व भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडी याकडे निर्देश करतात. त्यातील एकेका पैलूवर विस्ताराने विचार करता येईल, नव्हे करावा लागेल. परंतु सूत्ररुपात बोलायचे तर माणसाचे माणूसपण गमावून सामाजिक, आर्थिक, राजकीय यंत्राचा एक खिळा अशा रुपात नवीन माणूस ठेवायचा आहे का? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. व्यवस्था मोठ्या होणे आणि माणूस अधिकाधिक लहान होणे, व्यवस्थांचा पसारा वाढणे आणि माणसाची space कमी होणे अशी ही क्रिया आहे. या विश्वाची मूळ स्थिती गती आणि मूळ भारतीय चिंतन माणूस विशाल आणि व्यापक व्हावा, व्यवस्था त्याला साहाय्यभूत व्हाव्या; या बाजूचे आहे. व्यवस्थायंत्राचा एक खिळा होऊन माणूस मोठा, महान, विशाल, व्यापक होऊ शकत नाही. रामकृष्ण आश्रमाच्या व्यवस्थेतून दुसरे रामकृष्ण परमहंस निर्माण झाले नाहीत, बौद्ध विहारांच्या माध्यमातून भगवान बुद्ध निर्माण झाले नाहीत, चर्चेसमधून येशू ख्रिस्त निर्माण झाले नाहीत, संशोधन संस्थांमधून किंवा विद्यापीठांमधून आईनस्टाईन, सोक्रेतीस, आर्यभट्ट वा याज्ञवल्क्य निर्माण होत नाहीत. पसारा कमी करत जाणाऱ्या व्यवस्था हव्यात. सध्याच्या जागतिक घडामोडी व्यवस्थेचा पसारा वाढवत जाणाऱ्या आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. तात्कालिक धोरण म्हणून अनेक गोष्टी योग्य असल्या तरीही त्या करताना दीर्घकालीन दृष्टी गमावून बसता कामा नये.

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०१६

एस. टी.चे खाजगीकरण

- एस.टी. महामंडळाचं खाजगीकरण झालं तर ती केवळ गावखेड्यांची, गरिबांची, कर्मचाऱ्यांची समस्या नसेल; ती मानवी संवेदनांची हत्या असेल.

- कोण चूक, कोण बरोबर, नियम काय, फायदा तोटा; यापलीकडच्या काही गोष्टी असतात हे अजूनही आपल्याला समजत नाही हे दुःखद आहे.

- छोट्या मोठ्या गोष्टींवर अमाप शक्ती वाया घालवणाऱ्या सोशल मीडियावर एस.टी. संप बेदखल राहावा ही शोकांतिका आहे.

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०२१

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

खाजगी व सार्वजनिक

१) देव- कोणीही केव्हाही दर्शन घेऊ शकतो. कोणीही केव्हाही त्याच्याशी बोलू शकतो.

२) धर्म- कोणीही केव्हाही करू शकतो. भुकेल्याला खाऊ घालणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, रुग्णाची सेवा करणे, अशिक्षिताला शिक्षण देणे; कोणीही केव्हाही करू शकतो.

३) चुंबन- कोणीही, केव्हाही, कोणाचंही घेऊ शकत नाही. कोणाला वाटलं कोणाचं चुंबन घ्यावं आणि त्याने ते घेतलं तर मार खायचीच वेळ.

४) तात्पर्य- देव, धर्म सार्वजनिक आहेत/ असू शकतात. चुंबन ही खाजगी गोष्ट आहे.

५) तरीही- सार्वजनिक गोष्टी घरापुरत्या असाव्यात आणि खाजगी गोष्टी जगजाहीर असाव्यात.

६) निष्कर्ष- वरील क्र. (५) म्हणजे आधुनिकता/ म्हणजे धर्मनिरपेक्षता/ म्हणजे पुरोगामित्व.

- श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०१४

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

विकृत आवड

सकाळी गाणे ऐकले- `उठी श्रीरामा प्रभात झाली... उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माउली'. थोड्या वेळापूर्वी रोणू मुजुमदारची बासरी ऐकली. राग गोरख कल्याण. सकाळी गाणे ऐकताना जाणवले- तीन मिनिटांच्या त्या गाण्यात किती variations आहेत. किती सौंदर्यस्थळे आहेत. रोणुची बासरी ऐकताना जाणवलं- पहिला अर्धा तास बासरीशिवाय दुसरं काहीही नाही. तबला सुद्धा नाही. तरीही जग विसरायला लावण्याची ताकद त्यात आहे. अर्थात नंतरच्या अर्ध्या-पाउण तासातील तबल्यासह असलेली बासरीही गोडच आहे. अन आता कानावर पडते आहे कुठेतरी लग्नानिमित्त सुरु असलेले संगीत. मनात प्रश्न आला, तसा तो नेहमीच येतो- माणूस इतका विकृत का झाला असेल? ताल सूर कशाकशाचा काहीही संबंध नाही. ताल म्हणजे फक्त ढण ढण आणि ढण !!! अन संगीत म्हणजे त्या ढणढणचा वाढता आवाज. या विकृत वातावरणातून सुटका कधी होणार समाजाची कोणास ठाऊक. मोदीजी, नोटबंदीच्या दिवशी एक सूचना करावीशी वाटते. या तथाकथित वाद्यांवर आणि संगीतावर कठोर बंदी आणा. किमान भारतातून ते पूर्ण हद्दपार करा. तुमच्यावर रागावून, त्या संगीतापाठी कोणी देश सोडून जाणार असतील तर जाऊ द्या. अगदी देश रिकामा रिकामा झाला तरी चालेल. भारतभूवरचा भार अनेक अर्थांनी हलका होईल. मरोत या ढण ढण संगीताचे चाहते.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१७

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

वंचित आणि दिवाळी

कधी कधी आपण थोडे अधिकच भावनाशील होतो. अन नेमक्या चुका करतो. आजपासून दिवाळी आहे. यावर्षी पाऊसपाणी नीट न झाल्याने अनेक समाज घटकांवर परिणाम झाला आहे. शेतकरी तर त्याचा पहिला बळी ठरतो. ही परिस्थिती पाहून साहजीकच मनातील करुणा जागी होते. मग कोणीतरी विचार मांडतो की, यावर्षी दिवाळी साजरी करू नये. किंवा असेच काहीतरी. मित्रांनो, असे करू नका. हे खरे आहे की पुष्कळांच्या पुष्कळ समस्या आहेत अन असतात. पण आपण सणांचा सगळ्या अंगांनी विचार केला पाहिजे. त्यात आनंद, उत्साह हे जसे आहे तसेच; समाजात पैशाचे चलनवलन व्हावे, वितरण व्हावे हाही उद्देश असतो. आपण सण साजरा करतो तेव्हा तो अनेक गरजूंच्या, वंचितांच्या खिशात जातो. त्यांचीही दिवाळी अन आयुष्य सुरळीत व्हायला, सुखी व्हायला मदत होते. गरजू, गरीब, वंचित यांना प्रत्यक्ष मदत जशी करता येते, तशीच सहज समाजव्यवहार सांभाळून, सण उत्सव साजरे करून अप्रत्यक्ष मदतही करता येते. पुरुषार्थ, कलाकौशल्य यांनाही उठाव मिळतो. आणि दु:खाप्रमाणेच सुखही संसर्गजन्य असल्याने आनंदही पसरत जातो. हां, व्यक्तीच्या, परिस्थितीच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे १०० टक्के समाधान नाही राहू शकत. त्यासाठी प्रार्थना करावी, शुभचिंतन करावे. अन आपल्या बाजूने, आपल्या क्षमतेप्रमाणे सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जेवढा फैलाव करता येईल तेवढा करावा.

सगळ्यांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०१५

काँग्रेस आणि संस्थानिक

तत्कालीन स्थिती आपल्याला अनेकदा माहिती नसते आणि आपण आपल्या कल्पनेने भूतकाळ रंगवत असतो. इंग्रज भारतात असताना संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेश आणि संस्थानिकांच्या ताब्यात नसलेला प्रदेश असे देशाचे दोन भाग होते. इंग्रजांचा अंमल दोन्हीकडे होता. पण काँग्रेस पक्षाचे काम १९३८ पर्यंत संस्थानिकांच्या ताब्यात नसलेल्या प्रदेशातच होते. १९३९ च्या अधिवेशनात संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेशात काम करण्याचा ठराव करण्यात आला. संस्थानिकांची ही संख्या ६०० च्या जवळपास होती. (पटेलांनी सामील केलेली संख्या ५६५ होती. ती पाक वेगळा झाल्यानंतरची.) म्हणजेच १९३९ पर्यंत मोठ्या भूप्रदेशात काँग्रेसचे कामच नव्हते. किमान अधिकृतपणे. नंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १९४२ पर्यंत त्या प्रदेशात कितीसं काम झालं असेल? 'चले जाव' आंदोलनाचं मूल्यमापन करताना ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०१९

अर्णव आणि हिंदुत्व

अर्णव प्रकरणात एक सूर असाही ऐकू येतो आहे की, अर्णवला अटक हा हिंदुत्वावर हल्ला आहे. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की हा हिंदुत्वावर हल्ला नाही. आज अर्णव हिंदुत्ववाद्यांचा पत्रकारितेतील आयकॉन झाला आहे हे खरे. त्याला फॉलोइंग पण भरपूर आहे हेही खरे. अन्य माध्यमे जे विषय फारसे हाती घेत नाहीत, ते अनेक विषय तो हाती घेतो हेही खरे. परंतु एक प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा की, हे मुद्दे अर्णव का हाती घेतो? अन त्यामुळे त्याला मोठं फॉलोइंग का लाभलं? याचं कारण आहे - आयकॉन न होता कित्येक वर्षे सातत्याने, संयमाने हिंदुत्वाची पायाभरणी करणारे अनेक पत्रकार, लेखक, विचारक. हिंदुत्वाला अचानक पाच सात वर्षात आपोआप फॉलोइंग लाभलेलं नाही. तसं ते लाभलं असेल तर ते तसंच अल्पावधीत विरुनही जाईल. मात्र तसे होणार नाही. कारण आजही पाया सुस्थितीत राहावा यासाठी आणि त्यावर मजबूत, टिकाऊ इमारत उभी राहावी यासाठी झटणारे पत्रकार आहेत. ते संथ, संयत, low profile असल्याने पुष्कळदा त्याची कल्पना नसते. हे स्वाभाविक आहे. पण आहे ते असेच आहे. अन जोवर हे आहे तोवर हिंदुत्वावर हल्ला वगैरेत अर्थ नाही. किंबहुना असा हल्ला होऊच शकत नाही. हिंदुत्व हे आयकॉन आणि फॉलोइंग यावर अवलंबून नाही, यावर उभे नाही. तसा समज करून घेणे किंवा करून देणे, हे हिंदुत्वाचे एक प्रकारे नुकसान करणे होईल. कारण त्याने विपरीत बुद्धी तयार होत जाते. अर्णववर अन्याय होतो आहे की नाही, हा वेगळा विषय आहे. पण त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. अन अर्णवच कशाला... असो, यापुढे विचार करणाऱ्यांना काही सांगण्याची गरज नाही. त्यांना व्यवस्थित कळतं.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२०

दिवाळी अंक लिखाण (२०२१)

१) रवींद्रनाथ, राष्ट्रीयता आणि नॅशनॅलिझम (नागपूर तरुण भारत दिवाळी २०२१)

२) योगी अरविंद यांचे भारतीय साहित्यचिंतन (साप्ताहिक विवेक दिवाळी २०२१)

३) राष्ट्र सेविका समितीच्या 'अनसंग कथा' (अनलॉक दिवाळी २०२१)

४) जे. जे. गुडविन : विवेकानंदांचा उजवा हात (त्रैमासिक 'विमर्ष' दिवाळी २०२१)

५) भूदान यज्ञ : समरसतेचा महाप्रयोग (समरसता साहित्य परिषदेचा 'समरसता दिवाळी २०२१', ऑनलाइन)

हे माझे पाच लेख प्रसिद्ध झाले आहेत. शक्य होतील तसे वाचा आणि वाटलं तर प्रतिक्रिया द्या.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

दोन सूचना

केंद्रातील मोदी सरकार अनेक गोष्टी बदलत आहे. या आवश्यक कामात न्यायव्यवस्थेच्या संदर्भात दोन गोष्टी बदलाव्यात. १) आंधळी न्यायदेवता. डोळे उघडे ठेवल्याने जसे एखाद्याला favour केला जाऊ शकतो तसेच, डोळे बंद केल्यामुळे अन्याय होऊ शकतो आणि सारासार विचार बाजूला पडू शकतो हेही खरे. त्यामुळे तूर्त न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढावी आणि एखादा पर्याय देता येईल का; याचाही विचार व्हावा. २) कोणत्याही गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आज मुभा आहे. आम्ही किती न्यायप्रेमी आहोत असं म्हणून पाठ थोपटून घ्यायला हे ठीक आहे. मात्र व्यवहारात ते तितकंसं योग्य म्हणता येणार नाही. असंख्य फौजदारी वा मुलकी बाबी जिल्हा स्तरावरच सोडवल्या जाऊ शकतात. उलट त्यापुढे त्या बाबतीत न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जिल्हा पातळीवरच सोडवले जावेत असे विषय वेगळे करावेत आणि त्यापुढील विषय वेगळे करावेत. त्याने बोजा, गुंतागुंत, वेळ, खर्च सगळ्यांची बचत होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

६ नोव्हेंबर २०१६

शहाणे

- उपभोग चालू द्या, तेवढी कचऱ्याची समस्या सोडवा;

- वाहने वाढू द्या, तेवढं प्रदूषण मात्र कमी करा;

- शहरं अवाढव्य वाढू द्या, तेवढी कुटुंब व्यवस्था टिकवून धरा;

- अखंड धावपळ करा, शरीर स्वास्थ्य मात्र जपा;

- जीवनशैली उंचावत राहा, अभावातला साधेपणा, सहजता तेवढी टिकवा; (भाजप हा संदर्भ घ्यायला हरकत नाही);

- विद्यार्थ्यांना खूप शिकवा, त्यांच्यावर दडपण मात्र देऊ नका;

************************************

(यादी वाढवायला हरकत नाही.)

आम्ही इतके शहाणे की, ज्यामुळे समस्या तयार होते ती मूळ गोष्ट कमी न करता, समस्या सोडवण्याचा पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे !! ज्या फांदीवर बसला तीच फांदी तोडणाऱ्या लाकूडतोड्यानंतर, मानवी इतिहासात 'शहाणे' म्हणून आमचीच गणना होईल कदाचित.

- श्रीपाद कोठे

६ नोव्हेंबर २०१९

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

दिल्लीतील वायू प्रदूषण

दिल्लीच्या तीनही महानगरपालिकांच्या हद्दीतील शाळा वायू प्रदूषणामुळे काही दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता यावर खूप चर्चा होतील. समर्थक आणि विरोधक निर्माण होतील. त्यांचे राजकीय वर्गीकरण होईल. आरोप प्रत्यारोप होतील. मध्यममार्गी म्हणून मिरवीत काही जण पुढे येतील. मग हे प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर काथ्याकुट केला जाईल. काही दिवस काही उपाय होतील. थातुमातूर काहीतरी होईल. पुन्हा काही दिवसांनी (महिन्यांनी, वर्षांनी) पहिल्या वाक्यापासून सुरुवात होईल.

विचार आणि भावना स्पष्ट, व्यावहारिक, सशक्त नसणे हे एकमेव कारण.

१) आज अवाढव्य वाढणारी महानगरे मर्यादित करण्याचा विचार का होत नाही?

२) राज्यकर्ते म्हणतात लोकांची मागणी, लोक म्हणतात पर्याय नाही, उद्योजक-व्यापारी- गुन्हेगार- म्हणतात चाललंय तेच योग्य आहे; लुटालूट करायला बरं आहे.

३) विचारवंत अज्ञानी, मूर्ख, स्वार्थी किंवा लाचार आहेत.

माझ्या सूचना-

१) महानगरे मर्यादित असावीत. किमान १ लाख आणि कमाल १० लाख लोकसंख्या असावी.

२) समाजाने rat race चा मुर्खपणा सोडावा.

३) व्यापारी, उद्योजक यांनी थोडी तरी लाजलज्जा बाळगून समाज, नीतीमत्ता, पर्यावरण, माणुसकी यांचा विचार करून आपापल्या कामधंद्याचा विचार करावा.

४) राजकारण्यांनी अहंकार जरा कमी करावा.

५) विचारवंतांनी भाटगिरी सोडून विचारवंत व्हावे.

६) प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न व्हावा.

७) आपणच प्रश्न निर्माण करणे, ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ या भावनेचा त्याग करणे, तीच ती घाण चिवडत राहण्याची सवय सोडून; मन, बुद्धी, भावना, विचार, संकल्पना या सगळ्यांनी अधिक सशक्त आणि सार्थक होण्याचा प्रयत्न करणे.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१६

कर्कश्श गाणी

छात्या पुढे काढत आपल्या पौरुषाचं नेहमी प्रदर्शन करत फिरणारे पोलीस कर्णकर्कश्श गाणी वाजतात तेव्हा शेपूट घालून काय करत असतात? की त्यांना काहीही ऐकू येत नाही. सगळं पोलीस दल बहीरं आहे का? प्रत्येक वेळी तक्रारी अन बिक्रारीची काय गरज. फिरत्या गाड्या काय झक मारतात? रात्री अमुक वाजेपर्यंत गाणी वाजवायला परवानगी याचा अर्थ लोकांचे कान आणि डोके फोडायला परवानगी असा होतो का? लोकांनी तेवढा वेळ काय करायचे? केवळ मुकाटपणे अत्याचार सहन करायचा?

सरकार, आमदार, मंत्री वा कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते करणार नाहीतच काही; तरीही विनंती करतो की, जनतेच्या भल्याचं काही करायचं असेल तर हे तमाशे कायमस्वरूपी थांबवा. तुम्ही करणार नाही कारण जनता गेली तेल लावत तुम्हाला फक्त एकेक मत मोलाचं असतं. तुम्ही फक्त चुलीत घालायच्या लायकीचे आहात असं किमान अशा वेळी वाटतं.

सोशल मिडीयावर अतिशय सक्रीय असलेला जनता जनार्दनदेखील याविरुद्ध बुलंद आवाज उठवणे, जनमत तयार करणे, सामाजिक दबाव वाढवणे, याऐवजी सेल्फ्या टाकण्यात धन्यता मानतो. आग लागो आपल्या सगळ्यांना.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१६

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

अंदमान

त्र्यं. र. देवगिरीकर यांनी लिहिलेले सरदार पटेलांचे चरित्र वाचतो आहे. त्यात १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसची माहिती आहे. त्यात असा उल्लेख आहे की - राजबंदी मुक्त करणे हे काँग्रेसने प्रांतिक निवडणुकीत दिलेले आश्वासन होते. हिंसेच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगणारे बरेच जण अंदमानात होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी गांधीजी, वल्लभभाई वगैरेंनी प्रयत्न केले.

बाकी थोडी या प्रकरणाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची त्रोटक चर्चा आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संदर्भात. सहजच सावरकरांच्या सुटकेची, माफीनाम्याची आठवण झाली. दोहोंचा संबंध नाही पण हा विषय आज ज्या पद्धतीने हाताळला जातो तो तसा नाही हे म्हणता येऊ शकते. कारण अंदमानातील कैद्यांची सुटका हा विषय काँग्रेसनेही हाती घेतला होता. यावर अधिक माहिती आणि विश्लेषण व्हायला हवे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकायला हवा.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०१९

मर्यादांची जाणिव

सध्या सगळंच काही वाईट होत आहे असं नाही. सध्याच्या घडामोडींमुळे राजकारण, लोकशाही, निवडणुका यांच्या मर्यादा; सामाजिक/ व्यक्तिगत जीवन आणि राजकारण; हे ठळकपणे अधोरेखित होतं आहे. एक प्रकारे माणसाच्या psycho-social उत्क्रांतीला/ घडणीला बळ आणि वळण मिळतं आहे. समाज आणि व्यक्तीच्या over politicising ला कमी करण्यात याची मदत होऊ शकेल. अर्थात असं होईल का आणि आम्हाला ते हवं आहे का; हे प्रश्नच आहेत.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०१९

कर्म आणि त्याचे फळ

कर्माची प्रेरणा आणि परिणाम दोन्ही ईश्वरी असतात. चांगल्याचा परिणाम चांगला, वाईटाचा वाईट वगैरे काही नसतं. किंवा ते तसं सिद्ध करता येत नाही. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि बांगला देशाची निर्मिती या चांगल्या गोष्टी करूनही इंदिराजींची हत्या झाली. आपल्याकडून होणाऱ्या कर्माची स्फूर्ती, प्रेरणा, इच्छा या अज्ञात शक्तीकडून येतात. अन त्या कृतीचे परिणाम कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित, कधी अनाकलनीय असतात. थोडेफार ठोकताळे आपण सांगतो, पण सूक्ष्मता, अचूकता, पूर्णता आपल्या हाताबाहेरचे असते. योग्य वाटते ते करणे आणि सोडून देणे. 'करम की गती न्यारी'.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०२०

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

अणुबॉम्ब आणि भय

आधुनिक सभ्यतेने इतका अविश्वास निर्माण केला आहे की, एका अणुबॉम्बने प्रचंड मोठी हानी करू शकतो हे माहीत असूनही विविध देश डझनावारीच नव्हे, तर शेकडो अणुबॉम्ब बाळगतात. एका अंदाजानुसार रशियाकडे ८०० अन अमेरिकेकडे ६५० अणुबॉम्ब आहेत. आपले अणुबॉम्ब फुटतील की नाही अशी तर या देशांना शंका नाही. प्रचंड भय आणि त्यातून जन्माला येणारा अक्राळविक्राळ अविश्वास म्हणजेच आधुनिकता. विज्ञान, वैज्ञानिकता, वास्तवता यासारख्या गोष्टी भय, संभ्रम आणि अविश्वास जन्माला घालत असतील तर त्यापेक्षा अवैज्ञानिक आणि अंधश्रध्द असणे फार चांगले.

- श्रीपाद कोठे

३ नोव्हेंबर २०१६

जयजयकार

झी टॉकीजवर तृतीयपंथीयांवरचा 'जयजयकार' सुरू आहे. बाकी तर ठीक आहे पण दिलीप प्रभावळकर यांचं ज्येष्ठ नागरिकाचं पात्र छान आहे. एका अंगठीवरून त्याचा तृतीयपंथीय टोळीशी संबंध येतो. ही अंगठी त्याच्यासाठी एवढी महत्वाची का? कारण ती देवाघरी गेलेल्या बायकोच्या हेअर पिनची बनवलेली असते. अन त्यात खडा म्हणून गेलेल्या मुलाचा दुधाचा दात बसवला असतो.

सहज अरुणा ढेरेंची कविता आठवली - 'पुरुष असाही असतो'

- श्रीपाद कोठे

३ नोव्हेंबर २०१९

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

सफाई

दिवाळी येते आहे. साफसफाई करवून घेणे, घरदार चक्क करणे होईलच. पण स्वत: हातात झाडणी, फडा, खराटा, फडकं घेऊन थोडी तरी सफाई करता येईल का? काही नाही तर किमान दारे खिडक्या पुसून घेणे, नाही तर जाळे जळमट काढणे, पंखा पुसणे, डब्बे पुसणे, पडदे काढणे आणि लावणे; असं काही ना काही. अगदी थोडं तरी करता येईल का? स्त्री वा पुरुष वा मुलं, हुद्दा, व्यवसाय, स्थान, पैसा सगळं बाजूला ठेवून; स्वहस्ते काही ना काही सफाई. मन सुदृढ, कसदार आणि रेखीव व्हायला मदत होऊ शकेल. कणभर आध्यात्मिक उन्नतीही. पाहा. विचार करा.

- श्रीपाद कोठे

२ नोव्हेंबर २०१८

मंदिरात नमाज, मशिदीत आरती

मंदिरातील नमाजला विरोध असणाऱ्या काही लोकांनी 'मंदिरात नमाज आणि मशिदीत आरती' अशी भूमिका घेतलेली दिसली. त्यावर माझे मत -

असहमत. कारण हिंदूंच्या मंदिरात नमाज पठण हे हिंदूंच्या ethos ला बाधा पोहोचवत नाही. मशिदीत आरती इत्यादी त्यांच्या ethos ला धरून नाही त्यामुळे ते योग्य नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा, ती श्रद्धा घातक होत नाही तोवर आदर आणि सन्मानच करायला हवा. मशिदीत आरती करणे हे हिंदू विचाराला न शोभणारे. स्वामीजींना जेव्हा विचारले होते - 'आम्ही हिंदू व्हावे असे तुम्हाला वाटते काय?' त्यावर त्यांचे उत्तर होते - 'नाही. तुम्ही चांगले मुस्लिम, चांगले ख्रिश्चन व्हावे.' अर्थात स्वामीजींना नाकारण्याचे स्वातंत्र्यही हिंदू म्हणून आपल्याला आहेच. देव, धर्म, आध्यात्म हे राजकारणाच्या कलाने चालावेत हा मुस्लिम व ख्रिश्चन विचार आहे. तो हिंदू विचार नाही. तसे होऊ नये हे माझे स्पष्ट मत आहे.

- श्रीपाद कोठे

२ नोव्हेंबर २०२०

(मथुरेच्या नंद बाबा मंदिरात नमाज अदा केली म्हणून कोणी तरी तक्रार केली आणि प्रथम सूचना अहवाल दाखल करण्यात आला आहे. या आशयाची बातमी आत्ता पाहिली. विचित्र वाटलं. हिंदू बंधूंनो, मंदिरात नमाज अदा केल्याने आपला देव आणि धर्म बाटत नाही. उलट तसे करणाऱ्यांचा देव आणि धर्म बुडतो असे म्हणतात. हिंदूंचं काहीच नुकसान होत नाही. हां, काही नुकसान, तोडफोड, अवमानकारक उक्ती वा कृती, विषपेरणी; या गोष्टी नसल्या म्हणजे झाले. तेवढं लक्ष असावं. नमाजला हरकत असू नये.)

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

एक दिवा, एक मिनिट

दिवाळी सुरु झाली. येथून पुढे पाच दिवस सगळीकडे आनंद, उत्साह राहील; अन दिवेही राहतील. संध्याकाळी दिवे लावताना एक दिवा अधिकच लावू या आणि प्रार्थना करू या मिनिटभर सीमेवरील जवानांसाठी, शेतात राबणार्या शेतकर्यासाठी, आपल्याकडे काम करणार्या गडी माणसांसाठी, आपल्याशी संबंधित श्रीमंत- गरीब- स्त्री- पुरुष- वृद्ध- समवयस्क- बालके- मित्र- शत्रू- आपल्याला हसवणारे- आपल्याला रडवणारे- आपल्याशी सहमत- आपल्याशी असहमत- सगळ्यांसाठी, आपल्याला अज्ञात असणार्या सगळ्यांसाठीही, सगळ्या देशांसाठी, सगळ्या समाजांसाठी, पशु- पक्षी- वनस्पती- संपूर्ण सृष्टीसाठी, पंचमहाभूतांसाठी, आम्हाला अज्ञात सृष्टीसाठी, आमच्या पूर्वी पृथ्वीवर राहून गेलेल्यांसाठी, आमच्यासोबत राहणार्यांसाठी, आमच्यानंतर राहतील त्यांच्यासाठीही; अगदी सगळ्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या सगळ्यासाठी. आपल्या कोणत्याही कृतीला शारीरिक, आर्थिक, भौगोलिक मर्यादा असतात. मनाला मात्र मर्यादा नसते. दिवाळीनिमित्त त्याला खर्या अर्थाने सर्वव्यापी करू या. ईशवादी असलो तरीही करू या, इहवादी असलो तरीही करू या. दिवाळीचे पाच दिवस एक दिवा आणि एक मिनिट आपल्यातील माणसासाठी आणि आपल्यातील ईश्वरासाठी देऊ या.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१३

सरदार

संघावर बंदी घातली तरीही सरदार पटेल यांच्याबद्दल श्रद्धा आणि आदर ठेवणारे संघ- भाजप समजदार, विचारी, द्वेष न करणार्या भारतीय संस्कृतीचे पाईक; की सरदार आमचेच म्हणणारे वा सरदार आणि भाजपा- संघाचा काय संबंध असा प्रश्न विचारणारे महाभाग समजदार, विचारी, द्वेष न करणार्या भारतीय संस्कृतीचे पाईक? मतभेद असतील ते स्वच्छपणे मांडणे आणि तरीही गुण आणि कर्तृत्व याविषयी आदर, श्रद्धा, कौतुक आणि नम्रता बाळगणे; हा उमदेपणा की; ढोंगीपणाने आणि छाद्मिपणाने वागणे म्हणजे उमदेपणा?

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१३

भ्रम उत्पन्न करणारे काही शब्दप्रयोग

१) विरोधी पक्ष- नावातच विरोधी असल्याने विरोध करणे अपरिहार्य. मग समाजाच्या, देशाच्या विषयांचीही विभागणी तुमचे- आमचे अशी होते. त्याऐवजी सत्ताधारी आणि अन्य असा शब्दप्रयोग का नको?

२) युती सरकार/ आघाडी सरकार- दोन्ही शब्दात सौदा अध्याहृत आहे. त्यापेक्षा संयुक्त सरकार का नको?

३) दलितांवर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दलित असू शकतात, पण अत्याचार दलित म्हणून झाला असतो का? प्रत्येक वेळी तसेच असेल असे नाही.

४) महिलांवर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती महिला असू शकेल, पण महिला आहे म्हणून अत्याचार झाला हे प्रत्येक वेळी असेलच असे नाही.

५) अमुक भाषिकावर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती अमुक भाषेची असू शकते, पण अत्याचार ती व्यक्ती त्या भाषेची आहे म्हणूनच झालेला असेल असे नाही.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१४

आशावाद

'वेदांत दर्शनास आत्यंतिक निराशावादाने प्रारंभ होतो व त्याची परिसमाप्ती खऱ्या आशावादात होते. आम्ही इंद्रियांवर आधारलेला आशावाद नाकारतो हे खरे. तथापि इंद्रियातीत अनुभवांवर आधारलेला खराखुरा आशावाद आम्ही प्रतिपादतो. आज जगात आढळणारा आशावाद आपल्याला इंद्रियांच्या योगे विनाशाप्रत खेचून नेईल.'

- स्वामी विवेकानंद

काही गोष्टींचा मुळातून विचार करायला हवा आहे. आशावाद ही पण त्यातली एक. त्यासाठी विवेकानंदांचे हे प्रतिपादन दिशादर्शक आहे. विवेकानंदांचे बहुसंख्य भक्त, अनुयायी किंवा त्यांना मानणारे सुद्धा; विवेकानंदांच्या विचारांच्या आधारे त्यांनी त्याज्य ठरवलेला आशावाद मांडण्याचा प्रयत्न करतात. असे पुष्कळ बाबतीत होते. त्यासाठी थोडे सूक्ष्म अध्ययन वाढीला लागायला हवे. दिसायला छोट्या पण परिणाम मोठ्या करणाऱ्या या बाबी असतात.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१९

संघाचे आवाहन

रामजन्मभूमीचा निकाल सगळ्यांनी खुल्या मनाने स्वीकारून सौहार्द कायम राखण्याचे आवाहन रा. स्व. संघाने केले आहे. हिंदू समाजासह सगळ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे; आपली भाषा, भाव, अभिव्यक्ती, आनंद अथवा निराशा संयमितपणे प्रकट व्हावी ही अपेक्षा त्यातून व्यक्त झाली आहे. संघासोबत अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी देखील अशी समंजस भूमिका समाजासमोर मांडून तसे आवाहन करायला हवे. त्याने एक सार्वत्रिक सौहार्दाचे वातावरण तयार होईल.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१९

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

सोयीस्कर

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग. मित्राच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेलो होतो. सगळे विधी वगैरे झाले. शेवटी जराजर्जर शरीराला भस्मीभूत करणाऱ्या त्या पावन अग्नीत एकेक गोवरी टाकत सगळे परतू लागले. निघताना मृताला तिलांजली द्यायची आणि नळावर हातपाय धुवून बाहेर पडायचे अशी प्रथा आहे. काही जणांचे हातपाय धुवून झाले आणि नळाचे पाणी गेले. आता काय याची चर्चा सुरु झाली. तिथे एक हापशी होती तिकडे काही जणांनी मोर्चा वळवला. स्वाभाविक वेळ लागू लागला, जरा गर्दी झाली. त्यावेळी आमच्या कार्यालयातील एक इलेक्ट्रोनिक इंजिनिअर म्हणाला- `राहू द्या, नाही धुतले हातपाय तर नाही. घरी जाऊन आंघोळ करतोच आपण.' त्याचे म्हणणे खरेच होते. युक्तिवाद पण योग्य होता. पण तो तिथेच थांबला नाही. आपल्या म्हणण्याचा तर्क देत तो म्हणाला- `सब कुछ भगवान ही तो है. हम लोग भी फिजूल बातो मे उलझते है.' लगेच मनात घुसळण झाली. आपण कोणत्याही तत्वाचा किती सोयीस्कर अर्थ लावतो ते जाणवलं. मनातून सहज एक प्रश्न ओठांवर आला. त्याला म्हटले- `मित्रा, सगळे भगवान आहे हे ठीक. पण गेल्या महिन्यात तुम्हा इलेक्ट्रोनिक इंजिनिअरच्या पदोन्नतीचा प्रश्न आला होता तेव्हा तुला हे का नाही रे आठवले? तेव्हा का भांडलास ती पदोन्नती तुलाच मिळावी म्हणून.' स्वाभाविकच त्याने फक्त डोळे वटारून पाहिले आणि तो निघून गेला.

- श्रीपाद कोठे

३० ऑक्टोबर २०१५

जागल्या

कोणत्या तरी एका सोड्याची (दारूची जाहिरात करता येत नाही म्हणून सोड्याच्या नावाखाली) जाहिरात असते- कोणीतरी मुलीचा विनयभंग करण्याच्या तयारीत असतो. अन दुसरा कोणी मोठ्याने ओरडतो. तो ओरडल्याने सारेच सावध होतात आणि छेड काढणाऱ्याला मान खाली घालून निघून जावे लागते.

मी तो ओरडणारा आहे. विनाकारण हिंदूंचा मानभंग करणारे, हिंदूंना कमी लेखणारे, कमी दाखवणारे, उदारतेच्या नावाने हीनत्व जपणारे अन पसरवणारे, विविध कारणांनी हिंदुत्वाचा विरोध करणारे, हिंदू- हिंदुत्व- इत्यादीवर स्वत:ची मते लादून बौद्धिक दहशतवाद पसरवणारे, काहीही विचार करणे- समजून घेणे- या भानगडीत न पडता; हेकेखोरपणा करणारे... या सगळ्यांपासून सावध करण्यासाठी ओरडणारा मी जागल्या आहे.

खूप दूर जाण्याची गरज नाही. माझ्याच डझनावारी तर्कांना, माहितीला, आक्षेपांना बगल देणारे, आत्यंतिक असहिष्णू लोक मी रोज अनुभवतो. हे वाचाळ तोंडात मिठाची गुळणी धरून कसे बसतात याचा मला भरपूर अनुभव आहे. फक्त फेसबुकबद्दल बोलायचे तरीही अनेक उदाहरणे देता येतील. बाकी वेगळेच. अशा ढोंगी, बेजबाबदार लोकांपासून सावध करण्यासाठी मी ओरडत राहणार आहे. माझ्याशी सहमत असणाऱ्यांनाही माझे जागल्या होण्याचे आवाहन आहे.

- श्रीपाद कोठे

३० ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

बोलणे

एक कुरियरचा `डिलिव्हरी बॉय' पार्सल देण्यासाठी एका घरी गेला. घरी फक्त आजोबा होते. त्यांना कमी ऐकू येते. तो मुलगा त्यांच्याशी अशा काही गुर्मीत आणि थाटात बोलला की बस. मला लक्षात आले आणि मी त्याला टोकले. मी त्याला म्हणालो- नीट बोलावे. त्यावर त्याने दिलगिरी व्यक्त करणे दूरच, हुज्जत घालणे सुरु केले. वरून त्याचे पालुपद- मला काय माहीत त्यांना ऐकू येत नाही ते. मी म्हटले- अरे माहिती असण्याचं काय कारण. ते म्हातारे आहेत दिसत नाही का? आणि म्हातारे असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री; नीटच बोलले पाहिजे ना? अनेकदा तर आपणही असेच करतो- मला माहीत नव्हते. मी काय मुद्दाम केले का? वगैरे. परमेश्वराने सगळ्या गोष्टी सांगून तर जन्माला घातलेले नाही ना? परिस्थिती पाहून ती समजून घेण्याची वृत्ती; शिकण्याची, विकसित करण्याची आपली किती तयारी असते?

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर २०१४

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

अनुकरणीय

आमच्या जवळ एक सुपर मार्केट आहे. तिथे कधीही जा. श्रुतीमधुर भजने, गाणी, अभंग सुरूच असतात. स्पष्ट ऐकू येतील पण दोघांच्या बोलण्यात किंचितही अडथळा येणार नाही एवढ्या आवाजात. वाटलं तर दुर्लक्ष करा, वाटलं तर ऐका. त्यामुळे वातावरण पण छान असतं. आज मात्र बासरी वाजत होती. आत पाय ठेवताच हंसध्वनीचे स्वर कानावर पडले. गुणगुणतच सामान घेतलं. काउंटरवर बिल तयार झालं. त्या मुलीला विचारलं - काय वाजतं आहे? ओशाळून म्हणाली - नाही. तिला म्हटलं - तुझी परीक्षा नाही घेत. सहज विचारलं. याला म्हणतात राग हंसध्वनी. पेमेंट केलं अन पलीकडे बसलेल्या मॅनेजरकडे गेलो. त्यांना म्हटलं - तुम्हाला धन्यवाद. इतकी छान बासरी लावल्याबद्दल. त्यांनाही आनंद झाला. त्यांच्या दुकानाच्या या वेगळेपणाची दखल घेतल्याचा. म्हणाले - हो. छान आहे. श्रीकृष्ण वाजवत ती बासरी आहे. मनात म्हटलं - यांना आवड आहे. रसिक आहेत पण माहिती नाही. असो. त्यात काय? प्रत्येकाला शास्त्र माहिती असायलाच हवं असं कुठे आहे. त्यांनाही सांगून टाकलं. शास्त्रीय संगीतातील हा राग हंसध्वनी आहे. वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने कॉलर सरळ केली. सगळीकडेच, किमान जिथे जिथे शक्य असेल तिथे; असं सुमधुर काही वाजवायला, अनुकरण करायला काय हरकत आहे. एक ट्रेंडच सुरू व्हावा. सततच्या संस्काराने काही काळाने एक रसिक, लयबद्ध, तालबद्ध समाजही यातून तयार होऊन जाईल.

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०२१

दुर्गा पुजेवर बंदी

पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील नलवाडी गावात दुर्गापूजा करण्यावर गेल्या चार वर्षांपासून बंदी आहे. गावकरी वारंवार पोलिसांकडे परवानगी मागतात आणि पोलीस मात्र परवानगी देत नाहीत. आणि परवानगी न देण्याच्या अधिकृत पत्रात `सरकारी अनुमती नाही' असे नमूद करतात. पश्चिम बंगालच्या तत्कालीन कम्युनिस्ट शासनाने १२ वर्षांपूर्वी एक आदेश काढून नवीन दुर्गापूजा मंडळांवर बंदी घातली होती. त्या आदेशाचा हवाला यासाठी दिला जातो. मुख्यमंत्री ममता बानर्जी, बंगालचे कम्युनिस्ट, देशभरातील कॉंग्रेस आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्ष यावर काहीही बोलत नाहीत. १२ वर्षे ना दिवट्या प्रसार माध्यमांना याकडे लक्ष द्यावेसे वाटले ना अन्य कोणाला.

ही धर्मनिरपेक्षता? हे घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? ही घटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही? कोण कोण राजीनामे देणार या कारणासाठी? कपोलकल्पित भयापोटी राजीनाम्यांचा आचरटपणा करणारे किमान निषेधाचा एखादा शब्द तरी तोंडातून काढतील का?

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०१५

परस्परानुकुल

परस्परावलंबीत्व याऐवजी परस्परानुकूल या शब्दाचा उपयोग व्हावा, वाढावा असं वाटतं. परस्परावलंबीत्व या शब्दाने अवलंबून राहणे, अवलंबून असणे, अवलंबून ठेवणे, आपल्या भल्या वा वाईटासाठी अन्य कोणी/ अन्य काही जबाबदार असण्याची भावना, अवलंबित्व वाढवण्याची प्रवृत्ती, अडवणूक वा गैरफायदा, पारतंत्र्य; अशा सगळ्या बाबी कळत वा नकळत येतात. याउलट परस्परानुकूल या शब्दाने जबाबदारी, साद- प्रतिसादाची भावना, त्रुटींवर मात करण्याचा विचार, अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न, अडवणूक वा गैरफायदा याऐवजी पूरकतेचा विकास, व्यक्तीप्रतिष्ठा, समजुतदारी, जाणिवांचा विस्तार; याकडे लक्ष पुरवले जाते.

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०१९

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

प्रेरणा आणि नियंत्रण

वादाचे शमन प्रतिवादाने होत नाही. त्याने केवळ शक्तीचा, बुद्धीचा ऱ्हास होतो. वादाचे शमन विचाराने होते.

कट्टरतेचे शमन प्रति कट्टरतेने होत नाही. त्याने केवळ त्रास आणि वेदना वाढते. कट्टरतेचे शमन विवेकाने होते.

विचारांची आणि विवेकाची वाढ सांस्कृतिक उन्नतीने होते. त्यासाठी आतल्या माणसाला साद घालावी लागते. त्यालाच प्रेरणा जागवणे म्हणता येईल.

आधुनिक समाजव्यवस्था जीवनाच्या प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न करत नाही. जीवनाचा व्यवहार नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे समस्या चक्रवाढ गतीने वाढतात.

- श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२१

वंश

वंश, वंशवाद, वांशिकता, वंशवर्चस्व, वंशशुद्धी, वंशसातत्य, वंशप्राचीनता; अशा विषयांची बरीच चर्चा वेळोवेळी होत असते. यात दोन प्रकार आहेत. एकात वंश शब्द 'घराणं' या अर्थाने वापरला जातो. दुसऱ्यात वंश शब्द 'मनुष्य समूह' या अर्थाने वापरला जातो. जसे आर्य, द्रविड, मंगोल इत्यादी. इंग्रजीत ज्याला race म्हणतात त्या अर्थाने. दोन्ही प्रकारच्या चर्चा एका मर्यादेतच relevant असतात. त्यात खूप तथ्य असतं असं नाही. तो वेगळा विषय पण एक प्रश्न मनात येतो. हे सगळे वंश कुठून आले असतील. सगळ्याच्या सगळ्या वंशाच्या आद्य जोड्या वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून तर पडल्या नसणारच. किंवा जमिनीतून उगवल्या नसणार. म्हणजेच काही ना काही सरमिसळ प्रक्रिया घडली असणारच. याचाच अर्थ वंशाचे मूळ गवसणे अशक्य. मग जिथे मूळच हाती नाही तिथे या चर्चांना काय अर्थ राहतो? ते सुद्धा मानवजात आद्य जोडीतून विकसित झाल्याचं गृहितक स्वीकारलं तरंच. मानवाची उत्पत्ती आद्य जोडीविना झाली असेल आणि जोडी ही नंतरच्या प्रक्रियेत विकसित झाली नसेल, हे तरी कशावरून?

- श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२१

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

औषध खरेदी

औषधांच्या दुकानात गेलो होतो. शेजारी एक बाई येऊन उभ्या राहिल्या. बहुधा आधी येऊन गेल्या होत्या. दुकानदाराशी त्यांचा संवाद झाला -

- ते केवढ्याचं आहे?

- अमुक एवढ्याचं.

- मग ते राहू द्या. हे द्या.

*********************

हे भगवती हे बदलू दे. त्यासाठी शक्ती, बुद्धी, युक्ती, कौशल्य, आशीर्वाद दे... अन ते कायम असू दे...

***********************

दीपावलीचे शुभचिंतन.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१९

राष्ट्रगीताचा सन्मान

राष्ट्रगीताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रगीत म्हटले जात असताना वा वाजवले जात असताना, त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची भावना आणि वृत्ती वाढायला हवी हे खरेच आहे. आज ती नाही हेही योग्य नाही. मात्र ते कायद्याने बंधनकारक असावे का? यावर एकांगी आग्रह योग्य नाही. ते कायद्याने बंधनकारक करण्यापेक्षा, जे राष्ट्रगीताचा सन्मान करायला उभे राहत नाहीत, ते चुकीचे वागतात, बेजबाबदार आहेत, संवेदनशील नाहीत; असे सामाजिक वातावरण अधिकाधिक तयार व्हावे. अशा लोकांना कानकोंडे होईल असं वातावरण तयार करावं. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे- आज जसे देवदेवता, संत, धार्मिक प्रतिके यांच्या प्रतिमांचा बाजार झाला आहे आणि त्यांचे महत्व, गांभीर्य कमी झाले आहे; तसे राष्ट्रीय प्रतिकांचे व्हावे का? या प्रश्नाचाही विचार व्हावा. राष्ट्रीय प्रतिकांची sanctity राखावी हे जसे खरे तसेच, त्यासाठी त्यांचा वापर मर्यादित आणि मर्यादेत व्हावा हेही खरेच नाही का? राष्ट्रगीतासाठी उभे करून राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्याऐवजी, राष्ट्रभक्तीपोटी राष्ट्रगीताचा सन्मान राखला जावा.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१७

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

काव्यहोत्र

सध्या बिंदीशिवाय (😃) आणखीन एक विषय चर्चेत आहे. 'काव्यहोत्र' हा शब्द. निमित्त आहे विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या दीर्घ कवितांवरील कार्यक्रमाचे. त्या कार्यक्रमाला शीर्षक दिले आहे - 'काव्यहोत्र'. हे अग्निहोत्र सारखे आहे. त्यामुळे वैदिक (???) संस्कृतीला मनापासून विरोध असणाऱ्यांचा त्याला आक्षेप आहे. या काव्यहोत्रात कवितांच्या समिधा जाळायच्या का अशी चर्चाही आहे. त्यानिमित्ताने माझं मत.....

मला वाटतं, अग्निहोत्र म्हणजे अग्नीचं व्रत. नियमित, न चुकता अग्नीची उपासना, अग्नी विझू न देणे असा त्याचा आशय. अग्नीहोत्रात अग्नीची आहुती नसते. समीधांची असते. त्यामुळे काव्यहोत्रात काव्याची आहुती असा अर्थ शक्य नाही. अनुभव, अध्ययन, साधना यांची आहुती देऊन काव्याची उपासना करून कवितेला प्रसन्न करून घेणे, कवितेची ज्योत विझू न देणे; असा अर्थ लावता येईल. ज्यांनी हा शब्द वापरला त्यांना अभिप्रेत काय हे माहिती नाही.

- श्रीपाद कोठे

२३ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

आरोग्य

शरीराच्या आरोग्यासाठी हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; असं सगळं सुस्थितीत असावं लागतं. त्यांच्यावरच सगळं अवलंबून. पण ही सगळी मंडळी कोणाला दिसत नाही. त्यांचा साजशृंगार नसतो. त्यांची छायाचित्रे कोणी लावत नाही. मुख्य म्हणजे आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादी या महत्त्वाच्या मंडळींकडे दुर्लक्षच करतात. मग झटका बसला की धावपळ होते. सगळं ठीकठाक करायची. कधी ठीकठाक होतं, तर कधी ठीकठाक होत नाही. ठीकठाक झालं तरी आधीसारखं नाही होत. वयोपरत्वे होणारा बिघाड ok. पण आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादीमुळे होणाऱ्या बिघाडासाठी आपणच जबाबदार असतो.

समाजशरीराचं आरोग्यही हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; इत्यादींवर अवलंबून असतं. आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला त्याचीही माहिती नसते. असं काही असतं हेच ठाऊक नसतं. मग त्याची निगा, काळजी काय घेणार? आपल्याच आरोग्यासाठी आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी नीट राखणारे थोडेच असतात. समाजाच्या आरोग्याचं काय घेऊन बसता?

- श्रीपाद कोठे

२२ ऑक्टोबर २०२१

एक काल्पनिक संवाद...

- काय रे मतदान केलं की नाही?

- नाही बुवा.

- का रे?

- आवडत नाही अन पटतही नाही.

- मग तुला राहूच द्यायला नको या देशात.

- काहीच हरकत नाही. पण म्हणजे काय कराल?

- तुला काढून देऊ देशातून.

- म्हणजे काय करणार?

- नोटीस देऊ देश सोडण्याची. नाहीच गेलास तर... तर...

- सीमेवर सोडणार? दुसऱ्या देशात सोडणार?

- तर कारागृहात टाकू.

- म्हणजे राहण्या जेवण्याची तब्येतीची सोय करणार. फुकटात. तुमच्या पैशांनी.

- हो तसं म्हण हवं तर.

- बरं ही शिक्षा देईन म्हणतोस पण एक सांगशील का? कोणत्या अधिकाराने देणार ही शिक्षा? म्हणजे कोणी दिलाय हा अधिकार तुम्हाला?

- दिलेला नाही, घेतलाय आम्ही आमचा. मिळवलाय मिळवलाय.

- ओके. कुठून? कसा?

- संघर्ष करून, शक्ती प्राप्त करून. एकीने.

- बरं. पण अधिकार कसला मिळवलाय?

- या देशावर राज्य करण्याचा.

- हा देश कोणाकडून घेतलाय? त्याच्या नोंदणीचे कागद दाखवतोस? मूळ मालकाचं नाव, त्याच्या अटी, शर्ती, सही दाखवतोस जरा...

- श्रीपाद कोठे

२२ ऑक्टोबर २०२२

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शेवट ली माळ

आज शेवटली माळ. जगभरातील कोट्यवधी अनामिकांसाठी. उर्जस्वल ध्येयासाठी, जगाला प्रकाश देण्यासाठी, आपली चूलबोळकी अडगळीत टाकून जगाचा संसार चालवण्यासाठी जगणाऱ्यांना साथ देणाऱ्या शक्तीस्वरुपांसाठी. समाजकारण किंवा राजकारण, धर्म किंवा विज्ञान, शिक्षण किंवा सेवा, शेती किंवा वैद्यक, कला किंवा साहित्य... सगळ्या क्षेत्रात, सगळ्या जगभरात वावरणाऱ्या वेड्यांना- कधी पत्नी म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी आई म्हणून, कधी प्रेयसी म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, कधी कुठलंही नाव न देता येणाऱ्या अनाम भावबंधातून; परंतु ज्यांना साथ देतात त्या वेड्यांच्या उर्जस्वल विचारांवरील, प्रेरणांवरील आस्थेतून; हे वेडे जे करतायत ते आपल्याला जमत नसेल, समजत नसेल, पण ते चांगलं आहे, खूप महत्वाचं आहे या जाणीवेतून प्रसूत झालेल्या समर्पणाच्या भावनेतून साथ देणाऱ्या या अनामिका... हां, नावेच घ्यायची तर लक्ष्मणाची उर्मिला, तुकोबांची जिजाई, सावरकरांच्या यमुनाबाई आणि वहिनी, डॉ. हेडगेवारांच्या वहिनी, गुरुजी गोळवलकर यांच्या मातोश्री, बाळासाहेब देवरस यांच्या आई, पुलंच्या सुनीताबाई, र. धों. कर्वेंच्या पत्नी, साधनाताई आमटे... नावे घेता येतील अशा असंख्य आणि ज्यांची माहितीही नाही अशा अगणित अनामिकांसाठी- आजची माळ.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१५

अरे अर्णवा,

अरे अर्णवा, ऋग्वेद वगैरे quote करताना थोडा विचार करून बोलत जा रे. हिंदूंनी मानवासमोर ठेवलेला आदर्श कायदा वा अन्य प्रकारे लादण्यासाठी नाही, लादणे हे हिंदू धर्माच्या घोरविरोधी आहे. तो आदर्श या पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, विकासावस्थेनुसार गाठण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. बंधनकारक नाही. त्यासाठीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हिंदू तत्व भारतबाह्य रीतीने समजून घेता येत नाहीत.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१८

गांधीजी आणि चित्रपट क्षेत्र

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त काल पंतप्रधानांनी चित्रपट सृष्टीतील कलावंतांशी संवाद साधला. चांगली गोष्ट आहे. तसेही वाईट काही पाहू नये, बोलू नये, ऐकू नये. गांधीजींचीच तीन माकडे सांगतात ना ! अन गांधी बाजूला ठेवले तरी आपल्याला साधू (खरे तर संधीसाधू) व्हायचे असते ना? त्यामुळे पंतप्रधान कलावंतांना भेटले आणि गांधी विषयाची चर्चा झाली, हे चांगलेच झाले. या कलावंतांनी त्यांच्या मनोरंजन माध्यमातून गांधी जीवन, विचार यांना प्रसारित करण्याचे आश्वासन देखील दिले. हेही चांगलेच झाले. गांधीजी हे साधेपणा, अपरिग्रह, शारीरिक कष्ट, स्वभाषा, दारूबंदी यासारख्या विषयांचे प्रचंड आग्रही होते. स्वतःच्या जीवनात हे सारे आणण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांचे जीवन. अन त्यांचे जीवन हाच त्यांचा विचार. तर, या कलाकारांनी चित्रपटातून हे पोहोचवण्याचे आश्वासन दिलेले आहे. स्वतःच्या जीवनात गांधी उतरवण्याचे नाही. त्यांना तसे आश्वासन मागितलेही नाही कोणी आणि त्यांनी कोणाला तसे आश्वासन दिलेही नाही. कृपया याची नोंद आपण घेतलेली बरी. नाही म्हणायला, देशभर शिक्षण किंवा आरोग्य किंवा स्वच्छता किंवा अशाच एखाद्या क्षेत्रातील समाजाची संपूर्ण गरज; कोणाचीही कसलीही मदत न घेता/ न मागता; सरकारी जमिनी इत्यादींचीही मागणी न करता; समाजाच्या भल्यासाठी कार्यक्रम आयोजित करून समाजाच्याच खिशाला हात न लावता; पूर्ण करण्याची क्षमता चित्रपट कलावंतांची आहे. पण ते चित्रपट माध्यमाच्या धर्मात बसत नाही ना ! तेव्हा संपर्क चांगला झालेला आहे दोन क्षेत्रातला. चर्चा वगैरेही उच्च दर्जाचीच झालेली आहे. चित्रपट पाहण्याची आणि भारावून जाण्याची तयारी करायला सामान्य जनतेला अवधी मिळालेला आहे. बाकी मतदानाचे कर्तव्य करून देश घडवण्याचे काम आज करायचे आहेच आपल्याला.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१९

भगवंत आणि सरकार

- जगाचं भलंबुरं भगवंत करतो.

- त्याला प्रसन्न करणं आवश्यक असतं.

- त्याची मंदिरं असतात.

- त्याची पूजेची, उपासनेची पद्धत असते.

- जो मंदिरात जाणार नाही, पूजा, उपासना करणार नाही, भजन कीर्तन उत्सवात सहभागी होणार नाही; त्याला भगवंताची मर्जी लाभणार नाही.

- अशांना भगवंत शिक्षा करतो.

- त्या शिक्षेमुळे अशांचे जीवन दु:खी होते.

*****************

- देशाचं/ समाजाचं भलंबुरं सरकार करते.

- त्याला प्रसन्न करणं आवश्यक असतं.

- त्याची मंदिरं असतात.

- त्याची पूजेची, उपासनेची पद्धत असते.

- जो मंदिरात जाणार नाही, पूजा उपासना करणार नाही, भजन कीर्तन उत्सवात सहभागी होणार नाही; त्याला सरकारची (लोक प्रतिनिधींची) मर्जी लाभणार नाही.

- अशांना सरकार शिक्षा करते.

- या शिक्षेमुळे अशांचे जीवन दु:खी होते.

***************

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१९

मां दुर्गेचा संहार

दुर्गा उत्सवानिमित्त दरवर्षीच दुर्गा, तिची शस्त्र, तिचा संहार; इत्यादींची चर्चा होते. यात एक नेहमी लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की, दुर्गेचा हा संहार अधर्माचा संहार असतो. बाकीच्या अन्याय वगैरे ज्या गोष्टी या संहाराशी जोडल्या जातात त्या योग्य वाटत नाहीत. कारण अन्याय इत्यादी सापेक्ष, subjective बाबी असतात. या सगळ्या बाबी धर्म, अधर्म या निकषांवर घासून मग संहार आदी निर्णय करायचा असतो. नाही तर मला अन्याय वाटतो म्हणून कर संहार, मला अत्याचार वाटतो म्हणून कर संहार, मला अयोग्य वाटतं म्हणून कर संहार. असं केलं तर वास्तविक तो अधर्म होईल. ज्याचा संहार हे दुर्गेचं कार्य आहे. अन धर्म, अधर्म हे; हिंदू, शीख, जैन, बुद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी किंवा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अमुक ग्रंथ, अमुक व्यक्ती, अमुक समूह किंवा अगदी सामाजिक नीतीनियम; यांच्याशी जोडलेली कल्पना नव्हे. धर्म याचा जो सर्वोच्च व्यापक भाव आणि अर्थ आहे त्या अर्थाने धर्म, अधर्म निर्णय करून दुर्गा शस्त्र वापरते, संहार करते. आपापल्या स्वार्थासाठी माँ दुर्गेला वापरू नये.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१८

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

पांगुळगडा

चालणं शिकण्यासाठी पांगुळगाडा हवाच. पण पांगुळगाडा दूर सारल्याशिवाय चालणं आणि धावणं शक्य होत नाही. दोन्ही योग्य. दोन्ही आवश्यक.

चालण्याचे हे नियम - विचार करणं, निर्णय घेणं, काम करणं, सामाजिक कार्य, एखाद्या विषयाचं अध्ययन, मनाचा आनंद, मनाचं रंजन, आध्यात्मिक साधना; या आणि यासारख्या जीवनातल्या बहुतेक गोष्टींना लागू होतात. पुस्तकं, मंदिरं, धर्मग्रंथ, विचारवंत, माणसं, साधनं, कृती; या सगळ्यांकडे याच पद्धतीने पाहावं लागतं. कर्ता, कर्म, क्रियापद टाकून देऊन सोलीव तत्वाचं आकलन करण्याचा प्रयत्न हवा. कोणतीही गोष्ट अनुभूत व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

१९ ऑक्टोबर २०२०

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

Consumption theme योग्य?

`अर्थ' या विषयावर बोलणाऱ्यांचा एक महत्वाचा विषय असतो- `consumption theme.' लोकांनी उपभोग घेतला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या हाती पैसा असला पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहून प्रगती होते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे एकूणच समाज उपभोग घेण्यात मुळीच मागे नाही. use and throw हे तर तिथल्या संस्कृतीचं वर्णनच करण्यात येतं. असं असूनही त्यांच्या अर्थव्यवस्थांच्या प्रगतीचा दर १-२ टक्केच राहतो. खूप प्रयत्न सुरु आहेत पण दर वाढत नाही. यावरून `consumption theme' मध्ये फारसा अर्थ नाही असं म्हणायला हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०१९

नेहरूंना प्रश्न करावा

पुन्हा एकदा सावरकर चर्चेत आले आहेत. गांधीहत्येत सहभागी असल्याने त्यांना भारतरत्न देऊ नये असाही एक आवाज आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, गांधी हत्येसाठी सावरकर वा संघ यांना दोषी ठरवणाऱ्यांचा पंडित नेहरूंवर तरी विश्वास आहे की नाही? बरं त्यांची सत्तागाठ पटेलांशी बांधली होती असं म्हटलं तरी १९५० नंतर ती सुटली आणि नंतर १४ वर्ष नेहरूंना कोणताही अडथळा नव्हता. तरीही गांधी हत्येच्या आरोपातून मुक्त झालेले सावरकर आणि संघ मोकळेच राहिले. ज्यांना सावरकर आणि संघ सलतात त्यांनी त्यासाठी पंडित नेहरूंना प्रश्न केले पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०१९

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

भ्रष्टाचार की असभ्यता

पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. अमेरिका भ्रष्टाचाराच्या बाजूने आहे की असभ्यता व अश्लीलतेच्या बाजूने हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र अमेरिकेपुढे हे दोनच पर्याय आहेत.

१. सर्वाधिक स्वातंत्र्य

२. नियमपालन करण्यात आघाडीवर

३. देशभक्त

४. संरक्षण, तंत्रज्ञान, पैसा यात आघाडीवर.

... तरीही पर्याय दोनच - भ्रष्टाचार की असभ्यता? आदर्श समाज, आदर्श देश, विकसित सुखी समृद्ध देश घडवताना आपण थोडा याचाही विचार करायला नको?

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०१६

Good hindu

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर झालेच पाहिजे. अन मी bad hindu नाही. मी good hindu च आहे. हे दिवटे कोण होतात मला bad ठरवणारे? अन ते म्हणतात म्हणून मी का स्वतःला bad म्हणवून घेऊ. स्वतःला urban naxal म्हणवून घेणारे खरंच तसे असतात. ते खरंच बोलत असतात. मी का खोटं बोलायचं bad hindu आहे असं. अन ते गाढव प्रथा निर्माण करतात ती तरी मी का follow करायची? I am a best hindu and I want shriram mandir at ayodhya earliest.

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०१८

शैली नव्हे आधार

'Hindutva is a way of life' असं म्हटलं जातं. ते खरं आहे पण अपूर्ण आहे आणि संकुचित/ मर्यादित आहे, असं आता वाटायला लागलं आहे. खरं तर 'Hindutva is a foundation of life' हे यथार्थ होईल. हिंदुत्व केवळ जीवनशैली नाही तर जीवनाधार आहे. पृथ्वीवरच्या समग्र जीवनाचा आधार. या आधारातून शैली विकसित होतात, बदलतात, गतार्थ होतात, सृजित होतात.


- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०२१

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

आज जागतिक अन्न दिवस

अन्न !!! माणसाचीच नव्हे प्रत्येक सजीवाची एकमेव मुलभूत गरज. एकवेळ वस्त्र, निवारा नसले तरी चालेल; पण अन्न हवेच. या विश्वात मानवाचा प्रवेश झाला तेव्हापासून आजवरचा त्याचा अन्नप्रवास अजूनही निबिड इतिहासगुहेतच लपलेला. या निसर्गात असलेल्या असंख्य गोष्टींपैकी खाण्याच्या वस्तू कोणत्या, त्या कशा खायच्या, त्यावर काय काय प्रक्रिया करायच्या, त्यांची combinations, त्यांचे आकार-प्रकार, त्यांची सजावट, त्यांचे उपयोग, स्वास्थ्याशी त्यांचा संबंध आणि प्रत्यक्षात हे सारे करून; आजवर या पृथ्वीवर येऊन गेलेल्या अन वर्तमानातील अब्जावधी जीवांची अन्नकाळजी वाहणारी ही अक्षय, अनाम शक्तीधारा. आज जागतिक अन्नदिवस आहे. अनाम राहून मानवावर अपरिमित उपकार करणाऱ्या या शक्तीप्रवाहाला वंदन करून -

- अन्न मुळीच वाया न घालवण्याचं,

- अन्नाचा अपमान न करण्याचं,

- अन्न आणि अन्नदाता यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्याचं,

- अन्नाचा गैरवापर न करण्याचं,

- प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळावं अशी भावना ठेवून त्यासाठी प्रार्थना करण्याचं, त्यासाठी आपल्या आवाक्यातील प्रयत्न करण्याचं,

... वचन स्वतःच स्वतःला देऊ या.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२१

बारबाला आणि रोजगार

सर्वोच्च न्यायालयाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करतानाच, त्याने काल दिलेल्या डान्सबार बाबतच्या निर्णयावर असहमती व्यक्त केल्याविना राहवत नाही. ७५ हजार बारबालांचे रोजगार हा एकच मुद्दा त्यात आहे. रोजगार ही महत्वाची बाब असली तरीही-

१) डान्सबारमध्ये नाचणे वा मद्य पुरवणे एवढेच रोजगाराचे पर्याय आहेत का?

२) वरील पर्याय फार प्रतिष्ठा देणारा, सन्मानजनक वगैरे आहे का?

३) अन्य उद्योग बंद पडतात तेव्हा देखील हजारो लोक बेरोजगार होतात. ते वेगवेगळे पर्याय शोधतातच ना? बारबालांनी ते का करू नये?

४) या मुली वेगवेगळ्या ठिकाणांहून मुंबईत आलेल्या असतात. त्यांच्या त्यांच्या जिल्हा ठिकाणी त्यांनी काम का करू नये?

५) ७५ हजार मुलींचा workforce शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सेवा, सुरक्षा अशा अनेक बाबींसाठी उपयोगात येऊ शकतो. त्याऐवजी बारमध्येच काम करण्याचा या मुलींचा हट्ट का?

६) `आम्ही मुंबईत राहतो' हा बावळट आनंदाचा भाग, फार कौशल्य वा कष्ट न करता उन्मुक्त जीवन जगण्याची मानसिकता, जगण्यासाठी पैशाऐवजी पैशाची राक्षसी ओढ; या तीनच गोष्टींचा अडथळा आहे.

७) न्यायव्यवस्थेने वा सरकारने या तीन अडथळ्यांचा विचार करण्याची काय गरज?

८) न्यायालये कायद्याच्या चौकटीत काम करतात हे अगदी खरे. पण समाजाला युगप्रवर्तक निर्णयांची, त्याच्या आचारविचारात मुळापासून बदल घडवणाऱ्या निर्णयांची व कृतींचीही अधूनमधून गरज असते. कायद्याच्या पलीकडे गेल्याविना ते शक्य नसते. सर्वोच्च अधिकार असलेले पीठच जर कायद्यात अडकून पडत असेल तर युगप्रवर्तक चिंतन कोण करेल?

समाजातील सगळ्या सुबुद्धांना यावर विचार करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

भगिनी निवेदिता यांच्या पुस्तकांची यादी

आज वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने भगिनी निवेदितांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी.

1) Kali the Mother,

2) The Web of Indian Life,

3) Cradle Tales of Hinduism,

4) An Indian Study of Love and Death,

5) The Master as I Saw Him,

6) Notes of some wanderings with the Swami Vivekananda,

7) Select essays of Sister Nivedita,

8) Studies from an Eastern Home,

9) Myths of the Hindus & Buddhists,

10) Footfalls of Indian History,

11) Religion and dharma.

- श्रीपाद कोठे

१५ ऑक्टोबर २०१५

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (८)

सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक अशी ही त्रिविधा शक्ती ज्यातून आविर्भूत होते ती आत्मशक्ती. आत्मशक्ती म्हणजे माझी अर्जित शक्ती नाही. आत्मशक्ती म्हणजे माझ्या 'स्व'रूपाची शक्ती. या आत्मशक्तीची जाणीव, बोध, व्याप्ती, स्वरूप जेवढं आकलन होतं; तेवढ्या प्रमाणात सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक शक्तीकडे पाहण्याची; या तीन शक्तींच्या उपयोगाची; आमची भावना आणि क्षमता अधिक अर्थपूर्ण होते.

त्या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने कृतींना आणि विचारांना लेबल लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना price tag लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना वेगवेगळ्या कप्प्यात बंद करणे थांबते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एकांगीपण कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने स्वतःकडे तटस्थपणे पाहता येते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने जाळ्यात अडकणे किंवा फसगत होणे कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एखादी गोष्ट अमुक ठिकाणी वा वेळी योग्य का आणि दुसऱ्या ठिकाणी वा वेळी तीच गोष्ट अयोग्य का हे कळू लागते. जसे सहानुभूती. मी बाकीच्यांबद्दल सहानुभूती बाळगणे हेच योग्य असते, पण सहानुभूतीची अपेक्षा बाळगणे सर्वस्वी चूकच. हे फक्त एक उदाहरण. सगळ्याच गोष्टींचे असे अनेक कोन, आत्मशक्तीच्या प्रत्ययानंतर लक्षात येऊ लागतात.

म्हणूनच शक्तीचे संपादन, शक्तीची आराधना, शक्तीची उपासना; आत्मशक्तीच्या भक्कम आधाराशिवाय अपूर्ण  आणि अहितकर राहतात. या जगात सुखी आणि समाधानी राहायचे असेल, या विश्वात पूर्णता प्राप्त करायची असेल, या विश्वाला नंदनवन बनवायचे असेल, या विश्वाचा सुमेळ बसवायचा असेल; तर शक्तीची आराधना करावीच लागते. शक्तीची ही आराधना हितकर व्हावी यासाठी आत्मशक्तीचा ध्यास घ्यावा लागेल. त्यासाठी हवे आपल्या मर्यादित अस्तित्वाचे सीमोल्लंघन. शक्तीपूजेच्या नऊ दिवसांनंतर उद्या येणारे सीमोल्लंघन सकलांना आपल्या मर्यादित अस्तित्वाची सीमा लांघून अमर्याद आत्मशक्तीच्या वाटेकडे घेऊन जाणारे ठरो.

- श्रीपाद कोठे

१४ ऑक्टोबर २०२१

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

महिला समस्या

तीन चार वर्षांपूर्वीचा प्रसंग. एक महिला कार्यकर्त्या (स्वत: महिला आणि महिलांसाठी काम करणाऱ्या) एका प्रकरणाबद्दल सांगत होत्या. त्यांचं कथन झाल्यावर मी त्यांना विचारलं - नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्या घोटाळ्यात पडल्या. तेव्हा खुलासा करीत मी पुन्हा विचारलं- १) दोघात बेबनाव झाला आहे का? २) दोघांच्या wavelength जुळत नाहीत का? ३) अपेक्षापूर्ती न होण्याचा मामला आहे का? ४) तिसऱ्या कोणाची लुडबुड आहे का? ५) दुष्टपणा आहे का? यावर त्या नाराज झाल्या. म्हणाल्या- हा काय प्रश्न आहे? अन्याय म्हणजे अन्याय. न्याय मिळायलाच हवा. त्यावर मी म्हटले- दोघेही माणसे आहेत ना? त्या रागारागाने उठून निघून गेल्या.

आजच्या वातावरणात आणि चर्चेच्या महापुरात सहज स्मरण झालं.

- श्रीपाद कोठे

१३ ऑक्टोबर २०१८

शक्तीरूपेण संस्थिता (७)

हे विश्व शक्तीने ओतप्रोत आहे एवढंच नाही तर हे संपूर्ण विश्व हीच एक शक्ती आहे. विज्ञान सुद्धा एक प्रकारे हेच प्रतिपादन करतं. हे विश्व कशाचं बनलं आहे? हे विश्व ऊर्जा आहे की वस्तू? की सामान्य वस्तू (common matter), dark matter and dark energy? की एका महास्फोटातून हे विश्व जन्माला आलं? या सगळ्यांबद्दल असंख्य सिद्धांत आणि मतप्रवाह असले तरीही एक गोष्ट मात्र निश्चित की, या विश्वाचं आदिकारण हे शक्ती आहे आणि ती शक्ती अज्ञात आहे. महास्फोट झाला असेल तर कशाचा आणि कसा? Dark energy असेल तर तिचं स्वरूप काय? काहीही सांगता येत नाही. एवढंच सांगता येतं की या विश्वाच्या मुळाशी विलक्षण शक्ती आहे. हे सत्य व्यवहाराला लागू केलं की त्याची तर्कशुद्ध परिणती होते की, ती शक्ती आपण निर्माण केलेली नाही हे तर खरंच पण आपल्याला तिच्याबद्दल काही माहितीही नाही. म्हणजेच ती आपल्या मालकीची नाही. ती शक्ती आपली मालमत्ता नाही. अन हेच सत्य असेल आणि ते प्रामाणिकपणे मान्य करायचे असेल, स्वीकारायचे असेल तर आपल्या मनातली मालकीची भावना, स्वामित्वाची भावना पूर्ण टाकून द्यावी लागते. जी गोष्टच आमची नाही तिच्यावर हक्क कसा सांगता येऊ शकेल? तिची वाटणी कशी करता येऊ शकेल? तिच्यासाठी भांडणे, वाद आणि संघर्ष कसा करता येऊ शकेल? ईशावास्य उपनिषद या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हणतं, तर विज्ञान dark matter and dark energy. वेगळे शब्द यापलीकडे त्याला वेगळा अर्थ नाही. या आदिशक्तीची विश्वातील गोळाबेरीज तेवढीच असते. ती कमी होत नाही वा वाढत नाही. कमी करता येत नाही आणि वाढवता येत नाही. म्हणजेच प्रत्ययाला येणारं जग म्हणजे फक्त रूपांतरण असतं. त्यामुळेच आपला पुरुषार्थ, आपला वस्तू संग्रह, आपली possessions यांना फारसा अर्थ उरत नाही आणि त्यासाठीची धावपळ अर्थहीन ठरते. भारतीय आध्यात्मधारा तर विज्ञानाच्या पुढे जाऊन म्हणते - matter and energy या दोन वस्तू नाहीतच. ते फक्त एकाच तत्वाचं रूपांतरण आहे. दृश्य आणि अदृश्य याही दोन गोष्टी नाहीतच. त्याही एकाच तत्त्वाचे रूपांतरण असते. त्या आदिशक्तीची गोळाबेरीज म्हणजे हे विश्व. जे कधी दृश्य असतं तर कधी अदृश्य, कधी energy असतं तर कधी matter.

- श्रीपाद कोठे

१३ ऑक्टोबर २०२१

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

गंगाजल

आज सहज पाहिलं तर, विश्व हिंदू परिषदेने १९८० च्या दशकात काढलेल्या गंगाकलश यात्रेच्या वेळी घेतलेल्या गंगाजलाच्या बाटलीतील गंगाजल आजही स्वच्छ आहे. याचाच अर्थ किमान तोवर गंगा शुद्ध होती. तिच्या पाण्याची जादू कायम होती. सगळी घाण त्यानंतरची आहे.

जागतिकीकरणाचा परिणाम??

what next??

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

स्वामी सानंद गंगार्पित झाले. दु:ख स्वाभाविक आहे. पुढे-

- पाण्याची बाटली विकत घेणे बंद. घरून पाणी सोबत नेणे.

- कचरा कमी होण्यासाठी उपभोग आवश्यकतेच्या सीमेत आणणे.

- कचरा कमी होण्यासाठी आवरणाचा मोह सोडणे.

- सांडपाणी मातीत मुरेल याची काळजी घेणे.

- अधिकाधिक माती/ जमीन मोकळी राहील याचा प्रयत्न करणे.

- विजेचा गैरवापर थांबवणे.

- वस्तूंकडील धाव कमी करणे.

- मातीवर प्रेम करायला शिकणे.

- पंच महाभूतांवर वर्चस्व गाजवण्याचा हट्ट टाकून देऊन त्यांच्यावर प्रेम करायला शिकणे.

- `अं, काय होते? मी करून काय होईल?' याऐवजी विचार आणि कृती करण्याचा प्रयत्न करणे.

- माझी क्षमता, माझी परिस्थिती फुटभर माती मोकळी ठेवू शकत असेल तर तेवढी हिमतीने मोकळी ठेवणे.

- योग्य गोष्ट करताना निर्लज्ज होणे.

- प्रदूषण करणारे जे जे आहे ते कमी करणे आणि टाकून देणे. (धूम्रपान, प्रसाधने आदी)

असं काही केलं तर दु:खाला अर्थ राहील.

@@@@@@@@@@@@@@@@

- श्रीपाद कोठे

१२ ऑक्टोबर २०१८

शक्तीरूपेण संस्थिता (६)

सर्वमंगला शक्तीसाठी सद्भाव आवश्यक असतो. परंतु सद्भावांची कठोर परीक्षा पाहणारे क्षण अनेकदा आणि वारंवार येत असतात. कधी स्वतःच स्वतःची परीक्षा घेण्याचा प्रसंग येतो. अशा वेळी परीक्षा टाळण्याची प्रवृत्ती मोठी असते. पुष्कळदा अशा परीक्षेची कारणमीमांसा करण्याची वृत्ती असते. अनेकदा स्वच्छपणे परीक्षेला सामोरे जाऊनही, समजून उमजून परीक्षा अनुत्तीर्ण व्हावे लागते. जगाची आणि जीवनाची रीत लक्षात घेऊन हे सगळे समजूनही घेता येते. समजून घ्यावे लागते. त्यात वावगेही काही नसते.

याव्यतिरिक्त परिस्थितीदेखील सद्भावांची परीक्षा घेण्यात आघाडीवर असते. स्वतःला स्वतःची परीक्षा घ्यावी आणि द्यावी लागते तेव्हा काही गोष्टी आपल्या हाती असतात. त्यामुळे ती परीक्षा, आपण प्रामाणिक असू तर, तुलनेने सोपी असते. परिस्थिती जेव्हा सद्भावांची परीक्षा घेते तेव्हा मात्र आपल्या हाती फार काही नसते. त्यामुळे ती परीक्षा कठीण असते. अशा वेळी सद्भाव कायम ठेवून सर्वमंगला शक्तीचा आविष्कार ही एक साधनाच असते.

महाभारत युद्ध आणि भगवद्गीता हे या बाबतीत कालजयी उदाहरण आहे. युद्धातून पळ न काढणे, संघर्षाला पाठ न दाखवणे; हा गीतेचा संदेश आहे हे तर खरेच; पण तो संदेश नीट समजून घ्यायला हवा. एक लक्षात घ्यायला हवे की, पांडवांवरील अन्यायामुळे महाभारत युद्ध घडले. परंतु गीतेत श्रीकृष्णाने कुठेही त्याचा उल्लेखही केलेला नाही. अर्जुनाला युद्धप्रवृत्त करताना श्रीकृष्णाने कुठेही कौरव पांडव यांच्यातील वाद आणलेला नाही. गीतेत आत्मबोध सांगितला आहे, विश्वरूप दर्शन घडवले आहे. आणि या आत्मदर्शनाने झालेल्या उपरतीनंतर अर्जुन युद्धाला उभा झाला आहे. कोणत्याही युद्धाआधी हे आत्मदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय जो संघर्ष होईल त्यात अहंकार, स्वार्थ आणि विकार मिसळलेले राहतील. असा संघर्ष भूषणावह नाही. कारण तो लोण्याच्या गोळ्यासाठी दोन बोक्यांचा संघर्ष असेल. म्हणूनच कोणत्याही संघर्षाआधी संभ्रम निर्माण व्हायलाच हवा. अन त्या संभ्रमातून आत्मबोध हवा. नाही तर आले मनात अन केला संघर्ष असा प्रकार कधीच योग्य नसतो. गीतेचाही तो सांगावा नाही. संघर्ष हा सहनशीलता कमी पडली म्हणून नसावा, तो सत्य रक्षणासाठी असावा. अन आत्मबोधाशिवाय सत्यदर्शन शक्य नाही. संघर्षापासून दूर पळणे योग्य नसते पण हरघडी संघर्षसिद्ध असणेही योग्य नसतेच. संघर्षातील शक्तीचा आविष्कार सर्वमंगल होण्यासाठी संघर्षाआधी आत्मबोध आवश्यक ठरतो.

गीतेचा आणखीन एक संदेश आहे. 'यतो धर्मस्ततो जय:'. जिथे धर्म असेल तिथे जय असतो. पांडवांकडे धर्म (धर्मराज) होता म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने होते. धर्माची संघर्षक्षमता विशेष नव्हती. युद्धाच्या दृष्टीने तो कमकुवत होता. युद्धाची वेळ देखील धर्मामुळेच आली होती. तरीही पांडवांच्या मनात धर्माबद्दल अनास्था, अनादर नव्हता. त्यांनी धर्म सोडला नव्हता. त्यामुळेच संख्या आणि साधनांमध्ये कमी असूनही पांडवांचा पक्ष जिंकला. धर्म म्हणजेच संतुलन शक्ती. ही संतुलन शक्ती असेल तर आणि तरच ईश्वर साथ देतो आणि शक्तीचा सर्वमंगल आविष्कार होतो.

 - श्रीपाद कोठे

१२ ऑक्टोबर २०२१